नाशिक : अवैध वृक्षतोडीसह विविध प्रकारच्या गुन्हे तत्काळ उघड होणारी स्मार्ट प्रणाली वनविभागात कार्यरत झाली आहे. जंगलात असलेल्या वनकर्मचाऱ्यांद्वारे तेथील सद्यस्थिती तसेच गुन्ह्याची माहिती स्मार्टफोनद्वारे थेट ऑनलाइन कळविली जात आहे. त्यामुळे वनविभागाच्या कामकाजाच कमालीची पारदर्शकता आली आहे.
वृक्षतोड, वणवे, जनावरांची चराई, शिकार, अतिक्रमण यासह विविध वन गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसेच हे गुन्हे उघड करण्यासाठी राज्याच्या वनविभागाने पीडीए (पर्सनल डिजिटल असिस्टंट) ही प्रणाली कार्यन्वित केली आहे. व्हॉटसअॅपसारख्याच असलेल्या या प्रणालीद्वारे जंगलातील वनरक्षक तेथील वन गुन्ह्यांची माहिती तत्काळ फोटोसह देत आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून चालणाऱ्या या प्रणालीत गुन्हा घडला ते ठिकाण, त्याचे भौगोलिक स्थान, गुन्ह्याची गंभीरता, गुन्हेगाराची माहिती, साक्षीदारांची माहिती, पुरावे, कुठल्या कायद्याचा भंग करण्यात आला आहे, आदींची माहिती क्षणार्धात संकलित होतानाच ती पाठविली जात आहे. यामुळे उपवनसंरक्षकांपासून ते थेट वनविभागाच्या नागपूर येथील मुख्यालय किंवा मंत्रालयातील वन विभागाच्या प्रधान सचिवांना ही माहिती मोबाइलवरही उपलब्ध होत आहे. या कार्यप्रणालीमुळे वनविभागाचे कामकाज स्मार्ट होतानाच या कामकाजात पारदर्शकता येण्यास मोठी मदत झाली आहे.
कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
नाशिक जिल्ह्यातील ३७६ वनकर्मचाऱ्यांना पीडीएचे सॉफ्टवेअर स्मार्टफोनमध्ये देण्यात आल्याची माहिती मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील यांनी दिली आहे. या कर्मचाऱ्यांना त्याच्या वापराचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
पीडीए प्रणालीमुळे पेठ, सुरगाणा सारख्या आदिवासी भागातील वनक्षेत्रातील गुन्हे तातडीने उघड होत असल्याचे चित्र आहे. तसेच, जंगलात प्रत्यक्ष वन गुन्ह्यांची स्थिती काय आहे, हे सुद्धा स्पष्ट होत आहे.
कर्मचाऱ्यांवरही असणार नजर
पीडीएच्या वितरणामुळे वनकर्मचारी फिल्डवर आहेत की नाही याची शहानिशाही वरिष्ठ अधिकाऱ्यांना होत आहे. नाशिकमधील वनविभागाच्या मुख्य कार्यालयातील कंट्रोल रुममध्ये नाशिक व नगर जिल्ह्यातील वनकर्मचाऱ्यांनी पीडीएद्वारे पाठविलेली माहिती संकलित केली जाते. मोबाइलशिवाय कॉम्प्युटरद्वारेही माहिती पाठविण्याची सुविधा देण्यात आली आहे. तसेच, ज्या ठिकाणी मोबाइल नेटवर्क नसेल तेथे वनकर्मचारी फोटो काढून त्याची विस्तृत माहिती भरतात. ज्यावेळी नेटवर्क येईल तेव्हा ती माहिती आपोआप पाठविली जाते. या प्रणालीमुळे वनविभागाच्या कामकाजात अमूलाग्र बदल झाल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट