जागतिकीकरणामुळे व्यवसायांमध्ये प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. याचाच परिपाक म्हणून कुंभार व्यवसाय धोक्यात आला असून, त्यांचे दिवाळे निघण्याची वेळ आली आहे.
दिवाळी आली म्हणजे कुंभारांची दोन महिने अगोदरपासून कामाची प्रचंड लगबग सुरू होते. पणत्या बनविणे, महालक्ष्मीच्या मूर्ती बनविणे, धुपाटणे तसेच लहान मुलींसाठी मातीची खेळणी तयार करणे यासाठी ही लगबग असते. परंतु या दिवाळीत चायनाच्या पणत्या, चिनीमातीच्या पणत्या, लायटिंग असलेल्या पणत्या यामुळे मातीच्या पणत्यांकडे दुर्लक्ष झालेले आहे. मातीच्या पणत्या पंधरा रुपये डझन असूनही ग्राहकांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. यापेक्षा चिनी मातीच्या पणत्या किंचीत स्वस्त आहेत. महालक्ष्मीच्या मूर्ती मातीच्या ऐवजी पीओपीच्या आल्याने त्या अधिक सुबक दिसत आहेत. यामुळे ग्राहकांनी मातीच्या महालक्ष्मी खरेदी करण्यास उदासीनता दाखविली आहे. याचा परिणार कुंभार व्यवसायावर झाला आहे. यामुळे देशोधडीला लागण्याची वेळ त्यांच्यावर आली असून, नवीन व्यवसाय शोधण्याची वेळ आली आहे.
सद्यस्थितीला मातीची खेळणी बाद झाली असून प्लास्टिकची खेळणी स्वस्त व टिकाऊ असल्याने लोकप्रिय होऊ लागलीत. याचबरोबर पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याचे जारही वापरू लागल्याने हा व्यवसाय वाढला आहे. परंतु या सर्वांचा फटका पूर्णपणे कुंभारी व्यवसायावर पडला आहे. त्यांच्या मटक्यांची खरेदी थांबली. यामुळे कुभांरांकडे सहा महिन्यांपेक्षा अधिक काळापासून मातीचे मटके पडून आहेत. मातीच्या कुड्यांऐवजी प्लास्टिकच्या कुंड्या वापरात आल्याने मातीच्या कुंड्याही विकणे कुंभारांना मुश्किल झाले आहे. ऐन दिवाळीत कुंभारांचे दिवाळे निघण्याची वेळ आली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट