Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

फिटेना अंधाराचे जाळे...

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

महिन्याकाठी करोडो रुपयांची टोल वसुली होतानाही टोल रोड कंपनीच्या अनास्थेमुळे मनमाड- कोपरगांव राज्य महामार्गावरील येवला शहरातील पथदिप केवळ शोभेचे बाहुले बनले आहे. रस्त्याच्या मधोमध दुभाजकामध्ये बसविण्यात आलेले देखणे शेकडो पथदीप गेल्या अनेक महिन्यांपासून दुरुस्तीअभावी चक्क बंदच असल्याने महामार्गावर अंधाराचे मोठे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिणामी शहरातील नागरिकांना या मार्गावरून मार्गक्रमण करताना जीव मुठीत धरूनच पुढे सरसावे लागत असून, हे अंधाराचे जाळे कधी फिटणार असा रोखठोक सवाल सर्वच करीत आहेत.

मनमाड-नगर राज्य महामार्गावरील मनमाड-येवला-कोपरगांव या रस्त्याची काही वर्षांपूर्वी 'बीओटी' तत्वावर मालेगांव-मनमाड-कोपरगांव टोल रोड प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीतर्फे बांधणी केली जाताना सन २००७ मध्ये येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल शिवारात कंपनीचा टोल नाका सुरू झाला होता. या टोल कंपनीने रस्त्याचे काम करताना राज्य मार्गावर येवला शहराच्या दुतर्फा रस्त्याच्या दुभाजकाच्या मधोमध काही किलोमीटर अंतरावर देखणे असे पथदीप बसविले आहेत. तब्बल १३७ च्या आसपास हे पथदीप बसविण्यात आल्यानंतर पथदीपांच्या दोन्ही बाजुला असलेल्या दिव्यांमुळे काही दिवस चांगलाच प्रकाश पडला. राज्य मार्ग चांगलाच उजळून निघत होता. मात्र नव्याचे नऊ दिवस...म्हणतात तशीच या पथदीपांच्या बाबत गत होताना गेल्या काही वर्षात हे चित्र हळूहळू बदलत गेले. दिवसेंदिवस एक एक करत पथदीप बंद पडले. एखाद्या दोन दिव्यांचा अपवाद वगळता गेल्या काही महिन्यांपासून सर्वच दिवे बंद झालेले आहेत.

मोठ्या वाहतूक व रहदारीचा राज्य मार्ग, येवला शहरवासियांचे मोठे आवागमन...प्रत्येक क्षणाला भरधाव वेगाने धावणारी वाहने बघता रात्रीच्या वेळेस बंद राहणारे हे पथदीप मोठा चिंतेचा विषय झाला आहे. त्यातही दिवसेंदिवस या मार्गावर होणारे अपघाताचे प्रमाण बघता बंद पथदिपांबाबत शहरवासीयांची ओरड सुरु झाली आहे. एकंदरीत हे पथदूप केवळ शोभेचे बाहुले बनुन राहिले असून, राज्य मार्गावरील येवला शहर परिसरातील हे अंधाराचे साम्राज्य कधी दूर होणार? असा सवाल नागरिक करीत आहेत.

सोलरवरील दिवेही बंदच

टोल रोड कंपनीने येवला शहराचे मुख्य प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या येवला शहरातील विंचुर चौफुलीवर तसेच फत्तेबुरुज नाक्यावर उंच असे 'हायमॉक्स' दिवे काही वर्षांपूर्वी उभारले आहेत. त्यातील बरचसे दिवे गेल्या काही महिन्यांपासुन बंद असून, सेटमधील एखादा दुसराच दिवा प्रकाश देताना दिसतो. अनेकदा झटके खात कोमात जाणारे हे हायमॉक्स दिवे देखील चिंतेत टाकून जातात. टोल कंपनीने विंचुर चौफुलीवर तसेच त्यापुढे दक्षिणेला राज्य मार्गावर बसविलेले सोलर दिवे तर कायमच बंद दिसत आहेत. हे सौर ऊर्जेवरील पथदीप कधी उजळणार? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

सोयीसुविधा कोमात, टोलवसुली जोमात!

पिंपळगाव शिवारात टोल कंपनीचा टोल नाका असून, या टोल नाक्यावर दिवसाकाठी जवळपास साडेतीन ते चार लाखांच्या आसपास टोल गोळा होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.दररोजचा हा टोल बघता महिन्याला टोल कंपनीच्या खात्यात करोडो रुपये जमा होतात. या बाबी लक्षात घेता टोलवसुली करणाऱ्या कंपनीकडून नियमानुसार राज्य मार्गावर दिल्या जाणाऱ्या सोई सुविधांच्या बाबतीत मोठा अभाव नजरेत पडत आहे. विशेषतः गेल्या अनेक महिन्यांपासुन टोल कंपनीने आपल्या अंतर्गत येणाऱ्या रस्त्याची येवला शहरानजीकची डागडुजी अथवा दुरुस्ती न केल्याने अनेक ठिकाणी रस्त्यात मोठे खड्डे पडले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अतिक्रमणांवर पुन्हा चालला बुलडोझर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील अतिक्रमणांवर महापालिकेने पुन्हा एकदा बुलडोझर चालवला आहे. बुधवारी संभाजी चौक व महात्मानगर परिसरात निर्मूलन अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली आहे. महात्मानगर येथील काही अतिक्रमणधारकांनी मोहिमेस अडथ‍ळा आणल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

शहराच्या अनेक भागात अतिक्रमणाने विळखा घातला असून त्यावर कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी होती. नाशिक महापालिकेच्या वतीने अतिक्रमण निर्मूलन मोहीमे अंतर्गत पश्चिम विभागातील संभाजी चौक उंटवाडी परिसरातील पोकार रेसिडन्सी या इमारतीच्या उत्तर बाजुला श्रीमती तारादेवी रतनलाल बाफना व आर. सी. बाफना ज्वेलर्स यांनी लोखंडी अँगल व पत्र्याच्या शेडचे अतिक्रमण केले होते. दुपारी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत हे अतिक्रमण उध्वस्त करण्यात आले. या कारवाईत लोखंडी पत्रे, अँगल, जाळी असे सामान जप्त करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे महात्मानगर येथील मोना चेंबर्स या इमारतीत नरेंद्र सिंग बिंद्रा यांच्या मालकीच्या दुकान नं ३, ४,६ समोर वाढीव बांधकाम करुन पत्र्याचे शेड उभारले होते हे देखील या कारवाईत जमीनदोस्त करण्यात आले. या ठिकाणाहून तीन नग टायर मशिन, २ स्टॅँड, १ प्लास्टिक कव्हर असे साहित्यही जप्त करण्यात आले आहे. त्याच परिसरातील रमेश चेणानी यांच्या दुकानासमोर देखील अतिक्रमण काढण्यात आले. या कारवाईच्यावेळी महात्मानगर येथे नरेंद्रसिंग बिंद्रा यांनी अतिक्रमण निर्मूलन मोहीमेस विरोध करुन कामकाजात अडथळा आणला. तसेच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याने त्यांच्या विरोधात गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---

ही मोहीम राबवताना मोठी गुप्तता बळगण्यात आली होती. अनेकवेळा नोटीस बाजवूनही अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण काढून न घेतल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ही मोहीम राबवताना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची ४ पथके बांधकाम विभागाचे जेसीबी व मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ही कारवाई आयुक्त प्रविण गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त आर एम बहिराम यांच्या अधिपत्याखाली जयश्री सोनवणे, जी.जे. गवळी, यु.डी. जाधव व कर्मचाऱ्यांनी राबवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मुक्त’च्या पीएचडीला यूजीसीचा चाप

$
0
0

bhavesh.brahmankar@timesgroup.com

नाशिक : मोठ्या दिमाखात पीएचडीचा अभ्यासक्रम सुरू करणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला आता हा अभ्यासक्रम पुढील वर्षी न घेण्याचे पत्र विद्यापीठ अनुदान आयोगाला (यूजीसी) द्यावे लागले आहे. यूजीसीचे नियम न पाळता पीएचडीचा अट्टहास केल्यामु‍ळे विद्यापीठावर ही नामुष्की ओढावली आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानंतर बाहेरुन पीएचडी करण्याचा अभ्यासक्रमबंद करण्याचा निर्णय यापूर्वीच मुक्त विद्यापीठाला घ्यावा लागला आहे. या अभ्यासक्रमाची फेररचना करुन विद्यापीठाने पीएचडी पुन्हा सुरू करण्याचे निश्चित केले. प्रवेशित विद्यार्थ्यांना आपले संशोधन कार्य विद्यापीठात संबंधित विद्याशाखेत पूर्णवेळ थांबून करावे लागणार आणि संशोधक विद्यार्थ्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये दरमहा विद्यावेतन (फेलोशिप) दिले जाणार, असे विद्यापीठाने ठरविले. एकूण ४६ जागांसाठी घेण्यात आलेल्या पीएचडीच्या प्रवेश परीक्षेसाठी राज्यभरातून १५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले. ही प्रवेश परीक्षा घेण्यातही विद्यापीठाला अनेक अडचणी आल्या. परीक्षा लांबणीवर टाकण्यासह या परीक्षेचा निकाल उशिरा जाहीर करण्यात आला. त्यातच पीएचडीसाठीचे शिक्षक आणि गाईड नसल्याचा मुद्दाही उजेडात आला.

परिणामी, मुक्त विद्यापीठाच्या पीएचडी अभ्यासक्रमाची ही सारीच प्रक्रिया वादग्रस्त ठरली आहे. ही सारी बाब कमी म्हणून की काय, आता थेट मुक्त विद्यापीठाला या अभ्यासक्रमातून माघार घ्यावी लागली आहे. त्यासाठीचे पत्र विद्यापीठाने यूजीसीला दिले आहे. यंदा या प्रक्रिया राबविण्यात आल्याने आणि निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, असे आर्जव विद्यापीठाला यूजीसीकडे करावी लागली आहे. तसेच, पुढील वर्षापासून पीएचडीचा अभ्यासक्रम राबविणार नाही, असे लेखी आश्वासन विद्यापीठाला द्यावे लागले आहे. दूरदृष्टीचा अभाव आणि नियमबाह्य कामकाजाची हातोटी यामुळे विद्यापीठावर ही नामुष्की ओढावल्याचे बोलले जात आहे.

यूजीसीने बोलविलेल्या बैठकीत पीएचडीच्या अभ्यासक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. मात्र, त्यास मान्यता मिळू शकलेली नाही. यंदाच्या प्रक्रियेत निवड झालेल्या ३५ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. त्यांना विद्यापीठात संशोधन करता येईल. मात्र, पीएचडीचा सुरळीत अभ्यासक्रम यूजीसीची नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर झाल्यानंतरच सुरू करण्यात येईल.

डॉ. माणिकराव साळुंखे, कुलगुरू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगराध्यक्षपद निवड ३० नोव्हेंबरला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार येत्या २४ नोव्हेंबरला अर्ज दाखल करण्याची मुदत असून ३० नोव्हेंबरला अध्यक्षपदाची निवड करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, निफाड, कळवण, पेठ, चांदवड आणि देवळा या सहा गावांमध्ये प्रथमच नगरपंचायतींची स्थापना होऊन सार्वत्रिक निवडणुका गेल्या महिन्यात पार पडल्या आहेत. दिवाळीचा उत्सव सरल्यानंतर आणि जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह रजेववरुन कामावर आता रुजू झाल्याने नगरपंचायतींच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. अध्यक्षपदासाठीचे अर्ज २४ नोव्हेंबरला सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत दाखल केले जातील. त्याच दिवशी दुपारी २ वाजता या अर्जांची छाननी केली जाणार आहे. अवैध अर्जांची यादी २४ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजता जाहीर हाोईल. वैध अर्जांची यादी २७ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजेनंतर प्रसिद्ध केली जाईल. माघार घेण्याची मुदत २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेनंतर राहील. त्यानंतर ३० नोव्हेंबरला दुपारी २ वाजता होणाऱ्या विशेष सभेत अध्यक्षपदाची निवड केली जाईल. उपाध्यक्षपदासाठी ३० नोव्हेंबर रोजीच्या सभेतच उपाध्यक्षपदाचा अर्ज स्विकारुन त्याची छाननी केली जाईल. तसेच वैध व अवैध नावेही जाहीर केली जातील. त्याचवेळी माघारी आणि निवड केली जाईल, असे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले. निफाडला राजकारण तापले निफाड नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी राजकारणाने वेग घेतला आहे. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच शिवसेनेच्या तीन नगरसेवकांचा वेगळा गट तयार करण्यात भाजपचे पदाधिकारी आणि निफाडचे माजी सरपंच राजाभाऊ शेलार यांना यश आले आहे. तर, निफाडचे विद्ममान शिवसेना आमदार अनिल कदम यांना शह देण्यासाठीच शेलार यांनी व्युहरचना केल्याचे बोलले जात आहे. तर, गुरुवारीच मुकुंदा होळकर, सुनिता कुंदे आणि अपक्ष नगरसेवक किरण कापसे यांनी स्वतंत्र गट स्थापन केला आहे. हा गट आमदार कदम यांच्याशी संलग्न नसला तरी तो शेलार यांच्या विरोधी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका शाळा अंधारात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक महापालिकेच्या शिक्षण समितीने पालिकेच्या शाळांचे वीज बील वेळेवर न भरल्याने महावितरणने चार शाळांचा वीज पुरवठा खंडीत केला आहे. तर ७९ शाळांचा वीज पुरवठा खंडीत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे महापालिकेतील शाळा अधांरात सापडल्या आहेत. दरम्यान, महावितरणच्या कारवाईनंतर शिक्षण समिती खळबळून जागे झाली असून, पालिकेत बील भरणा करण्यासाठी धावाधाव सुरू केली आहे. महापालिकेत शिक्षण मंडळाऐवजी आता शिक्षण समिती अस्तित्वात आली आहे. त्यामुळे शिक्षण मंडळाचे अधिकार कमी होऊन पालिकेला अधिक अधिकार आले आहे. या बदलाचा फटका शाळांना बसला असून, शाळांचे वीज बिल भरण्यासाठी प्रशासनाला आता आयुक्तांकडे धाव घ्यावी लागत आहे. महापालिकेच्या १३१ शाळा असून त्यांचे महिन्याचे सरासरी बील सव्वा दोन लाख रुपयांच्या आसपास येते. समिती अस्त‌ित्वात आल्यापासून बील भरण्याची प्रकिया बदलली आहे. त्याचा फटका थेट शाळांना बसला आहे. वेळेवर बील भरणा न झाल्याने महावितरण नाशिकरोडच्या तीन व पंचवटीची एक अशा चार शाळांचे वीज खं‌डीत केल‌ी. तर ७९ शाळांचे वीज कनेक्शन तोडण्यासाठी नोटीस दिली आहे. त्यामुळे प्रशासन खळबळून जागे झाले असून, बील भरण्यासाठी धावाधाव सुरू केली आहे. दोन दिवसात बील भरण्याचे आश्वासन पालिकेने महावितरणला दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीजींच्या झाडाझडतीनंतर ‘सीपी’ लागले कामाला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक राज्याचे पोलिस महासंचालक प्रविण द‌‌‌ीक्ष‌ित यांनी दोन दिवसापूर्वी घेतलेल्या झाडाझडतीचा परिणाम आज आयुक्तालयात काही प्रमाणात दिसून आला. पंचवटीत झालेल्या घरफोडीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांनी घटनास्थळी भेट देऊन तब्बल दोन तास माहिती घेतली. सिंहस्थानंतर नाशिक पोलिस आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी आता आपले बस्तान बसवण्यास सुरूवात केली आहे. कमाईचे वेगवेगळे पर्याय चाचपून पाहण्यास सर्वांकडून सुरूवात झाली असून, पंचवटीत एकटवलेले अवैध व्यवसाय सर्वांच्या केंद्रस्थानी आहेत. काही वर्ष कमाईच्या ठिकाणांपासून दूर राहिलेले कलेक्टर पुन्हा सक्रिय झाल्याने चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पंचाईत होत असल्याची कैफ‌ियत मांडली जाते आहे. त्यातच वाहतूक विभागातील कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा कायमस्वरूपी स्पॉट देण्याबाबत हालचाली सुरू असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. सध्या वाहतूक कर्मचाऱ्यांना दररोज नियुक्त केले जाते. त्यामुळे एकाच ठिकाणावर बस्तान बांधणे कर्मचाऱ्यांना शक्य होत नाही. तेच ठराविक ठिकाणीच त्यांची नियुक्ती असेल तर हप्तेखोरीसारखे प्रकार वाढण्याचा धोका निर्माण होतो. मात्र, याकडे दुर्लक्ष करीत हा निर्णय पुढे रेटण्याचा प्रयत्न होतो आहे. आर्थिक सुबत्तेचे गणित आखण्याचे काम सर्वच पातळ्यांवर सुरू असल्याने गुन्हेगारांचे फावले आहे. संबंध शहरातील अवैध धंद्यांचे केंद्रीकरण पंचवटीत झाल्याने तिथे गुन्हेगारांचा वावर वाढला आहे. यातून घरफोडी, मोटारसायकल चोरी, हाणामाऱ्या, खून असे गंभीर प्रकार वाढीला लागले. याची गंभीर दखल पोलिस महासंचालक प्रविण दीक्ष‌ित यांनी घेतली. काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये आलेल्या द‌ीक्ष‌ित यांनी उपस्थित अधिकाऱ्यांचे पीसे काढली. अधिकारी फिल्डवर जातच नसल्याचे त्यांनी स्पष्ट करीत पोलिस आणि नागरिकांचा संबंध वाढवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना राबवण्याचे आदेश दिलेत. दीक्ष‌ित यांनी केलेल्या सुचनांचे पालन करण्यास किमान पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी पुढाकार घेतल्याचे दिसते. पंचवटी येथील घरफोडीनंतर जगन्नाथन यांनी काही तास पोलिस स्टेशनमध्ये घालवले. आता, उर्वरीत पोलिस यंत्रणा दीक्ष‌ित यांच्या आदेशाचे कितपत पालन करते, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माहिती टाळाटाळ प्रकरणी ‘सावाना’वर कारवाई

$
0
0

ग्रंथालय अनुदान रोखण्याच्या सूचना म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक माहितीचा अधिकार देण्यात टाळाटाळ केल्याने सार्वजनिक वाचनालयाचे अनुदान वितरीत न करण्याच्या सूचना सहायक ग्रंथालय संचालकांनी दिल्या असल्याचे पत्रक सावानाचे माजी कार्यवाह श्रीकांत बेणी यांनी प्रसिध्दीला दिले आहे. अग्निशमन यंत्रणेचे काम, सभासदांची यादी, जून ते ऑगस्ट २०१५ च्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीचा वृत्तांत या विषयांची माहिती मिळावी असा अर्ज श्रीकांत बेणी, हेमंत देवरे, श्रीकृष्ण शिरोडे यांनी जनमाहिती अधिकारी व सावानाचे कार्यवाह यांच्याकडे केला होता. परंतु त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. माहिती देण्याऐवजी नवीन व्यक्तीची नियुक्ती होईपर्यंत माहिती देता येणार नाही, अशा आशयाचे पत्र अर्जदारांना पाठविण्यात आले. जनमाहिती अधिकारी नियुक्त होण्याबाबत आठ बैठका होऊन देखील कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. हा प्रकार अध्यक्षांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी कार्यवाहांनाच कामकाज पाहण्याचे आदेश दिले व त्याबदल्यात कार्यवाहपदाच्या काही जबाबदाऱ्या इतरांकडे सुपूर्द करण्यात आल्या. परंतु तरीही कार्यवाहांनी अर्जदारांना कोणतीही माहिती दिली नाही. चार महिने वाट पाहिल्यानंतर श्रीकांत बेणी यांनी नाशिक विभागाचे सहायक ग्रंथालय संचालक अ. द. येवले यांच्याकडे लेखी तक्रार केली. या तक्रारीची
दखल येवले यांनी घेतली व सावानाचे अध्यक्ष व कार्यवाह यांना पत्र पाठवले. अर्जदारांना २१ नोव्हेंबरपर्यंत सर्व माहिती पुरवावी आणि माहिती वेळेत का देण्यात आली नाही. याबाबत खुलासा करावा असे आदेश या पत्रात देण्यात आले आहेत. अर्जदारांना योग्य माहिती पुरवित नाही तोपर्यंत सावानाला कोणत्याही प्रकारचे अनुदान वितरीत करण्यात येऊ नये, अशा सूचना जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुरज मडावी यांना येवलेंकडून देण्यात आल्या आहेत. सावानाला अनुदान मिळालेले आहे, अनुदान थांबविण्याचे कोणतेही लेखी आदेश नाहीत. ते आदेश तोंडी आहेत अशी माहिती आहे. - मिलिंद जहागिरदार, कार्यवाह सावाना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीवनात साधना महत्त्वाची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

'आपल्या सर्वांच्या जीवनात साधना महत्त्वाची आहे. साधना नसेल तर आपले जीवन व्यर्थ आहे. ज्ञानाचे स्वरूप जाणून घेतल्याशिवाय समर्पण होत नाही. यासाठी साधना महत्त्वाची आहे. साधनेशिवाय समर्पण नाही. साधनेचे सूत्र प्रत्येकाने जाणून घेतले पाहिजे.' असे प्रतिपादन हिमाचल प्रदेशातील जीवन आश्रमाचे स्वामी प्रकाशानंद महाराज यांनी केले.

पंचवटीतील पेठ रोडवरील कैलास मठात बुधवारपासून सुरु असलेल्या संत संमेलनात मार्गदर्शन करताना स्वामी प्रकाशानंद महाराज बोलत होते. यावेळी महामंडलेश्वर स्वामी साविदानंद सरस्वती यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी स्वामी विश्वात्मानंद (हरिद्वार), स्वामी मनीशानंद(माउंटअबू), स्वामी महेशानंद(पंजाब), स्वामी शिवज्योतीशानंद (अजमेर), स्वामी शिवचांद्रायगिरी (वृंदावन), स्वामी केशवानंद (गंगोत्री), स्वामी च‌िदंबारानंद (हिमाचा प्रदेश), स्वामी सागरानंद सरस्वती (त्रंबकेशवर), माता ऋतेश्वरी (जायतगर), स्वामी स्वरूपानंद (गुजरात) आदी उपस्थित होते. देशभरातून आलेल्या सर्व साधुसंतांचे यावेळी पूजन करण्यात आले.

स्वामी प्रकाशानंद महाराज यांनी यजुर्वेदातील ३४ व्या अध्यातील बारावा मंत्र 'तन्मे मन: शिवसंकल्प मास्तु'या श्लोकावर मार्गदर्शन केले. स्वामी साविदानंद सरस्वती यांनी मार्गदर्शन करताना संत ज्ञानेशवर व संत जनाबाई यांनी आपल्या अभंगात मनाचे जे महत्त्व सांगितले. गुरुवारी सकाळच्या सत्रात 'आनंदाचे डोही आनंद तरंग' या उक्तीप्रमाणे सर्व संतांनी आणि उपस्थित भक्तांनी आनंद घेतला. भगवान श्री रामचंद्र एवं भगवान शिवाची मंत्रात्मक पूजा प.पु.स्वामी प्रकाशानंद महाराज यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच 'श्री श्री आनंदमयी मा' यांचा स्मृतिदिन असल्याने त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यात आला. दुपारच्या सत्रात सर्व उपस्थित संत व महंत यांनी आपल्या व्याख्यानातून परमेश्वर प्राप्तीसाठी आपण सदैव भजन, पूजन केले पाहिजे. अखंड सत्संग केला पाहिजे, असेही सांगितले. यावेळी स्वामी डॉ. निरंजन भाई महाराज यांनी संतांची पूजा केली पाहिजे, संत साहित्याचा कायम अभ्यास केला पाहिजे आपल्या वाणीतून संताना आपली ओळख करून दिली पाहिजे. आपली वाणी पवित्र असली पाहिजे असेही सांगितले. स्वामी गोरक्षगिरी महाराज यांनी सांगितले की, आपल्या मनाच्या शांतीसाठी आपण कायम देवाचे नामस्मरण केले पाहिजे, चिंतन केले पाहिजे, आपले अंतकरण जोपर्यंत शुद्ध होणार नाही तोपर्यंत आपणास परमेश्वर प्राप्ती होणार नाही. परमेश्वराच्या उपासनेने आपले मन आणि अंतकरण शुद्ध व पवित्र होते असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी विविध संतांनी आपल्या पवित्र वाणीतून परमेश्वर प्राप्तीचे मार्ग सांगितले. यावेळी व्यासपीठावर स्वामी नरेंद्रभाई शास्री, स्वामी शिवज्योतीशानंद महाराज, स्वामी रुद्रानान्द्जी महाराज, स्वामी महेशानंद महाराज, स्वामी मनीषानंदजी महाराज, स्वामी केशवानंद महाराज आदी उपस्थित होते.

शुक्रवारी सकाळी 'नाशिकतीर्थ की, रहस्यात्मक महिमा एव गरिमा' या विषयावर विविध संतांचे विचार मंथन होईल. त्यानंतर दुपारचे भोजन तथा महाप्रसाद आणि पुन्हा दुपारच्या सत्रात विविध संत विचार व्याख्याने आयोजित केले आहेत. सायंकाळी संत संमेलनाचा समारोप होणार आहे. परिसरातील भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


यज्ञामुळे निसर्गचक्र अबाधित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

'विश्वशांतीसाठी यज्ञ करणे अनिवार्य असून, हिंदू धर्मात कुठल्याही देवता यज्ञाद्वारेच प्रसन्न होत असल्याचे पुराणात दाखले आहेत. सप्तशती, शतचंडी, सहस्त्रचंडी, लक्षचंडी अशा यज्ञामुळे निसर्गचक्र अबाधित राहण्यास मदत होते.' असे प्रतिपादन महामंडलेश्वर डॉ. रामकृष्णदासजी लहवितकर यांनी केले.

देवळालीत माळावरची देवी म्हणून प्रख्यात असणाऱ्या महालक्ष्मी मंदिरात मंदिर सेवा समितीतर्फे आयोजित शतचंडी यज्ञाच्या पूर्णाहुती प्रसंगी ते बोलत होते. तीन दिवस चाललेल्या या यज्ञाच्या समारोप प्रसंगी वेदपठन, स्थापित देवतापूजन, महाअभिषेक, बल‌िदान, ब्राह्मण पूजन होऊन वाजत गाजत मिरवणुकीद्वारे स्थापित देवतेंच संध्यास्नान होऊन १११ जोडप्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी यज्ञाचे महत्त्व विशद करताना प्रधानाचार्य राजाभाऊ खोचे यांनी यज्ञ का, कोणी, कधी, कसा आणि कोणाकडून करावा याचे महत्त्व विषद केले. महिला व मुलींनी डोक्यावर कलश घेत सायंस्नानासाठी निघालेल्या मिरवणुकीत सहभाग घेतला. यावेळी देवीचा व राक्षसाचा सादर केलेला देखावा आकर्षण ठरला. यज्ञादरम्यान यजमान प्रमोद आडके, भाऊसाहेब पेखळे, विठ्ठल कोठुळे, पंढरीनाथ आडके, मंगेश पाळदे हे यजमान म्हणून उपस्थित होते. तर तीन दिवस चालणाऱ्या या शतचंडी यज्ञ सुरळीतपणे पार पाडण्यासाठी महालक्ष्मी मंदिर सेवा समितीचे सर्व सदस्य, महालक्ष्मी महिला मंडळ प्रयत्नशील होते. समितीच्या वतीने सांयकाळी महाआरतीसाठी परिसरातील मान्यवरासंह भाविकांनी हजेरी लावली होती. तद्नंतर मुझिक बिट्स या आर्केस्ट्रा समूहाने भक्ती व भावगीतांची सुरेख मैफल सादर केली, यानंतर झालेल्या महाप्रसादाचा लाभ पंचक्रोशीतील भाविकांनी घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्रीय समिती आज नाशकात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक राज्यात यंदा पावसाने सरासरीही न गाल्याने निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समितीची चार पथके राज्यात दाखल झाली आहेत. यातील एक पथक नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर शुक्रवारी येणार आहे. येवला, नांदगाव आणि सिन्नर तालुक्यातील गावांमधील दुष्काळी परिस्थितीची पाहणी ही समिती करणार आहे. राज्यात यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती उदभवल्याने या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे आर्थिक निधीची मागणी केली आहे. त्यासाठीच केंद्र सरकारने चार पथकांची नियुक्ती केली आहे. पथक क्रमांक १ हे जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेचा दौरा करणार आहे. पथक क्रमांक २ हे बीड, लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातील पाहणी करणार आहे. पथक क्रमांक ३ हे नाशिक आणि नगरचा दौरा करणार असून, पथक क्रमांक ४ हे धुळे, जळगाव, बुलढाणा आणि औरंगाबाद जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची दाहकता लक्षात घेणार आहे. नाशिकच्या दौऱ्यावर येणाऱ्या पथकामध्ये नीती आयोगाचे उप सल्लागार मानस चौधरी आणि केंद्रीय ऊर्जा प्राधिकरणाचे उपसंचालक शंतनू बिश्वास यांचा समावेश आहे. शुक्रवारी (२० नोव्हेंबर) सकाळी ९.३० च्या दरम्यान पथकाचे येवला तालुक्यात आगमन होणार आहे. येवला, नांदगाव आणि सिन्नर या तीन तालुक्यातील किमान तीन गावांमध्ये हे पथक जाणार आहे. यावेळी त्यांच्या समवेत विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, उपविभागीय अधिकारी वासंती माळी यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी राहणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील एकूण १६३३ गावे ही दुष्काळाच्या छायेत आहेत. या सर्व गावांची आणेवारी ५० पैशापेक्षा कमी आहे. नाशिक जिल्ह्यातील घटलेले पर्जन्यमान, जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती, जिल्ह्यातील सध्याचा जलसाठा आदींचा अहवाल समितीला सादर केला जाणार आहे. दुष्काळी परिस्थितीची पाहणी करुन त्याचा एकत्रित अहवाल ही समिती केंद्र सरकारला देणार असून त्यानंतरच राज्य सरकारला दुष्काळ निवारणासाठीचा निधी मंजूर होणार आहे.
केंद्र‌ीय समिती शुक्रवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. दुष्काळाला नागरिक कशा पद्धतीने तोंड देत आहेत, ही वस्तुस्थिती समितीच्या निदर्शनास आणून देण्यात येईल. -रामदास खेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदर्श गावसाठी फक्त ढवळेश्वरचा प्रस्ताव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आदर्श गाव निर्मितीसाठी जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातील ढवळेश्वर या एकाच गावाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. पुण्यातील राज्यस्तरीय कार्यकारी समितीकडे हा प्रस्ताव पाठविणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी मंगळवारी दिली.

विपरीत परिस्थितीशी दोन हात करीत अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार गावाने आजतागायत आदर्श ग्राम लौकीक सांभाळला आहे. राज्यातील अन्य गावेही हिवरेबाजार प्रमाणेच आदर्श व्हावीत यासाठी राज्य सरकारने १९९२ मध्ये आदर्श गाव निर्मितीची योजना हाती घेतली. जिल्ह्यात यापूर्वी देवळा तालुक्यातील कापशी गावाची या योजनेसाठी निवड करण्यात आली आहे. तेथे ६ कोटी ६८ लाखांची कामे पूर्ण झाली आहेत. चालू वर्षासाठी मालेगाव तालुक्यातील ढवळेश्वर या गावाचा विकास करता यावा यासाठी जिल्हा प्रशासनाने समितीकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावावर जिल्हाधिकारी कार्यालयात आज चर्चा करण्यात आली. या बैठकीला कृषी विभाग तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी उपस्थित होते. या गावाची योजनेसाठी अंत‌िम निवड झाली तर तेथे पाणी पुरवठ्याच्या सुविधा, शाळा बांधणी, कुपोषण जनजागृती, व्यसनांच्या दुष्परिणामांविषयी माहिती देणे, किमान दहावीपर्यंतच्या शिक्षणाची सुविधा गावात उपलब्ध करून देणे, गावामध्ये एकता प्रस्थापित करणे यांसारखी कामे मार्गी लागू शकणार आहेत. पाणलोट विकास, बॅंकींग क्षेत्रातील सेवा सुविधा पुरविणे, कौशल्य वृध्दी प्रशिक्षणे, पशुसंवर्धन, शेतीसंबंध‌ीच्या सेवांचा दर्जा उंचावणे, गावातील युवकांना रोजगार तसेच स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासारखी कामे मार्गी लावणे शक्य होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशकात सिंगल स्क्रिनचा पडदा पडला !

$
0
0

सरकारचे अनाठायी धोरण कारणीभूत म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक चित्रपटमहर्षींची कर्मभूमी म्हणून सर्वदूर परिचित असलेल्या नाशिक शहरातून सिंगल स्क्रिन नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. शहरात एकेकाळी संपन्नतेमध्ये वावरलेले सिंगल स्क्रिन आज मरणकळा अनुभवत आहेत. सरकारचे अनाठायी धोरण व सिंगल स्क्रिनच्या मालकांचे दुर्लक्षच याला जबाबदार असल्याची प्रतिक्रिया प्रेक्षकांमध्ये उमटत आहे. सिंगल स्क्रिनसाठी देण्यात येणाऱ्या सुविधा 'ए वन' दर्जाच्या असाव्यात असे धोरण सरकारने जाहीर केल्यानंतर नाशकातील सर्वच सिंगल स्क्रिन बंद पडले आहेत. मालेगाव स्टॅण्डवरील अशोक, त्यापाठोपाठ रविवार पेठेतील हेमलता, दूधबाजारातील प्रभात थिएटर, अशोकस्तंभावरील सर्कल, विकास थिएटर, भद्रकालीमधील दामोदर, विजयानंद, मधुकर, चित्रमंदिर ही एकेकाळी जनमानसावर राज्य केलेली थिएटर बंद पडली असून, सामान्य प्रेक्षक चित्रपटापासून वंचित झाला आहे. सिंगल स्क्रिन थिएटरमध्ये केवळ महालक्ष्मी हे एकच थिएटर सद्यस्थितीत सुरू असून, त्याचीही अवस्था बिकट अशीच आहे. काही काळापूर्वी राजस्थान सरकारने सिंगल स्क्रीन थिएटर्सचा मनोरंजन कर शून्य केल्याची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्रातही तसे वारे घुमले होते. त्यात नाशिकच्याही सर्व थिएटर्स मालकांचा समावेश होता. राज्य सरकारने सिंगल स्क्रिनवर लादलेला करमणूक कर कमी करावा, एक्झिट पॉलिसीचा अधिकार मालकांना द्यावा व व्यवसाय संवर्धनासाठी आर्थिक पाठबळ द्यावे, अशा मागण्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलने करण्यात आली; मात्र सरकारने सिंगल स्क्रिन मालकांच्या कोणत्याही मागणीकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे मनोरंजन कर भरून आणि सरकारच्या अनाठायी मागण्या पूर्ण करताना मालकांच्या नाकी नऊ आले. 'ए वन' दर्जाची सुविधा देऊ शकत नसल्याने अनेकांनी थिएटर्सच बंद करून टाकली आहेत. सध्या मुंबईत सिंगल स्क्रीन थिएटर्ससाठी ४५ टक्के मनोरंजन कर आहे. तर राज्यभरातील थिएटर्सना ४० टक्के मनोरंजन कर आकारला जातो. हा कर अवाजवी आहे. मल्टिप्लेक्सच्या तुलनेत सिंगलला सापत्नपणाची वागणूक मिळते. मल्टिप्लेक्सला करमणूक करामध्ये तब्बल पाच वर्षे सूट देण्यात आली आहे. पैकी तीन वर्षे १०० टक्के तर दोन वर्षे ५० टक्के अशी ती सूट आहे मात्र सिंगल स्क्रिनला पूर्ण कर भरावाच लागतो. नफा मिळत नसतानाही सरकारच्या अध्यादेशानुसार हे स्क्रिन बंद करता येत नाही. त्याच्या मेन्टेनन्ससाठी कोणतीही रक्कम सरकारकडून देण्यात येत नाही. तसेच सिंगल स्क्रिनच्या भवितव्यासाठी सरकार कोणतीही योजना राबवत नाही. त्यामुळे ही थिएटर्स बंद करून टाकण्यात आली आहेत. मराठी चित्रपटांच्या माहेरघरावरही कळा विजयानंद थिएटरला मराठी चित्रपटांचे माहेरघर म्हणून संबोधण्यात येत‌े. याठिकाणी ५२ आठवड्यांमध्ये १५० मराठी चित्रपट दाखविण्यात येतात. मात्र लायसन्स रद्द केल्याने सध्या विजयानंद, दामोदर आणि मधुकर हे तिन्ही सिंगल स्क्रिन बंद अवस्थेत आहेत. दामोदर चुंबळे यांच्या नावाने असलेले लायसन्स त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलांच्या नावे झाले मात्र त्यानंतर २२ हून अधिक अर्ज करूनही पोलिस आयुक्तालयाकडून पुढील पिढीच्या नावाने लायसन्स तयार झालेच नाही. त्यानंतर लगेचच भद्रकाली पोलिस स्टेशनकडून हे तिन्ही थिएटर बंद करण्याचे आदेश देण्यात आले. लायसन्स रद्द करण्याचे कोणतेही कारण न दाखवता ही कारवाई झाल्याने थिएटरमालक, कामगार वर्ग, प्रेक्षक असे सर्वांचेच हाल होत आहेत. आमच्या सात पिढ्या थिएटर सांभाळण्याच्या कामानेच गौरविल्या गेल्या. मराठी चित्रपटांना संजीवनी देणारे म्हणून आम्हाला २०१३ मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते गोल्ड मेडलही देण्यात आले. आता आमचे थिएटरच बंद करण्यात आले आहे मग आम्ही हे गोल्ड मेडल सरकारला परत करू का? विनय चुंबळे, संचालक विजयानंद थिएटर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुत्री मरणासन्न आहेत हे ठरवणार कोण?

$
0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर

घातक भटक्या कुत्र्यांना ठार मारता येऊ शकेल अशी परवानगी सुप्रीम कोर्टाने बुधवारी दिली. पण भटकी कुत्री घातक असतात हे मान्य असले तरी सर्वच भटकी कुत्री घातक ठरतात? ही कुत्री मरणासन्न आहेत हे ठरवणार कोण? भटक्या कुत्र्यांना जीवे मारण्यापेक्षा अजून काही उपाय होईल का? अशी हाक प्राणी मित्रांनी दिली आहे.

भटक्या कुत्र्यांना जीवे मारण्याऐवजी त्यासाठी योग्य ते उपाययोजना कराव्यात असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. भटक्या कुत्र्यांना ठार करून प्राण्यावर अन्याय होणार आहे. केवळ मनुष्याच्या संरक्षणासाठी प्राण्याची जीव घेणे योग्य ठरणार नाही असा सूर व्यक्त होतो आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने हा निर्णय बदलायला हवा असे मत प्राणीमित्रांनी व्यक्त केले आहे.

भटकी कुत्री माणसांसाठी घा‌‌तक आहेत. त्यामुळे त्यांना मारल्यास फरक पडणार नाही, असे डॉ. सुनील जगताप यांनी सांगितले. तर अनिमल वेल्फेअर सोसायटीचे सदस्य वैभव भोगले म्हणाले, प्राण्याला जगण्याचा अधिकार आहे. हे खूपच घातक असतील तर यांची नसबंदी करून संख्या कमी करावी.

भटक्या कुत्र्यांबाबत कठोर निर्णय घेणे आवश्यक असले तरी हा निर्णय योग्य नाही. हे हिंसक कृत्य असून माणुसकीला शोभणारे नाही. याउलट अशा कुत्र्यांची जंगलात किंवा संगोपनगृहात रवानगी करणे उपयुक्त ठरेल. पण त्यांना मारू नये.

राहुल अडांगळे

मानवधर्म आणि भूतदया या गोष्टींचा विचार करून निर्णय घ्यायला हवा. भटकी कुत्री अपघातांनाही कारणीभूत ठरतात. त्यांना अटकाव नक्कीच व्हायला हवा; पण ही कुत्री धोकादायक हे ठरवणार कोण? यासाठी योग्य समिती असावी. घातक कुत्र्यांना अटकाव करून औषधोपचार व्हावा.

स्वाती पाचपांडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉम्प्युटराईज्ड रेल्वे प्रतिकृती नाशकात

$
0
0

fanindra.mandlik@timesgroup.com

ना‌शिक : सेकंदा सेकंदाला धावणाऱ्या लोकल, या स्टेशनवरुन त्या स्टेशनवर धडधडत जाणाऱ्या रेल्वे गाड्या यांच्याबाबत कायमच लहान मोठ्यांना आकर्षण वाटत आले आहे. हे रेल्वेचे तंत्रज्ञान समजण्यासाठी भारतातील पहिले कॉम्प्युटराईज्ड रेल्वे मॉडेल पार्थ आणि सौमित्र या अभियंत्यांनी नाशिकच्या पंचवटी येथील कपीकुल येथे तयार केले आहे.

हे मॉडेल संपूर्णतः संगणकीकृत असून एस.एस.आय. (सॉलीड स्टेट इंटरलॉकींग) या प्रणालीद्वारे बनवण्यात आले असून, ही प्रणाली भारतीय रेल्वे सध्या वापरत आहे. जर्मनी येथील हॅम्बर्ग येथे अशीच एक प्रतिकृती असून दुसरी प्रतिकृती नाशिकमध्ये तयार करण्यात आली आहे. यात नव्यानेच इंग्लंडमध्ये अस्तित्वात आलेल्या ई.आर.टी.एम.एस. (युरोपियन रेल्वे ट्रेन मॅनेजमेंट सिस्टीम)चा समावेश करण्यात आला आहे. यामुळे तंत्रज्ञांना देखील यातून प्रशिक्षण मिळणार आहे. रेल्वेमुळे होणारे अपघात टळावेत व प्रवाशांचा प्रवास सुखरुप व्हावा याकरीता नवीन टेक्नॉलॉजीने सिग्नल सिस्टीम, रुट सिलेक्शन, ट्रॅक चेंजिंग, रेल रोड क्रॉसिंग या सर्व गोष्टी सॉफ्टवेअरद्वारे ऑटोमॅटीक तयार करण्यात आल्या आहेत. शहरातून, डोंगरातून, बोगद्यातून धावणाऱ्या ट्रेन्स नागरिकांच्या अकर्षणाच्या केंद्रबिंदू ठरल्या आहेत. आता नाशिककरांना मनोरंजनाबरोबरच रेल्वे यंत्रणेचे ज्ञान ही या मॉडेलद्वारे घेता येणार आहे. पार्थ व सौमित्र या रोबोटिक्स अभियंत्यांनी याची निर्मिती केलेली असून, या लेआऊटचे सर्व डिझार्इंनींग कृष्णमयी यानी अत्यंत कल्पकतेने साकारले आहे. यामध्ये भारतीय रेल्वेची सर्व यंत्रणा शिकायला मिळणार आहे. तसेच लहान मुलांना आवडेल अशी लहान लहान घर, आदर्श गाव, झाडे, बोगदा, धरण, पुल अशी सर्वच गोष्टी येथे कल्पकतेने साकारल्या आहेत. या रेल्वे प्रतिकृतीचे कंट्रोलींग कॉम्प्युटरद्वारे करण्यात येत असून, त्यात पीएलसी(प्रोग्रॅमेबल लॉजीक कंट्रोल), स्काडा (सुपरव्हायजरी कंट्रोल अॅन्ड डाटा अक्वेझिशन) ही सिस्टीम बसवली आहे.

इंजिनीअरींगचे विद्यार्थी किंवा रेल्वेमध्ये ज्यांना करीअर करायचे आहे अशा अभियंत्यांना हे अभ्यासासाठी पुरक ठरू शकते. या मॉडेलचा विद्यार्थ्यांना फायदा होणार असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचे तंत्रज्ञान समजावून घ्यावे यासाठी हे तयार करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगीकरणाची ‘सुरत’ बिघडणार!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील स्वच्छतेचे खासगीकरण करायला निघालेल्या महापालिकेतील सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाचे सुरत अभ्यास दौऱ्याने खाडकन डोळे उघडले आहते. सुरत शहराची स्वच्छता खासगीकरणाद्वारे नव्हे तर महापालिकेच्या सफाई कर्मऱ्यांमार्फतच केली जात असल्याचे समोर आले आहे. अतिरिक्त साफसफाईसाठी सुरत महापालिकेने अर्धवेळ रोजदांरी सफाई कर्मचारी नियुक्त केल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे आज, शुक्रवारी होणाऱ्या महासभेत महाआघाडीतील काही पक्षांसह शिवसेना-भाजपचा विरोध होऊन खासगीकरणाचा प्रस्ताव गुंडाळला जाण्याची शक्यता आहे.

नोकर भरती न करता, शहरातील स्वच्छतेचे काम खासगीकरणामार्फत करण्याचा १२ कोटींचा प्रस्ताव महासभेवर आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरत महापालिकेतील स्वच्छता कामांची पाहणी करण्यासाठी महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरूमीत बग्गा यांच्यासह पदाधिकारी, अधिकाऱ्यांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. सुरत पॅटर्नचा हवाला देवूनच शहरातील स्वच्छतेचे खासगीकरण करण्यात येणार होते. मात्र, या पाहणीत प्रशासनासह सत्ताधारी पदाधिकारी तोंडघशी पडले. सुरत महापालिकेत आस्थापनेवरील सहा हजार व प्रमुख रस्त्यांच्या रात्रीच्या साफसफाईसाठी १९०० अतिरिक्त अर्धवेळ रोजंदारी सफाई कर्मचाऱ्यांमार्फत शहराची स्वच्छता करण्यात येते. ८५ दिवसांच्या करारावर या कर्मचाऱ्यांना घेवून त्यांना महापालिकेमार्फत किमान वेतनानुसार वेतन थेट बँकेत जमा केले जाते.

स्वच्छतेची चतु:सूत्री

नाशिकचाच घंटागाडी प्रकल्प स्वीकारून गुजरातमधील सुरत महापालिकेने त्यात कालानुरूप बदल करीत स्वच्छतेचा स्वतःचा नवा पॅटर्न निर्माण केला आहे. संकलन, वाहतूक, प्रक्रिया, विघटनाच्या चतुःसूत्रीवर भर देत डेस्टबीनमध्येच कचरा साठविला जात आहे. विशेष म्हणजे सुरतवासीयांची स्वच्छता शुल्क भरण्याची मानसिकता तयार केली आहे. अस्वच्छता करणाऱ्याकडून शुल्क घेणे तर कचरा गोळा करणाऱ्यांना अनुदान देण्याची पद्धत अवलंबल्याने सुरत कचरा मुक्त झाले आहेत. त्यामुळे नाशिकच्या पदाधिकाऱ्यांवर अंतर्मुख होण्याची वेळ आली आहे.

अस्वच्छतेमुळे सन १९९५ मध्ये प्लेग रोगाचा सामना करणाऱ्या सुरतने देशभरात आज स्वच्छतेचा स्वत:चा आदर्श पॅटर्न तयार केला आहे. नाशिकचा आदर्श घंटागाडी प्रकल्पाची वाट लावणाऱ्या महापालिकेतील अधिकारी व लोकप्रतिनिधींना आपलाच प्रकल्प यशस्वीरित्या राबविणाऱ्या सुरतचा अभ्यास करावा लागत आहे. स्वच्छतेचा सुरत पॅटर्न पाहण्यासाठी महापालिकेने अभ्यास दौरा नुकताच झाला. यात महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरूमीत बग्गा, विरोधी पक्षनेता कविता कर्डक, माकप गटनेते तानाजी जायभावे, आरपीआय गटनेते प्रकाश लोंढे, काँग्रेसचे उद्धव निमसे, शिवाजी गांगुर्डे, आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे, पशुसंवर्धन अधिकारी प्रमोद सोनवणे यांच्यासह माध्यम प्रतिनिधींचा या दौऱ्यात समावेश होता.

नाशिकचा पॅटर्न सुरत महापालिकेने प्रभावीपणे राबवून शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्यात नाशिकपेक्षा आघाडी घेतली आहे. कचरा संकलनावर डोअर टू डोअर अधिक भर देत व त्याची प्रभावी अंमलबजावणी करत व कठोर नियमावली तयार करत स्वच्छतेबाबत आदर्श निर्माण केला आहे. सुरत महापालिकेने घरात कचराकुंडी न आढळल्यास घराच्या प्रति स्केअर फूट एक रुपया असा दंड आकारला जातो. घरातील कचरा कंचराकुंडीतून थेट डोअर टू डोअर घंटागाडीतच जात असल्याने कचऱ्याचे ट्रॅकींग उत्तम प्रकारे केले आहे. कचरा संकलन करण्यासाठी सात विभागात वाहतुकीची स्वंतत्र व्यवस्था निर्माण केली आहे. संकलित कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर त्याला कंटेनरने विघटनासाठी २० किलोमीटरवर नेला जातो. सोबतच कचरा स्पॉट फिक्स करून शहरात तब्बल कचऱ्याचे ११०० कंटेनरची व्यवस्था केली आहे. कचरा संकलनासाठी प्रतिटन एक हजार रुपये खर्च केला जातो. मात्र, नाशिक महापालिकेत कचरा संकलनासाठी तब्बल १२०० रुपये प्रतिटन खर्च केला जातो.

अस्वच्छेता करणाऱ्याला बसतो आर्थिक भूर्दंड

सुरत महापालिकेकडून स्वच्छतेसाठी प्रतिकुटूंब दरवर्षी ६०० रुपयांचा स्वच्छता कर आकारला जातो. अस्वच्छता केल्यानंतर त्याचा मोबदलाही द्यावा लागणार. निवासी भागासाठी प्रतिकुटूंब ६००, व्यापारी भागासाठी प्रतिदुकान ७५० तर एमआयडीसीसाठी १२०० रुपयांचा कर आकारला जातो. मालमत्ता करात करवसूली केली जाते. प्रतिवर्ष स्वच्छतेसाठी आकारल्या जाणाऱ्या करातून महापालिकेला १२५ कोटीचा महसूल मिळतो. तर खर्च ११० कोटीपर्यंत होतो. त्यामुळे कचऱ्याच्या संकलनातून महापालिकेला योग्य नियोजनामुळे १५ ते २० कोटीचे उत्पन्नही मिळते. तर दुसरीकडे नाशिक महापालिकेत स्वच्छतेसाठी कोणताही कर आकारला जात नाही. तर मोठ्या सोसायट्यांना कचरा संकलनासाठी अनुदानही दिले जाते. प्रतिघरासाठी ६० पैसे स्केअर फूट मोबदला दिला जातो.

हॉस्पिटल्स, हॉटेल्सची स्वतंत्र व्यवस्था

नाशिकमध्ये हॉस्पिटल्स व हॉटेल्सचे कचरा संकलन हे महापालिकेच्या घंटागाड्यांमार्फत केले जाते. मात्र, सुरत महापालिकेने हॉटेल्स व हॉस्पिटल्सवरच कचरा संकलनाची जबाबदारी सोपवली. हॉटेल असोसिएशनमार्फत हॉटेल्सचा कचरा गोळा केला जातो. यासाठी हॉटेल्स चालकांची स्वतंत्र व्यवस्था उभारली आहे. अशीच व्यवस्था बायोमेडिकल्स कचऱ्याची आहे. हॉस्पिटल्स असोसिएशनतर्फेच तो गोळा करून खासगी ठेकेदारामार्फत तो नष्ट केला जातो.

नाशिकला मानसिकता बदलावी लागणार

नाशिकच्या स्वच्छतेसाठी नागरिकांसह लोकप्रतिनिधींची मानसिकता बदलावी लागणार आहे. नाशिकमध्ये स्वच्छता कर आकारल्यास महापालिकेला प्रभावीपणे स्वच्छतेवर काम करता येणार आहे. मात्र, कर ही द्यायचा नाही आणि कर वाढवायचा नाही अशी अवस्था नागरिकांची व लोकप्रतिनिधींची असल्याने प्रशासन कोंडीत सापडले आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींना कर वाढवण्याची तर नागरिकांना कर देण्याची मानसिकता ठेवावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आमच्याकडे द्या कंपनी व्यवस्थापन!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

सातपूर एमआयडीसीतील ट्रायकॉम कंपनीतील कामगारांनी महिन्यापासून वेतनवाढ आणि बोनसचा प्रश्न सुटत नसल्याने कामबंद आंदोलन सुरुच ठेवले आहे. कंपनी मालकांनी स्थानिक व्यवस्थापन बाजूला ठेवून आमच्याकडे जबाबदारी सोपवावी, आम्ही कंपनी सक्षमपणे चालवून दाखवू असा दावा कामगारांनी गुरुवारी केला. दरम्यान, २८ दिवस उलटून देखील ट्रायकॉम कंपनीतील तिढा प्रश्न सुटत नसल्याने कामगारांनी आंदोलनाची भूमिका कायम ठेवली आहे.

ट्रायकॉम कंपनी व्यवस्थापनाने कामगारांच्या मागणीकडे लक्ष न घातल्याने ऐन दिवाळसणातही कामगारांना आंदोलन करावे लागले. याबद्दल कामगारांनी नाराजी व्यक्त केली आहे. अंबड व सातपूर एमआयडीसीमध्ये लहान, मोठे उद्योग आहेत. यात डाटा एन्ट्रीचे काम करणाऱ्या ट्रायकॉम कंपनीतील कामगारांनी दोन वर्षांपासून होत नसलेली वेतनवाढ, वेळेवर न मिळणारे वेतन आणि बोनसवरून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. आज २८ दिवसांपासून कामगार कंपनीच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करत आहेत. कंपनी व्यवस्थापनाने मात्र कंपनीच्या गेटवरच लॉकआऊटची नोटीस लावत हात झटकले आहेत. त्यातच कामगार उपायुक्त देखील कंपनीचीच बाजू मांडत असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. अनेकदा कामगार उपायुक्तांच्या दालनात झालेल्या बैठकीत कंपनी मालकच उपस्थित राहत नसल्याने तोडगा निघणार कसा, असा सवाल कामगारांनी उपस्थित केला आहे. ट्रायकॉम कंपनीत साडेतीनशेहून अधिक कर्मचारी सात ते आठ वर्षांपासून काम करत आहेत. सुरळीत काम होत असतांना कंपनीच कामगारांना वेढीस धरले जात असल्याचा आरोपही कामगारांनी केला आहे. यात योग्य तो तोडगा काढण्याचे साकडे कामगारांनी कामगार उपायुक्त आर. एस. जाधव यांना घातले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटीबाबत चर्चासत्रांमधून जागर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेच्या वतीने केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यातील २० शहरात समावेश व्हावा यासाठी नागरिकांची मते जाणून घेतली जात आहेत त्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध ठिकाणी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विविध स्तरातील नागरिकांची मते जाणून घेण्यात आली.

केंद्र सरकारने जाह‌ीर केलेल्या स्मार्ट सिटी अभियाना अंतर्गत नागरिकांचा सहभाग होण्याच्या दृष्टिकोनातून नाशिक शहरातील पर्यावरण प्रेमी व वृक्षप्रेमी नागरिक संस्था यांचे महात्मा फुले कलादालन येथे चर्चासत्र झाले. यामध्ये पर्यावरण वृक्षमित्र संघटनेच्या अनेक मान्यवरांनी अनेक मौलिक सूचना केल्या. त्यामध्ये पँन सिटी प्रोजेक्ट, एरिया बेस्ड प्रोजेक्टवर मान्यवरांनी त्यांची मते मांडली. कार्यकारी आभियंता (पर्यावरण) एस. आर. वंजारी यांनी सूत्रसंचालन केले. तसेच राष्ट्रीय नागरी उपजीवीका अभियान (NULM) स्मार्ट सिटी अंतर्गत बचतगट व फेरीवाला यांचीही मते जाणून घेण्यात आली. कालिदास कला मंदिरातील चर्चासत्रात महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त जीवन सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. तसेच झोपडपट्टीतील नागरिकांसाठी राजीव गांधी भवन येथे चर्चासत्र झाले. यावेळी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपआयुक्त आर. एम. बहिरम यांनी मार्गदर्शन केले. याशिवाय सरकारी निमसरकारी अधिकारी कर्मचारी यांची मते जाणून घेण्यासाठी उंटवाडी रोडवरील अशोका हॉल येथे चर्चासत्र झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अपोलो’त ‌लिव्हर ट्रान्सप्लांट ट्रिटमेंट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अपोलो हॉस्पिटलमध्ये आता लिव्हरशी संबंधित आजारांनी त्रस्त पेशंट्सना देखील उपचार मिळू शकणार आहे. लिव्हर संबंधित आजारांवर अद्ययावत आणि उत्तम दर्जाच्या उपचारांची सुविधा नाशिकमध्ये करण्यात येत असून नुकतेच सुपर स्पेशालिटी लिव्हर क्लिनिक आणि लिव्हर ट्रान्सप्लांट क्लिनिकची सुविधा सुरू करण्यात आल्याची घोषणा डॉ. शरद देशमुख यांनी केली.

स्वामी नारायणनगर आडगाव येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. देशमुख बोलत होते. भारतात दरवर्षी सुमारे २ लाख पेशंट्स शेवटच्या टप्प्यातील लिव्हर विकार आणि कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडतात. अतिमद्यपान आणि हिपॅटायटीस बी आणि सी, फॅटी लिव्हर यांसारख्या इन्फेक्शनमुळे लिव्हरला धोका निर्माण होतो. अशावेळी अचूक निदान आणि योग्य उपचार लवकर सुरू करणे आवश्यक असते. ती सर्व सुविधा ओपोलो हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होणार आहेत. हे क्लिनिक दर गुरूवारी लिव्हरच्या आजाराने त्रस्त पेशंट्ससाठी ओपीडी सुरू राहणार आहे. गरजेनुसार पेशंटला लिव्हर ट्रान्सप्लांटची सुविधा सुरू केली जाणार असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.

अपोलो हॉस्पिटल हैदराबादचे लिव्हर सर्जन डॉ. मनीष वर्मा यांनी सांगितले, की या क्लिनिकच्या माध्यमातून पेशंट्सना नियमित भेटून लिव्हर विकारांवर योग्य सल्ला व उपचार देता येणार आहे. अत्याधुनिक रोग निदानाचे आणि उपचाराचे परिपूर्ण तंत्रज्ञान नाशिकमधील तसेच उत्तर महाराष्ट्रातील पेशंट्ससाठी उपलब्ध व्हावे यासाठी अपोलो हॉस्पिटल येथे सुपर स्पेशालिटी लिव्हर क्लिनिक आणि लिव्हर ट्रान्सप्लांट क्लिनिक सुरू करत आहे. यावेळी हॉस्पिटलचे अॅडमिनिस्ट्रेशन हेड डॉ. स्वामी, डॉ. मंगेश जाधव, डॉ. डी. बी. पाटील, ज्ञानदेव वरुळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंडियन हॅण्डीक्राफ्ट एक्स्पोचा शुभारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अवध हस्तकला, हस्तशिल्प आणि ग्रामोद्योग समिती यांच्यातर्फे डोंगरे वसतीगृह मैदानावर इंडियन हॅण्डीक्राफ्ट अॅण्ड हॅण्डलूम एक्स्पो २०१५ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. ५० हजाराहून अधिक वस्तू एकाच छताखाली मिळत असल्याने ग्राहकांचा पहिल्या दिवसापासून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

अवध हस्तकला, हस्तशिल्प आणि ग्रामोद्योग समिती ही संस्था भारत सरकारच्या कापड मंत्रालयाने पुरुस्कृत केलेली आहे. प्रदर्शन २९ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार असून या प्रदर्शनात हस्तकारागिरांनी तयार केलेल्या वस्तू थेट ग्राहकांना मिळणार आहे. या प्रदर्शनात दिल्ली, महाराष्ट्र, पंजाब, जम्मू आणि काश्मिर, ओडिशा, गुजरात, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू या प्रातांचे कलाकार व उत्पादक सहभागी झालेले आहेत. यामध्ये डिझायनर ड्रेस मटेरियल, कुर्तीज, मार्बल मंदिर, लखनवी चिकन वर्क, फुलकारी वर्क, कच्छ हॅण्डब्लॉक प्रिंट, बांधनी वर्क, साऊथ कॉटन ड्रेस मटेरियल, कुरेशीया वर्क, हॅण्डमेड चिन पटना टाईज, जयपुरी ब्लॉक प्रिंट, व बेडशिट जम्मू व काश्मिर हॅण्डलूम शॉल, ड्रेस मटेरियल सारीज बिहार, भागलपुरी सिल्क ड्रेस मटेरियल वेस्ट बंगाल, तान्त सारीज्, काथा वर्क आदी असंख्य कपडे आणि वस्तू उपलब्ध असणार आहेत. प्रदर्शनाचा नाशिककरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देखभालीसाठी नाही कुणी वाली!

$
0
0

नामदेव पवार, सातपूर

नाशिक महापालिकेच्या सातपूर विभागात ३० हून अधिक उद्याने आहेत. परंतु, महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ही उद्याने ओस पडली आहेत. उद्यान विभागात कर्मचाऱ्यांचीच संख्या कमी असल्याने उद्यानांची देखभाल करणार कोण असा प्रश्न उपस्थित होतो. एकीकडे स्मार्टसिटीचे आव्हान महापालिका पेलण्याची तयारी करीत असतांना शहरातील उद्यानांकडे लक्ष देणार कोण? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.

नाशिक महापाल‌िकेतील सातपूर परिसरात ३७ उद्याने आहेत. महापालिकेने उभारलेल्या उद्यानांकडे महापालिकेचेच लक्ष नसल्याने उद्याने ओस पडलेली दिसतात. काही ठिकाणी उद्यानांजवळच राहत असलेल्या कर्मचाऱ्यांकडून उद्यानांची देखभाल केली जात असल्याचे दिसून येत आहे. मात्र, कर्मचाऱ्यांची नेमणूक नसलेल्या उद्यानांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. यात महापालिकेच्या उद्यान विभागातील कर्मचारी व अधिकारी यांची संख्या कमी असल्याने उद्यांनाची देखभाल करणार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. उद्यानात बसविण्यात आलेल्या खेळण्यांची दुरावस्था झाली आहे. यामुळे महापालिकाचा उद्यान विभाग करतो काय असा प्रश्न उपस्थित राहतो.

महिला बचत गटांना अजुनही आस

सातपूरमधील बहुतांश उद्याने ही महिला बचत गटांच्या माध्यमातून सुरळीत ठेवली जात होती. मात्र, बचत गटांकडून उद्यानांची कामे काढून घेतल्यानंतर प्रशासनाविरोधात नगरसेवक दिनकर पाटील यांनी महापालिका सभागृहात आंदोलन केले होते. यामध्ये काम केल्याबद्दल महिला बचत गटांना पैसे मिळाले. मात्र, बचत गटांकडून उद्यानांची कामे काढून घेण्यात आल्याने मोजकीच उद्याने सोडल्यास अन्य उद्याने ओस पडली आहेत. त्यामुळे आताही बचतगटांना आपल्याला काम मिळण्याची सकारात्मक अपेक्षा आहे.

राज्य कर्मचारी उद्यान सुस्थितीत

सातपूरला अशोकनगर भागात असलेल्या राज्य कर्मचारी वसाहतीतील उद्यानाकडे महापालिका व स्थानिक नगरसेवकांचे लक्ष असल्याने ते सुस्थितीत आहे. यामुळे उद्यानात लहान मुलांसह नागरिक व महिलांची वर्दळ नेहमीच असते. यात उद्यानात काम करणारे कर्मचारी जवळच राहत असल्याने उद्यानाची देखभाल वेळेवर होत असल्याचे रहिवाशांनी सांगितले.

गरज स्वतंत्र यंत्रणेची

महापालिकेच्या सातपूर विभागात ३७ उद्याने आहेत. मात्र, यात बहुतांश उद्यांनाची दुरवस्था झालेली आहे. असे असतांना उद्यान विभागात कर्मचारी संख्या अतिशय कमी आहे. उद्यानातील स्वच्छता, झाडांची देखभाल, पाण्याची व्यवस्था बघणे यासारखी कामे करणार कोण असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. उद्यानात तुटलेली खेळणी याकडे लक्ष कोण घालणार असाही प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेने स्वतंत्र यंत्रणा उभारूण याकडे लक्ष घालण्याची मागणी केली जात आहे.

सातपूरमधील रहिवाशांना विरंगुळाचे ठिकाण असावे यासाठी महापालिकेने उद्याने उभारली. परंतु, यात महापालिकेने केवळ ठराविक ठिकाणी लक्ष घातल्याने इतर ठिकाणी उद्यानांची दुरवस्था झाली आहे.

- रमाबाई नेरपगार, रहिवाशी, सातपूर

सातपूर भागात अद्ययावत उद्याने असावीत अशी नागरिकांची जुनी मागणी आहे. महापालिकेने उद्याने उभारली असली तरी यातील बहुतांश उद्यानांमध्ये टवाळखोर व मद्यपींचा वावर असतो.

- माणिकराव पाटील, रहिवाशी, सातपूर कॉलनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images