November 23, 2015, 1:30 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात दोन कैद्यांकडे मोबाइल आढळल्याने खळबळ उडाली आहे. कारागृहाचे रक्षक अब्दुल गणी शेख हे शनिवारी (ता.२२) दुपारी गस्तीच्या ड्युटीवर होते. गस्त घालत असताना मंडल क्रमांक ७ मधील यार्ड क्रमांक दोनमध्ये असलेला कैदी लक्ष्मण धनेश चव्हाण याच्या हालचालींबाबत शेख यांना संशय आला. त्यांनी ही बाब वरिष्ठांच्या निर्दशनास आणून दिली. दरम्यानच्या काळात चव्हाणने प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेली वस्तू बाहेर फेकली. त्याचा साथादीर अनिल रामशकल शर्मा याचीही चौकशी केली असता त्याने यार्डा नजिकच्या शौचालयाजवळ एका प्लास्टिकच्या पिशवीत लपवलेले दोन मोबाइल कारागृह अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
८० किलो मांस जप्त
भद्रकाली परिसरात बैलाचे ८० किलो वजनाचे मांस व इतर अवयव जवळ बाळगणाऱ्या संशयित आरोपीविरोधात भद्रकाली पोलिसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षक कायद्यानुसार कारवाई करीत अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडील सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
November 24, 2015, 1:38 pm
उद्यान वापराविना पडून; महापालिकेकडून प्रलंबित कामे पूर्ण होण्याची प्रतीक्षा
नामदेव पवार, सातपूर शहरात येणाऱ्या पर्यटकांना विशेष आर्कषण असलेल्या सोमेश्वर धबधब्याजवळ महापालिकेने उभारलेले गोदावरी परिचय उद्याने वापराविनाच पडून आहे. या उद्यानासाठी महापालिका प्रशासानाने आतापर्यंत तब्बल तीन कोटी रुपरे खर्च केले आहेत, ते वाया गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. उद्यान खुले करण्याची मागणी केली जात असतांना महापालिका प्रशासनाकडून प्रलंबित कामे पूर्ण होण्याची प्रतीक्षा असल्याचे उत्तर दिले जात आहे. नदीकाठी गोदावरीचा परिचय पर्यटकांना व्हावा या हेतूने जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्रूत्थान योजनेतून या उद्यानाची उभारणी केली जात आहे. तत्कालीन नगरसेविका नगरसेविका इंदुमती काळे यांच्या कार्यकाळात तत्कालीन महापौर विनायक पांडे, तत्कालीन आयुक्त भास्कर सानप यांच्या उपस्थितित डिसेंबर २०११ मध्ये या उद्यानाचे भूमिपूजन करण्यात आले. यानंतर वर्षभरात उद्यान कंत्राटदाराने बरीच कामे केली मात्र, उद्यान अद्याप पूर्ण झालेले नाही. गोदावरी परिचय पर्यटकांना व्हावा असा उद्यान निर्मितीमागील मूळ उद्देश होता. मात्र, कंत्राटदाराने केवळ झाडे लावून, संरक्षक भिंत उभारत आणि डोम बांधले. यातून गोदावरीचा कोणताही परिचय होत नाही. त्यामुळे नगरसेवक विलास शिंदे यांनी उद्यानात गोदावरीचा परिचयाची माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. आता पर्यंत चार वेळा महापालिका प्रशासनाकडे उद्यान पूर्ण करण्याची मागणी केली मात्र, आपल्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे. साहित्य गेले कुठे? गोदावरी परिचय उद्यानाच्या भुमिपूजनावेळी माजी महापौर विनायक पांडे यांनी गोदावरीचा इतिहास गोदावरी परिचय उद्यानातून साकारला जाणार असल्याचे सांगितले होते. परंतु, सध्या उद्यानाचे साहित्य गेले कुठे ? गोदवरी परिचय उद्यान असे नाव केवळ नाममात्र ठेवले की, काय असा सवाल पर्यटक उपस्थित करत आहेत. मद्यपी-जुगारींचा अड्डा गोदावरी परिचय उद्यानात मद्यपी आणि जुगाराचे अड्डे सर्रासपणे सुरू आहेत. विशेष म्हणजे सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. धबधब्याला पाणी असो वा नसो सुट्टीच्या दिवशी हमखास पर्यटक येथे येतात. मद्यपी व जुगाऱ्यांचा पर्यटकांना त्रास सहन करावा लागत आहे. गोदावरी तीरावर सोमेश्वर धबधब्याला लागून महापालिकेने गोदावरी परिचय उद्यान उभारले आहे. मात्र, तीन वर्षांपासून उद्यान बंद आहे. त्यामुळे येथे येणारे पर्यटक नाराज होतात. महापालिकेने उद्यान पूर्ण करून त्याचे लोकार्पण केले पाहिजे. - योगिता खताळे, रहिवाशी, गंगापूरगाव
सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांची नेहमी गर्दी असते. बालाजी मंदिरात देखील भाविक मोठ्या संख्येने येतात. मात्र, गोदावरी परिचय उद्यान बंद असल्याचे पाहून पर्यटकांचा हिरमोड होतो. महापालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. - अरुण सोनवणे, पर्यटक
नाशिकसह मराठवाड्यातील महत्त्वाची नदी म्हणून गोदावरीची ओळख आहे. गोदावरीचा परिचय पर्यटकांना व्हावा या हेतून या उद्यानाची उभारणी करण्यात आली. मात्र, येथे गोदावरीचा परिचय कुठे आहे? उद्यान सुरू कधी होणार असा प्रश्न उपस्थित होतो. - बाळासाहेब पाटील, रहिवाशी, गोवर्धनगाव
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 24, 2015, 1:30 pm
स्थायीवर प्रस्ताव; २२ हजार वृक्षारोपणही हातघाईवर म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
मखमलाबाद येथील कचरा डेपोसाठी आरक्षित असलेली ४१ हेक्टर जमीन हातातून जाण्याची शक्यता असल्याने ही जमीन वाचविण्यासाठी पालिकेने धावाधाव सुरू केली आहे. शुक्रवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत या जमिनीसाठी ३८ कोटी रुपये मोबदला देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. तर शहरात वृक्षारोपणाची घाईही महापालिकेला झाली असून, तब्बल २२ हजार वृक्षरोपे ठेकेदारामार्फत लावण्याचेही प्रस्ताव स्थायीवर ठेवण्यात आले आहेत.
शुक्रवारी महापालिकेची स्थायी होणार असून, त्यात मखमलाबाद येथील प्रस्तावित कचरा डेपोच्या ४१ हेक्टर जमीनच्या आरक्षण बदल्यात ३८ कोटी ५८ लाख रुपये अदा करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. कचरा डेपोचे आरक्षण असलेल्या एका शेतकऱ्याच्या जमिनीवर आरक्षण हाय कोर्टाने उठविले आहे. त्यामुळे उर्वरीत आरक्षण जावू नये म्हणून प्रशासनाने घाई गडबडीत ३८ कोटी ५८ लाख रुपये अदा करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे स्थायीला हा प्रस्ताव मंजूर करावा लागणार आहे. तर दुसरीकडे स्थायीवर तब्बल २२ हजार वृक्षरोपे कंत्राटदारामार्फत शहरातील विविध भागात लावण्याचे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यासाठी जवळपास पाच कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 24, 2015, 1:30 pm
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिकेत आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून स्वच्छता कर्मचारी भरती करण्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही विरोध दर्शवला आहे. स्थानिक भूमिपुत्रांनाच न्याय देण्याच्या सूचना त्यांनी महापौरांसह आयुक्तांना केल्या आहेत. सोबतच घंटागाडी व पेस्ट कंट्रोलच्या ठेक्यांचे प्रस्ताव तत्काळ मार्गी लावण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. शहरांतर्गत रस्त्यांची कामे मार्गी लावा, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.
राज ठाकरे मंगळवारी दुपारी नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांनी महापौरांसह, आयुक्तांशी चर्चा केली. या बैठकीपूर्वी त्यांनी टाटा फाऊंडेशन व एल अॅन्ड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. वनोद्यानाचा करार तत्काळ
मार्गी लावण्यासह दादासाहेब फाळके स्मारक सीएसआरमधून करण्यावर चर्चा झाली.
दरम्यान, महापौर व आयुक्तांशी चर्चा करतांना, त्यांनी घंटागाडी व पेस्ट कंट्रोलचे विषय तत्काळ मार्गी लावण्याचे आदेश दिले. हा विषय जास्त दिवस लांबवू नका, अशा सूचना त्यांनी केल्या. सोबतच स्वच्छता कर्मचारी आऊटसोर्सिंगद्वारे भरण्यात त्यांनी विरोध केला. शहरातील स्थानिक भूमिपुत्रांमार्फतच ही कामे करावीत, असे त्यांनी सांगितले. तर शहरातील अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली असून, त्यांची कामे त्वरित लावा, असेही त्यांनी आदेशित केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 24, 2015, 2:30 pm
म. टा. वृत्तसेवा, मालेगाव
नांदेडचे अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची मालेगाव अपर जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली असून, त्यांनी नुकताच या पदाचा पदभार रघुनाथ गावडे यांच्याकडून स्वीकारला.
स्वामी यांनी अमरावती येथे निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी रोहयो, उपआयुक्त अमरावती महानगरपालिका आदी विविध पदांवर काम केले आहे. पुसद उपविभागीय अधिकारी, नांदेड उपविभागीय अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी महसूल विभागाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविले. मालेगावचे निलंबित अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार यांच्या जागी त्यांची बदली करण्यात आली आहे.
येथील अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार यांच्यावर लाचलुचपत विभागाने कार्यवाही केल्यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले होते. याआधी देखील येथील प्रांत संदीप पाटील यांच्यावर अशीच कार्यवाही झाली होती तर, तहसीलदार दीपक पाटील यांच्या अनियमित कारभारामुळे ते चर्चेत राहिले होते. नुकतीच त्यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी मालेगाव तहसीलदारपदी सुरेश कोळी तर प्रांताधिकारीपदी अजय मोरे यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारीपदी अद्यपा नियुक्ती झालेली नव्हती. आता दिलीप स्वामी यांची येथे नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे आता तरी महसूल विभागाच्या कारभारात सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
November 24, 2015, 1:30 pm
म.टा. प्रतिनिधी, नाशिक
गोरक्षणाचे काम करणाऱ्या हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांवर जीवघेणे हल्ले होऊ लागले आहेत. त्यामुळे त्यांना गोवंशाची रक्षा करण्यासही मर्यादा येत आहेत. गोरक्षण करणाऱ्या कार्यकर्त्यांना शस्त्र परवाने द्यावेत, अशी मागणी समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. समितीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
अनेकदा गोवंश कत्तलीसाठी नेला जात असल्याचे उघड झाले आहे. गोवंशाची हत्या होऊ नये यासाठी कायदेही करण्यात आले आहेत. मात्र, या कायद्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. समितीच्या कार्यकर्त्यांकडून गोवंश रक्षणाचे कार्य केले जाते. मात्र कार्यकर्त्यांवर हल्ले होण्याचे प्रकार हल्ली घडू लागले आहेत. गोरक्षणाचे काम अखंडीतपणे करता यावे यासाठी शस्त्र परवाने द्या, अशी मागणी समितीने केली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 24, 2015, 2:30 pm
म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर
बेमोसमी पावसाचा जोर कायम राहिल्याने टोमॅटो पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. बाजारात चांगला भाव मिळत असताना नेमका अवकाळी पाऊस कोसळला आणि टोमॅटोच्या निगा राखलेल्या बागा अक्षरशः जमीनदोस्त झाल्या आहेत.
सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावत टोमॅटो पिकाचे नुकसान केले आहे. जोपासना केलेली टोमॅटो बाग भुईसपाट होत असल्याने यापुढील उत्पनाला मुकावे लागणार आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड झाली आहे. वाघेरा, वेळुंजे, अंबोली, शिरसागाव, तळवाडे अंजनेरी, बेझे, चाकोरे या बागायती पट्ट्यात टोमॅटोचे लाखोंचे नुकसान झाले आहे. अंबोली येथील सुनील मेढे यांनी यावर्षी लागवड केलेले टोमॅटो पीक जोमदार आले होते. बाजारात भाव चांगला असल्याने पहिली तोडणी त्यांनी उत्साहात सुरू केली. मात्र, सायंकाळी त्याच वेळेस पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली आणि डोळयासमोर झाडे जमीनदोस्त झाली. यावर्षी टोमॅटोसाठी केलेला भांडवली खर्च निघणे दुरापास्त झाले असून, आपल्या सारखेच शिवारात किमान शंभर एकरांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.
मदतीची गरज
तालुक्यातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था पाहता शासनाने तातडीने मदतीचा हात पुढे करण्याची आवश्यकता आहे. भात, नागली, वरई तसेच टोमॅटा आदी पिकांना नुकसानभरपाई देतानाच पशुधनासाठी साठवत असलेला चारा देखील सडला आहे. याची दखल घेण्याची गरज आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 24, 2015, 1:30 pm
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
दलित जनतेच्या पाठिंब्यावरच राज्यात युतीचे सरकार आले आहे. त्यामुळे राज्यातील सत्तेत आम्हाला वाटा आवश्यक आहे. तो मिळाला नाही, तर आम्ही या सरकारचा काटा काढू, असा इशारा रिपाइं नेते रामदास आठवले यांनी दिला आहे. आपल्याला राज्यातच नव्हे, तर केंद्रातही मंत्रिपद देण्याचे लेखी आश्वासन भाजपने दिलेले असल्याचा दावाही त्यांनी केला.
खासदार आठवले यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. माझी पत्नी मंत्री होणार ही आवई कोणी उठवली हे माहिती नसल्याचे सांगतानाच, रिपाइंमध्ये भाजपपेक्षा चांगले कार्यकर्ते अन् चांगले
चेहरेही असल्याचा टोला त्यांनी लगावला. मला केंद्रात मंत्रिपद देण्याचे भाजपने कबूल केले असून, तसा लिखित करारच आहे. मित्र पक्षांमध्ये आरपीआय सर्वांत मोठा पक्ष आहे. त्यामुळे भाजपने आश्वासने पाळली पाहिजेत. मंत्रिपदांबरोबरच महामंडळे सुद्धा आरपीआय कार्यकर्त्यांना मिळाले पाहिजेत, असे आठवले यांनी निक्षून सांगितले.
राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी कमी करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयास आपला विरोध असून, याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही ते म्हणाले. २६ नोव्हेंबर हा दिवस आरपीआयच्या वतीने संपूर्ण देशभर संविधान दिवस म्हणून पाळणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
भाजप-सेनेतील वाद मिटवू
सध्याचे भाजप-सेनेमधील भांडण हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रमाणेच आहे. निवडणुका जिंकण्यासाठी ते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. मात्र, आता या दोन्ही पक्षांतील दुही ८० टक्के कमी झाल्याचा दावा आठवले यांनी केला. उर्वरीत दुही कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले. सर्व पक्षांनी एकत्रित येवून कामाला लागले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
आमिरचे कान टोचले
देश राज्यघटनेवर चालत असून, देशात गोधरा सारखी स्थिती नसल्याने आमिर खानने देश सोडू नये, अशा शब्दांत आठवले यांनी आमिरचे कान टोचले. नरेंद्र मोदींनी राज्यघटनेला धर्मग्रंथ मानला आहे. आरएसएसचा अजेंडा वेगळा आहे. परंतु, मोदी हे राज्यघटनेवरच राज्य चालवत आहे. देशातील परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे आमीर खानने असे वक्तव्य करू नये, असा सल्ला देतानाच आमिरने देश सोडला तरी त्याला आपण परत आणू, असा दावा त्यांनी केला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 24, 2015, 2:30 pm
संदीप देशपांडे, मनमाड
नांदगावसह ग्रामीण भागात पाण्याची परिस्थिती बिकट झाली आहे. यामुळे नांदगाव येथील सामाजिक भान जपणाऱ्या भैय्यासाहेब चव्हाण या शिक्षकाने आपल्या मुलाच्या लग्नात सेव्ह वॉटर उपक्रम राबविण्याचे ठरवले असून, लग्नपत्रिकेबरोबर चक्क पाणी वाचवा, पाणी काटकसरीने वापरा हे सांगणारे भावनिक निवेदन देखील वऱ्हाडी मंडळींसह निमंत्रितांना पाठवले आहे.
येत्या १४ डिसेंबर रोजी नाशिक येथे होणाऱ्या चव्हाण यांच्या मुलाच्या लग्नात जल हैं तो कल हैं आणि सेव्ह वॉटर, सेव्ह फ्यूचर हा संदेश डिजिटल बॅनर्सद्वारे सर्वांसमोर पोहचणार आहे. पाण्याविषयी जागरूकता आणि पाण्याचे मोल सांगण्यासाठी भैय्यासाहेब चव्हाण यांनी
मुलाच्या लग्नाचा योग्य मुहूर्त शोधला याचे सर्वत्र कौतुक होत आहे. आपल्या मुलीच्या लग्नात ही चव्हाण यांनी सामाजिक बांधिलकी जपत आणि समानतेचा नारा देत बेटी बचाव उपक्रम राबवला होता. तसेच, दोन मुलींनंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणाऱ्या अकरा दाम्पत्याचा थेट लग्नात हृदय सत्कार करून आपले वेगळेपण दाखवले होते.
नांदगाव येथील व्ही. जे. हायस्कूलमधील तांत्रिक विभाग प्रमुख आणि नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारिणी सदस्य असलेले भैयासाहेब चव्हाण यांचा मुलगा सम्राट याचा विवाह येत्या १४ डिसेंबर रोजी होणार आहे. पण, या लग्नाची पत्रिका पाणी वाचवाचा संदेश देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेते आहे. पत्रिकेसोबत भोजनाच्या निमंत्रणासह वेगळी अशी पाण्याचे मोल जाणा हे सांगणारी वेगळी पत्रिका पण आवर्जून दिली जात आहे. नवरदेवाच्या वडिलांचे हे सामाजिक भान इतरांनाही अनुकरणीय ठरणारे आहे.
कितना घाटा उठा चुके हैं
हम अपनी मनमानी मै
पानी नही हैं अब गांवों मे
ना ही अब हैं शहरो मैं
हे शब्द लग्नपत्रिकेच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहचवले जात आहेत. जल हैं तो कल हैं हा वास्तव मंत्र ही अक्षदांप्रमाणे सर्वत्र वाटला जात आहे. राज्यातील दुष्काळ आणि पाणी परिस्थिती याची जाणीव ठेवत लग्नपत्रिकेद्वारे सकलजन शहाणे करून सोडण्याचा भैयासाहेब चव्हाण यांचा हा प्रयत्न सर्वांची दाद मिळवित आहे. आपल्या परीने हा सामाजिक कार्यातील छोटासा वाटा आणि पाणी जपून वापरण्याची कळकळीची विनंती चव्हाण करीत आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
November 24, 2015, 11:53 am
४० टक्के नाशिककरांकडे नाही पक्के घर; २४ टक्के लोक अजूनही वीजेपासून वंचित Jeevan.bhawasar @timesgroup.com २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यातील ४० टक्के कुटुंबांना राहण्यासाठी पक्के घर उपलब्ध नाही. तर ४८ टक्के लोकांना नळाद्वारे पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही. समाधानाची बाब म्हणजे तब्बल ७६ टक्के लोकांपर्यंत वीज पोहोचली आहे, अर्थात दिवसातून कितीवेळ त्यांना वीज मिळते हा भाग अलहिदा. नाशिक जिल्ह्यातील सुमारे ७ लाख कुटुंब वीट, सिमेंट, पत्रा वापरून बनविलेल्या घरामध्ये राहतात. तर ९५ हजार ३९७ कुटुंबांना झाड्यांची पाने, बांबू, मातीच्या भिंती असलेल्या घरांमध्ये रहावे लागते. बागलाण तालुक्यामधील सर्वाधिक २१ टक्के कुटुंब कच्च्या घरांमध्ये राहत असल्याचे २०११ च्या जनगणनेतून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील ५२ टक्के लोकांना नळाद्वारे प्रक्रिया केलेले पिण्याचे शुद्ध पाणी मिळते. हे शुद्ध पाणी अपेक्षेप्रमाणे नाशिक शहरातील लोकांना सर्वाधिक मिळते. तरीदेखील सुमारे ३००० लोकांना विहिरी उघड्या विहिरीतील पाणी वापरावे लागते. हॅंडपंपद्वारे कळवण, सुरगणामधील सुमारे १३ टक्के नागरिकांना पाणी घ्यावे लागते. जिल्ह्यात या दोन तालुक्यात हे प्रमाण सर्वाधिक आहे. जिल्हाभरातील ६ लाख २० हजार कुटुंबांना नळाचे शुद्ध पाणी मिळते. तर पावणे तीन लाख कुटुंब पाण्यासाठी उघड्या विहिरींवर अवलंबून आहेत. जिल्ह्यात धरणे, विहिरी, पाणी पुरवठा योजना यांचे इतके प्रमाण असले तरी सुमारे पावणे ८ हजार कुटुंबाना नळ, विहिर, नदी, हँडपंप, तलाव, बोअरवेल, कालवे अशा कुठल्याच मार्गाने पाणी मिळत नाही. ८,६९० कुटुंबे अंधारात जिल्ह्यातील ११ लाख ८० हजार कुटुंबांपैकी ९ लाख ४ हजार कुटुंबांपर्यंत वीज पोहोचली आहे. तर अडीच लाख लोक रॉकेलचे दिवे वापरतात. सुरगणा, पेठ, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सुमारे ६० टक्के कुटुंबांपर्यंत वीज पोहोचली नसल्याने त्यांना रॉकेलचाच आधार आहे. जिल्ह्यातील सुमारे ९ हजार कुटुंब सौर ऊर्जा किंवा इतर माध्यमातून घरात प्रकाश आणतात. मात्र तब्बल ८,६९० कुटुंबांकडे प्रकाश मिळवण्याचा कुठलाही स्रोत नाही. विशेष म्हणजे त्यातील २ हजार कुटुंबे जिल्ह्याच्या शहरी भागातील आहेत. यातील जवळपास निम्मी म्हणजे ९१७ कुटुंबे ही नाशिक शहरातील आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 24, 2015, 2:30 pm
म. टा. वृत्तसेवा, मालेगाव
ज्या गावात पाणीटंचाई भासणार आहे, अशा गावांचे प्रस्ताव सरपंच व ग्रामसेवकांनी त्वरित पाठवावे, अशी सूचना खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केली. मालेगाव तालुक्यातील पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीला पंचायत समितीचे सभापती भरत पवार, उपसभापती यशवंत मानकर, उपविभागीय अधिकारी अजय मोरे, तहसीलदार सुरेश कोळी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस. के. खताळे, पंचायत समित लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता पी. टी. मोराणकर, जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता जयवंत खरे, तसेच कृषी व विद्युत विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.
खासदार भामरे पुढे म्हणाले की, ज्या विहिरीतील पाणी पिण्यायोग्य नाही अशा विहिरीतील पाणी शुध्द करून घ्यावे. चारा टंचाईसाठी शासनाने सर्व मदत केली आहे. कृषी विभागाच्या कृषी सहाय्यकांनी
प्रत्येक गावात जाऊन चाराटंचाई विषयी माहिती घ्यावी. मालेगाव तालुक्यासाठी असलेल्या खासदार निधीतून विकासकामे होतील परंतु, केंद्र शासनाच्या अनेक योजना आहेत, त्या राबविण्यासाठी निधी कमी पडणार नाही. यावेळी त्यांनी ग्रामपंचायतनिहाय गावांचा पाणीटंचाई, वीजपुरवठा, पाणीपुरवठ्याच्या योजनांबाबत सविस्तर आढावा घेतला.
बैठक केवळ फार्स
संपूर्ण मालेगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला असताना येथे झालेल्या आढावा बैठकीत मात्र पंचायत समिती व महसूल विभागाचे अधिकारी, पदाधिकारी याबाबत गंभीर नसल्याचे चित्र पहायला मिळाले. पाणीटंचाई असलेल्या गावांचा आराखडा असेल किंवा टँकर सुरू करण्याची मागणी असेल, कोणत्याही बाबतीत पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांच्यात ताळमेळ दिसला नाही. बैठकीत एकाही अधिकाऱ्याकडे संपूर्ण माहिती नसल्याचे खासदार सुभाष भामरे यांच्या निदर्शनास आले. त्यात आपल्या अकार्यक्षम कारभाराला पांघरून घालण्यासाठी पंचायत समिती व महसूल अधिकारी-पदाधिकारी यांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलणे, तोंडसुख घेण्यातच धन्यता मानली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 24, 2015, 1:56 pm
नाशिक : दुष्काळ, अवकाळी पाऊस यांसारख्या आसमानी संकटांबरोबरच कर्जबाजारीपणामुळे हतबल ठरलेल्या दोन शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. गेल्या ४८ तासांत तीन शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली असून, गेल्या ११ महिन्यांत जिल्ह्यात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ७० हून अधिक झाली आहे. शामकांत देवराम ठाकरे (वय २९, रा. राहूड, ता. बागलाण) यांनी आणि भगवान लक्ष्मण दिवे (वय ३२, रा. दावचवाडी, ता. निफाड) अशी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे आहेत. सोमवारी तालुक्यातील डांगसौंदाणे येथील शेतकरी रामदास देवरे (४८) यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. ठाकरे यांचा दीड वर्षापूर्वी त्यांचा विवाह झाला असून, त्यांना सहा महिन्यांचा मुलगा आहे. तर दिवे यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 24, 2015, 1:30 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शिक्षक भरतीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अर्जातील चुकांच्या दुरूस्तीसाठी पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना परिषदेच्या वेबसाईटवर ऑनलाइन पध्दतीने माहिती अपडेट करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
टीईटी १६ जानेवारी २०१६ रोजी पार पडणार आहे. या परीक्षेसाठी हजारो विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र, अनेक विद्यार्थ्यांकडून या अर्जांमध्ये चुकीची माहिती भरण्यात आली. तर काही प्रकरणांमध्ये यासाठी तांत्रिक चुकाही कारणीभूत होत्या. यानंतर उमेदवारांकडून झालेली ओरड विचारात घेत परिषदेने उमेदवारांना त्यांची माहिती अपडेट करण्यासाठी आता अखेरची संधी उपलब्ध करून दिली आहे. परीक्षा अर्ज भरताना उमेदवारांनी स्वत:च्या नावे केलेले लॉग इन उपयोगात आणावे, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती अपडेट केल्यानंतर उमेदवारांनी या हार्ड कॉपीपंचायत समितीमध्ये गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे जमा कराव्यात. टपाल किंवा इ मेल पध्दतीने पाठविण्यात येणाऱ्या दुरूस्ती स्वीकार होणार नाहीत, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
November 24, 2015, 1:39 pm
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
मुंबईतल्या पाणी वाटप बैठकीत शहराचे ६०० दशलक्ष घनफूट पाणी कपात केल्याने आता आणखी पाणीकपातीचा सामना नाशिककरांना करावा लागणार आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्येच नाशिककरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पाण्याचे आरक्षण टाकतांना बाष्पीभवनाचा विचार झाला नसल्याने महापालिकेवर दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे वेळ येणार आहे. त्यामुळे पाणी संकट आणखी गहीरे होणार आहे.
पालकमंत्र्यांनी नाशिक शहरासाठी जुलै अखेरपर्यंत गंगापूर धरण समूहात २७०० तर दारणा धरणसमूहात ३०० दशलक्ष घनफूट पाणी मंजूर केले आहे. शहराचा पाणीपुरवठा गंगापूर धरणावरच जास्त अवलंबून असल्याने ३३०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी केली होती. मात्र त्यात ६०० दशलक्ष घनफूटची कपात करण्यात आली आहे. तर दारणाच्या पाण्याचा शहराला काहीच उपयोग नाही. तर बाष्पीभवन हे २० टक्के होणार असून हा साठा आणखीनच खालावणार आहे.
सद्यस्थितीत १५ ते २० टक्के पाणीकपात सुरू आहे. ही कपात कायम ठेवल्यास सध्याचे पाणी हे मे अखेरपर्यंत पुरणार आहे. जुलै अखेरपर्यंत हा साठा पुरवायचा असेल तर आणखी १५ ते २० टक्के कपात करावी लागणार आहे. त्यामुळे एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे वेळ महापालिकेवर येणार असून, हा पाणीपुरवठा करताना पालिकेची कसोटी लागणार आहे.
महापालिकेची कसोटी मुंबईतल्या पाणीवाटप बैठकीत मंजूर झालेल्या पाण्यातून उर्वरीत आठ महिन्यांसाठी पाणीपुरवठा करणे ही महापालिकेसाठी कसोटी ठरणार आहे. सध्याच्या पुरवठ्याप्रमाणे पाणीपुरवठा केल्यास तो केवळ सात महिनेच पुरणार आहे. तर, या मंजूर साठ्याचे बाष्पीभवन गृहीत न धरल्याने त्यात आणखी घट होणार आहे. त्यामुळे महापालिकेला पाण्याची मोठी तूट भरून काढावी लागणार असून, आणखी पाणीकपातीशिवाय पर्याय नाही.
गंगापूर धरणातून उर्वरीत दिवसांसाठी महापालिकेला ३३०० दशलक्ष घनफूट पाण्याची आवश्यकता असताना केवळ २७०० दशलक्ष घनफूट पाणी दिले आहे. दारणातून ३०० दशलक्ष घनफूट पाणी मिळाले आहे. सध्या महापालिकेकडून १५ ते २० टक्के पाण्याची कपात केली जात आहे. राखीव साठ्यातून बाष्पीभवन २० टक्के गेल्यास २१०० दशलक्ष घनफूट पाणीच पालिकेला मिळणार आहे. त्यामुळे जूनपर्यंत हा साठा पुरणार आहे. ऑगस्ट अखेपर्यंत हे पाणी पुरवायचे असेल तर, सध्याची पाणीकपात आणखी वाढवावी लागणार आहे. सध्या महापालिका दररोज १२.३५ दशलक्ष घनफूट पाणी दररोज उचलते. त्यात आणखी घट झाल्यास कपात २५ ते ३० टक्क्यांच्यावर जाणार आहे. यासाठी आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठाच बंद ठेवावा लागणार आहे. त्यामुळे एकतर दररोजच्या पुरवठ्यात कपात नाहीतर एक दिवस बंद असा पर्याय स्वीकरावा लागणार आहे. त्यामुळे शहरवासीयांसमोर पाणीकपातीचे गंभीर संकट ओढावणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे.
विशेष महासभेची शिवसेनेकडून मागणी
राज्याचे मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांनी नाशिककरांना वेठीस धरले असल्याचा आरोप शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते यांनी केला असून, पाण्याचे नियोजन करण्यासाठी तातडीने विशेष महासभा बोलविण्याची मागणी केली आहे.
ठाकरेंकडे लक्ष
मुकणे पाणीपुरवठा योजनेसंदर्भात थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिकच्या पाणीप्रश्नावर काय बोलतात याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकमध्ये मनसेची सत्ता असून, नागरिकांवर आताच पाणीकपातीचे संकट गहिरे आहे. यावर ठाकरे काय भाष्य करतात याकडे नाशिककरांच्या नजरा लागून आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 24, 2015, 1:30 pm
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
देशातील असहिष्णुतेच्या मुद्यावर अनेक साहित्यिकांनी आपले पुरूस्कार परत केले. मात्र, असहिष्णुतेबाबत अभिनेता आमिर खानचे वक्तव्य म्हणजे अतिरेक असल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. नाशिकमध्ये शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यातील युती सरकारवरही ताशेरे ओढले. मंत्रिमंडळात जाण्यासाठी शिवसेना लाचार असून, भाजप त्यांना गाजर दाखवत असल्याची टीका विखे पाटील यांनी केली.
आमिर खानने अतिरेक केला असला तरी त्याचे वक्तव्य प्रातिनिधीक स्वरूपात घेण्याची गरज असून, त्यामागच्या भावना तेवढ्या समजून घ्यायला हव्यात, असेही विखे पाटील म्हणाले. भाजप-सेना सरकारच्या कामकाजावर टीका करताना, हे सरकार अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली आहे. राज्यातील सत्तेत वाटा मिळवण्यासाठी शिवसेना लाचार झाली आहे. त्यामुळे सेनेने ही लाचारी सोडली पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 24, 2015, 2:30 pm
सटाणा : तालुक्यातील देवळाणे शिवारात मांजरीची शिकार करीत असताना मांजरींसह बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला. बिबट्याला विहिरीतून काढताना तरुणावर दगड पडल्याने तो गंभीर जखमी झाला.
देवळाणे शिवारात शंकर बुधा चव्हाण यांच्या विहिरीचा कृषिपंप चालू करण्यासाठी विहिरीजवळ गेले असता त्यांना विहिरीतून वास येऊ लागला. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना विहिरीत मृत बिबट्या व मांजर आढळून आले. यानंतर तत्काळ वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. कड्याकपाऱ्यांच्या विहिरीत बिबट्या बाज लावूनही वरती येत नसल्याने अखेर सुरेश निंबा जाधव या तरुणाने विहिरीत उतरून मृत बिबट्याला बाजेवर ठेवण्यासाठी वनविभागाला मदत केली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 24, 2015, 2:00 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक महाराष्ट्र पोलिस अकादमीला स्वायत्तता देण्याच्या प्रस्तावाला कॅबिनेटच्या बैठकीमध्ये अखेर मंजुरी देण्यात आली. राज्यातील पोलिस उपनिरीक्षक आणि उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या या संस्थेला स्वायत्त करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वर्षाच्या सुरुवातीलाच घोषणा केली होती. मागील सात ते आठ महिन्यापासून या निर्णयाची उत्सुकता पोलिस दलाला लागली होती. यशदाच्या धर्तीवर एमपीएला स्वायत्त केले जाणार असून, कॅबिनेटच्या लेखी मंजुरीची अद्याप प्रतीक्षा असल्याचे एमपीएचे संचालक नवल बजाज यांनी स्पष्ट केले. २६० एकरवर उभारण्यात आलेल्या एमपीएमध्ये पोलिस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. यशदाच्या धर्तीवर असेच प्रकाराचे प्रशिक्षण खासगी संस्थांना देणे यामुळे शक्य होऊ शकते. राज्य सरकारच्या आदेशानुसार गेले काही महिने अधिकाऱ्यांनी स्वायतत्तेसाठी आवश्यक असलेल्या बाबींचा आढावा घेतला. एमपीएच्या स्वनिधीच्या क्षमता तपासून पाहण्यात आल्या. स्वनिधी उभा राहणार स्वायत्ता मिळाल्यानंतर पाच वर्षे सरकारी अनुदान मिळणे अपेक्षित असून, त्यानंतर एमपीए स्वतःचा निधी उभारू शकते. यशदाच्या धर्तीवर एमपीएच्या विविभ विभागामार्फत अभ्यासक्रमांची निर्मिती केली जाऊ शकते. सायबर गुन्हे, दहशतवादी हल्ले, धमकी, धमक्यांविरुध्द खबरदारीचा उपाय आणि मदत करण्यासाठी अकादमी येथे प्रशिक्षण आयोजित केले जाऊ शकते. संबंधित कंपनीच्या काही लोकांना प्रशिक्षण देण्यात आल्यास ते त्यांच्या कंपनीच्या इतर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करू शकतील. याचा थेट फायदा शेवटी पोलिसांनाच होणार असल्याचा दावा केला जात आहे. यातून निधी संकलनाचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा सूत्रांनी व्यक्त केली. आधुनिक समाजात तपासाचे काम पाहणारा कर्मचारी तेवढाच आधुनिक असला पाहिजे. आजमितीस, अशी आधुनिकता जोसपणारे सरकारी मानधनावर काम करण्यास राजी होत नाहीत. एमपीएला स्वायतत्ता मिळाल्यास देशातूनच नव्हे तर परदेशातील तज्ज्ञांना मार्गदशर्नासाठी बोलवणे शक्य असल्याचे मत एका अधिकाऱ्याने व्यक्त केले. असे होणार फायदे पोलिस प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक उपलब्ध होतील. पोलिसांकडील सायबर क्राईम, दहशतवादी हल्ले, धमकी आणि त्याबाबत करावयाची उपाययोजना याची माहिती आणि प्रशिक्षण संस्था आणि सर्वसाधारण व्यक्तींना मिळू शकेल. आधुनिकतेसाठी एमपीएला स्वनिधी उभा करता येणार.
महाराष्ट्र पोलिस दलाची शिखर प्रशिक्षण संस्था म्हणून निवड.
आधुनिक प्रशिक्षणातील बदल लागलीच स्वीकारले जाऊ शकतील.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
November 24, 2015, 2:00 pm
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मुंबईत पाणीवाटपासंदर्भात घेतलेल्या निर्णयाने नाशिक- नगरमधील वादासोबतच आता शहर विरुद्ध ग्रामीण संघर्ष उभा राहिला आहे. शहराचे पाणी शेतीला दिल्याची भावना नाशिककरांमध्ये बळावणार आहे, तर महापालिकेच्या वाट्याला आलेल्या पाण्यातून जुलै अखेर सध्याच्या आरक्षणाप्रणाणे पाणीपुरवठा करणे अशक्य असल्याने आठवड्यातून एक दिवस संपूर्ण पाणीपुरवठाच बंद ठेवावा लागणार आहे. त्यामुळे महापालिकेची कसोटी लागणार असून, पाण्याची धग वाढेल तसतसा शहर व ग्रामीण असा असंतोष वाढणार आहे.
जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडीला पाणी सोडल्यानंतर पाणीवाटपाचा वाद शांत होण्याऐवजी दिवसेंदिवस चिघळतच चालला आहे. जायकवाडीला पाणी सोडताना जिल्ह्याला आवश्यक पाण्याचा अंदाज घेतला नाही. त्यामुळे पाणी सोडल्यानंतर उर्वरीत पाण्यातून शेतीला पाणी मिळावे म्हणून शेतकरी आक्रमक झाले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 24, 2015, 2:30 pm
सटाणा : देवळा नगरपंचायतीच्या पहिल्या अध्यक्षपदासाठी देवळा विकास आघाडीच्या नगरसेविका धनश्री केदा आहेर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मंगळवारी (दि. २४) प्रारंभ झाला. जि. प. चे सभापती केदा आहेर यांच्या पत्नी धनश्री केदा आहेर यांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दोन प्रतीत तहसीलदार कैलास पवार यांच्याकडे सादर केला. यामुळे दि. ३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची आता केवळ औपचारिकता शिल्लक आहे. या प्रसंगी गटनेते अशोक आहेर, योगेश आहेर, पुंडलीक आहेर, लक्ष्मीकांत आहेर, बाळासाहेब आहेर आदी मान्यवर उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 24, 2015, 2:03 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक पत्रकारांना मारहाण केल्याप्रकरणी चौकशीस समोरे जाणाऱ्या पोलिस उपायुक्त अविनाश बारगळ यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. याबाबतची माहिती पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी पत्रकारांच्या बैठकीत दिली. नाशिकमधील पाणी जायकवाडी धरणात सोडल्याच्या निषेधार्थ २१ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात शेकडो शेतकरी जमले होते. याच दरम्यान पोलिस उपायुक्त अविनाश बारगळ यांनी पत्रकार महेंद्र महाजन यांच्यासह अन्य दोघांना मारहाण केली. याबाबत महाजन यांनी रितसर तक्रार केल्यानंतर पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन या प्रकरणाची जातीने चौकशी करीत आहेत. आजवर काही प्रत्यक्षदर्शी व पोलिस अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले असून, आणखी माहिती देण्याची कोणाची इच्छा असल्यास त्यांनी पुढे यावे, असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले आहे. दरम्यान, बारगळ यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी पत्रकारांकडून सातत्याने होत होती. यापार्श्वभूमीवर मंगळवारी संध्याकाळी वरिष्ठ संपादक शैलेंद्र तनपुरे, श्रीमंत माने, चंदूलाल शहा, विश्वास देवकर, वेणुगोपाल पिल्ले, भालचंद्र पिंपळवाडकर यांच्यासह अनेक वरिष्ठ पत्रकारांनी जगन्नाथन यांची भेट घेतली. यावेळी, बारगळ यांना आजपासूनच सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असल्याची माहिती पोलिस आयुक्त जगन्नाथन यांनी दिली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧