कॉलेज कॅम्पस, रहिवाशी भागातील कट्टा, छेडछाड किंवा वर्चस्ववाद या सारख्या किरकोळ कारणातून होणाऱ्या छोट्या-मोठ्या हाणामारीच्या घटनांमध्ये अनेकदा पोलिस स्टेशनमध्ये तडजोड केली जाते. फारतर अदाखलपात्र गुन्ह्याची नोंद होऊन दोन्ही पार्ट्यांना सोडले जाते. मात्र, हे अदखलपात्र गुन्हे हत्येच्या कारणांचे मूळ ठरत असून, त्याची पोलिसांना गंभीर नोंद घ्यावी लागणार आहे.
शहरात जानेवारी ते सप्टेंबर या ९ महिन्याच्या काळात झालेल्या ३८ हत्यांच्या घटनांमध्ये पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून १० जणांचा बळी घेतला गेला आहे. यातील बहुतांश गुन्ह्यातील आरोपी आणि मयतांच्या पूर्वीच्या भांडणाबाबत पोलिस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद होती, हे महत्त्वाचे. पूर्व वैमनस्यातून होणाऱ्या हत्येच्या घटनांमध्ये अटक केलेल्या आरोपींमध्ये १८ ते २५ वयोगटातील तरूणांचा सर्वाधिक समावेश आहे. बळी गेलेल्यांमध्ये याच वयोगटातील मुलांचा संबंध आहे. यंदा एकूण हत्यांच्या घटनांपैकी सरासरी २६ टक्के हत्या पूर्वीच्या भांडणामुळे झाल्याचे समोर आले आहे. यामुळे अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करणाऱ्या पोलिसांची जबाबदारी कैकपटीने वाढली आहे.
झोन दोनचे पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी सांगितले की, खुनाच्या घटनांमध्ये क्षणिक राग आणि नातेसंबंध यांचा सर्वाधिक संबंध असतो. नाशिकरोड, देवळाली कॅम्प, उपनगर, इंदिरानगर, सातपूर आणि अंबड या नाशिक परिमंडळ दोनमध्ये ३८ पैकी २० हत्या झाल्याची नोंद आहे. यातील, ७ खुनाचे प्रकार पती-पत्नीशी संबंधीत होते. ४ हत्यांच्या घटनांमध्ये नातेवाईकांना अटक झाली. तर सर्वाधीक म्हणजे ९ खून पूर्वीच्या भांडणाची कुरापत काढून करण्यात आले. अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी यापुढे अदखलपात्र गुन्हा नोंदवताना विशेष काळजी घेतली जाईल, असेही उपायुक्त धिवरे यांनी स्पष्ट केले. हाणामारी किंवा दमदाटीसारख्या प्रकरणांमध्ये सीआरपीसी १५१ नुसार अटक करणे उचित ठरू शकते. तसेच, अदखलपात्र गुन्हा दाखल होणाऱ्या संशयितांची पार्श्वभूमी काय? त्याच्यावर यापूर्वी किती गुन्हे दाखल आहेत, याचा अभ्यास करूनच गुन्हा दाखल करण्याचा निर्णय यापुढे घ्यावा लागेल. अल्पवयीन किंवा युवकांमध्ये असे प्रकार सर्वाधिक असून जनजागृतीच्या आधारे हे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवे, असे आवाहन उपायुक्त धिवरे यांनी केले.
यंदा खुनाच्या घटनांमध्ये वाढ झाली असली तरी बहुतांश गुन्ह्यातील आरोपींना लागलीच अटक झाली. यात, नातेवाईक आणि मित्र परिवाराचा सर्वाधिक समावेश होता. पूर्वीच्या भांडणामुळे होणाऱ्या हत्या रोखण्यासाठी काही प्रतिबंधक उपाययोजना राबवणे शक्य असून, त्यावर अंमलबजावणी केली जाईल. - श्रीकांत धिवरे, पोलिस उपायुक्त
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट