November 29, 2015, 2:30 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
आवक वाढल्याने मेथी, कोथिंबीर, शेपू, पालक, कांदापात या पालेभाज्यांच्या दरात घसरण झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. टोमॅटोचे दरही दहा रुपयांनी कमी झाले आहेत. महागलेल्या डाळी घेणे परवडत नसल्याने हिरव्या पालेभाज्यांचे दर कमी झाल्याने गृहिणींची चिंता काही अंशी कमी झाली आहे.
नोव्हेंबर महिन्यातील तिसऱ्या आठवड्यापासून पालेभाज्यांची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या महिन्यात पालेभाज्यांचे दर गगनाला भिडले होते. मेथी, कोथिंबीरची जुडी पन्नास ते साठ रुपयांपलीकडे गेली होती. यामुळे सर्वसामान्यांच्या आहारातून या भाज्या हद्दपार झाल्या होत्या. मात्र, या महिन्यात पालेभाज्यांचे दर बऱ्यापैकी आवाक्यात आले आहेत. या भाज्यांच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. रविवारी मेथीची जुडी ८ ते १५ रुपये तर, कोथिंबीरची जुडी ३ ते ८ रुपयांनी विकली गेली.
टोमॅटोचे दरही गेल्या आठवड्यात वाढले होते. सुमारे ३५ ते ४० रुपये किलोप्रमाणे टोमॅटोची विक्री होत होती. मात्र त्याच्या किमतीतही दहा रुपयांनी घसरण झाली आहे. कांदापातचे दरही पाच रुपयांनी कमी झाले आहेत. शेपू सहा ते आठ रुपये जुडी तर पालक मातीमोल भावात विकला जात आहे. यामुळे शेतकरी नाराज असले तरी ग्राहक मात्र समाधानी आहे. वांगे, दोडके, कारले, गिलके यांचे दर अजूनही पन्नाशीच्या आत-बाहेर आहेत. कोबी-फ्लॉवरचे दर जैसे थे आहेत.
कांदा घसरला
बाजारात लाल कांद्याची आवक वाढल्याने दरावर परिणाम झाला आहे. या आठवड्यात कांदा दोन हजाराच्या खाली आला आहे. यामुळे किरकोळ बाजारातही १५ ते २० रुपये किलाप्रमाणे कांद्याची विक्री होत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
November 29, 2015, 2:30 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
बाजारात अॅपल बोर, कडाखा, उमराण या बोरांची आवक वाढली आहे. यामुळे तोंडाला पाणी आणणारे बोरं वीस ते पत्तीस रुपये किलोप्रमाणे मिळत आहेत. सध्या मागणीही कमी असल्याने दर कमी आहेत. सीताफळ व पपईची आवकही चांगली असून दर जैसे थे आहेत.
साधारणतः जूनमध्ये झाडांना पाणी दिल्यानंतर चार महिन्यांनी फळ परिपक्व होऊन बाजारात दाखल होते. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बोरांची आवक वाढली आहे. अॅपल बोर गेल्या महिन्यापासूनच बाजारात दाखल झाले आहे. मात्र, आता कडाखा व उमराण या जातीची गोड गोड बोर बाजारात दाखल झाल्याने खाणाऱ्यांच्या तोंडाला पाणी आणत आहेत. पपईची आवक वाढूनही तीस रुपये भाव जैसे थे आहे. सीताफळाचे दरही टिकून आहेत. चिकूचे दरही थोडे कमी झाले असून साठ रुपये किलो दराने मिळत आहेत. डहाणू भागातून मोठ्या प्रमाणात चिकूची आवक होत आहे. सफरचंदचे दरही जैसे थे आहेत. अॅपल बोरांची आवक वाढल्याने वीस ते तीस रुपये किलो दराने मिळत आहेत. डाळिंबाची आवक वाढू लागली असून दरात घसरण झाली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 29, 2015, 1:30 pm
म. टा. प्रतिनिधी, पंचवटी
महिलांचे सक्षमीकरण करणे काळाची गरज आहे. समाजात वावरतांना आणि इतर व्यवसाय करतांना महिलांना अनेक समस्या जाणवतात. महिलांना खंबीरपणे व्यवसायात संधी शोधता आल्या पाहिजे, त्यांची मानसिकता बदलली पाहिजे, सर्व प्रकारचे काम सहज आणि सुलभ पद्धतीने करता आले पाहिजे, अशा अनेक बाबींवर इनरव्हील क्लब ऑफ नाशिकच्या राज्य परिषदेत विचार मांडण्यात आले.
आडगाव नाका येथील श्री स्वामी नारायण मंदिरातील सभागृहात दोन दिवसीय परिषद झाली. यावेळी इनरव्हीलच्या राष्ट्रीय अध्यक्षा अंजली जाधव, ममता अग्रवाल, राज्यस्तरीय अध्यक्षा प्रेरणा बेळे यांच्यासह मराठी अभिनेत्री आदिती सारंगधर, उषा दीदी, अमी सेठ आदींनी विविध विषयावर मार्गदर्शन केले.
महिलांनी महिलांसाठी घेतलेल्या या परिषदेत अनेक महिलांनी विविध प्रदर्शनीय वस्तूंचे प्रदर्शन भरविले.
परिषेदत संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. यात राज्य अध्यक्षपदी प्रेरणा बेळे यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणीच्या अन्य सदस्यांमध्ये जुलेखा शुक्ल, संगीता घोडगांवकर, गौरी धोड, आरती चौधरी, वैजयंती पाठक (उपाध्यक्षा), अंजली जाधव (क्लब अध्यक्षा), मृदुला जाधव, सुशीला चंद्रशेखर, मधुरा पारखी, कांचन निकम, डॉ. अश्लेषा पाटेकर, पूजा जोशी, लता पिल्लई, आशा पगार आदींचा समावेश आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 29, 2015, 12:30 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नाशिक-पुणे आणि पुणे-नाशिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्होल्वो बसेसपैकी दोन बसेसची किलोमीटर क्षमता संपल्याने त्या सेवेतून बाद करण्याचा निर्णय राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतला आहे. मात्र त्या बदल्यात अद्ययावत वातानुकुलीत चार स्कॅनिया बसेस महामंडळाच्या ताफ्यात दाखल होत असून, नववर्षाच्या सुरूवातीला ही बससेवा सुरू होईल, अशी माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.
एकपदरी रस्त्यामुळे नाशिक-पुणे प्रवास नागरिकांना कंटाळवाणा वाटतो. रस्ता रुंदीकरणाचे काम प्रगतीपथावर असले तरी ते पुर्ण होण्यासाठी आणखी काही काळ जाऊ द्यावा लागणार आहे. हा प्रवास सुलभ व्हावा यासाठी या मार्गांवर व्हॉल्वो बसेस चालविल्या जातात. दोन्ही बाजूने व्हॉल्वो बसेसच्या प्रत्येकी तीन फेऱ्या होतात. मात्र यातील काही बसेस मार्गात बंद पडण्याचे, नादुरूस्त होण्याचे प्रकार घडू लागल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडे प्रवासी वळू लागले. महामंडळाच्या ताफ्यात असलेल्या आणि गेली अनेक वर्ष पुणे-नाशिक दरम्यान सेवा देणाऱ्या दोन व्हॉल्वो बसेसने किलोमीटरची मर्यादा ओलांडल्याचे महामंडळाच्या निदर्शनास आले. म्हणूनच त्या प्रवाशांना सेवा देण्यासाठी पूर्वी इतक्या उपयुक्त ठरत नसल्याचे महामंडळातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
परिणामी नाशिक आणि पुणे अशा दोहो बाजूकडील प्रत्येकी एक व्हॉल्वो बस बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यांचे तिकीट आरक्षणही बंद करण्यात आले आहे. प्रवाशांचा प्रतिसाद आणि त्या तुलनेत अपुऱ्या ठरणाऱ्या बसेस यांमुळे प्रवाशांची गैरसोय देखील होत आहे. मात्र ती टाळण्यासाठी अशाच प्रकारच्या लक्झरीयस स्कॅनिया बसेस खरेदी करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. या बसेस नववर्षाच्या सुरूवातीला प्रवाशांच्या सेवेत रूजू होतील असा विश्वास अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे. दोन व्हॉल्वो बसेसची सेवा बंद करण्यात आली असली तरी चार नवीन बसेस दाखल होणार असल्याने नाशिक पुणे आणि पुणे नाशिक यादरम्यान एकूण आठ अशा लक्झरीयस बसेस सेवा पुरवू शकणार आहेत. नाशिक ते मुंबई आणि नाशिक ते औरंगाबाद दरम्यानही अशा प्रकारची सेवा पुरवायला हवी अशी प्रवाशांची मागणी आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 29, 2015, 1:30 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
'वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजणारे आम्ही आहोत', असे वक्तव्य करून मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी अलिकडेच टाळ्या मिळविल्या. ही वाक्य फडणवीसांच्या तोंडी शोभत नाहीत. दात मोजण्याचे कॉन्ट्रॅक्ट आता ते घेऊ लागले तर मग बेराजगार झालेल्या मराठ्यांनी वाटीत चणे घेऊन चावत बसायचे का? अशी खोचक टीका आमदार नितेश राणे यांनी रविवारी केली.
मराठा एकीकरण समितीच्या वतीने आयोजित मराठा आरक्षण एल्गार मेळाव्यासाठी राणे नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस, विनायक मेटे यांच्यासह अनेकांवर सडकून टीका केली. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत फडणवीस आणि उध्दव ठाकरे यांच्यात वाद उदभवला. आवेशात भाषण करताना फडणवीस यांनी वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजणारे आम्ही आहोत असे वक्तव्य केले. मराठ्यांचे काम फडणवीस केव्हापासून करू लागले असा सवाल राणे यांनी उपस्थित केला. वाघ वगैरे म्हणणे हे बाळासाहेब ठाकरेंपुरते ठीक होते. पण फडणवीस यांनी हे काम आपल्याकडे घेऊन तमाम मराठा समाजालाच बेरोजगार केल्याचा टोला राणे यांनी लगावला. आमदार विनायक मेटेंवरही यावेळी राणे यांनी तोफ डागली. शिवाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती पसरविणाऱ्या पुरंदरेंच्या सत्कार सोहळ्यात मेटे पुढच्या रांगेत बसतात, याचा यावेळी निषेध नोंदविण्यात आला.
माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनीही यावेळी माजी मंत्री छगन भुजबळ, मधुकर पिचड यांच्यावर टीका केली. आपण संख्येने अधिक आहोत, म्हणूनच विखुरले गेले आहोत. त्यामुळे आपल्यात ताकद आणि क्षमता असूनही ती कमी झाल्याची खंत पिचड यांनी व्यक्त केली. आपण विरोधकांची जास्त दखल घेतो, हेच चुकते. मराठा आरक्षण आणि तत्सम कारणांसाठी निवेदन देण्यासाठी का म्हणून भुजबळ, पिचड यांना भेटायचे? आपल्याला मराठा नेते दिसत नाहीत का असा सवाल कोकाटे यांनी उपस्थित केला. प्रत्येकजण कर्नल बनू पहात असेल तर सैन्य बनून लढायचे कुणी असा सवालही त्यांनी विचारला. नितेश राणे माझ्यापेक्षा वयाने लहान असले तरी त्यांचे नेतृत्व मला मान्य असल्याचे कोकाटे यावेळी म्हणाले.
प्रक्षोभक भाषण अन् गोंधळ
मराठा आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष अविनाश खापे यांनी मनसे नेते राज ठाकरे, माजी मंत्री छगन भुजबळ यांचा एकेरी उल्लेख करीत त्यांच्यावर टीकेची तोफ डागली. मात्र, त्यास एका ज्येष्ठ नागरिकाने आक्षेप घेतला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. त्या ज्येष्ठ नागरिकाने व्यासपीठाकडे धाव घेतली. परंतु, त्यांना लगेच अडविण्यात आले. 'तुम्ही अपशब्द वापरू नका' असे आवाहन त्यांनी केले. मात्र, 'आम्ही कुणाला भीत नाही. आमचे मत परखडपणेच मांडू' असा इशारा देत ज्येष्ठ नागरिकाला प्रत्युत्तर देण्यात आले. राणे यांनाही या ज्येष्ठ नागरिकाने विरोध केला. मात्र, पुरंदरेना पुरस्कार देतेवेळी अशी विरोध करण्याची हिंमत का दाखविली नाही, असा सवाल राणे यांनी उपस्थित केला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
November 29, 2015, 11:58 am
म. टा. प्रतिनिधी, सातपूर
नाशिक शहराचा समावेश स्मार्टसिटीत केला असला तरी शहर सुंदर व्हावे यासाठी विशेष प्रयत्न होताना दिसत नाहीत. शहर परिसरातील अनधिकृत अतिक्रमणे हटविणार कोण असा सवाल नाशिककर विचारत आहेत. त्यात 'फक्त पावती फाडा आणि व्यवसाय करा' असे जाहीर रस्ता परवाने मिळत असल्याने त्र्यंबकेश्वर रस्त्यालगत बाजार थाटले जात आहेत. याचा त्रास वाहनचालकांना होत असून, शहराचे रूपडे गलिच्छ होत असल्याची नाराजी नागरिक व्यक्त करतात.
महापालिकेची वीस, तीस रुपयांची पावती फाडा अन् रस्त्यावर व्यवसाय करा अशीच अवस्था शहरातील अनेक भागात पहायला मिळत आहे. त्र्यंबकेश्वररोडवर अनधिकृत बाजार दररोजच पहायला मिळतो. यात महापालिकेचे कर्मचारी केवळ पावती फाडण्यातच आपली धन्यता मानतात. यात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे भले होत असल्याने यावर कारवाई करणार कोण असा सवाल उपस्थित होत आहे.
कोणताही व्यवसाय करताना व्यवसायिकाला गाळा विकत किंवा भाड्याने घ्यावा लागतो. त्यातच शासनाचे सर्व प्रकारचे कर भरून व्यवसायाला परवानगी मिळते. परंतु शहरातील मुख्य रस्त्यांवर महापालिकेची वीस, तीस रुपयांची पावती फाडून व्यवसाय करणाऱ्यांवर अतिक्रमण विभाग कारवाई का करत नाही. याचा फटका इतरांना बसतो.
- शोभा नाईकवाडे,
कापड दुकान व्यवसायिक
प्रत्येक रस्त्यांवर असे व्यवसाय करणारे वाढले आहेत. एकिकडे महापालिका आयुक्त शिस्त लावण्यासाठी गंगापूररोडवर अतिक्रमण मोहीम राबवितात. परंतु या रस्त्यावर महापालिकेची पावती फाडली जात असल्याने या व्रिक्रेत्यांकडे दुर्लक्ष केले जाते. याकडे महापालिका आयुक्तांनी लक्ष घालण्याची गरज आहे.
- जमिल पठाण,
बूट दुकान व्यवसायिक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 29, 2015, 1:30 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नोव्हेंबरच्या प्रारंभीपासून थंडीचा कडाका वाढीस लागल्याने नाशिककरांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढीस लागल्या आहेत. दुपारी ऊन व रात्री थंडी अशी परिस्थिती सध्या शहरात असल्याने दवाखान्यांच्या पायऱ्या चढणार्यांची संख्येत वाढ झाल्याचे चित्र दिसते आहे.
गेल्या आठवड्यापासून थंडीचा पार सातत्याने खाली उतरत आहे. रात्री थंडी व दुपारी कडक ऊन्हाचा सामना शहरवासियांना करावा लागत आहे. याचा परिणाम शरीरावर होत असून, आरोग्यविषयक तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. ताप, सर्दी, खोकला अशा तक्रारींमध्येही त्यामुळे वाढ झाली आहे. थंडीमुळे सांधेदुखीवरही परिणाम होत असल्याने सांधेदुखीच्या त्रासालाही अनेकांना सामोरे जावे लागत आहे. यंदा सातत्याने अनियमित पावसाला सामोरे जावे लागत असल्याने त्याचा परिणामही थंडीवर झाला आहे. हवामानाच्या चक्रामुळे आहार, विहार, सेवन सर्वच बाबतीत काळजी घेणे व पथ्य पाळणे गरजेचे झाले आहे.
थंडीचा सामना करण्यासाठी व आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने उबदार कपड्यांनाही मागणी वाढली आहे. शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये स्वेटर खरेदीसाठी गर्दी होत आहे. येत्या काळात थंडीत आणखी वाढ होणार असल्याचे मत हवामान खात्यानी व्यक्त केले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 29, 2015, 1:30 pm
नाशिक : पथदीपांवरील दिव, फोनची अथवा ओएफसी केबल अशा सार्वजनिक मालमत्तेची चोरी झाल्याची घटना ऐकू येतात. मात्र, पंचवटीमधील अमृतधाम परिसरात चक्क ड्रेनेजच्या झाकणाची चोरी करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
अमृतधाम परिसरात अग्निशमन दलाची इमारत आहे. या इमारतीजवळ गटारी झाकण्यासाठी ड्रेनेजवर सिमेंटची झाकणे टाकण्यात आलेली आहे. मात्र, गेल्याच आठवड्यात यापैकी काही झाकणांची चोरी करण्यात आली आहे.
ड्रेनेजची झाकणे चोरण्यामागचा हेतू काय असावा, असा प्रश्न अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांसह नागरिकांनाही पडला आहे. अन्यत्र ड्रेनेजचे खड्डे झाकण्यासाठी किंवा झाकण तोडून त्यातील लोखंडी गज भंगारमध्ये विकण्यासाठी त्या झाकणांची चोरी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 29, 2015, 12:20 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सूरबहार या दुर्मिळ वाद्याचे माधुर्य, त्याच्या सूरश्रवणातील दुर्मिळता, त्याला मिळालेली पखवाजाची संगत व त्यानंतर झालेले दमदार शास्त्रीय गायन याची अनुभूती नाशिककरांना आली.
निमित्त होते शंकराचार्य न्यासाचा सांस्कृतिक विभाग व नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्टस् (एनसीपीए, मुंबई) तर्फे आयोजित 'युवा संगीत महोत्सवा'चे. या दोनदिवसीय महोत्सवाचा रविवारी समारोप झाला. शंकराचार्य संकुलाच्या डॉ. कुर्तकोटी सभागृहात हा महोत्सव पार पडला.
जयपूर येथील ख्यातकीर्त सतारवादक व गुरू पंडित अरविंद पारीख यांचे शिष्य सूरबहार वादक अश्विन गवळी यांनी यावेळी सुश्राव्य वादन घडवून आणले. सुमारे पंचवीस ते तीस वर्षांनंतर नाशिककरांनी या वाद्याचा आविष्कार अनुभवला. सितारासारखे दिसणारे हे वाद्य अद्यापही अप्रचलित असून देशात केवळ तीन ते चारच सूरबहार वादक आहेत. यामुळे रुद्रवीणेसारख्या सूरबहार वाद्याची रचना करण्यात आली. रुद्रवीणेप्रमाणेच स्वर असणाऱ्या या वाद्याचे ज्ञान मग शिष्यांना दिले जाऊ लागले, असे यावेळी अश्विन गवळी यांनी सूरबहारची माहिती देताना सांगितले. त्यातील ख्याल व बीन हे अंग प्रचलित असल्याचेही त्यांनी वाद्याची ओळख करुन देताना सांगितले. यानंतर आलाप, जोड आलाप यांचे सादरीकरण त्यांनी केले. पखवाजच्या साथीने रागदरबारी रागातील दोन बंदिशी सादर केल्या. चौतालमधील पारंपरिक बंदिश व सूरतालमधील बंदिशींचा त्यात समावेश होता. सुखद मुंडे यांनी पखवाजची संगीतसाथ दिली. गायक पंडित अजय चक्रवर्ती यांचे शिष्य ब्रजेश्वर मुखर्जी यांचे शास्त्रीय गायन झाले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
November 29, 2015, 1:30 pm
म. टा. प्रतिनिधी, सिडको
विल्होळी शिवारातील एका कंपनीने कंपनीच्या बाहेरील १५ झाडांची नुकतीच कत्तल केली. यात विल्होळी ग्रामपंचयातीने झाडांची कत्तल करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. याबाबत वृक्षप्रेमींनी देखील कंपनी व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
विल्होळी शिवारात असलेल्या एका कंपनीत व्यवस्थापनाने परवानगी न घेता पंधरा झाडांची कत्तल केल्याने विल्होळी ग्रामपंचायतीने विरोध केला आहे. यात कंपनी व्यवस्थापनाने प्रवेशद्वाराबाहेर असलेली १५ झाडांची कत्तल केली. त्यामुळे विल्होळी ग्रामस्थांनी कपंनी व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याची दखल वृक्षप्रेमींनी घेतली आहे. पोलिस व वनविभागाला झाडांची कत्तल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
विल्होळीत असलेल्या कंपनीत कंपनी व्यवस्थापनाने रस्त्यावरील झाडे तोडण्याचे कारणच काय? झाडांची कत्तल करणाऱ्या कंपनी व्यवस्थापनावर कारवाई झालीच पाहिजे; अन्यथा ग्रामस्थांना घेऊन जनआंदोलन छेडण्यात येईल.
- बाजीराव गायकवाड,
सरपंच, विल्होळी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 29, 2015, 12:24 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
भरधाव वेगात जाणारी दुचाकी स्लिप होऊन झालेल्या अपघातात चेतनानगर परिसरातील साईराम अपार्टमेंटमध्ये राहणारा सुभाष भास्कर गायकवाड (२४) हा तरूण मृत्युमुखी पडला. अपघाताची घटना शुक्रवारी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास त्र्यंबकरोडवरील महाराष्ट्र पोलिस अकदामीसमोर घडली होती. रस्त्यावर पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या सुभाषवर उपचार सुरू असताना तो मृत्युमुखी पडला. याप्रकरणी जेलरोड परिसरातील इंगळेनगर येथे राहणारा दुचाकीचालक अमित अशोक फडवळ (२३) याच्याविरोधात गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पीएसआय सरीता जाधव करीत आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 29, 2015, 1:30 pm
प्रशांत धिवंदे, देवळाली कॅम्प
वाढदिवस म्हणजे मित्रमंडळींसोबत मौजमजा, ओल्या सुक्या पार्ट्या, फटाक्यांची आतषबाजी अन् यातून पैशांचा चुराडा असे चित्र आता काही नवीन राहिलेले नाही. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींकडून तर स्वत:ची ऐट मिरविण्यासाठी वाढदिवस वा अन्य कारणांसाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो. मात्र, नाशिकपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बेलतगव्हाण येथील तरुणाने वाढदिवसानिमित्त थेट स्मशानभूमीमध्ये स्वखर्चातून कामे केली आहेत.
नाशिक तालुक्यात असलेल्या आणि देवळालीजवळ दारणा नदीकाठी वसलेले बेलतगव्हाण गाव तसे कायमचं विविध समस्यांच्या गर्तेत अडकलेले गाव. परंतु, येथील ग्रामपंचायत सदस्य वा अन्य सामाजिक-राजकीय क्षेत्रातल व्यक्तींनी कधील सामाजिक उपक्रम राबविले नाहीत. गावाच्या स्मशानभूमीत तर पाय ठेवणेही कठीण व्हावे, अशी परिस्थिती. गेल्या काही वर्षांपासून स्मशानभूमीत चिता रचण्यासाठी असलेल्या चारपैकी खांब तुटलेले होते. त्यामुळे शव जाळण्यासाठी अडचण निर्माण होत होती. तीच अडचण विचारात घेऊन गावातील सूरज धुर्जड या युवकाने स्मशानभूमीतील खांब नव्याने बसविले. सर्वच लोखंडी साहित्याला स्वखर्चाने रंगरंगोटी केली आणि स्मशानभूमीला नवे रूप देण्याचा प्रयत्न केला. सूरजला या कामासाठी धीरज पाळदे, कपिल माळोदे, दीपक पागेरे, सचिन पाळदे, राजेश धुर्जड या युवकांचे सहकार्य मिळाले.
माणसाची जीवनयात्रा संपल्यानंतर त्याचा अखेरचा प्रवास नीट आणि असुविधांपासून मुक्त व्हावा, या प्रामाणिक हेतूने हे कार्य केले. यासाठी मला मित्रमंडळींचे सहकार्य लाभले.- सूरज धुर्जड
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 29, 2015, 12:26 pm
... म्हणे मोबाइल पेटला !
काही माणसे टोकाची व्यवहारी नसतात, अशा माणसांना व्यवहारी माणसे 'वेंधळी' असं संबोधतात. अशा वेंधळ्या माणसांची खासगी आयुष्यात धांदल उडतेच, पण त्यांच्यामुळे इतरांच्याही आयुष्यात धांदलही उडू शकते. असाच एक वेंधळा रसिक सांस्कृतिक कार्यक्रम बघण्यासाठी एका नाट्यगृहात गेला. खिशातला नवा कोरा मोबाइल जपण्यावर त्याचा विशेष कटाक्ष होता. त्याचा मोबाइल नवा असावा असा अंदाज शेजारील रसिकाला आला. कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रम रंगात येत असतांना त्याचा नव्या मोबाइलच्या फंक्शन्सशी मैत्री करण्याचा चाळा सुरू होता. शेजारील प्रेक्षकांनी हटकल्यानंतर त्याने गुमान मोबाइल खिशात कोंबला. पण काही क्षणातच त्याच्या खिशातल्या मोबाइलची रिंगटोन जोरात वाजू लागली. त्याने खिशातून झटपट मोबाइल बाहेर काढून हवेत फेकत 'मोबाइल पेटला, मोबाईल पेटला' अशा आरोळ्या देण्यास सुरुवात केली. तो प्रकार पाहून भोवतालचे रसिकही घाबरले. काही क्षण उलटूनही पेटलेल्या मोबाइलचा स्फोट होईना, म्हणून त्याची थोडीशी भीड चेपली. पेटता मोबाइल हातात घेऊन बघताच आपल्या मोबाइलला अलार्म वाजल्यानंतर भोवताली पिवळ्या धमक रंगाचे लाईट लागण्याचे फंक्शन आहे, याची नव्याने माहिती झाली. त्यामुळे मोबाइल पेटला नसून आपणच विनाकारण सेट केलेल्या अलार्मने बेल दिल्यानंतर त्याचे नवे कोरे लाईट लागल्याचा साक्षात्कार झाला अन् त्यासोबतच नाट्यगृहातील भोवतालच्या प्रेक्षकांचाही जीव भांड्यात पडला.
शब्दांकन : जितेंद्र तरटे
नाथाभाऊ
चाललंय काय?
राजकारणात कार्यबाहुल्य असणारी व्यक्ती एखाद्या कार्यक्रमाची प्रमुख अतिथी असल्यास उपस्थितांच्या संयमाची कशी परीक्षा पाहीली जाते, हे वेगळे सांगायला नको. प्रत्येकानेच कधी ना कधी त्याचा अनुभव घेतला असेल.
लेवा समाजाने आयोजिलेल्या वधू-वर परिचय मेळाव्यासाठी दादासाहेब गायकवाड सभागृहात वधूवर आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने एकत्रित जमले होते. सकाळी दहाचा कार्यक्रम असला तरी दुपारी एक वाजेनंतरही व्यासपीठावरील मान्यवरांचे सत्कार समारंभच सुरू होते. राज्याचे दस्तुरखुद्द महसूलमंत्री आणि जळगाव जिल्ह्यातील पॉवरफुल नेते नाथाभाऊ खडसे कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असल्याने सत्कारार्थींच्या यादीला अंत नव्हता. हनुमानाच्या शेपटाप्रमाणे ही यादी वाढतच चालली होती. त्यामुळे हळूहळू टाळ्यांचा आवाजही क्षीण होत गेला. सत्कार समारंभ तसेच काही मान्यवरांची भाषणे आटोपल्यानंतर अखेर खडसेंनी माईकचा ताबा घेतला. पोवाडा ऐकतानाच सभागृहातील लोकांच्या चेहऱ्यावरील कंटाळवाणे हावभाव त्यांनी अचूक टिपले होते. तोच धागा पकडून त्यांनी भाषणाला सुरूवात केली. हा केवळ वधु-वर मेळावा नव्हे तर बहुउद्देशीय मेळावा असल्याची माझी खात्री पटल्याचे ते म्हणताच सभागृहात हशा पिकला. एकतर तरुण पिढी येथे आयुष्याचा जोडीदार शोधण्यासाठी उत्सुक आहे. अशा परिस्थितीत प्रदीर्घ लांबलेला हा सत्कार सोहळा पाहून ते म्हणत असतील नाथाभाऊ, आम्ही आलोय कशासाठी आणि येथे चाललंय काय? हे ऐकताच पुन्हा सभागृहात हास्याचे कारंजे उडाले.
शब्दांकन : प्रवीण बिडवे
तेल लावा,
केस येतील!
नाशिकमध्ये नुकतेच एक प्रदर्शन लागले होते. खरेदीसाठी ग्राहकांचा येथे प्रचंड ओघ होता. या प्रदर्शनात एक स्टॉल लागला होता. टक्कल असलेल्या माणसांनी त्यांच्याकडील तेल लावले तर केस येतील, अशी ग्वाही इथे दिली जात होती. नेमकी या स्टॉलसमोरुन एक टक्कल असलेली व्यक्ती चालली होती. विक्रेत्यानी त्याला आवाज देऊन देऊन बोलावले. एवढ्या गर्दीत हा विक्रेता आपल्या डोक्यावर केस नाही, पाहून आवाज देतोय हे समजल्याने तो माणूस भलताच ओशाळला. लोकंही त्याच्याकडे पाहू लागले. कसातरी तो त्या विक्रेत्याजवळ गेला. तेल कसं उपयुक्त आहे, हे ऐकून घेतलं. त्याला काहीही प्रश्न न विचारता हळूच इकडे तिकडे पाहत शांततेत ते विकतही घेतलं अन् गप्पगुमान निघून गेला.
इकडे विक्रेत्याने चांगलाच डाव
साधला. तेलाची एक बाटली विकली गेली म्हणून विक्रेत्याच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं.
शब्दांकन : अश्विनी कावळे
देवाण घेवाण
बुकेची
सध्या सांस्कृतिक कार्य संचलनालयातर्फे परशुराम साइखेडकर नाट्यगृहात राज्य नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने आयोजकांतर्फे नाटकाच्या दिग्दर्शकांचा किंवा संस्थेच्या प्रमुखाचा सत्कार करण्याचा नवा पायंडा पाडण्यात आला आहे. शनिवारी झालेल्या नाटकाच्या वेळी दिग्दर्शकांचा सत्कार अमुकअमुक असे करतील, अशी माईकवरून घोषणा करण्यात आली. घोषणा करताच भांबावलेल्या दिग्दर्शकाने बुके घेऊन येणाऱ्याच्या हातूनच आपला सत्कार स्वीकारला. ज्याच्या हातून सत्कार होणार होता तो स्टेजवर येताच त्याला कळेना काय झाले ते. तेवढ्यात दिग्दर्शकाला आपली चुक कळली की आपण मघाशी जो सत्कार स्वीकारला तो बुके घेऊन येणाऱ्याच्या हातून. खरा सत्कार करणारा तर स्टेजवर आहे. मग मात्र फोटोसाठी पुन्हा एकदा बुकेची देवाणघेवाण झाली. यामुळे मात्र दोन मिनीट का होईना प्रेक्षागृहात हशा पिकला.
शब्दांकन : फणिंद्र मंडलिक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
November 29, 2015, 11:30 am
म.टा.प्रतिनिधी, नाशिक
ज्युनियर असोसिएट्स ऑफ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकर्सच्या परीक्षांचा अखेरचा टप्पा नाशिकमध्ये पार पडला. रविवारी तिसऱ्या टप्प्यात झालेल्या परीक्षेस सुमारे ५२५ विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली.
तीन आठवड्यांच्या कालावधीत सुमारे १५७५ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. म्हसरूळ येथील महावीर पॉलिटेक्नीक कॉलाजमध्ये या परीक्षा केंद्राचे नियोजन करण्यात आले होते. जिल्हाभरातून या परीक्षेसाठी हे एकमेव केंद्र ठेवण्यात आले होते. या परीक्षा देशभरात घेण्यात येत असून ऑनलाईन पध्दतीने या परीक्षा पार पडल्या. बँकिंग क्षेत्रातील मुलभूत ज्ञानासह वित्तीय सेवा विषयक ज्ञान, ग्राहक संबंध, आधुनिक बँकिंग तंत्रज्ञान, लेखाशास्त्र तसेच बँकिंग क्षेत्रातील दैनंदिन कामकाज इत्यादी विषयांवरील प्रश्नांचा या परीक्षेत समावेश होता.
'आयआयबीएफ' ही भारतातील बँकिंग आणि वित्तीय संघटनातील कर्मचारी, अधिकारी यांना बँकिंग क्षेत्रातील शिक्षण तसेच प्रशिक्षण देणारी त्यांच्या परीक्षा घेणारी आणि त्यांच्यात व्यावसायिक कौशल्ये निर्माण करणारी संस्था आहे. त्यांच्यामार्फत या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. वर्षातून दोनदा म्हणजेच मे आणि नोव्हेंबर महिन्यात ही परीक्षा पार पडते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 29, 2015, 11:40 am
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
विविध शैक्षणिक प्रश्नांची कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीच्या माध्यमातून आज (दि.३०) पुण्यातील शिक्षण आयुक्त कार्यालयावर सकाळी ११ वाजता शिक्षण संस्थाचालक धडक मोर्चा काढणार आहेत. यामध्ये नाशिक शहर व जिल्ह्यातून शिक्षक सहभागी होणार आहेत.
नवीन शिक्षकेतरांना आकृतीबंध तातडीने लागू करावे, इयत्ता सहावी व इयत्ता आठवीच्या वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांना प्रशिक्षित पदवीधर वेतनश्रेणी मिळावी, स्वयं अर्थशासित धोरण रद्द करावे, इंग्रजी माध्यमाच्या कायम विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना पूर्ण वेतन मिळावे या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मागण्यांना न्याय न मिळाल्यास दि. ९ व १० डिसेंबर रोजी राज्यात लाक्षणिक शाळा बंद करून १० डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी खासगी शिक्षण संस्थांची स्वायतत्ता कायम ठेवणे, कला व क्रीडा शिक्षकांची पूर्णवेळ नियुक्ती करणे, संचमान्यतेचा २८ ऑगस्ट २०१५ चा शासन निर्णय रद्द करणे आदी मागण्या यावेळी मांडण्यात येणार आहेत.
शिक्षक परिषदेचाही एल्गार
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीनेही नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मंगळवारी (दि. ८) सकाळी ११ वाजता धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. अनुदानपात्र शाळांना तातडीने अनुदान द्यावे, अशैक्षणिक कामातून कर्मचाऱ्यांची मुक्तता करावी, निवडश्रेणीसाठी एमए (एज्युकेशन) व मुक्त विद्यापीठाच्या निष्णात पदव्या ग्राह्य धराव्यात, महाराष्ट्र खासगी शाळा नियमावली १९८१ च्या शेड्युल सी मध्ये बदल करण्यासाठी अधिसूचना काढण्यात यावी यासह अन्य काही मागण्या परिषदेने केल्या आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 29, 2015, 11:30 am
म.टा.प्रतिनिधी, नाशिक
केंद्रीय तंत्रविज्ञान खाते आणि उद्योजकता विकास संस्था, अहमदाबाद यांच्या वतीने तंत्रविज्ञान प्रशिक्षितांसाठी उद्योजकता विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ५ डिसेंबरपासून हे प्रशिक्षण सुरू होणार आहे. ४० दिवस हे प्रशिक्षण सुरू राहील.
या प्रशिक्षण उपक्रमात अन्नप्रक्रिया, बांधकाम, अभियांत्रिकी, संगणक, दूरसंचार या क्षेत्रातील विकसित तंत्रज्ञान आणि त्यावर आधारीत संधींबाबत राज्यभरातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.
यात मार्केट सर्व्हेक्षण, प्रकल्प अहवाल, शासकीय कर्जयोजना, प्रोत्साहन योजना, उद्योग व्यवसायांना अभ्यासभेटी व उद्योग उभारणीची प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या १८ ते ३५ वयोगटातील युवकांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात अवघ्या ३० उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 29, 2015, 11:39 am
म. टा. प्रतिनिधी, नाशिक चेन स्नॅचिंग करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी जेरबंद केलेल्या दोघा इराणी संशयितांना कोर्टाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. अंबड पोलिसांनी पाठलाग करून दोघा संशयितांना कालिका पार्क येथे शनिवारी दुपारी पकडले होते. रीयाज फय्याज इराणी (३२) आणि मुस्लीम यासीन खान इाराणी (२६) अशी दोघांची नावे असून अंबड पोलिसांनी त्यांना उपनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. उपनगर पोलिस स्टेशन हद्दीतील जयभवानीरोडवरील जगतापमळा येथील लिलाबेन उगरेज (६०) ही वृध्द महिला येथील म्हसोबा मंदिर येथून जात असताना दोघा संशयितांनी त्यांच्या गळ्यातील ४० हजार रूपये किंमतीचे दागिने लांबविले. या प्रकरणात संशयितांचा ताबा घेतल्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आले असता, कोर्टाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
November 30, 2015, 2:08 pm
माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक जे मनाला आनंद देते, अंत:करणाला आनंद देते, कानाला गोड वाटते ते गाणे. चांगले गाणे ऐकणे म्हणजे मेडिटेशन केल्यासारखेच आहे. त्यामुळे समजत नसेल तरी गाणे ऐकावे. किमान ते भरभरून आनंद देते, असे प्रतिपादन माजी महसूल मंत्री व आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या वतीने देण्यात येणारा कला क्षेत्रातील यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार नाशिकचे पं. मकरंद हिंगणे यांना सोमवारी प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून थोरात बोलत होते. रावसाहेब थोरात सभागृहात कार्यक्रम झाला. थोरात म्हणाले, की शास्त्रीय संगीत ही पिढ्यानपिढ्यांची दौलत आहे. ती पुढील पिढ्यांपर्यंत नि:संकोचपणे झिरपायला हवी तरच गायनाचे क्षेत्र समृध्द होऊ शकते. गायन ही कला शालेय अभ्यासक्रमात घ्यायची का याचाही विचार व्हावा असे वाटते. चांगल्या व्यक्तीचा सत्कार करण्याची संधी मिळाली. पुरस्कार विकले जाण्याच्या जमान्यात हा मानाचा पुरस्कार पंडित हिंगणे यांना घरच्यांच्या उपस्थितीत दिला जावा यासारखा दुसरा गौरव नाही. पुरस्काराला यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने आणखीच वलय प्राप्त झाले आहे. कार्यक्रमासाठी लखनौ, दिल्ली येथे जाता येते; परंतु नाशिककरांनी दिलेली ही कौतुकाची थाप मोलाची असल्याचेही थोरात म्हणाले. गाण्याविषयी थोरात म्हणाले, की कानाला जे गोड वाटते ते गाणे. एकेकाळी मराठी चित्रपटाच्या क्षेत्रात काहीही नवीन होत नव्हते. मग नटरंग आला, अजय-अतुल आले त्यानंतर मराठी चित्रपटाने एकदम भरारी घेतली. मध्यंतरी बालगंधर्व आला, आताही मी थिएटरमध्ये जाऊन कट्यार काळजात घुसली पाहिला. अगदी अप्रतिम चित्रपट आहे. तुम्ही सर्वांनी तो नक्की पहावा म्हणजे गाणे काय आहे हे तुम्हाला कळेल. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने पुरस्कार आहे, मुख्यमंत्री म्हणून निवडून आल्यावर पहिल्यांदा कला अकादमी स्थापन करणारा हा पहिला राज्यकर्ता असल्याचेही थोरात म्हणाले. पुरस्काराला उत्तर देताना पंडित हिंगणे म्हणाले, की जो विषय आवडीचा आहे तोच नेमका शिकवला जात नाही. अनेक कॉलेजातून असे अनेक विषय वर्ज्य करण्यात आलेले आहेत. असे होऊ नये, कॉलेजेसमधून कलेला प्रोत्साहन मिळाले तर नवीन कलाकार घडतील. बहुजन वर्गाचा कलेकडे ओढा वाढतोय ही गोष्ट अत्यंत समाधानकारक आहे. ज्या घरात सांस्कृतिकता जोपासली जातेय तेथूनच फक्त कलेला प्रतिसाद मिळण्याचा एक काळ होता. आता ते बदलत असून या बदलत्या चित्रात पालकांचेही कौतुक केले पाहिजे. विद्यार्थ्यांना फायदा झाला तर शहर सांस्कृतिकतेचा विकास होणार आहे. असेही हिंगणे म्हणाले. माजी मंत्री वनाधिपती विनायकदादा पाटील यांनीही छोटेखानी भाषण केले. यावेळी अध्यक्षस्थानी माजी मंत्री शोभा बच्छाव यांची प्रमुख उपस्थिती होती. गायिका सुखदा बेहरे यांनी कार्यक्रमाच्या सुरूवातीला वंदे मातरम आणि समारोपाला राष्ट्रगीत सादर केले. स्वानंद बेदरकर यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रवादाची सक्ती करता येत नाही
राज्यघटनेत बदल म्हणजे आत्महत्या या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याशी आपण पूर्णपणे सहमत असून या राज्यघटनेची नांदी वाचली तरी देशाचे हित कशात आहे हे आपल्याला कळू शकते, असे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले. मोदींनी घटनेविषयी अनुकूल मत जाहीर केले असले तरी घटनेला अभिप्रेत असल्यानुसारच वागले पाहिजे, नाहीतर ते देशाला घातक ठरू शकते. राष्ट्रवादाची सक्ती करता येत नाही हा मुद्दा मांडताना त्यांनी राष्ट्रवादाचा विचार बळकट केला तर ती यशवंतराव चव्हाण यांना मानवंदना दिल्यासारखेच होईल, असेही थोरात म्हणाले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 30, 2015, 2:30 pm
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महाराष्ट्रातील शहरे, गावे दारुमुळे त्रस्त आहेत. वाढती व्यसनाधिनता ही मोठी समस्या बनली असून, दारुमुळे अपघात आणि गुन्हेगारी वाढली आहे. दारुबंदी करणाऱ्या व्यसनमुक्ती चळवळीतील कार्यकर्त्यांना छळण्याच्या, खोटे गुन्हे दाखल करण्याच्या घटना राज्यात वाढल्या आहे. याकडे गंभीरपणे लक्ष देऊन महाराष्ट्र सरकारने बिहार राज्याप्रमाणे महाराष्ट्र कायमचा दारुमुक्त करावा, अशी मागणी नाशिक जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांनी केली आहे.
दारुला सरकारचे अभय मिळत असल्याने शहरातील वस्त्या आणि गावे दारूच्या वाढत्या धंद्यांनी त्रस्त आहे. ग्रामसभेचे ठराव देऊनही दारुबंदी होत नाही याचा परिणाम शहरात, गावांमध्ये तरुण पिढी उद्धवस्त होत आहे. अल्पवयीन मुलेही व्यसनाच्या विळख्यात सापडली आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यपी धिंगाणा घालत आहेत. नाशिकच्या हातगड किल्ल्यावर तसेच अन्य धरणांच्या परिसरात व शिवकालीन किल्ल्यावर मद्यपी दारू पिऊन पावित्र्य भंग करीत आहेत. याचे गांभीर्य व दाहकता लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने बिहार सरकारचा आदर्श घेत आपले राज्य दारुमुक्त करावे, अशी मागणी महाराष्ट्र वारकरी महामंडळ, व्यसनमुक्त युवक संघटना, शेतकरी वाचवा अभियान, शिवकार्य गडकोट मोहीम, शहीद भगतसिंग युवा मंच, सीवायएसएस विद्यार्थी संघटना, व्यसनमुक्ती संघटना, भ्रष्टाचार विरोधी आंदोलन, किसान सभा, आळंदी खोरे लोककलावंत संघटना, हुंकार राज्यस्तरीय माध्यम चळवळ, अनुभव शिक्षा या सामाजिक संघटनांनी केली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 30, 2015, 2:10 pm
पक्ष्यांच्या आगमनाने नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य बहरले
म. टा. प्रतिनिधी, नाशिक राज्याचे भरतपूर असलेल्या नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात दरवर्षी नवनवीन पक्ष्यांचे दर्शन होत असून यंदा मछली घार (OSPREY) या पक्ष्याने आगमन केल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे नांदूरमध्यमेश्वर पुन्हा आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे. हिवाळ्याला प्रारंभ होताच देशोदेशीच्या पक्ष्यांना नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य खुणावते. अनेक वैशिष्ट्यपूर्ण पक्ष्यांची मांदियाळी तेथे जमल्याचे पहायला मिळते. पक्षी निरीक्षक व तज्ज्ञांची पावलेही नांदूरमध्यमेश्वरकडे वळत असून याद्वारेच नांदूरमध्यमेश्वरला प्रथमच भेट देणाऱ्या किंवा वारंवार भेट देणाऱ्या पक्ष्यांची नोंदही यामुळे होत आहे. यंदाही मछली घार (OSPREY) या पक्ष्याचे दर्शन नांदूरमध्यमेश्वरला झाल्याची माहिती पक्षी निरीक्षक सतीश गोगटे यांनी दिली आहे. या पक्ष्याबाबत त्यांनी सांगितले, की हा पक्षी गरुड जातीत मोडतो. त्यास फिश हॉक (fish hawk) असेही संबोधले जाते. सुमारे दोन फूट (५८ सेंटीमीटर) लांब असलेला हा पक्षी १० ते १२ वर्षात प्रथमच दिसला आहे. या पक्ष्याच्या पंखांचा पल्ला सहा फूट लांब असून तो अतिशय देखणा, रुबाबदार पांढरा रंग व त्यावर तपकिरी नक्षीदार पंख, पिवळे भेदक डोळे, अशा स्वरुपाचा आहे. त्यामुळे सहाजिकच हा पक्षी निरीक्षकांचे लक्ष्य वेधून घेत आहे. या पक्ष्याचे प्रजनन उत्तर हिमालयात होते आणि त्यानंतर हिवाळी पाहुणा म्हणून हा पक्षी भारतात येतो. नांदूरमध्यमेश्वर पाणीसाठ्यात असलेल्या माश्यांच्या प्रजननामुळे पक्ष्यांना मोठ्या प्रमाणात खाद्य उपलब्ध होत आहे. मछलीघारसह इतरही पक्ष्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.
गेल्या ८ वर्षांपासून मी नांदूरमध्यमेश्वरला पक्षी निरीक्षण करीत आहे. माझ्याकडील पक्षीसूची २३४ एवढी झाली आहे. दरवर्षी यात वाढ होत आहे. २०१४ मध्ये तुर्रेबाज टिबुकली (Great Crested Grebe) या पाणपक्ष्याची तर २०१३ मध्ये शाम कादंब (Grey Lag Goose) या आफ्रिकेतून येणाऱ्या हंसांची भर पडली आहे. यंदा मछली घारने हजेरी लावले आहे. - सतीश गोगटे, पक्षी निरीक्षक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧