चारा छावण्या सुरू करण्याची मागणी; पैसेवारी समितीकडून पिकांची पाहणी
म. टा. वृत्तसेवा, लासलगाव
मुबलक पाण्याच्या जोरावर कृषी प्रधान तालुका अशी ओळख असणाऱ्या निफाड तालुक्याला यंदा कधी नव्हे तेवढ्या दुष्काळसदृश परिस्थितीस सामोरे जावे लागत आहे. पावसाअभावी निफाड तालुक्यातील शेती व्यवसाय संकटात सापडल्याची स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत. परतीच्या पावसाने आशा जागवल्या असल्या तरी नद्या, नाले, विहिरी अजूनही कोरड्या आहेत. यामुळे रब्बी हंगामही अधांतरीतच दिसत आहे.
कुटुंबकबिल्यासह अहोरात्र मोठे काबाडकष्ट करून शेतात केलेल्या खरिपाच्या पीक-पेरण्या पाण्याअभावी धोक्यात आल्याने कष्टकरी शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. ऐन पावसाळ्यात आभाळ रुसून बसल्याने परिसरातील विहिरींनी तळ गाठला. गेल्या तीन ते चार वर्षांपासून सातत्याने लहरी निसर्गाच्या दृष्टचक्रात
अडकून मेटाकुटीला आलेल्या बळीराजाला यंदाचं वर्षही मोठे कठीण जात असून, या भीषण दुष्काळजन्य परिस्थितीत शेती व्यवसाय सांभाळण्यासाठी करावे तरी काय असा यक्ष प्रश्न जगाच्या पोशिंद्यासमोर उभा ठाकला आहे.
निफाड तालुक्यातील लासलगाव, टाकळी, पिंपळगाव नजीक, कोटमगाव, विंचूर, नैताळे, पाचोरे आदींसह अनेक गावांमध्ये अत्यल्प पाऊस झाला असल्याने शेतीसाठी पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे कांदा, सोयाबीन, मका, बाजरी, भुईमगू आदी खरीप पिकांसह टोमॅटोचे पीकही पाण्याअभावी जळू लागल्याने बळीराजावर मोठे आर्थिक संकट घोंगावत आहे. एकीकडे सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असतांनाच दुसरीकडे जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची समस्याही उभी राहिल्याने बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे.
लासलगावच्या पिंपळगाव नजीक येथे विहिरींना पाणीच नसल्याने उभी पिके जळून गेली आहेत. त्यात चारा पिकेही नष्ट झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे परिसरात चारा छावण्या सुरू करण्याची मागणी केली आहे. अशीच परिस्थिती तालुक्यातील अनेक गावांमध्ये निर्माण होत आहे.
पर्जन्यमानात घट
निफाड तालुक्यात सरासरी पर्जन्यमान ४८२ मिमी राहिले आहे. गेल्यावर्षी ६० मिमी पावसाची घट होऊन ती ४२२ मिमी नोंदविली
गेली. चालू वर्षात जून, जुलै,
ऑगस्ट व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत ती अवघी ३२ टक्के म्हणजेच १५२ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे.
विशेष कमिटीची स्थापना
पाणीटंचाई परिस्थितीसंदर्भात निफाड पंचायत समितीच्या सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंभळे, पंचायत समिती सभापती सुभाष कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक होऊन संबंधित विभागाचे अधिकारी व ग्रामसेवक यांना पाणीटंचाई निवारणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तालुक्यातील १३५ गावांमध्ये पैसेवारी १५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, त्यासाठी एक विशेष कमिटी स्थापन केली आहे. या कमिटीमध्ये तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, प्रगतशील शेतकरी आदींचा समावेश असून, ही कमिटी पिकांची पाहणी करून त्यासंदर्भातील अहवाल तयार करून प्रशासनाला सादर करणार आहे.
पाणीपुरवठा योजना
निफाड तालुक्यात २००६-०७ ते आतापर्यंत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत एकूण ८३ योजना पूर्णत्वास गेल्या आहेत. मात्र, आजघडीला त्यातील ३९ योजना सुरळीत असून ३९ योजनांचे कामे सुरू आहेत. पाच योजना बंद पडल्याची माहिती जिल्हा परिषदेचे ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजना विभागाचे कार्यकारी अभियंता नंदनवरे यांनी दिली. निफाड तालुक्यात लासलगाव जवळील पिंपळगाव नजीक येथे टँकर सुरू करण्यात आला असून, आठ वाड्यांना टँकरने पाणी सुरू आहे. टाकळी विंचूरचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. तसेच कोटमगाव, रानवड, मुखेड, सावरगाव, नांदूरखुर्द, महाजनपूर, भेंडाळी, चितेगाव, रेडगाव या गावांनाही टँकर सुरू करावे लागतील, असे पंचायत समितीच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्षांना कळविण्यात आले आहे.
वळण बंधारे भरून द्या
उगाव, शिवडी, खेडे, वनसगाव, आदी गावातील सार्वजनिक पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे या गावांमध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, यावर उपाय म्हणून पालखेड कालव्याचे पाणी विनिता नदीपात्रात सोडून वळण बंधारे भरून द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पैसेवारी पंचवीस पैसे?
लासलगाव येथील चालू वर्षांतील पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामात पिकाचे उत्पादन धोक्यात आले आहे. शुक्रवारी लासलगावचे महसूल मंडल अधिकारी चंद्रशेखर नगरकर, ग्रामविकास अधिकारी सी. के. मुंढे व तलाठी एस. पी. गांगुर्डे यांच्यासह पैसेवारी समितीने लासलगावी विविध शेतांमध्ये जाऊन पिकांची पाहणी केली. लासलगाव येथील प्राप्त पीक पैसेवारीनुसार खरीप हंगामात पिकाचे नुकसान झाल्याने वीस ते पंचवीस पैशांच्या आत पीक आणेवारी घोषित होण्याच्यी शक्यता आहे.
परतीच्या पावसावर आशा
परतीच्या पावसाने दोन दिवस हजेरी लावल्याने बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. खरीप हंगाम वाया गेला असला तरी रब्बी हंगामाला या पावसाचा फायदा होऊ शकतो. दोन दिवस तालुक्यातील अनेक गावांत मुसळधार पाऊस झाला. यामुळे कांदा पिकाला थोडा फायदा होऊन लागवडही वाढू शकते. पावसाने सातत्य ठेवल्यास रब्बी हंगाम घेणे शक्य होईल. यामुळे बळीराजाच्या नजरा या परतीच्या पावसावरच लागल्या आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट