नाशिक : राज्याला पावसाने दिलेला दिलासा, लागोपाठ आलेल्या सुट्ट्या आणि एकादशी व प्रदोषचा मुहूर्तामुळे भाविकांनी त्र्यंबकमधील तिसऱ्या पर्वणीला रेकॉर्डब्रेक हजेरी लावली. विशेष म्हणजे नाशिकच्या तीन व त्र्यंबकेश्वरच्या दोन पर्वण्यापासूंन लाब राहिलेला मराठी भाविक शेवटच्या पर्वणीला घराबाहेर पडले आणि भक्तांचा महामेळाच भरला. अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी आल्याने तिसऱ्या पर्वणीचे प्रशासनाने केलेले पूर्ण नियोजनच कोलमडले. त्र्यंबकमध्ये सुमारे २० लाख भाविकांनी हजेरी लावल्याने व कुशावर्तच्या क्षमतेपक्षा अधिक संख्या असल्याने लाखो भाविकांना स्नान व दर्शनाविनाच त्र्यंबक सोडावे लागले.
त्र्यंबकमध्ये शुक्रवारी कुंभमेळ्याची शेवटची पर्वणी असल्याने प्रशासनाने या पर्वणीचे नियोजन बेताचेच केले होते. पहिल्या पर्वण्यांना फारसा प्रतिसाद न मिळालेल्या त्र्यंबकमध्ये तिसऱ्या पर्वणीला मोजकीच गर्दी होईल असा प्रशासनाचा अंदाज होता. मात्र, राज्यात नुकताच झालेला दिलासादायक पाऊस, लागोपाठ आलेल्या चार दिवसांच्या सुट्ट्या,शेवटच्या पर्वणीच्या पूर्वसंध्येला एकादशी व प्रदोष व्रत आल्याने भाविकांनी प्रशासनाचा पूर्ण अंदाजच चुकविला. दिवसभरात पाच लाख भाविकांना सामावून घेण्याची क्षमता असलेल्या त्र्यंबकेश्वर आदल्या रात्रीच चार लाख भाविकांनी ठाण मांडले. त्यामुळे रात्रीच गर्दीने हाऊस फुल्ल झालेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये सकाळी आणखीन भाविकांना सामावून घेण्याची क्षमताच उरली नव्हती.
चार ते पाच लाख भाविकांचा अंदाज बांधून असलेल्या प्रशासनाला मराठी भाविकांनी शेवटच्या पर्वणीला मोठा धक्काच दिला. पहिल्या व दुसऱ्या पर्वणापासून दूर राहिलेला राज्यातील भाविकांनी तिसऱ्या पर्वणीला हजेरी लावून प्रशासनाला अंदाज खोटा ठरविला. दुष्काळामुळे दूर राहिलेल्या राज्यातील कानाकोपऱ्यातील भाविकांनी मिळेल त्या वाहनाने सकाळी नाशिकमध्ये दस्तक दिली. मिळेल त्या वाहनाने त्यांनी त्र्यंबक गाठायला सुरुवात केली. तर एसटी बस न मिळाल्याने काहीनी पायपीटच सुरू केली. त्यामुळे सकाळीच अचानक त्र्यंबकच्या दिशेने वाढलेली गर्दी बघताच प्रशासनाने धावपळ सुरू केली.
एवढ्या गर्दीची क्षमता नसल्याने 'होल्ड अॅण्ड रिलीज'चे आदेश सोडण्यात आले. त्यामुळे दुपारीच त्र्यंबकपासून नाशिक आणि घोटीकडे दहा किलोमीटरपर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. एसटी बसेस बंद कराव्या लागल्या. तर नाशिकची वाहतूक गंगापूर मार्गे वळविण्यात आली. एवढ्या भाविकांचे कुशावर्तावर स्नान व त्र्यंबकराजाचे दर्शन करणेच शक्य नसल्याने भाविकांना आहे, त्याच ठिकाणी रोखून हळू हळू गर्दी रिलीज करण्याचा प्रयत्न प्रशासनाने सुरू केला. मात्र, वाढती गर्दी आणि रिलीजचे ताळमेळ बसत नसल्याने हजारो भाविकांनी दुरूनच त्र्यंबक राजाचे दर्शन घेवून माघारी फिरणे पसंद केले. भाविकांना सुमारे २० किलोमीटर पायपीट करावी लागल्याने अनेकांनी रस्त्यावरूनच आपल्या गावी माघारी फिरणेच पसंत केले.
दोनदा स्टॅम्पेंड वाचवली
त्र्यंबकनगरीत क्षमतेपेक्षा जास्त भाविक दाखल झाल्याने चेंगराचेंगरीची शक्यता बळावली. मात्र, पोलिस व प्रशासनाने शिताफीने गर्दीचे नियंत्रण करत चेंगराचेंगरीची निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात केली. सकाळी कुशावर्तावर बडा उदासीन आखाड्याच्या स्नानावेळीच चेंगराचेंगरी होता होता वाचली. पालकमंत्री, जिल्हाधिकारी व पोलिसांनी आपल्या जीवाची बाजी लावून ही स्टॅम्पेड रोखली. तर गजाजन महाराज मंदिराबाहेरही गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी आपले जीव पणाला लावले. त्यामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये दोनदा चेंगराचेंगरी होता होता वाचल्याचे श्रेय पोलिस आणि प्रशासनालाच जाते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट