म. टा. प्रतिनिधी, नाशिक
राज्य मंत्रिमंडळात सहकार राज्यमंत्रिपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर दादा भुसे यांच्याकडून मतदारसंघातील जनतेच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात उंचावल्या आहेत. विकासापासून वंचित असलेल्या तालुक्यात विकासाची गंगा वाहती होईल, अशी अपेक्षा मतदार बाळगून आहेत. जिल्हा निर्मितीचे भिजत घोंगडे मार्गी लावण्याबरोबरच रोजगार वाढीसाठी उपयुक्त असलेला औद्योगिक वसाहतींचा प्रश्न, पिण्याचे पाणी तसेच शेती सिंचनाचा प्रश्न सोडविण्याचे आव्हान ना. भुसे यांच्यापुढे आहे.
सलग तिसऱ्यांदा संधी मिळाल्याने ना. भुसे यांनी आजवर मतदारसंघात छोटी-मोठी अनेक कामे केली. मात्र, मतदारसंघाच्या विकासासाठी लक्षवेधी कामे होऊ शकलेली नाहीत. मालेगावात औद्योगिक वसाहतींची आजही प्रतीक्षा आहे. पिण्याचे पाणी उपलब्ध होत असले तरी शेती सिंचनाचा प्रश्न आ वासून उभा आहे. वर्षभरात आमदार निधीसाठी मिळणारा निधीही ते पूर्ण खर्च करू शकलेले नाहीत. मतदारसंघात आतापर्यत सुमारे ३३ लाख ११ हजार रुपयांची कामे केली आहेत. यामुळे मतदारसंघातील पायाभूत कामेही होऊ शकलेली नाहीत. मात्र, वर्षभरात त्यांनी ८० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळवली आहे. या निधीतील काही कामे प्रगतीपथावर आहेत. ही कामे पूर्ण झाल्यास मालेगाव बाह्य मतदारसंघाच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे.
अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्याचे कामकाज वडनेर उपविभागाला जोडण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून मंजुरी मिळवली. तसेच, मालेगाव महापालिकेच्या हद्दवाढ झालेल्या भागात मूलभूत सुविधांच्या विकासासाठी विशेष अनुदान म्हणून १४.५५ कोटी रुपये मंजूर करून घेतले आहेत. तळवाडे धरणाची क्षमता वाढविण्यासाठी ५.८० कोटी, उर्दू घर बांधण्यासाठी चार कोटी, अभ्यासिकेचे काम पूर्णत्वाकडे आहे. तालुका क्रीडा संकुल आंतरखेळ काम सुरू आहे. राज्यमार्ग व जिल्हा आणि इतरमार्गाचे कामांना मंजुरी मिळवली आहे. एस. सी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी निधी मंजूर करून घेतला आहे. तसेच आदिवासी विकास ठक्कर बाप्पा, २५१५ गाव अंतर्गत कामे, क्रीडांगण कंपाऊंड, इन्फ्रा-२ अंतर्गत कामांना मंजुरी मिळवली आहे. तसेच, तळवाडे येथे ३३ केव्हीच्या सबस्टेशनचे काम सुरू आहे.
मालेगाव जिल्हा निर्मितीचा मुद्दा गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकीत लक्षवेधी ठरला आहे. मालेगावला मंत्रिपद मिळाल्याने तरी हा प्रश्न मार्गी लागेल, अशी मतदारांना अपेक्षा आहे. यामुळे ना. भुसे यांच्यापुढे सद्यस्थितीत तरी जिल्हा निर्मितीचे मोठे आव्हान आहे. तसेच, गिरणा धरणाच्या पाण्याचा प्रश्नही सध्या ऐरणीवर आला आहे. यामुळे जळगाव व मालेगावमध्ये पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हे आहेत. यावर ना. भुसे यांना मालेगावचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी ठोस पावले उचलावी लागणार आहेत.
भुसे यांनी अनेक कामांचा आढावा घेतला असून, अनेक कामे प्रस्तावित आहेत. यामध्ये महिला रुग्णालय, पश्चिम भागत अश्निशमन केंद्र सुरू करणे, भूमी अभिलेख केंद्र सुरू करणे, शहरातील रस्ते रुंदीकरण, मनपा हद्दवाडीतील ५९ कर्मचारी सामावून घेणे, मालेगावला भुयारी गटार योजना, पूरपाणी कालवे, नवीन सबस्टेशन, शेती महामंडळाच्या जमिनीवर औद्योगिक वसाहत सुरू करण्यासाठी पाठपुरावा, आदिवासी विकास उपकार्यालय सुरू करणे, केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत कामांचा पाठपुरावा करणे आदी कामे प्रस्तावित आहेत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्ज रक्कमेच्या दुप्पटीहून अधिक वसुली न करण्याचा निर्णय घेऊन तातडीने अमंलबजावणी करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच, कागदोपत्री असलेल्या सहकारी संस्थांची तपासणी करून तसेच मतदानापुरतीच संस्था म्हणून कार्यरत असलेल्या संस्थांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, विविध संस्थांमधील ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित करण्यासाठी पावले उचलण्यात येण्यात आहेत. ठेवी सुरक्षित राहण्यासाठी येत्या अधिवेशनात कायदा करण्याचे विचाराधीन आहे, असे ना. भुसे यांनी सांगितले.
विशेष करून मालेगावमध्ये उद्योग धंदे स्थापन करण्यावर भर दिला आहे. शेती महामंडळाच्या जमिनीवर औद्योगिक वसाहत स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जिल्हा निर्मितीसाठी प्रयत्न सुरू आहेत. सरकारच्या धारेणानुसार हा प्रश्नही मार्गी लागेल. सहकारी कारखाने विकण्याचे गेल्या सरकारचे धोरण होत, त्यातूनच गिरणा कारखान्याची विक्री झाली. सहकारी साखर कारखाने सुरू करण्यासाठी काही नवीन प्रस्ताव विचाराधीन आहेत. मालेगावचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.
- दादा भुसे, सहकार राज्यमंत्री
गेली दहा वर्षे विरोधी पक्षात असल्यामुळे विकासकामे करता आली नाही म्हणून त्यांनी मतदारांकडे मतांसाठी झोळी पुढे केली. मात्र, आता दादा भुसे यांना मंत्रिपदही मिळाले आहे. तरी सुध्दा मतदारसंघात विकासकामे झालेली नाहीत. पाणीप्रश्नावर निवडणूक जिंकणाऱ्या भुसे यांना मतदारसंघातील पाणीप्रश्न अद्याप सोडवता आला नाही. एकही उद्योग आणता आलेला नाही. जिव्हाळ्याच्या गिरणा सहकारी साखर कारखानाही त्यांना राखता आला नाही. सहकार राज्यमंत्री असूनही मतदारसंघात बँकाचे क्षेत्र वाढीस लागलेले नाही.
- पवन ठाकरे, प्रतिस्पर्धी उमेदवार
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट