एकलहरेतील प्रस्तावित ६६० मेगावॅट औष्णिक विद्युत प्रकल्पाचे काम त्वरित सुरू करावे या व अन्य मागण्यांसाठी नाशिक औष्णिक विद्युत प्रकल्प संघर्ष समितीतर्फे सिन्नर फाटा येथे रास्तारोको करण्यात आला. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. सहाय्यक पोलिस आयुक वाडेकर यांना समितीतर्फे मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
समितीचे अध्यक्ष शंकरराव धनवटे, निवृत्ती चाफळकर, नितीन जगताप, प्रकाश म्हस्के, योगेश म्हस्के, विशाल घेगडमल, विनायक हारक, शांताराम राजोळे, दिनकर म्हस्के, बाळासाहेब पवळे, राजेंद्र जाधव, नंदू मगर, मधुकर कापसे, सचिन जगताप, सुभाष जगताप, बहिर जाधव आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, नवीन प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. त्याचे काम लवकर सुरू करावे. प्रकल्प चालू होत नाही तोपर्यंत संच क्रमांक तीन, चार व पाच बंद करू नये. त्यांचे नूतनीकरण करावे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महानिर्मितीचे वरिष्ठ अधिकारी, संघर्ष समितीचे पदाधिकारी यांच्यात बैठक झाली. त्यावेळी प्रकल्पाच्या अडचणी दूर करून कामाला वेग देण्याचे ठरले होते. राज्य विद्युत निर्मितीच्या मालकीची जमीन, रेल्वे, पाणी विद्युत वितरण उपकेंद्र उपलब्ध आहे. त्यामुळे नवीन प्रकल्पाचा खर्च कमी होईल. एवढे असतानाही शासन प्रकल्प उभारणीसाठी टाळाटाळ करीत आहे. शासन खासगी कंपन्यांच्या दबावाखाली आहे. खासगी कंपन्यांना परवानगी न देता शासनाच्या मालकीच्या विद्युत कंपन्यांना परवानगी द्यावी. या प्रकल्पासाठी जमीन संपादीत केलेल्या मालकांचे पुनर्वसन त्वरित करावे, त्यांना रोजगार द्यावा. त्यांच्या वारसांना विनाअट शासकीय प्रमापत्र द्यावे. शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला द्यावा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट