आज देशाची वाटचाल विकासाकडे होत असली तरी मुलींच्या जन्मदरामध्ये मात्र विकास झालेला दिसून येत नाही. मुलींच्या जन्माचा मार्ग खडतरच असल्याचे आजही दिसून येत आहे. त्यामुळे देशभरात अद्याप एक हजार मुलांमागे आजही ९२९ इतक्याच मुली असल्याचे दिसून येते. ही विषमता हटवण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान प्रभावी ठरेल, असे प्रतिपादन 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. राजेंद्र फडके यांनी केले.
केंद्र सरकारने देशभर बेटी बचाओ, बेटी बढाओ अभियान राबविणे सुरू केले आहे. त्या अनुषंगाने जनजागृती करण्याच्या हेतूने रविवारी मेळाव्याचे आयोजन केले होते. याप्रसंगी डॉ. फडके बोलत होते. पुढे फडके म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी अभियानांपैकी 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' एक आहे. भाजप सरकारने सर्व राज्यांमधील साडेपाचशे जिल्ह्यांमधील जन्मदराविषयक सर्वेक्षण यासाठी केले आहे. महाराष्ट्रातील नाशिक, बीड, बुलढाणा, वाशिम, जालना, औरंगाबाद, जळगाव, अहमदनगर, उस्मानाबाद, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमधील प्रमाणातही मोठी विषमता असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. हे मिटविण्यासाठी या अभियानात गर्भचाचणीला प्रतिबंध, मुलींच्या शिक्षणाबाबत समाजात सकारात्मक दृष्टीकोन रुजविणे, मुलींच्या जीवनमानास सरकार म्हणून खात्री देणे, घटणारा जन्मदर वाचवणे ही उद्दिष्टे समोर ठेवून कार्य केले जाणार आहे. तसेच मेळावे, कीर्तने, पथनाट्य, शॉर्टफिल्म या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी राष्ट्र, राज्य, जिल्हा, तालुका अशा टप्प्यांनुसार समितीही नेमण्यात आली आहे. या अभियानाचे धागे फडके यांनी शिक्षणाशी जोडून शैक्षणिकदृष्ट्या सक्षम समाज घडविण्याची गरजही व्यक्त केली.
यावेळी भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, आमदार देवयानी फरांदे, उत्तर महाराष्ट्र प्रकल्प समन्वयक डॉ. विजया अहिरराव, राज्य प्रकल्पप्रमुख अस्मिता पाटील, नगरसेवक सतीश कुलकर्णी, विजय साने व भाजपाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट