October 17, 2015, 12:06 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
जळगाव पोलिस दलातील पोलिस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्याप्रकरणी जळगावचे पोलिस अधीक्षक जालिंदर सुपेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते यांच्यासह सागर चौधरी या वाळू तस्करावर गुन्हा दाखल करण्यात आला. सादरे यांना आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून येथील पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला. सादरे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारे चौकशीचे आदेश नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक जयजीत सिंग यांनी दिले आहेत.
सादरे यांनी शुक्रवारी सायंकाळी पंचवटी परिसरातील ओमनगर भागातील राहत्या घरात गळफास आत्महत्या केली होती. महिनाभरापासून पोलिस सेवेतून निलंबित करण्यात आल्याने ते डिप्रेशनमध्ये होते. मृत्युपूर्वी सादरे यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली. जळगाव पोलिस दलातील भ्रष्टाचाराचा त्यांनी उल्लेख केला होता. एसपी सुपेकर व पीआय रायते सतत पैशांची मागणी करून प्रभारी अधिकाऱ्यांना मानसिक त्रास देतात, असेही त्यांनी म्हटले होते.
सादरे कुटुंबीयांचा ठिय्या
सादरे यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करावा, यासाठी त्यांचे कुंटुंबीय आग्रही होते. संबंधितांवर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. शनिवारी रात्री यावर काहीच तोडगा निघाला नाही. म्हणून सादरे यांच्या नातेवाईक आणि मित्र परिवाराने सकाळी सात वाजेपासून पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला. सकाळी सुरू झालेल्या चर्चेनुसार दुपारी दीड वाजता गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले. माधुरी सादरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर सादरे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
October 17, 2015, 12:08 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
पोलिस निरीक्षक अशोक सादरे यांनी आत्महत्या केल्याप्रकरणाची गंभीर दखल राज्याचे पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी घेतली असून, आत्महत्या प्रकरणाची व सादरे यांनी केलेल्या आरोपांबाबत सविस्तर चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. सादरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली. त्या चिठ्ठीच्या आधारे चौकशी केली जाईल, अशी माहिती नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक जयजीत सिंग यांनी दिली.
एफआयआरसाठी चालढकल
मृत्युपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारे संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी वेळकाढू धोरण राबवले. पोलिसांवर महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाव असल्याचा थेट आरोप माधुरी सादरे यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांनी केला. नातेवाईक आपली मागणी रेटत असताना पोलिस मात्र सबुरीचे धोरण ठेवून काम करीत असल्याचे दिसून आले. असे का झाले याकडे अथवा असे करण्यामागे वरिष्ठांचे काही आदेेश होते याबाबतही चौकशीची मागणी यावेळी करण्यात आली.
कोणाचाच विश्वास बसेना
ओमनगर येथे राहणाऱ्या सादरे यांना ओमकार आणि पुनम ही दोन अपत्ये. गेली अनेक वर्षे नाशिकमध्ये वास्तव्यास असलेल्या सादरे यांचा कॉलनीतच नव्हे तर परिसरात धाक होता. अत्यंत हुशार आणि मनमिळावु अशी प्रतिमा असलेले सादरे आत्महत्येच्या निर्णयापर्यंत पोहचले कसे, असा प्रश्न सर्वांना सतावतो आहे. याबाबत त्यांच्या नातेवाईकांनी व मित्रपरिवाराने व्यक्त केल्या.
गेल्या महिन्याभरापासून त्यांच्यावर मानसिक दबाव होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह महसूल मंत्र्यांचा यात हस्तक्षेत असल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. दोषींवर कारवाई व्हावी, ही अपेक्षा. - माधुरी सादरे, अशोक सादरे यांची पत्नी
पोलिस अधिकारी आणि वाळू माफीयांनी सादरे यांचा बळी घेतला. ते काही दिवस अहमदनगर येथे आले होते. मात्र, ते प्रचंड दबावाखाली होते. सर्वांशी त्यांचे बोलणे कमी झाले होते. सर्व व्यवस्थेवरील त्यांचा विश्वास उडाल्याने त्यांनी आत्महत्येचा मार्ग स्विकारला. त्यामुळे दोषींवर कारवाई झाली पाहिजे.
- प्रमोद काळभोर, नातेवाईक
कॉलनीतच नव्हे तर परिसरात त्यांची ख्याती होती. मनमिळावू आणि मार्गदर्शक म्हणून ते काम करीत. अनेकदा परिसरातील तरूणांना त्यांनी मार्गदर्शन केले. ते असे काही करतील, याची शक्यता नव्हती. - अनंत वालझडे, स्थानिक नागरिक
त्यांनी आत्महत्या केली, त्यावेळी घरात कोणीच नव्हते. मुलगा ओमकार व त्यांची पत्नी घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांच्या जोरात किंचाळण्याचा आवाज आल्यानंतर आम्ही तिथे पोहचलो. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत सर्व संपले होते. - विलास शेळके, स्थानिक नागरिक
सादरे यांच्यावर होणारे आरोप बिनबुडाचे आहेत. त्यांचा स्वभाव चांगला होता. त्याची प्रचिती सर्वांनी घेतली असून त्यामुळेच परिसरातील नागरिक रात्रीपासून सिव्हील हॉस्पिटल आणि आता पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये ठाण मांडून आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी चौकशी करून दोषींना शासन करावे. - निखील गालफडे, स्थानिक नागरिक
सादरे कुटुंबीयांनी माझ्यावर केलेले सर्व आरोप तथ्थहीन असून, वाळूमाफिया सागर चौधरी भाजपचा कार्यकर्ता नाही, त्याचबरोबर सादरे कुटुंबीयांनी केलेल्या सर्व आरोपांची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल. मी गेल्या दोन वर्षांत सादरे यांना किंवा त्यांच्या परिवाराला कधीही भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी माझे कधीही बोलणे झालेले नाही. खंडणी प्रकरणात सादरे यांच्याविरुद्ध सागर चौधरी याने दाखल केलेला गुन्हा न्यायालयाच्या आदेशावरून करण्यात आलेला आहे. त्यामुळे मी दबाव आणण्याचा कोणताही प्रश्न उरत नाही. सादरे यांची कारकीर्द नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिली आहे. - एकनाथ खडसे, महसूलमंत्री
अशोक सादरे यांना रामानंदनगर पोलिस ठाण्यात मीच माझ्या कार्यकाळात पोस्टिं ग दिले होते. मी फक्त त्यांच्या बदलीचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र पोलिस महानिरीक्षकांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले होते. मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. सादरे किंवा त्यांच्या कुटुंबीियांकडून जे आरोप माझ्याविरुद्ध केले गेले आहेत, ते चुकीचे आहेत. - जालिंदर सुपेकर, पोलिस अधीक्षक, जळगाव
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 17, 2015, 12:10 pm
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
शहरातील भविष्यातील पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या २६६ कोटींच्या मुकणे पाणीपुरवठा योजनेला महासभेत सहा तासांच्या वादळी चर्चेनंतर मंजुरी देण्यात आली. शिवसेना व भाजपने उपस्थित केलेल्या तात्रिंक मुद्दे व निधीला प्रशासनाने चोख उत्तर दिल्याने युतीचा विरोध निष्प्रभ ठरला. विशेष म्हणजे भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी उघड पाठिंबा दिला तर, आमदार देवयानी फरांदे यांनी तांत्रिक मुद्द्यांवर आपली आडकाठी असल्याचे सांगितले. या योजनेसाठी आपल्या निधीला कात्री लागू नये, अशी भितीही नगरसेवकांनी व्यक्त केली. अखेरीस महापौरांनी शहराच्या हिताच्या दृष्टीने हा विषय महत्त्वपूर्ण असल्याने तो मंजूर केला.
गेल्या सहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुकणे पाणीयोजनेच्या फैसल्यासाठी शनिवारी महापौर अशोक मुर्तडक यांच्या अध्यक्षतेखाली महासभा झाली. मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस व अपक्षांनी या योजनेला समर्थन केल्याने हा प्रस्ताव मंजूर होणार होता. २६६ कोटींच्या १८ किलोमीटरच्या पाइपलाइनचा विषय गेल्या अनेक दिवसांपासून वादात सापडला होता. राज्य सरकारने मध्यंतरी या योजनेच्या निविदा प्रक्रियेवर स्थगिती दिली होती. निविदा प्रक्रिया सीव्हीसीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार करण्याचे फर्मान सोडले होते. या योजनेला राजकीय स्वरूप प्राप्त झाले होते. भाजपच्या तीन आमदारांनी योजनेबाबत वेगवेगळ्या भूमिका घेतल्या होत्या. त्यामुळे सभागृहात या विषयावर वादळी चर्चा झाली. शिवसेनेच्या सुधारकर बडगुजर व अजय बोरस्ते, आमदार देवयांनी फरांदे यांनी तांत्रिक मुद्दे उपस्थित महापौरासह आयुक्तांना जाब विचारला. अतिरिक्त ३६ कोटींच्या निधीसह तांत्रिक मुद्दे आयुक्तांनी खोडून काढत सीव्हीसीच्या गाईडलाइनप्रमाणे निविदा प्रक्रिया पार पडल्याची भूमिका मांडली. जवळपास सहा तास या विषयावर वादळी चर्चा झाली. सीमा हिरे यांनी योजनेच्या बाजूने उघड भूमिका घेतली. आमदार देवयानी फरांदे यांनी योजनेतील आक्षेप उघड करीत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. योजनेला विरोध नाही मात्र वेगवेगळ्या निधीमुळे संशयकल्लोळ माजल्याचे त्यांनी सांगितले. अखेरीस महापौरांनी योजनेला मंजुरी दिल्याचे जाहीर केले.
नगरसेवकांचा पाणीप्रश्न
मुकणे पाणीपुरवठ्याचा विषय असला तरी, नगरसेवकांच्या भावना मात्र पाणीकपातीवरच होत्या. प्रत्येक नगरसेवक पाणीकपात आणि निर्माण झालेले प्रश्न यावरच पोटतिडकीने बोलत होते. त्यात सत्ताधारी व विरोधकांचा समावेश आहे. नगरसेवक बापू सोनवणे यांनी तर पाण्यावर बोलू दिले नाही म्हणून सभागृहाचा संतापात त्याग केला. उषा शेळके यांनी जलकुंभापर्यंत नवनिर्माण पोहचू द्या असे सुनावले. मनसेच्या नगरसेविका अर्चना थोरात यांनी तर पाणी या विषय हा किती दिवस करायचा असा सवाल केला. गळती असूनही लक्ष दिले जात नाही. जलकुंभ मंजूर असूनही काम केले जात नाही. त्यामुळे नगरसेवकांना हा एकच विषय लावून धरावा लागत असल्याचे दुर्दैव असल्याचे सांगून आपण आजारी असूनही पाण्याच्या विषयावर े खडे बोल त्यांनी महापौरांना सुनावले व संतापात सभागृह सोडले.
राजकीय स्थगिती
मुकणे योजनेला शासनाने दिलेली स्थगिती ही राजकीय स्थगिती असल्याचा आरोप उपमहापौर गुरुमीत बग्गा यांनी केला. कोणतेही कारण नसल्याने स्थगिती अखेरीस सरकारलाच उठवावी लागला. विशेष म्हणजे सरकारने उठवतांना तक्रारदारांनाही बोलवले नाही, असा दावा केला. त्यावरून सुधाकर बडगुजर यांनी त्यावर आक्षेप घेतला. राजकीय स्थगिती या विषयावरून या दोघांमध्ये सभागृहातच जुगलबंदी रंगली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 17, 2015, 12:12 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नगरपंचायतीच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असल्या तरी अजूनही नगराध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आलेले नाही. परिणामी जातपडताळणीलाही विलंब होण्याची शक्यता असून, जातपडताळणी प्रमाणपत्राअभावी नगराध्यक्ष पदापासून वंचित तर राहावे लागणार नाही ना असा उमेदवारांमध्ये संभ्रम आहे.
राज्यात अनेक ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपंचायतींमध्ये झाले असून, तेथे सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. नाशिक जिल्ह्याचा विचार करता येथेही कळवण, चांदवड, निफाड, सुरगाणा, पेठ, देवळा या नगरपंचायतींमध्ये निवडणुकांचा बार उडणार आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, सोमवारी अर्ज मागे घेण्यास सुरुवात होणार आहे. त्यानंतरच निवडणुकीतील अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होणार असून, खऱ्या अर्थाने प्रचाराला वेग येणार आहे.
समाज कल्याण विभागाकडून केवळ विजयी उमेदवारांचीच जात पडताळणी केली जात असल्याने नियमानुसार हे काम निवडणूक निकालानंतरच सुरू होणार आहे. खरेतर नगराध्यक्ष आरक्षण जाहीर झाल्यानंतर जात पडताळणी अर्ज असल्याशिवाय उमेदवारी अर्ज वैध होत नाही. अशा परिस्थितीत राज्य निवडणूक आयोगाने याबाबत कोणताही निर्णय न घेतल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम आहे. काही मागास प्रवर्ग, अनुसूचित जातीमधील उमेदवार सर्वसाधारण जागेवर निवडणूक लढवितात.
किमान नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करून संबंधितांच्या उमेदवारी जात पडताळणीसाठी योग्य ती कार्यवाही केली जावी, अशी मागणी होत आहे. राज्य निवडणूक आयोगाने याबाबत योग्य निर्णय घेतला नाही तर अनेक उमेदवारांना केवळ जात पडताळणी नाही म्हणून पदापासून वंचित राहू शकतात. कायदेशीर अडचणी वाढून उमेदवारांना न्यायालयीन लढाई लढावी लागण्याची शक्यता आहे. याबाबत गांभीर्याने विचार करून राज्य निवडणूक आयोगाने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी माजी जि. प. सदस्य राजाराम शेलार यांनी केली आहे.
नगरपंचायत निवडणुकीसाठी अद्याप आरक्षण जाहीर नाही. मागासवर्गीय प्रवर्गातून अर्ज भरताना जात पडताळणीसाठी अर्ज सादर केल्याची पावती उमेदवारी अर्जासोबत जोडली तरी अर्ज ग्राह्य धरला जातो. निकालानंतर विजयी उमेदवारांना जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची कालावधी मिळेल. हा कालावधी पुरेसा आहे. - नीलेश जाधव, उपजिल्हाधिकारी
विजयी उमेदवारांनाच जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याची धोरण अवलंबले जात आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये ते अवलंबिण्यात आले. आता नगरपंचायत निवडणुकीतही तेच धोरण असून, डिसेंबर २०१७ पर्यंत होणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी हेच धोरण असणार आहे. - शशिकांत पाटील, जनसंपर्क अधिकारी, समाजकल्याण विभाग
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 17, 2015, 12:23 pm
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
मुकणे योजनेवरून सत्ताधारी मनसे व भाजपातील सुप्त संघर्ष शनिवारी महासभेत पहायला मिळाला. योजनेतील त्रुटी दाखवूनही मनसे नेते व आयुक्तांनी शासनदरबारी पाठपुरावा करून उठवलेली स्थगिती व महाजनांच्या चिमट्याने घायाळ झालेल्या आमदार देवयांनी फरांदे या सभागृहात आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यावरच बरसल्या. आयुक्तांच्या स्मार्ट कार्यपद्धतीवर टीकास्र सोडत नगरसेवकांनाही स्मार्ट करा, असा टोला लगावत सोशल मीडियातून बाहेर येण्याचा सल्ला दिला. तर, भाषण करून बाहेर पडलेल्या फरांदे यांना आयुक्तांनीही जशास तसे उत्तर देत प्रश्न विचारून बाहेर निघून गेलेल्यासांठी सोशल मीडियाचा वापर करावा लागत असल्याचा प्रतिटोला लगावला.
मुकणेवरून गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय नेत्यांमध्ये धूमसत असलेल्या भावनांचा बांध शनिवारी सभागृहात फुटला. नवीन नगरसेवकांचे समाधान झाल्यापासून ते वरिष्ठ नेत्यांच्या गुळगुळीत बोलण्यावरून सभागृहात एकमेकांना चागलेच खडे बोल सुनावण्यात आले. त्यात सर्वाधिक वाद रंगला तो आमदार फरांदे, आयुक्त डॉ. गेडाम व महापौर मुर्तडक यांच्यात. फरांदे यांनी या योजनेत राबविलेल्या तांत्रिक त्रुटीवर बोट ठेवत त्याला विरोध केला होता. त्यासंदर्भातील पत्रही दिले होते. त्यामुळेच स्थगिती मिळाली होती. मात्र सत्ताधारी व आयुक्तांनी पाठपुरावा करून ती स्थगिती उठविली. त्यातच सीमा हिरे यांनी या प्रकल्पाला उघड पाठिंबा दिला. सभागृहात नगरसेवक सचिन महाजन यांनी फरांदे यांना चिमटे काढत संशयकल्लोळ कशासाठी असा सवाल केला.
संतप्त फरांदेनी आयुक्त गेडाम यांच्यास महाजन व महापौरांना खडे बोल सुनावले. योजनेला विरोध नाही. मात्र तांत्रिक मुद्यांचे स्पष्टीकरण दिले नसल्याने विरोध केल्यासा खुलासा केला. महापालिकेची आर्थिक स्थिती किता खराब आहे, त्याचा भंडाफोड केला. नगरसेवकांच्या अस्वस्थेवर बोट ठेवत आयुक्तांच्या स्मार्ट कामगिरीवर हल्ला चढवला. व्हॉट्स अॅपच्या थिंक टँक ग्रुपवरून शहरात जाता येत नाही. फेसबुक व व्हॉट्स अॅपच्या बाहेर या असा सल्ला दिला. शहर स्मार्ट सिटी होईल तेव्हा होईल प्रथम मूलभूत सुविधेचे बघा, असा टोला लगावला. महाजन यांनाही खडसावत त्यांनी सभागृह सोडले. आयुक्त डॉ. गेडाम यांनाही आमदारांचे बोलणे चांगलेच टोचले. काही लोक प्रश्न उपस्थित करतात पण उत्तर ऐकायला राहत नाहीत. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करावा लागत असल्याचा टोला लगावला. त्यामुळे सभागृहात हशा पिकला. योजनेला उशीर झाल्याने किमत वाढल्याचे सांगून अतिरिक्त खर्च महापालिकेलाच करावा लागणार असल्याचा खुलासा केला.
आमदारांची सुनामी...
सभागृहात महापौर अशोक मुर्तडक व फरांदे यांच्यातही खटके उडाले. फरांदेच्या टोलेबाजीवर महापौरांनीही त्यांच्यावर तोंडसुख घेतले. फरांदे आपल्या अमृतवाणीतून चांगलेच चटके मिळाल्याचा टोला लगावला. पंधरा मिनिटांच्या सुनामीने सगळ्यांचे कान खराब झाले. त्यांच्या आरोपांनी सभागृहाचे वातावरण बदलून गेल्याचे सांगून चांगल्या अन्नात जास्त मिठ पडल्यासारखे झाल्याचा भास झाल्याचा टोला फरांदेंना लगावला.
महापालिकेची आर्थिक स्थिती दयनीय आहे. गार्डनमधील गवत काढण्यासाठी सुद्धा नगरसवेक आमदार निधीची मागणी करताहेत. आयुक्तांसह महापौरांना याचे भान राहिले पाहिजे. मोबाइलमधून बाहेर येवून गावाच्या विकासाकडे बघा. - देवयानी फरांदे, आमदार, भाजप
सोशल मीडियाचा आज सर्वच जण वापर करीत आहेत. मुकणेबद्दलची भूमिका आम्ही फेसबुक व ट्विटरवरही मांडू. कोणाला काही आक्षेप असतील तर त्यांनी त्यावर आक्षेप नोंदवावा. - डॉ. प्रवीण गेडाम,आयुक्त, मनपा
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
October 17, 2015, 12:09 pm
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
नाम फाउंडेशनच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नाशिककरांच्या वतीने आर्थिक मदत करण्याच्या हेतूने स्थानिक सहा फोटोग्राफर्सने एकत्र येत १९ व २० ऑक्टोबर रोजी 'मूड्स ऑफ कुंभ' या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. शैलेश कुटे यांच्या सहकार्याने होत असलेल्या या प्रदर्शनात नाशिककरांना सिंहस्थ कुंभमेळ्याची अप्रतिम सफर घडवली जाणार आहे. यातील काही निवडक फोटो विकत घेऊन शेतकऱ्यांना मदतीसाठी खारीचा वाटाही उचलता येईल.
तिडके कॉलनीतील हॉटेल एसएसकेमध्ये सकाळी ११ ते रात्री १० वाजेदरम्यान हे प्रदर्शन खुले राहील. अनिल पाटील, महेश कट्यारे, राम पवार, सचिन पाटील, समीर बोंदार्डे व श्रीकांत नागरे या सहा फोटोग्राफर्सने टिपलेल्या कुंभमेळ्यातील वेगळ्या धाटणीतील फोटोंचा आविष्कार नाशिककर रसिक, कलावंतांना यानिमित्ताने अनुभवता येणार आहे. नाम फाउंडेशनच्या उपक्रमालाही प्रदर्शनाच्या माध्यमातून हातभार लावण्याचा उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.
नाशिकचं वैभव असलेल्या कुंभमेळ्यातील वैभव पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी यातून मिळणार आहे. प्रदर्शनाला अधिकाधिक रसिकांनी भेट द्यावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 17, 2015, 11:33 am
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
गंगापूर व दारणा धरण समूहातील पाणी मराठवाड्यासाठी न सोडता ते नाशिक जिल्ह्यात पिण्यासाठी तसेच, फळबागांसाठी आरक्षित ठेवावे यांसह विविध मागण्यांसाठी जलचिंतन अभियांत्रिकी संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. शेकडो कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते.
संघटनेने इशारा दिल्याप्रमाणे शनिवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. आमदार जयंत जाधव यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले. नाशिक जिल्ह्यात सरासरीच्या ६० टक्के इतकाच पाऊस पडल्यामुळे येथील धरणांमध्येच पुरेसे पाणी नाही. अशा परिस्थितीत जलसंपदा मंत्र्यांनी गंगापूर दारणा धरण समूहातून जायकवाडीस पाणी सोडण्याचे घोषणा करणे आश्चर्यकारक असल्याची भावना यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली. मराठवाड्याला पिण्यासाठी पाणी देण्यास विरोध नाही परंतु, ऊसासाठी पाणी दिण्यास विरोध दर्शविण्यात आला. अप्पर गोदावरी खोऱ्यातील जनतेला उपाशी ठेऊन मराठवाड्याला पाणी दिले जात असल्याबाबत निषेध करण्यात आला. जायकवाडीस पाणी सोडल्यास नाशिक, निफाड तालुक्यातील फळबागा धोक्यात येतील व येथील शेतकरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतील, अशी भीती आंदोलकांनी व्यक्त केली. गंगापूर तसेच आळंदी धरण समूहातून पाणी न सोडण्याची शिफारस विभागीय आयुक्तांनी करावी, अशी विनंती निवेदनात करण्यात आली. ऊस क्षेत्रावर निर्बंध आणावेत, नाशिकमधील पिण्याच्या पाण्याची तसेच उद्योगाची गरज भागल्यानंतर जायकवाडीला पाणी सोडावे, असे या निवेदनात म्हटले आहे.
नार-पारचे पाणी वळवा
नार-पारच्या खोऱ्यातील ३२ टीएमसी पाणी गिरणा कादवा खोऱ्यात वळविण्याची आवश्यकता आहे. तसे झाले तर चांदवड, नांदगाव, मनमाड, येवला येथील दुष्काळ दूर होईल, असा विश्वास आंदोलकांनी व्यक्त केला. या आंदोलनात पाणीवापर महासंघ, गंगापूर डावा कालवा, चांदवड इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, सिन्नर पाणीवापर संस्था, यांच्या वतीने करण्यात आली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 17, 2015, 11:33 am
म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड
हवाई दलात पायलट असलेल्या आपल्या मुलाला रेल्वे पार्सलने पाठवलेली बुलेट दीड महिन्यानंतरही न मिळाल्यामुळे शिक्षक पिता वैतागला आहे. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यापर्यंत त्यांनी न्यायासाठी दरवाजे ठोठावले आहेत.
दिंडोरी रोडवर राहणा-या दगडू रतन खैरनार यांचा मुलगा नीलेश हवाई दलात पायलट असून, सध्या खरगपूर (प. बंगाल) येथे नियुक्तीस आहे. खैरनार यांनी नीलेशसाठी चार सप्टेंबरला नाशिकरोड रेल्वे स्थानकातील पार्सल विभागाकडे बुलेट जमा केली. दीड महिना झाला तरी बुलेट पोहचलेली नाही. कुंभमेळ्याच्या गर्दीमुळे बुलेटसह सर्व पार्सले भुसावळला नऊ सप्टेंबर रोजी हलविल्याचे पार्सल विभागाने सांगितले. भुसावळला विचारले असता २४ सप्टेंबरला बुलेट नागपूरला पाठविल्याचे उत्तर मिळाले. टोलवाटोलवीला वैतागून खैरनार यांनी रेल्वेमंत्री, रेल्वेच्या कस्टमर केअरपर्यंत सर्वांना ई मेल केले.
अखेर लागला ट्रेस
नाशिकरोडचे पार्सल विभाग प्रमुख आर. एस. गोसावी यांनी त्यांना चांगले सहकार्य केले. दि. १७ ऑक्टोबरला गोसावी यांनी चिकाटीने प्रयत्न केल्यावर बुलेट रायगडहून (छत्तीसगड) विलासपूरला पोहचली असून, ट्रेन नं. ५८११३ व्दारा खरगपूरला पाठविणार असल्याचे उत्तर त्यांना मिळाले.
माझा मुलगा देशाच्या रक्षणासाठी रात्रंदिवस सेवा पुरवत आहे. त्याच्याबाबतीत उडवाउडवीची उत्तरे मिळत असतील तर सामान्यांचे काय होत असेल. - रतन खैरनार
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 17, 2015, 3:26 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
जळगाव पोलिस दलातील निलंबत पोलिस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्याप्रकरणी जळगावचे पोलिस अधीक्षक जालिंदर सुपेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते यांच्यासह सागर चौधरी या वाळू तस्करावर शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सादरे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचबरोबर सादरे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारे या प्रकरणाच्या चौकशाचे आदेश नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक जयजीत सिंग यांनी दिले आहेत.
सादरे यांनी शुक्रवारी सायंकाळी पंचवटी परिसरातील ओमनगर भागातील राहत्या घरात आत्महत्या केली होती. महिनाभरापासून पोलिस सेवेतून निलंबित करण्यात आल्याने सादरे डिप्रेशनमध्ये होते. मृत्युपूर्वी सादरे यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली. त्यात जळगाव पोलिस दलात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचा त्यांनी उल्लेख केला. एवढेच नव्हे तर एसपी सुपेकर आणि पीआय रायते सतत पैशांची मागणी करून प्रभारी अधिकाऱ्यांना मानसिक त्रास देतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
सादरे कुटुंबीयांचा ठिय्या
सादरे यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करावा, यासाठी त्यांचे कुटुंबीय आग्रही होते. संबंधितांवर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. माधुरी सादरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर सादरे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
October 18, 2015, 1:56 am
मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या सनातनसारख्या संस्थेकडूनच केली जाऊ शकते, असा दावा सुरूवातीपासूनच करण्यात येत होता. तो आता खरा ठरत असून, पुरोगामी विचारसरणीच्या व्यक्तींसह त्यांच्या कार्यक्रमाच्या आड येणाऱ्यांचा नाश करणं हे या संस्थेकडून तयार करण्यात आलेल्या 'रोबो' मानवांचे उद्दीष्ट आहे. आता तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही त्यांच्या हिटलिस्टवर आहेत, असा खळबळजनक दावा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे संघटक प्रा. श्याम मानव यांनी केला आहे.
येथील शासकीय विश्रामगहात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा दावा केला. डॉ. दाभोलकरांची हत्या झाली त्यावेळी हे कृत्य सनातनसारख्या संस्थेकडूनच करण्यात आले असावे, असा दावा आम्ही केला होता, त्याची सत्यता कॉ. गोविंद पानसरे आणि त्यानंतर एम. कलबुर्गी यांची हत्या त्याच पद्धतीने करण्यात आल्यानंतर समोर आली, असे मानव म्हणाले. सनातनचे संस्थापक जयंत आठवले यांनी संमोहनशास्त्राचा वापर करून मानवी रोबो तयार केले आहेत. ते समाजातील पुरोगामी विचारवंतांचा नाश करण्यासाठी तयार करण्यात आले आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
सनातनला देशात ईश्वराचे राज्य आणायचे आहे. त्यांना देशाची घटना मान्य नाही. पोलीस, लोकशाही, राज्यकर्ते आणि पुरोगामीवादी नेते मान्य नाहीत. त्यांच्यादृष्टीने हे सारे दुर्जन असून, त्यांचा नाश करणे हेच एकमेव उद्दिष्ट आहे, असेही मानव म्हणाले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 18, 2015, 12:06 pm
fanindra.mandlik @timesgroup.com
नाशिक : भारत सरकारच्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेतर्फे स्वीडन येथे आयोजित स्टॉकहोम संगीत महोत्सवात नाशिकच्या ज्ञानेश्वर सोनवणे या संवादिनी वादकाला सोलो वादनाची संधी मिळाली. या परिषदेतर्फे निवड झालेला ज्ञानेश्वर हा पहिला महाराष्ट्रीयन कलाकार आहे. संगीत क्षेत्रात फार कमी लोकांच्या वाट्याला येणारा हा मान नाशिकच्या तरुणाला मिळाला असून, ही अत्यंत गौरवास्पद व अभिमानास्पद बाब आहे.
स्वीडन येथे ३ ते ११ ऑक्टोबरदरम्यान आयोजित स्टॉकहोम संगीत महोत्सवात ज्ञानेश्वरने स्वतंत्र हार्मोनियम वादन केले. त्यानंतर ११ ते १८ ऑक्टोबर रोजी लंडन येथील नेहरू सेंटर सभागृहात आयोजित संगीत महोत्सवात पं. गिरीजा देवी यांच्या शिष्या व बंगालच्या प्रख्यात शास्त्रीय गायिका सोमा घोष यांच्याबरोबर शास्त्रीय गायनासाठी हार्मोनियमची साथ केली. या दोन्ही कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी महाराष्ट्रातील ज्ञानेश्वर सोनवणे या कलाकाराला प्रथमच मिळाली. संगीत क्षेत्रात फार कमी लोकांच्या वाट्याला येणारा हा मान नाशिकच्या तरुणाला मिळाला असून, ही अत्यंत गौरवास्पद व अभिमानास्पद बाब आहे.
ज्ञानेश्वरचे प्राथमिक शिक्षण त्याची मोठी बहीण उषा सोनवणे यांच्याकडे तर पुढील शिक्षण नाशिकचे सुप्रसिध्द हार्मोनियम वादक बापू कुलकर्णी यांच्याकडे झाले. गेल्या पाच वर्षांपासून तो मुंबई येथील पंडित सुधीर नायक यांच्याकडे गुरुकुल पध्दतीने शिकत आहे. ज्ञानेश्वरने आजवर पंडित जयतीर्थ मेवूंडी, सर्वश्री पं. राजा काळे, शौनक अभिषेकी, अश्विनी भिडे देशपांडे, ओंकार गुलवडी, अविराज तायडे, नितीन वारे, देवकी पंडित आदी दिग्गज कलाकारांसोबत साथ केली. ज्ञानेश्वरला २०१३ साली भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे मानाची समजली जाणारी हार्मोनियमसाठीची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. ज्ञानेश्वरने आजपर्यंत भारतातील अनेक दिग्गजांना साथ केली असून, अनेक देशांचा दौरा केला आहे. गोवा येथे झालेल्या स्वराधीश संगीत महोत्सवात प्रख्यात गायिका देवकी पंडित यांच्याबरोबर साथ करीत असताना कार्यक्रम संपल्यानंतर अनेकांनी त्यांच्या हार्मोनियम वादनाचे कौतुक केले होते. त्याचप्रमाणे मुंबई येथे कलाकोस्ट संगीत महोत्सवात शौनक अभिषेकी यांच्याबरोबर साथ करताना त्यांना स्वतंत्र वादनाची संधी मिळाली होती. पुण्यात झालेल्या गाजावाजा संगीत महोत्सवात शोभा मुदगल यांनीही त्यांच्या वादनाचे कौतुक केले होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 18, 2015, 12:09 pm
pravin.bidve @timesgroup.com
नाशिक : राज्यात एकीकडे बेरोजगारांची संख्या वाढत असताना राज्य मार्ग परिवहन महामंडळाला आदिवासींच्या २२ टक्के राखीव कोट्यातून चालक-वाहक मिळत नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. वर्षानुवर्षे रिक्त राहाणारी अशी पदे भरता यावीत यासाठी खास आदिवासी बांधवांकरिता स्वतंत्र आणि सुसज्ज प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. नाशिकसह नागपूर, अमरावती, मुंबई आणि पुणे विभागांत अशी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. नाशिकमधील केंद्रासाठी आदिवासी विकास विभागाने २५ कोटींचा निधीही मंजूर केल्याने या कामाला गती मिळणार आहे.
महामंडळ गरजेनुसार चालक-वाहकांसह कर्मचाऱ्यांची भरती करीत असते. खुला गट, इतर मागासवर्गीयांमध्ये रस्सीखेच अधिक असली तरी आदिवासी बांधवांसाठी राखीव असणाऱ्या जागांवर उमेदवार मिळत नसल्याचे वास्तव आहे. भरती प्रक्रियेबाबत आदिवासी बांधवांना माहिती नसणे, त्यांच्या भागात पुरेशा सोयी सुविधांचा असणारा अभाव, भरती प्रक्रियेला सामोरे जाण्यासाठी काय तयारी करायची याची माहिती नसणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे न्यूनगंडामुळे बहुतांश आदिवासी उमेदवार या भरती प्रक्रियेकडे पाठ फिरवितात.
परिणामी महामंडळात त्यांच्यासाठी राखीव असणाऱ्या अनेक जागा रिक्त राहतात. अशा जागा राखीव कोट्यातून भरणे अनिवार्य असल्याने एसटी महामंडळाने आदिवासी बहुल भागांमधील अशा उमेदवारांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तेथेच त्यांची निवासाची, जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे. चालक म्हणून आवश्यक असणारे सर्व प्रकारचे परवाने महामंडळ त्यांना काढून देणार आहे. या केंद्रामध्ये प्रशिक्षणासाठी त्यांना बसही उपलब्ध असेल. एकावेळी १०० उमेदवारांना नाशिकमधील केंद्रात प्रशिक्षण घेता येणार असून, अशा उमेदवारांना महामंडळ सेवेत सामावून घेणार आहे.
ट्रेनिंग सेंटरसाठी २५ कोटींचा निधी मंजूर
पांढरकोडा आणि चंद्रपूरला आदिवासींसाठी ट्रेनिंग सेंटर असून, तेथे महामंडळाला राखीव कोट्यातून चालक-वाहक मिळू लागले आहेत. अन्य ठिकाणी अजूनही जागा भरल्या जात नाहीत. एकट्या नाशिक विभागात आदिवासींच्या ८०० जागा रिक्त आहेत. पाच विभागांत असे ट्रेनिंग सेंटर सुरू झाल्यानंतर या जागा भरू शकतील. नाशिक येथील केंद्रासाठी २५ कोटींचा निधी मंजूर झाला असून, नकाशा बनविण्याचे काम सध्या सुरू आहे. महामंडळाची मान्यता मिळताच प्रशिक्षण केंद्राचे काम सुरू करण्यात येणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 18, 2015, 12:10 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
टीव्ही सिरियलमधील अपहरणाचा कट बघून त्याप्रमाणे मोहित बाविस्कर (वय १७) या विद्यार्थ्याचा खून करणाऱ्या दोघा संशयित आरोपींना शहर पोलिसांनी रविवारी बेड्या ठोकल्या. बालपणापासून सोबत राहणाऱ्या मित्रानेच मोहितचा घात केला. शहर पोलिसांनी सीसीटीव्ही मदतीने आरोपींचा माग काढला.
शिक्षणासाठी गोळे कॉलनीत रूम घेऊन राहणाऱ्या मोहितचा २० लाख रुपयांच्या खंडणीसाठी खून करण्यात आला. ही घटना शनिवारी उघडकीस आल्यानंतर शहर पोलिसांनी सौरभ चौधरी आणि आकाश प्रभू या दोघांना अटक केली. सौरभ आणि आकाश दोघेही काठे गल्ली परिसरात रूम घेऊन राहतात. तर, वडाळा गाव परिसरातील एका इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये डिप्लोमाचे शिक्षण घेतात. मालेगाव शहरातील कलेक्टरपट्टा येथे सौरभ आणि मृत मोहित यांचे घर आहे. अगदी पहिलीपासून हे दोघे मित्र होते. आयआयटीच्या क्लाससाठी शहरात आलेल्या मोहितची सौरभमुळे आकाश प्रभू याच्याशी मैत्री झाली. या दोघांनीच त्र्यंबकेश्वरला फिरायला जाण्याचा बहाणा करीत १४ ऑक्टोबर रोजी सकाळी एमएच ०१ बीएच ९५३२ या क्रमाकांच्या बुलेट दुचाकीवरून मोहितचे अपहरण केले. मित्रांच्या डोक्यात संचारलेल्या राक्षसी विचारांपासून अनभिज्ञ असलेला मोहित त्यांच्या समवेत गेला. गणपतबारी येथे पोहचल्यानंतर आरोपी सौरभ आणि आकाश यांनी मोहितची हत्या केली.
सीसीटीव्हीमुळेच संशयित गजाआड
मोहितच्या खून प्रकरणात आरोपींना शोधण्यात पोलिसांसाठी सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरले. मोहितेचे अपहरण आणि नंतर झालेल्या खंडणीच्या मागणींचा पोलिसांनी अभ्यास केला. मोहित त्या दिवशी कोठे गेला याची माहिती काढली. त्यानुसार त्याच्या रूममेटससह काही मित्रांकडे चौकशी केली. त्यात, सौरभ आणि आकाशचाही समावेश होता. मात्र, हे दोघे अतिशय सराईतपणे पोलिसांच्या चौकशीस समोरे गेले. त्यांच्या चेहऱ्यावर गुन्हा केल्याचा कोणताही लवलेश नव्हता. ही चौकशी सुरू असताना पोलिसांनी आधुनिक पध्दतीने तपास करीत खंडणीसाठी कॉल करणाऱ्यांचे शेवटेचे लोकेशन प्राप्त केले. ते प्राप्त होताच तपास अधिकाऱ्यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शहर परिसरात लावलेल्या सुमारे ३०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज अवघ्या साडेपाच तासात तपासून पाहिले. यात, एका ठिकाणी संशयित आढळून आले. मात्र, फुटेज अस्पष्ट होते. मात्र, इतर ठिकाणावरील फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली.
हत्येनंतरही केली खंडणीची मागणी
पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपींनी टीव्हीवरील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सिरियलपासून प्रेरणा घेतली. अपहरणाचा तसेच खंडणीचा सर्व आराखडा तयार करणाऱ्या संशयितांनी मोहितला बेशुध्द करण्याचे ठरवले होते. मात्र, तसा कोणताही मार्ग त्यांच्याकडे उपलब्ध नव्हता. त्यामुळे गणपतबारी येथे पोहचल्यानंतर संशयितांनी मोहितचा जीव घेतला. यानंतर आरोपींनी त्याचा मृतदेह एका पुलाखाल सोडून देत शहराची वाट पकडली. शहरात आल्यानंतर १५ ऑक्टोबररोजी त्यांनी मोहितच्या वडिलांना दूरध्वनी करून रक्कमेची मागणी केली, अशी माहिती क्राईम ब्रँचचे पोलिस उपायुक्त अविनाश बारगळ तसेच एसीपी सचिन गोरे यांनी दिली. खंडणीद्वारे मिळणारे पैसे दोघे वाटून घेणार होते.
पोलिसांकडे तक्रार येण्यापूर्वीच संशयित आरोपींनी मोहित बाविस्करचा खून केला होता. मित्राचा खून करणारे दोघे संशयित सराईत गुन्हेगाराप्रमाणे वागत होते. - एस. जगन्नाथन, पोलिस आयुक्त
मोहितच्या घरच्यांची आर्थिक परिस्थिती ठाऊन असल्यानेच आरोपींनी कट करून हे कृत्य केले. आरोपींना कडक शासन झालेच पाहिजे. या प्रकरणात कोणतीही हलगर्जी होऊ नये, अशी मागणी आम्ही पोलिस आयुक्तांना केली. - रमेश शिंदे, मोहितेच नातेवाईक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
October 18, 2015, 12:12 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
जळगाव पोलिस दलातील पोलिस निरीक्षक अशोक सादरे यांनी केलेल्या आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. आता प्राथमिक चौकशी सुरू असून, आवश्यकता असल्यास संशयित आरोपींना अटक करण्यात येईल, असे पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी रविवारी स्पष्ट केले.
जळगाव पोलिस दलात कार्यरत असताना निलंबित झालेल्या सादरे यांनी शुक्रवारी संध्याकाळी पंचवटी येथील राहत्या घरात आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी सादरे यांनी जळगावचे पोलिस अधीक्षक जालिंदर सुपेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते यांच्यासह सागर चौधरी या वाळू तस्करावर कट कारस्थान करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबतची सुसाईड नोट लिहून ठेवली.
या चिठ्ठीच्या आधारे आणि नातेवाईकांच्या मागणीनुसार पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये संबंधित अधिकारी आणि वाळू तस्कराविरोधात कलम ३०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाला आता संबंधिताना अटक करण्यात येणार काय याबाबत आयुक्त एस. जगन्नाथन यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी या प्रकरणी तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले. सुसाईड नोटमध्ये ज्या व्यक्तींची नावे आहेत त्यांच्यामुळे सादरे यांनी आत्महत्या केली, याचे पुरावे शोधण्यात येतील.
यासाठी अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागले. या चौकशीदरम्यान कोणी अधिकारी दोषी आढळून आले तर गृहमंत्रालयाच्या मंजुरीने त्यांना अटक करण्यात येईल, असे जगन्नाथन यांनी स्पष्ट केले. दाखल झालेल्या प्रत्येक गुन्ह्यात संशयितांना अटक होतेच असे नाही. चौकशीत समोर येणाऱ्या पुराव्यानुसार तपास अधिकारी तो निर्णय घेतो. या चौकशीसाठी किती कालावधी खर्ची पडेल, हे आता सांगणे कठीण असल्याचेही आयुक्तांनी सांगितले. दरम्यान, सादरे यांनी केलेल्या आत्महत्येनंतर जळगावच नव्हे तर राज्यभरातील पोलिस दलात विविध चर्चांना पेव फुटले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी अपेक्षा पोलिस अधिकारी व्यक्त करीत आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 18, 2015, 12:13 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
गोवर्धन-गंगापूर गावातील ग्रामस्थांकडून सांगितल्या जात असलेल्या दंतकथेनुसार गंगापूर, गोवर्धन व जलालपूरमध्ये देवीच्या तीन मूर्ती होत्या. यातील एक मूर्ती सध्या गंगापूर व दुसरी गोवर्धनमध्ये आहेत. यातील तिसरी मूर्ती कोठे आहे याचा शोध घेतल्यावर गोवर्धन व गंगापूर येथील मूर्तीसारखीच मूर्ती गोरेराम लेनमधील राजेंद्र भाबड कुटुंबियांकडे असल्याचे आढळले. या मूर्तीबाबत माहिती रितेश राजेंद्र भाबड म्हणाले,'सहा पिढ्यांपासून महालक्ष्मीची लाकडातील अखंड मूर्ती आमच्याकडे आहे.
तिची सेवा आम्ही भक्तीभावाने करीत आहोत. ही मूर्ती गंगापूरमध्येच बनविण्यात आली होती. मात्र ही जलालपूरची देवी आहे याबाबत आम्हाला काहीच माहिती नाही. त्या कारागिराने तीन मूर्ती कोरल्या होत्या. त्यातील एक गंगापूरची महाकाली व गोवर्धनची महासरस्वती व गोरेलेनमधील महालक्ष्मी आहे, ही माहिती मागच्या पिढ्यांनी आम्हाला दिली आहे. ही मूर्ती आमच्याकडे कशी आली हेही देखील आम्हाला माहिती नाही.'
गेल्या अनेक वर्षांपासून गोवर्धन व गंगापूरच्या देवींची मिरवणूक काढली जात नाही. उत्सवाच्या काळात गोवर्धनची मोठ्या होळीची देवीची प्रतिकृती पेठगल्लीतील देवीच्या भेटीसाठी नेली जाते. मात्र तीन भगिनींची गेल्या अनेक वर्षांपासून ताटातुटीमुळे भेट होऊ शकलेली नाही.
देवींना नावही नव्हते...
गोवर्धनमध्ये मोठी होळी केली जाते. त्याच चौकात देवीचे मंदिर असल्याने या देवीला मोठ्या होळीची देवी म्हटले जाते. तर गंगापूरमधील बाजारपेठ गल्लीत देवी असल्याने तिला पेठगल्लीतील देवी म्हटले जाते. या देवीला आतापर्यंत नाव नव्हते. पण, रितेश भाबड यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवर्धनमधील देवीचे नाव महासरस्वती तर गंगापूरमध्ये देवीचे नाव महाकाली आहे. ही माहिती त्यांना मागच्या पिढ्यांनी दिलेली आहे. याला कागदोपत्री पुरावा मात्र नाही, असेही ते सांगातात.
रूप समाधान देती...
भारतात मातृदेवतांच्या पूजनाची परंपरा अतिशय प्राचीन आहे. नवरात्रीच्या नऊ रात्रीत महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती आणि दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. त्यांनाच नवदुर्गा म्हणतात. समृद्धी, संरक्षण आणि शौर्य इत्यादींसाठी मातृदेवतांपुढे नतमस्तक झालेले मानवी मन आपल्याला पाहायला मिळते. लाकडात अखंड कोरलेल्या या तिन्ही मूर्ती दशभुजा असून, त्या वाघावर आरूढ आहेत. असुरांचा वध करताना तिन्ही देवींच्या अवतीभवती नाग, माकडे व वाघ आहेत. तिन्ही देवींच्या चेहऱ्यावरील भाव वेगवेगळे असून, पाहणाऱ्याला त्यांचे रूप समाधान देतात.
इतिहासाचे होणार संकलन
गोवर्धन, गंगापूर, जलालपूर या गावांच्या इतिहासाचे संकलन करण्याचा निश्चय ग्रामस्थांनी केला असून, 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये वेशीवरच्या पाऊलखुणाच्या माध्यमातून ही प्रेरणा मिळाल्याची माहिती अॅड. सुदर्शन पाटील यांनी दिली. पाटील म्हणाले,''मटा'ने या गावांमधील अनेक अज्ञान पैलू उलगडले आहेत. गोवर्धन-गंगापूरचे योगदान नाशिकच्या इतिहासात महत्त्वाचे ठरले आहे.
काळानुसार या गावांच्या इतिहासाच्या पाऊलखुणा दुर्मिळ व अस्पष्ट होत जाणार आहेत. या इतिहासाचे संकलन होण्याची गरज 'मटा'मुळे समोर आली. लवकरच याचे काम हाती घेण्यात येईल.'
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 18, 2015, 12:15 pm
Ramesh.padwal@timesgroup.com
नाशिक : एकाच लाकडात अखंड कोरलेल्या देवीच्या तीन मूर्ती पेशवाईत रथयात्रेच्या माध्यमातून एकमेकींना भेटायच्या. मात्र गंगापूरची महाकाली व गोवर्धनची महासरस्वती यांच्यापासून जलालपूरच्या महालक्ष्मीची ताटातुट झाल्याने गेल्या अडीचशे वर्षांपासून त्या एकदाही भेटलेल्या नाहीत. असे का झाले ? तिसरी देवी कुठे आहे ? त्यांची ताटातुट कशी झाली ? याचे याचे रहस्य अजूनही कायम आहे.
गोवर्धन गावाला दोन हजाराहून अधिक वर्षांचा रोचक इतिहास आहे. सातवाहनांपासून ते पेशव्यांपर्यंत या परिसरात असंख्य घडामोडी घडल्या. नाशिकही पेशव्यांची उपराजधानी असल्याच्या काळात गोवर्धन, गंगापूर व जलालपूरचा विकास झाला. नानासाहेब पेशव्यांच्या पत्नी गोपिकाबाईंचे वास्तव गंगापूर येथे होते. यामुळे या काळात कला संस्कृतीला चालना मिळाली. सध्या गंगापूरमध्ये पेठगल्लीत देवीचे मंदिर व गोवर्धनमध्ये मोठ्या होळीची देवी अशा लाकडात अखंड कोरलेल्या देवीच्या दोन मूर्ती आहेत. याबाबत एक दंतकथा सांगितली जाते की, गंगापूरच्या कोष्ठ्याला गोदावरीपात्र निंबाचे मोठे खोड मिळाले. त्यात त्याने देवीच्या तीन मूर्ती कोरल्या. यातील एक मूर्ती गोवर्धनमध्ये मोठ्या होळीच्या ठिकाणी बसवली. दुसरी गंगापूरमध्ये पेठगल्लीत तर तिसरी जलालपूरमध्ये. या तिन्ही मूर्तींची भेट उत्सवाच्या काळात मिरवणुकी दरम्यान व्हायची. मात्र, जलालपूरातील मूर्ती गोदेच्या पुरात वाहून गेली की मिरवणुकीदरम्यान ती नाशिक शहरातच राहिल्याने तेव्हापासून तिघींची भेट झालेली नाही. तिसरी मूर्ती कोठे आहे हेही कोणाला माहिती नाही, असे मुरलीधर पाटील यांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 18, 2015, 12:16 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सण उत्सवांना प्रारंभ झाला की आपोआपच फळे, किराणा, भाजीपाला यांचे भाव वाढतात. किंबहूना आवक घटल्याचे कारण सांगत त्यांच भाव वाढवले जातात. सध्या सर्वच वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे सर्वसामान्यांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागत आहे. सध्या डाळींचे दर आवाक्याबाहेर गेले आहेत. यामुळे किराणाच्या यादीत डाळींचे वजन कमी झाले आहे.
यंदा पावसाने ओढ दिल्याने डाळींच्या आवकेवर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून डाळींनी शंभर रुपये किलोचा टप्पा ओलांडला आहे. तूर, उडीद डाळ तर सर्वसामान्यांना घेणे अवघड झाले आहे. या दोन्ही डाळींनी दोनशे रुपये किलोपर्यंत मजल मारली आहे. मूग व मठ डाळही ८० ते १०० रुपये किलोप्रमाणे मिळत आहेत. सध्या साखरेचे दरही वाढले आहेत. शेंगदाणा तेलचे दरही जैसे थे आहेत. शेंगदाण्याचे दरही वाढले असून ११० रुपये किलोने मिळत आहेत. यामुळे दसरा-दिवाळी सर्वसामान्यांचे दिवाळे काढणारी ठरणार आहे.
रेशनचे धान्यही पुरेशा प्रमाणात व वेळेत मिळत नसल्याने सर्वसामान्यांची दसरा दिवाळी कडूच दिसत आहे. यामुळे जीवनावश्यक वस्तूच महागाईमुळे जीवनातून हद्दपार होताना दिसत आहेत. दिवाळीपर्यंत तरी हे दर आटोक्यात येण्याची चिन्हे कमी दिसत आहे. डाळींची साठेबाजी होत असल्याचाही संशय ग्राहक व्यक्त करीत आहेत. यामुळेच दर वाढल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. गूळ, रवा, मैदा या पदार्थांची मागणी वाढल्याने त्यांच्या दरात किरकोळ वाढली आहे. यामुळे यंदा सर्वसामान्यांना आपल्या बजेटला कात्री लावावी लागणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
October 18, 2015, 12:19 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
गेल्या आठवड्यात कडाडलेले पालेभाज्यांचे दर काही प्रमाणात आवाक्यात आले आहेत. मात्र, गिलके, कारले, दोडके यांचे दर जैसे थे आहेत. गवारचे दर थोडे कमी झाले असून ३० ते ४० रुपये किलोप्रमाणे मिळत आहेत. शेपूचा भाव मात्र आवकेत घट झाल्याने वाढला आहे.
डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याचे दर दोन महिन्यानंतर प्रथमच ३० रुपये किलोच्या खाली आले आहेत. तसेच ५० रुपये जुडीच्या पुढे गेलेली मेथी, कोथिंबीरची जुडी २० ते २५ रुपयांपर्यंत मिळू लागली आहे. यामुळे सर्वसामान्यांना खेरदी करणे शक्य झाले आहे. शेपूची आवक घटल्याने दर वीस जुडीपर्यंत गेले आहेत. काकडी व टोमॅटोचे दर जैसे थे आहेत. मागणी वाढल्याने वांग्याचे दर अल्प प्रमाणात वाढले आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 18, 2015, 12:20 pm
म. टा. वृत्तसेवा, घोटी
मराठवाड्यासाठी नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडले जाणार आहे. मात्र, दारणा धरणातील अत्यल्प साठा बघता इगतपुरी तालुक्यातही पाणीटंचाईचे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. यामुळे दारणा धरणातून पाणी सोडण्यात येऊ नये, या मागणीसाठी आमदार निर्मला गावित यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ आज, सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देणार आहेत.
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या बैठकीत नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणाचे पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील दारणा धरणाच्या समूहातून पाणी सोडण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आमदार निर्मला गावित यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी तालुक्यातील शेतकरी शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. याप्रसंगी इगतपुरी तालुक्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शेतकरी नेते पांडूरंग शिंदे यांनी केले आहे.
मराठवाड्यासाठी ३१ ऑक्टोबरपूर्वी पोलिस बंदोबस्तात नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांमधील जवळपास १२ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. त्यात इगतपुरी तालुक्यातील दारणा धरण समूहातूनही जवळपास ३.२४ टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. यासंदर्भात प्रशासकीय स्तरावर नियोजन सुरू आहे. या तालुक्यात दारणा धरण समूहातील मुकणे, वाकी या धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे. दारणा धरणातून यापूर्वीच अनेकवेळा पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे या धरणात जेमतेम पाणीसाठा आहे. त्यात इगतपुरीसारख्या पावसाच्या प्रदेशात अवघा ६० टक्के पाऊस झाल्याने तालुका दुष्काळाच्या छायेत आहे. यासंदर्भात इगतपुरी तालुक्यातही आगामी काळात पाणीटंचाईचे संकट उभे राहणार आहे.
शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ आज सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांची भेट घेऊन निवेदन देणार आहे. इगतपुरी तालुक्यावर अन्याय झाल्यास मोठे जनआंदोलन उभे राहील असा इशारा देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही बाजार समितीचे माजी संचालक पांडूरंग शिंदे यांनी केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 18, 2015, 12:14 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
गंगापूर धरणातील पाणी वहन मार्गाने घेऊन जाण्यास आपला तीव्र विरोध असल्याचे शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांनी रविवारी स्पष्ट केले. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी अभ्यास न करता स्वार्थापोटी हा निर्णय घेतला असून, नाशिककरांच्या विश्वासाला तडा देणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा कदम यांनी दिला. यामुळे नाशिक आणि मराठवाड्यातील पाणी प्रश्न पेटण्याचे संकेत कदम यांनी दिले. जिल्ह्यातील पाण्याबाबतची नेमकी परिस्थिती पालकमंत्र्यांनी जाणून घ्यायला हवी होती. नाशिकमधील धरणांचे पाणी मराठवाड्याला देण्यापूर्वी जिल्ह्यातील आमदारांना विश्वासात घ्यायला हवे होते, असा टोलाही त्यांनी लगावला.
नाशिकचे गंगापूर धरण आणि दारणा धरणातून मराठवाड्यासाठी वहन मार्गाने पाणी सोडण्याचा निर्णयाला आपला सक्त विरोध असल्याचे आमदार कदम, आमदार राजाभाऊ वाजे यांनी रविवारी शासकीय विश्रामगृह येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. कदम म्हणाले, 'वहन मार्गाने पाणीवाटप करण्याचा निर्णय अतिशय घाईघाईने घेण्यात आला आहे. हा निर्णय साम, दाम, दंडाचा वापर करून हाणून पाडू. गंगापूर आणि दारणा धरणाचे पाणी नाशिककरांच्या हक्काचे आहे.'
गंगापूर धरणावर आज आंदोलन
वहन मार्गाने पाणी घेऊन जाण्याऐवजी रेल्वेने किंवा अन्य मार्गाने सुरक्षितरित्या हे पाणी न्यावे, अशी मागणी आमदार कदम यांनी केली आहे. दरम्यान या प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी सोमवारी सकाळी अकराला गंगापूर धरणावर आंदोलन करण्यात येणार आहे.
पाणी सोडण्याचा निर्णय माझा नसून, न्यायालयाच्या निर्देशानुसार आहे. पाणी वाटप हा एखाद्या मतदार संघापुरता मर्यादीत विषय नसतो. राज्याच्या हितासाठी अशा निर्णयांची अंमलबजावणी करावी लागते. आम्ही कुणाचाही विश्वासघात केला नसून, आमदारांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी. - गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧