Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘दिगंबर’ची कीर्तीध्वजा गगनी!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'जय श्री राम', 'जय हनुमान' या घोषणात आणि धर्मपंडिताच्या मंत्रोच्चारात दिगंबर आखाड्याची धर्मध्वजा गगनी भीडली. १२ वर्षे प्रतिक्षा असलेल्या या सोहळ्याचे साक्षीदार झालेल्या साधू-महंतांनी मिठाईचे वाटप करून आणि फटाक्यांची आतषबाजी करून आपला आनंद साजरा केला.

वैष्णव आखाड्यांतील प्रमुख असलेल्या दिगंबर आखाड्यात सकाळी सात वाजता ब्राह्मणवृंदांनी पूजेस प्रारंभ केला. पुजेसाठी दिगंबर आखाड्याचे महंत कृष्णदास महाराज, महंत रामकिशोरदास महाराज, निर्वाणी आखाड्याचे महंत धर्मदास महाराज, निर्मोही आखाड्याचे महंत राजेंद्रदास महाराज, आखाड्याचे महामंत्री वैष्णवदास महाराज, माधवाचार्य आदी उपस्थित होते. याच दरम्यान, महापौर अशोक मुर्तडक, माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी आखाड्यास भेट दिली. मुख्यमंत्री फडणवीस, भाजपाध्यक्ष शहा आखाड्यात आले. शहा यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला इष्टदेवातांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

संगीत सलामी

धर्मध्वजेस दररोज सकाळ व सायंकाळ संगीत सलामी दिली जाणार आहे. बुधवारीही संगीत सलामी पार पडली. यासाठी स्थानिक वाद्यवृदांस आखाड्यांनी पाचारण केले आहे. देशाच्या तिरंग्याप्रमाणे कीर्तीध्वजेला मान दिला जाणार आहे.

नोटांची उधळण

सोहळ्यानंतर एका महंतांनी दहा रुपयांच्या नोटांची उधळण केली. उपस्थितांनी नोटा घेण्यासाठी गर्दी केली. २००३ सालच्या कुंभमेळ्यात सरदार चौकात अशाच प्रकारे चांदीच्या नाण्यांची उधळण केल्यामुळे घटनेत २९ भाविकांचा प्राण गेले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फडकला निर्वाणी आखाड्याचा ध्वज

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आठव्या शतकात निर्माण झालेल्या निर्वाणी आखाड्याची नाशिकमध्ये मूळ बैठक नाही; परंतु प्रतिवर्षी येथे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आखाडा स्थापित करण्यात येतो. या आखाड्याचे ध्वजारोहण बुधवारी मोठ्या उत्साहात पार पडले.

सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी महंत ग्यानदास महाराज, महंत धर्मादास महाराज, भाजपाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री गिरिश महाजन, खासदार हेमंत गोडसे, महापौर अशोक मुर्तडक, माजी पालकमंत्री छगन भुजबळ, स्थायी समिती अध्यक्ष शिवाजी चुंबळे, महंत रामकिशोर महाराज, महंत गौरीशंकर महाराज यांचे आगमन झाले. ध्वजाला प्रणाम करीत पूजा सुरू असलेल्या ठिकाणी जात ध्वजाची पूजा केली. आठ वाजून दहा मिनिटांनी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

पुजेसाठी श्री महंत धर्मादास महाराज बसले होते. वेदमूर्ती विनायक अनंतशास्त्री पुराणिक, यशवंत पैठणे, संतोष शौचे, अजित अगस्ते, उपेन्द्र देव, विजय गायधनी यांनी मुख्य पुजेचे पौराहित्य केले.

असा आहे ध्वज

सूर्याचा बुधवारी एका महिन्यासाठी सिंहराशीत प्रवेश झाला. त्याच मुहूर्तावर आठ वाजून दहा मिनिटांनी आखाड्याचे ध्वजारोहण पार पडले. निर्वाणी आखाड्याचा ध्वज लाल रंगाचा असून, त्याच्या दोन्ही बाजूंवर सुवर्ण हनुमान विराजमान आहे. ध्वजावर हा हनुमान सुवर्णकांती असून, ही ध्वजा २५ फूट लांब, १० फूट रूंद आहे. ५१ फूट उंच काठीवर हा ध्वज फडकविण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ढोल ताशांच्या गजरात ‘निर्मोही’चे ध्वजारोहण

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ढोल ताशाचा गजर, सियावर रामचंद्र की जय, पवनपुत्र हनुमान की जयचा जयघोष, वेद मंत्रोच्चारात बुधवारी सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात झाली. तीन आखाड्यांपैकी एक असलेल्या अखिल भारतीय श्री पंच निर्मोही अनी आखाड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आदींच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

मुख्य कार्यक्रमाला सकाळी ७ वाजता प्रारंभ झाला. आखाड्याचे प्रमुख सोमयाजित षष्ठपीठाधीश्वर गोस्वामी वल्लभरायजी महाराजश्री यांच्या मार्गदर्शनाखाली पूजारंभ झाला. पुजेसाठी हनुमान, इष्टदेवता व उत्सवमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात झाली. कुंभमेळा निर्विघ्न पार पडावा यासाठी गणेशाला आवाहन करण्यात आले. त्यांनतर पुण्याहवाचन करण्यात येऊन सदगुरू पुजन करण्यात आले. यात आद्य गुरुंच्या पादुकाचे पुजनाचा समावेश होता.

यानंतर आखाड्यांच्या ८० पैकी निर्मोही आखाड्याच्या ९ निशाणांचे (ध्वजांचे) पूजन करून विधीवत स्नान घालून त्यांची आरती करण्यात आली. त्यानंतर बृहस्पती पूजन करण्यात येऊन स्वस्ती पूजन, स्तंभ पूजन करण्यात आले. पुजाविधी पार पडल्यानंतर शंख निनाद करण्यात आला. साडे आठ वाजता मुख्यमंत्री फडणवीस व अमित शहा यांच्या हस्ते ध्वजस्तंभाची पूजा करण्यात येऊन ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला.

शस्त्र पुजनालाही मान

शास्त्र आणि शस्त्र या दोघांनाही धर्मशास्त्रात महत्त्व असल्याने शस्त्रांचे देखील पूजन करण्यात आले. यावेळी दाणपट्टा, चक्र, तलवार, भाले, त्रिधारा, चौधारा, चंद्रकोर धारिया, मतका फरी, बाण इत्यादी शस्त्रांची पुजा करून विविध प्रकारचे साहसी खेळ करण्यात आले. नाशिक जिल्हा पारंपरिक मर्दानी खेळ तथा संरक्षक दल व उपस्थित साधूंनी खेळांचे सादरीकरण केले.

नाशिककरांकडून पौराहित्य

तीनही आखाड्यांच्या ध्वजारोहणाचे पौराहित्य नाशिकच्या १८ पंडितांनी केले. निर्मोही आखाड्याचे पौराहित्य वे. शा. सं गजानन शास्त्री गायधनी यांच्या अधिपत्या खाली झाले. यात विनायक शास्त्री गायधनी, विलास शास्त्री आंबेकर, योगेंद्र शास्त्री पाराशरे, मंदार शास्त्री शिंगणे, प्रभाकर शास्त्री गायधनी, योगेश शस्त्री गायधनी यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५०० कोटींच्या निधीची मागणी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कुंभमेळ्याचा आर्थिक भार सहन होत नसल्याने केंद्र सरकारने ५०० कोटींची मदत करावी, अशी मागणी महापौर अशोक मुर्तडक यांनी केली. सिंहस्थ आराखड्यात ७५ टक्के राज्य सरकारची असली तरी भूसपांदन व अन्य कामांच्या भारामुळे ७०० कोटीचां अतिरिक्त बोजा पडला आहे. याचा नागरी कामांवर परिणाम होत असल्याचे मत त्यांनी मांडले.

साधुग्राममधील जगदगुरू रामानंदचार्य प्रवेशद्वाराचे उदघाटन झाले. यावेळी झालेल्या जाहीर कार्यक्रमात महापौरांनी नाशिक महापालिकेची स्थिती मांडण्याचा प्रयत्न केला. केंद्र सरकारने अलहाबाद आणि उज्जैनला निधी दिला. मात्र, नाशिकला दिला नाही. त्यामुळे अमित शाह यांनी केंद्रात आमची बाजू मांडत ५०० कोटींचा निधी मिळवून द्या, अशी आर्जव महापौरांनी केले. महापालिकेच्या वतीने आवश्यक सोयी सुविधा आम्ही पूर्ण केल्या असून, साधू महंतानी आनंदाने नाशिकमधून परतावे, असे आवाहन त्यांनी केले.

'कुंभमेळा आदर्श का आदर्श'

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज यांनी कुंभमेळ्याच्या यशस्वी नियोजनाबद्दल प्रशासनासह राज्य सरकारची पाठ थोपडली. नाशिकचा कुंभमेळा हा आदर्शचा आदर्श कुंभमेळा असल्याची स्तुतीसुमने उधळत, आपल्याला आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार, महापौर, उपमहापौर, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांचा गौरव करीत त्यांच्या प्रयत्नामुळे झालेली व्यवस्था स्वप्नवत असल्याचे सांगितले. हनुमानाच्या आगमानाने आता सिंहस्थाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. कोणी रास्ता दाखवला तर, कोणी चांगले काम करून कुंभमेळ्याला यशस्वी केल्याचे ग्यानदास यांनी सांगितले. यावेळी ग्यानदास यांनी अमित शाह यांच्यावरही स्तुतीसुमने उधळत अमित रुप प्रकटे असे गौरवोद्गार काढलेत. सोबतच आम्ही तुम्हाला फक्त नाशिकसाठी बोलावले होते. मात्र, तरीही तुम्ही वाटे पाडल्याचे सांगून शाहंच्या त्र्यंबकेश्वर जाण्यावर आक्षेप घेतला.

पर्यटन जिल्हा जाहीर करावा

नाशिक जिल्हा हा कायमस्वरूपी पर्यटन जिल्हा म्हणून राज्य सरकारने जाहीर करावा, अशी मागणी सहकार राज्यमंत्री दादा बुसे यांनी केली. धार्मिक पर्यटना इथे पूर्ण वाव आहे. येथील शेतकरही खुश होईल. यावेळी त्यांनी स्व. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींनाही उजाळा दिला.

देशात सौख्य व शांती नांदो

दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ प्रधान केंद्राचे प्रमुख गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी राज्यातील शेतकरी संकटात असल्याचे सांगितले. गंगामाई आणि साधू महंताच्या आशिर्वादामुळे परिस्थितीत बदल होईल असे सांगत, यानिमित्ताने वरुणराजाला साकडे घालण्याचे आवाहन करत, या कुंभमेळ्यामुळे देशाचे सौख्य, शांतता अबाधित राहो, अशा प्रार्थना केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधी राजकारण अन् शाब्दिक शालजोडे

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

साधुग्राम ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त व्यासपीठावर आलेल्या राजकीय नेते आणि संत महंतानीही राजकीय कोट्या करीत एकमेकांना चिमटे काढण्याची संधी सोडली नाही. माजी मंत्री छगन भुजबळ यांनी थेट मुख्यमंत्र्यांसह, अमित शहांनाही चिमटे काढत, सरकारची संकटे कमी होतील अशी कुरघोडी केली. मुख्यमंत्र्यांनी सभ्यतेने परीस्थिती हाताळत वाढीव निधी देण्याचे आश्वासन दिले. अमित शहांनी निधी मागणीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. तर महंत ग्यानदासांनी राजकीय पदाधिकाऱ्यांचे कौतुक करतांनाच शहांच्या त्र्यंबकेश्वर प्रेमावर आक्षेप घेतला.

प्रत्यक्षात राजकारणात शहकाटशह देणारे नेते आणि विविध संप्रदायांचे प्रमुख संत-महंत एकाच व्यासपीठावर आसनस्थ झाल्यानंतर या वक्त्यांकडून प्रसंगी राजकीय कोट्याही अपेक्षित होत्याच. भुजबळांनी सरकारला टोले लगावण्याची संधी सोडली नाही. केंद्राकडून सिंहस्थ निधीसाठी मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत. मात्र, मुख्यमंत्र्याचा आवाज कमी असल्याने तो पंतप्रधानापर्यत पोहचत नाही. त्यामुळे शहांनी जोर लावल्यास निधी मिळेल, अशी मुख्यमंत्र्यांवर कुरघोडी केली. राज्यात पावसाअभावी शेतकरी संकटात आहे. त्यामुळे पावसाची आवश्यकता आहे.

कुंभमेळ्यामुळे पाऊस लवकर सुरू होवो आणि राज्य सरकार सकट शेतकऱ्यांवरील संकट कमी होवो, असे सांगत सरकारला चिमटा काढला. तर मुख्यमंत्र्यांनीही निधीचा मोठा प्रश्न नसल्याचे सांगत, भुजबळांची हवा काढण्याचा प्रयत्न केला. कुंभमेळ्यातून सकारात्मक ऊर्जा निर्माण होवून राज्यावरील संकटे दूर होतील असा प्रतिटोला भुजबळांना लगावला. तर भुजबळांसह महापौरांच्या निधीच्या मागणीकडे अमित शहांनी दुर्लक्ष करत आपण छोटे नसल्याचे आपल्या कृतीतून दर्शवून दिले. महंत ग्यानदास महाराजांनाही सर्वच अधिकाऱ्यांचे कौतुक केले. नेते आणि महंताच्या या कोट्यांमुळे धार्मिक कार्यक्रमात काही वेळ हास्याचे फवारे उडाले.

त्र्यबंक भेटीवर आक्षेप

त्र्यंबकेश्वरमधील शैव आखाडे आणि नाशिकमधील वैष्णव आखाड्यांमधील वाद सर्वश्रुत आहे. या वादात केंद्र आणि राज्य सरकारही भरडले जात आहे. त्याचा अनुभव ध्वजारोहण सोहळ्यात आलेल्या अमित शाह यांनाही आला. आपण नाशिकसाठी आमंत्रण दिले असतांनाही शहांच्या त्र्यंबकभेटीवर ग्यानदास महाराजांनी शैलीत आक्षेप घेतला. अमित भाई चमत्कारी असल्याचे सांगून 'हमने अपने लिये आपको अकेले बुलाया था, लेकीन आपने उसमे भी आधा-आधा कर दिला' असे सांगत, शहांच्या त्र्यबंकभेटीवर आक्षेप घेतला. शहांनी त्र्यंबकेश्वरला जावू नये अशीच भूमिका त्यांनी मांडली. मात्र, शहांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.

पदाधिकाऱ्यांचे कौतुक

आतापर्यंत प्रशासनासह, राजकीय नेत्यांवर टीका टिप्पणी करणाऱ्या साधू-महंतानी ध्वजारोहण कार्यक्रमात मात्र राजकीय नेत्यांसह, सरकार, प्रशासनातील अधिकाऱ्यांवर स्तुतीसुमने उधळली. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमीत बग्गा, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यासह सर्वांचे साधू महंतासह मुख्यमंत्र्यांनी तोंडभरून कौतुक केले.

ठाकरे बंधू दूरच

सिहंस्थ कुंभमेळ्यासाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यात महापालिकेत सत्तेत असलेल्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही बोलावले होते. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप नेते आले तरी, या दोन्ही ठाकरे बंधूनी या कुंभमेळ्यापासून दूर राहणेच पसंद केले.

पालिकेचे नियोजन उत्तम

रामकुंडावर पुरोहित संघाच्या ध्वजारोहण सोहळ्या प्रसंगी झालेल्या मानापमान नाट्याचा धडा घेत, महापालिकेने साधुग्राममधील ध्वजारोहण सोहळ्याचे यशस्वी नियोजन करून तो वादाविना पार पाडला. राजकीय पदाधिकारी, नेते, साधू-महंताचा योग्य तो सन्मान ठेवत प्रत्येकाला सन्मान दिला. विशेष म्हणजे प्रमुख्यांच्या सत्कारातही सर्वपक्षीय नेत्यांना सामावून घेत, सभांवित वाद महापौरांनी टाळले. त्यामुळे वादाविना ध्वजारोहण पार पडल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली गेली.

ताम्रपत्र आलेच नाही

ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी उपस्थित साधू-महंतासह विविध व्हीव्हीआयपी हा कार्यक्रम कायम स्मरणात रहावा यासाठी महापालिकेतर्फे प्रत्येकाला ताम्रपत्र देण्यात येणार होते. यासाठी एका एजन्सीला सहा लाख २४ हजार रुपये देवून ४५ ताम्रपत्र तयार करण्याचे काम देण्यात आले होते. एका ताम्रपत्राची किंमत सुमारे १३ हजार रुपयांपर्यंत होती. मात्र, बुधवारी ध्वजारोहणाच्या ठिकाणी हे ताम्रपत्र पोहचलेच नाहीत. वादविवादामुळे हे ताम्रपत्र वेळेत तयार झालेच नाहीत. त्यामुळे कार्यक्रमाच्या वेळेपर्यंत तयार झाले नसल्याने महापालिका अधिकाऱ्यांची चांगलीच फसगत झाली. अखेर केवळ स्मृतीचिन्ह देवून उपस्थितांची बोळवण महापालिकेतर्फे करण्यात आली. त्यामुळे सव्वा लाख रुपये खर्चाचे काय, असा प्रश्न उपस्थित केले जात आहे.

सरकारचेही विघ्न हटो

कुंभमेळा जगातील सर्वात मोठा उत्सव असून नाशिकला त्याचे सौभाग्य लाभल्याचे सांगत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी यशस्वीतेचे श्रेय सर्वांनाच देण्याचा प्रयत्न केला. कुंभमेळ्याच्या निधीवरून केंद्रासह मुख्यमंत्र्यांवर टोलेबाजी करत, या कुंभमेळ्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसह राज्य सरकारचीही संकटे दूर होतील असा टोला लगावला. कुंभमेळ्यातील नकारात्मक बाबींकडे दुर्लक्ष करत, झालेल्या कामांचे श्रेय आणि अपयश सर्वांचेच असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आघाडी सरकारने अडीच हजार कोटींचा प्लॅन मंजूर केला असला तरी कुंभमेळ्या दहा हजार कोटी नाशिकमध्ये येणार आहे. त्यामुळे येणारा प्रत्येक भक्त आणि साधू महंत खुश होऊन नाशिकमधून परतला पाहिजे. कोणाला त्रास होणार नाही याची दक्षता सर्वांनीच घेतली पाहिजे, असेही भुजबळ यांनी सांगितले. पोलिसांनी भाविक आणि नाशिककरांशी नरमाईने वागावे. १५ किलोमीटरवरच भाविकांना रोखू नका, असे आवाहनही त्यांनी केले.

अमित शहांची पुण्यप्राप्ती

ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त नाशिकमध्ये आलेल्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष अमित शहा यांनी पुण्यप्राप्तीची संधी साधली. गुजरातचे गृहराज्यमंत्री असल्यापासून वेगवेगळ्या आरोपांमुळे घेरले गेलेल्या शहांनी मोदींच्या मदतीने राजकीय आरोपातून मुक्ती मिळवली असली तरी त्यांचे खऱ्या अर्थाने पापक्षालन झाले नव्हते. त्यामुळे बुधवारी त्यांनी आपल्या कुटुंबीयांसह रामकुंडावर गोदामाईची पूजा करीत तीर्थाचे आचमन केले. गोदामाईच्या स्नानाने पापमुक्ती होत असल्याचे त्यांना ध्वजारोहण सोहळ्यात सांगत, आपल्यावरील आरोपांचेही पापक्षालन करून घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

६० लाखांना बँकेची फसवणूक

0
0

नाशिक : बँकेकडून घेतलेल्या कर्जाऊ ६० लाख रुपयांची परतफेड न केल्याने तसेच बँकेने जप्त केलेल्या जंगम मालमत्तेची परस्पर विल्हेवाट लावल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी संबंधितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. २४ सप्टेंबर २००९ ते २८ जुलै २०१५ या कालावधीत दि. बिझनेस बँकेच्या मुख्य शाखेत हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

खेळते भांडवल म्हणून संबंधितांनी ६० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्याची मुदतीत परतफेड करण्यात आली नाही. त्यामुळे बँकेने जंगम मालमत्ता जप्त केली. मात्र बँकेची पूर्वपरवानगी न घेताच या मालमत्तेची विल्हेवाट न लावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या जागेवर मे. कंकारिया बिल्डिंग मटेरियल नावाने नवीन फर्म सुरू करण्यात आली. तसेच जागेवर बँकेचा बोझा असतानाही ते न फेडता सातबारा उताऱ्यावर नोंद न करता फर्म सुरू केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीवे मारण्याचा प्रयत्न; तिघांना पाच वर्षे शिक्षा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पूर्वी झालेल्या भांडणाची कुरापत काढून भंगार व्यावसायिकास जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने तिघांना प्रत्येकी पाच वर्षे सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा ठोठावली. सन २०११ मध्ये झालेल्या या हल्ल्यात स्वत:चा बचाव करताना व्यावसायिकाने गोळीबार केला होता. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता. महमंद याकूब चौधरी यांचे अंबड परिसरात भंगाराचा व्यवसाय आहे. चौधरी दुकानात बसले असताना सहा ते सात जणांचे टोळके तेथे आले. त्यात मुन्नावर हुसेन चौधरी (५१ रा. भद्रकाली), जन्नत हुसेन नूरअली शेख (२७, संजीवनगर, अंबड), अली हुसेन नूरअली शेख (३१) करम हुसेन नूरअली शेख (२२, दोघे रा. अंबडलिकं रोड), आकाश रामप्रकाश सिंग (२१), नूरअली सादीक शेख (४१), नीलेश एकनाथ जाधव (२१) यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल शॉप पंचवटीत फोडले

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंचवटी परिसरात मोबाइल शॉपी फोडून चोरट्यांनी तब्बल साडेपाच लाख रुपये किमतीचे मोबाइल चोरून नेले. मंगळवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पंचवटीतील राधानगरी परिसरात ड्रिम कॅस्टल या गाळ्यामध्ये हा प्रकार घडला. पंचवटी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. बंद दुकानाचे शटर बनावट चावीने उघडून सॅमसंग कंपनीचे ३४ मोबाइल चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यामुळे दुकानदार धास्तावले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचा कुलगुरूंना घेराव

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आरोग्य विद्यापीठाच्या माध्यमातून अलिकडे सुरू केलेल्या नर्सिंग विषयक अभ्यासक्रमाबाबत विद्यापीठाकडून चुकीची धोरणे राबविली जात आहेत. याचे प्रतिकूल परिणाम विद्यार्थ्यांना भोगावे लागत असल्याने त्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होते आहे. ही बाब लक्षात घेत आरोग्य विज्ञान विद्यापीठाने या अभ्यासक्रमाच्या हजारो विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अन्यथा राज्यभर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने देण्यात आला.

नर्सिंग अभ्यासक्रमाच्या बाबतीत नव्याने उभा राहिलेला प्रश्न या विद्यार्थ्यांनी मंगळवारी कुलगुरूंना घेराव घालत मांडला. याप्रश्नी माहिती घेऊन योग्य ती पावले उचलण्याचे आश्वासनही आंदोलनकर्त्यांना विद्यापीठाच्या वतीने देण्यात आले.

नर्सिंग विषयात बेसिक आणि इतर अभ्यासक्रम जाहीर करण्यात आले. सन २०१४-१५ या वर्षापासून या अभ्यासक्रमांच्या अंमलबजावणीला सुरुवातही करण्यात आली. मात्र पहिले सेमिस्टर पार पडताच परीक्षेचा पॅटर्नच विद्यापीठाने अचानक बदलल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. परीक्षा पध्दतीत बदल करताना विद्यार्थ्यांना विश्वासात घेण्यात आले नव्हते, असेही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. नवीन परीक्षा पध्दती लागू करण्यास विद्यार्थ्यांची हरकत नाही मात्र एकाच वर्षात राबविलेल्या दोन परीक्षा पध्दतींमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून, ते रोखण्यासाठी पुढील वर्षापासून नवा पॅटर्न राबविण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी अभाविप महानगर मंत्री कुणाल काबरा, जिल्हा संयोजक अमोल गायकवाड, मविप्र नर्सिंग, के.के.वाघ नर्सिंग, गोखले नर्सिंग, नाशिक नर्सिंग, नामको नर्सिंग, मातोश्री नर्सिंग, आडके नर्सिंग आदी संस्थांचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

.... तर भेटूही नका !

झाल्या प्रकाराबाबत दाद मागण्यासाठी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, नर्सिंगचे विद्यार्थी असाल तर भेटूही नका अशी भूमिका घेत कुलगुरूंनी या विद्यार्थ्यांना परतवल्याचे अभाविपचे म्हणणे आहे. यामुळे निराश झालेली मुले विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून कुलगुरूंना भेटले. पण अडचण मांडण्यासाठी गेल्यानंतर मिळालेल्या या नकारामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेचा पाणी अजेंडा!

0
0

विनोद पाटील, नाशिक

मुंबई, पुणे या शहरानंतर सध्या नाशिकचे नागरिकीकरण झपाट्याने होत असून, विकासाच्या वेगासोबतच लोकसंख्या वाढीचा वेग प्रचंड आहे. त्यामुळे नाशिकच्या लोकसंख्येने १८ लाखांचा टप्पा आताच ओलांडला असून, २०१४१ मध्ये नाशिकची लोकसंख्या ५१ लाख ७१ हजारापर्यंत पोहचणार आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्याचे मोठे आव्हान महापालिकेसमोर आहे. महापालिकेने या वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्याचे स्मार्ट नियोजन अगोदरच केले असून, त्यासाठी जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्रूथ्थान योजनेतील निधीच्या माध्यमातून या योजना पूर्णत्वास नेल्या जात आहे. सन २०४१ मध्ये शहराला १०९६ एमएलडी पाण्याची रोजची मागणी असणार असल्याने पाणीपुरवठ्यासाठी मुकणे आणि किकवी धरणातून पाणी आणण्याचे स्मार्ट पावले उचलले जात आहेत. हे दोन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यास नाशिकचा २०५० पर्यंतचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न निकाली निघणार आहे.

नाशिक शहराची सध्याची लोकसंख्या १८ लाखाच्या आसपास आहे. दरवर्षी यात एक लाखाची भर पडत आहे. सद्यस्थितीत शहराला दररोज ३९८ ते ४०५ एमएलडीपर्यंत पाण्याचा पुरवठा केला जात आहे. गंगापूर, गौतमी, कश्यपी, दारणा या धरणांमधून पाणीपुरवठा केला जात आहे. त्यासाठी पाच ठिकाणी वितरण आणि जलशुद्धीकरणाच्या व्यवस्था तयार करण्यात आल्या आहेत. नाशिक शहराच्या २५९ चौरस किमी क्षेत्रफळामध्ये व सुमारे १८ लाख लोकसंख्येसाठी ५ जलशुध्दीकरण केंद्रे, ९० जलकुंभाद्वारे व सुमारे १८५५ किमी पा‌इपला‌ईनद्वारे दैनंदिन सुमारे सरासरी ४०० एमएलडी प्रतिदिन पाणीपुरवठा करण्यात येतो. सद्यस्थितीत नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा असल्याने त्यात सध्या ७२ एमएलडी पाणीपुरवठ्याची वाढ करण्यात आली आहे. नाशिक शहरामध्ये सद्यस्थितीत एकूण एक लाख ९२ हजार नळ्जोडण्या असून, प्रत्येक नळजोडणाला मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे ९८ टक्के नळजोडणी मीटरसह असून, १०० टक्के मीटर पध्दत नजिकच्या भविष्यात पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

शहरातील नवीन नाशिक, पंचवटी, सातपूर, मध्य नाशिक, पूर्व नाशिक आणि नाशिकरोड अशा सहा विभागांमध्ये दररोज नियमीत पाणीपुरवठा केला जातो. काही भागात दोन वेळा, तर काही भागात एकवेळ पाणीपुरवठा केला जात असून, प्रतिमानसी पाण्याचा पुरवठा हा १३५ लिटर गृहीत धरण्यात येवून हा पाणीपुरवठा केला जात आहे. शहरात सध्या करण्यात येत असलेल्या पाणीपुरवठा हा सरासरी १३५ लिटर प्रती व्यक्‍ती / दिन याप्रमाणे करण्यात येत आहे.

नाशिक शहराची वाढती लोकसंख्या व त्यानुसार आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निमाण अभियानांतर्गत देशातील ६३ शहरांमध्ये नाशिक शहराचा समावेश असून, त्यात विविध पाणीपुरवठ्याच्या योजना व नियोजन हाती घेण्यात आले आहे. या अभियानांतर्गत इतर अनेक प्रकल्पांपैकी नाशिक शहराच्या भविष्यातील पाण्याचे मागणीचा विचार करून सविस्तर प्रकल्प अहवाल केंद्र शासनास सादर करावयाचा आहे.

मुकणे आणि किकवी धरण

नाशिक महापालिकेतर्फे सद्यस्थितीत गंगापूर, कश्यपी, गौतमी, दारणा या धरणातून पाणी उचलले जात असले तरी भविष्यात पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी मुकणे आणि किकवी धरणातून योजना राबविण्याचे नियोजन आहे. मुकणे धरणातून थेट पाइपलाइनद्वारे पाणी आणण्याचे नियोजन असून, त्यासाठी २७० कोटी रुपये खर्चून थेट १८ किलोमीटर लांबीवरून पाइपलाइनद्वारे पाणी आणले जाणार आहे. केंद्र, राज्य सरकारच्या मदतीने ही योजना पूर्ण केली जाणार आहे. त्यातून महापालिकेला दररोज ४०० एमएलडी पाणी मिळणार आहे. मात्र, सद्यस्थितीत हा प्रकल्प वादात सापडला आहे. तर प्रस्तावित किकवी धरणातूनही अडीच हजार दशलक्ष पाणीपुरवठा होणार आहे. मध्यम स्वरूपाच्या या धरणाची साठवण क्षमता सुमारे २५१३ दशलक्ष घनफूट असून, त्यामुळे २०४१ पर्यंत शहराच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

वितरणातील त्रुटी

शहरात दररोज पाणीपुरवठा होत असला तरी वितरणातील त्रुटींमुळे सिडको, सातपूर, नाशिकरोड, पंचवटी या भागांमध्ये पाणीपुरवठ्याच्या असंख्य तक्रारी आहेत. असमतोल पाणी वितरणावरून अनेकदा भडकाही उडाला असून, जुन्या पाइपलाउनमुळे गळती मोठ्या प्रमाणावर होत आहे. विशेषतः सिडको आणि जुन्या नाशिक परिसरात आणि नव्याने विकसित होणाऱ्या भागांपर्यत पाणी पोहचत नसल्याने अनेकदा वादाच्या ठिणग्या पडल्या आहेत. नागरिकांना पाण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. पाणी वितरणात अनेक त्रुटी असल्याने हा सारा गोंधळ उभा राहिला असून स्मार्ट सिटीच्या माध्यमातून तो दूर होईल, असा विश्वास नागरिकांना वाटतो आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी पालिकेची ‘स्मार्ट’ पावले

0
0

विनोद पाटील, नाशिक

सुवर्ण त्रिकोणातील नाशिकचे चहुबाजूने झपाट्याने नागरिकीकरण होत आहे. दरवर्षी नाशिकच्या लोकसंख्येत एक ते दीड लाख लोकसंख्येची भर पडत असून, या वाढत्या लोकसंख्येसाठी पायाभूत सोयी सुविधांची पूर्ती करण्याचे मोठे आव्हान महापालिकेसमोर आहे. सद्यस्थितीत १८ लाख लोकसंख्या असली, तरी २०४१ पर्यंत नाशिकची लोकसंख्या ५२ लाखांपर्यत पोहचणार आहे. त्यामुळे या वाढीव लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्याचे आव्हान असून, त्यासाठीचे स्मार्ट नियोजन पालिकेने पूर्ण केले आहे. पुढील पंचवीस वर्षात शहराला लागणाऱ्या अकराशे एमएलडी पाण्याची गरज लागणार असून, त्यादृष्टीने विविध धरणांचे पाणी आरक्षण आणि ते पाणी नागरिकांपर्यत पोहचवण्याच्या कार्यवाहीला सुरूवात केली आहे.

सद्यस्थितीतील ४०५ एमएलडी पाण्याची गरज ही गंगापूर, दारणा, काश्यपी आणि गौतमी धरणातून भागवली जात आहे. तर वाढीव पाण्यासाठी २७० कोटीची मुकणे धरण पाईपलाइन योजना, स्वतःच्या मालकीचे किकवी धरणाची बांधनी असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प महापालिकेने हाती घेतले आहे. त्यामुळे उर्वर‌ति ७०० एमएलडी पाणी या दोन धरणांतून उचलले जाणार आहे. त्यामुळे नागरी पाणीपुरवठ्यासोबतच औद्योगिक व व्यावसायिक पाणी वापराची गरजही पूर्ण केली जाणार आहे. ९१ जलकुंभासोबतच नवे जलकुंभ उभारणे, वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासह पाणी बचतीवर जनजागृती, पाण्याचे ऑडिट व शहरांंतर्गत नवीन पाईपलाइनचे जाळे विस्तारण्याचीही तयारी महापालिकेने सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यावरील इडापिडा टळो

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थातून निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जेतून राज्यावरील संकटे दूर होतील, अशी आस व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंहस्थासाठी आवश्यकता भासल्यास वाढीव निधी देण्याचे आश्वासन दिले.

साधुग्राममधील जगदगुरू रामानंदाचार्य प्रवेशद्वाराचे उदघाटन झाल्यानंतर झालेल्या जाहीर कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी नाशिककरांना निधी संदर्भात आश्वस्त केले. या कार्यक्रमाला अमित शाह यांच्यासह, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील, महंत ग्यानदास महाराज, जगदगुरू हंसदेवाचार्य, नाणीज पिठाचे जगदगुरू शंकराचार्य, जगदगुरू वल्लभाचार्य यांच्यासह पदाधिकारी व साधूमहंत उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले,'सिंहस्थ कुंभमेळ्यात आलेल्या साधूमहंताची सेवा करण्याचा आनंद आम्हाला मिळाला. यातून निर्माण होणाऱ्या सकारात्मक ऊर्जेतून राज्यातील संकटे दूर होतील. कुंभमेळ्यासाठी सरकार आणि प्रशासनाने आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यात काही त्रुटी राहिल्या तर साधूमहंतानी आम्हाला माफ करावे. कुंभमेळा हा निर्विघ्नपद्धतीने पार पडेल याचे सर्व श्रेय प्रशासनासोबतच साधूमहंतानाही आहे. नाशिककरांनी थोडासा त्रास सहन करावा, असे आवाहनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.

कुंभमेळा मॅनेजमेंटचे उत्तम उदाहरण

कुंभमेळ्याची परंपरा ही शेकडो वर्षापासून सुरू असून, यासाठी कोणाच्या निमंत्रणाची गरज पडत नसल्याने हा सोहळा आगळावेगळा ठरत असल्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी सांगीतले. कोणत्याही प्रयत्नांशिवाय लाखो लोकांचा सहभाग हे मॅनेजमेंटचे उत्तम उदाहरण असल्याचे प्रशस्ती पत्र देत, यावर विद्यार्थ्यांनी संशोधन करायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले. अमृतबिंदूंनी पवित्र अशा गोदावरीत भाविक पापमुक्तीनंतर स्वत: धर्माला समर्पीत करत असल्याचे कार्य होते. याचे भाग्य आपल्यालाही मिळाल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. देश धर्माच्या मार्गावर यापुढे मार्गक्रमण करीत राहील, असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरीही ‘सरल’ अर्धवटच

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यभरातील सर्व शाळांची माहिती एकत्रित गठीत करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाद्वारे विकसित केलेल्या 'सरल प्रणाली'ची अंतिम तारिख उलटली तरी नाशिकमध्ये प्रक्रिया अर्धवटच असल्याचे समोर आले आहे.

शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी अशी शाळांसंदर्भात असलेली सर्व माहिती एकत्रित करण्याच्या व शोधण्यास सोपे जावे, या उद्देशाने राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने सरल प्रणाली विकसित करण्यात आली आहे. शैक्षणिक व प्रशासकीय नियोजनासाठी आवश्यक असलेली विभिन्न स्वरुपाची सांख्यिकीय माहिती केव्हाही मिळविण्यास ही प्रणाली अतिशय लाभदायक ठरणार आहे. मात्र, ही सर्व माहिती अपडेट करताना येत असलेल्या अडचणींमुळे ही प्रक्रिया अद्यापही अर्धवटच असल्याचे चित्र आहे.

सरल प्रणालीवर १५ ऑगस्टपर्यंत ही सर्व माहिती अपडेट करणे शाळांना अनिवार्य होते. मात्र, त्या तारखेपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही. म्हणून शिक्षण विभागाच्या वतीने १५ ऑगस्टला २४ तासांची मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु, ही मुदतदेखील उलटून गेली तरी काही शाळांचे कामकाज अद्यापही कासवगतीनेच सुरू आहे. याबाबत शाळांना विचारले असता प्रणालीतील चुका, अद्ययावत केलेली माहिती करप्ट होणे, सर्व्हर डाऊन असणे, इंटरनेटची सुविधा शाळेत उपलब्ध नसल्याने प्रक्रिया पूर्ण करता आली नसल्याचे सांगण्यात येत आहे. तर अशा शाळांवर शिक्षण विभागाचा कोणतेही पत्र पाठवले गेले नसल्याने माहिती अपडेट करण्यास शाळा गतिशील नसल्याचे दिसत आहे.

दिवसभर सर्व्हर डाऊनमुळे अडचण

सर्व्हर डाऊनची अडचण सातत्याने समोर येत असल्याने एका दिवसात केवळ ५ ते ६ मुलांचीच माहिती अपडेट होऊ शकत आहे. त्यामुळे भविष्यातील वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी वर्तमानकाळात वेळेचा अपव्यय केला जात आहे. या प्रणालीत माहिती अपडेट करण्यासाठी शिक्षक व्यग्र असल्याने विद्यार्थ्यांच्या तासिकांवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परदेशी वाइनची भारतात विक्री वाढणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाइन उद्योगात मोठी क्षमता असली तरी त्याचा विकास योग्य पद्धतीने विकास झालेला नाही. त्यातच आता भारतीय द्राक्ष प्रक्रिया मंडळ बंद झाल्याने देशांतर्गत वाइनचे उत्पादन कमी होऊन परदेशी वाइनची भारतात विक्री वाढणार असल्याची भीती वाइन उत्पादकांकडून व्यक्त केली जात आहे.

सद्यस्थितीत भारतामध्ये एकूण १२० वायनरी आहेत. यातील निम्म्याहून अधिक वायनरी महाराष्ट्रात आहेत. वाइन उद्योगात अफाट क्षमता असूनही त्याकडे योग्य प्रमाणात लक्ष देण्यात आलेले नाही. सरकारी पातळीवरील अनास्थेपोटी वायनरीसारखा सक्षम शेतीपूरक व्यवसाय शेतकऱ्यांना लाभू शकलेला नाही, याची मोठी खंत द्राक्ष उत्पादक आणि वाइन उत्पादकांना आहे. द्राक्ष प्रक्रिया मंडळाच्या माध्यमातून सरकार, प्रशासन आणि उत्पादक यांच्यातील दुवा म्हणून मंडळाचे काम असणे आवश्यक आहे.

सध्या देशात २८ लाख केसेसची विक्री भारतीय बाजारात होते. (१२ बॉटल म्हणजे एक केस). यात परदेशी वाइनचा वाटा जवळपास ५ लाख केसेस विक्री होतात. देशांतर्गत वाइनचे उत्पादन वाढले नाही तर परदेशी वाइन मोठ्या प्रमाणात भारतीय बाजारात येईल, याचा मोठा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. शिवाय स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण करण्याच्या दृष्टीनेही या उद्योगाकडे पाहणे आवश्यक आहे.

कर्नाटक सरकारने राज्यासाठीचे मंडळ स्थापन करुन येथील वाइन उद्योगाला मोठी चालना दिली आहे. अत्यंत सक्षम पद्धतीने हे मंडळ कार्यन्वित असून, गेल्या काही वर्षात तेथील वाइनचे उत्पादन वाढतानाच त्याचा मोठा लाभ शेतकऱ्यांना होऊ लागला आहे. कंत्राटी पद्धतीच्या वाइन द्राक्षाची शेती तेथे होत आहे. छोटेखानी वायनरी सुरु करुन काही शेतकऱ्यांनी तेथे सक्षम पर्याय उभा केल्याचे वाइन उत्पादकांकडून सांगितले जात आहे. याच पद्धतीने केंद्रात आणि राज्यात द्राक्ष प्रक्रिया मंडळ कार्यन्वित करुन शेती आणि शेतीपूरक उद्योगाला वाव द्यायला हवा, असे मत व्यक्त केले जात आहे.

द्राक्ष प्रक्रिया मंडळ हे केंद्र आणि राज्य दोन्ही स्तरावर हवे. मंडळाच्या माध्यमातून द्राक्ष प्रक्रिया उद्योगाचा विकास शक्य आहे. तसे नियोजन करुन या उद्योगाला बळ द्यायला हवे.

- शिवाजी आहेर, अध्यक्ष, ऑल इंडिया वाइन प्रोड्युसर्स असो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतीच्या रक्षणासाठी अंगावर घेतला वार

0
0

महिलेच्या धाडसामुळे चोरटा जेरबंद

म. टा. प्रतिनिधी, सिडको/सातपूर

सशस्त्र घरफोड्यांनी घरात कोणीच नसल्याची संधी साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऐनवेळी घरातील माणसे परतल्याने त्यांचा डाव फसला. पळ काढण्याच्या नादात घरफोड्यांनी शस्‍त्राचाही वापर केला. मात्र, जीवाची परवा न करता तसेच पतीचे रक्षण करीत त्या महिलेने वार अंगावर झेलत चोरट्याला पकडून ठेवले. तिघे फरार झाले मात्र एक जण हाती लागला. या महिलेच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सातपूर भागातील मौल हॉलच्या बाजूला असलेल्या संदीपनगर भागात सराईत गुन्हेगारांनी रात्री दहा वाजेच्या सुमारास दरोडा टाकला. गजानन कृपा या डॉ. सुदाम चौधरी यांच्या बंगल्याचे गेट व दरवाज्याचे कुलूप व कडी कोयंडा तोडत गुन्हेगारांनी घरात प्रवेश केला. याचवेळी मंदिरात गेलेले डॉ. सुदाम चौधरी यांचे कुटुंब परतल्याने चोरट्यांचा गोंधळ उडाला. घराचा दरवाजा उघडा कसा हे पाहण्यासाठी डॉ. चौधरी गेले असता चार संशयित गुन्हेगारांनी त्यांच्यावर हल्ला केला. डॉ. चौधरी यांची पत्नी सुलभा यांनी एका गुन्हेगारास एका हाताने जोर लावत पकडून ठेवले. परंतु, दुसऱ्या एकाने धारधार शस्त्राने डॉ. चौधरी यांच्यावर वार करण्याचा प्रयत्‍न केला. यावेळी सुलभा चौधरी यांनी हात आडवा करीत वार स्वतःच्या डाव्या हातावर घेतला. झटापटीनंतर तिघे चोरटे पळून गेले मात्र, एका जणाला पकडण्यात यश आले. शेजा-यांनी धाव घेत चोरट्याला पकडून ठेवले. यानंतर पोलिसांना या घटनेबद्दल कळविण्यात आले.

वरिष्ठ पोलिस निरिक्षक मनोज करंजे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. दरोड्यात सोन्याच्या वस्तू व रोख २७ हजार रुपये गुन्हेगारांनी लांबविले. विकास जाधव हा संशयित पोलिसांच्या ताब्यात लागला असून, उर्वरीत तिघे भटू दंडगव्हाळ, शरद पाटील व अक्षय भारती यांचा पोलिस शोध घेत आहेत. शेजारील रहिवाशांनी पकडून ठेवलेल्या जाधव यास पोलिसांच्या हवाली केले. फरार तिघांचा शोध पोलिस लावणार कधी असा, सवाल आता सातपूरकर उपस्थित करीत आहेत. जाधव याला २१ ऑगस्टपर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ध्वजारोहणाने सिंहस्थारंभ

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ध्वजारोहणाची वेळ जसजशी जवळ येऊ लागली तसतसा साधुग्राममधील वातावरणात आनंद, जल्लोष वाढू लागला. पौराहित्य करणाऱ्या गुरूजींच्या मंत्रस्वरांनी संपूर्ण परिसर भारून गेला होता. पुण्याहवाचनाच्या मंत्र ऋचांनी गुंजणारा स्वर आणि वेदमंत्रांच्या या उच्चारात पार पडणारी तिन्ही आखाड्यांची पूजा यामुळे माहोल भक्तीमय झाला होता. आठ वाजून दहा मिनिटे झाली. यावेळी सूर्याचा सिंह राशीत प्रवेश होत असताना दिगंबर, निर्वाणी व निर्मोही आखाड्याच्या ध्वजांचे रोहण झाले.

सकाळी सात वाजेपासून ध्वज पूजेला सुरूवात झाली. महंत कृष्णदास महाराज व रामकिशोरदास महाराज यांच्या हस्ते दिगंबर आखाड्याच्या ध्वजाची, महंत धर्मादास महाराज यांच्या हस्ते निर्वाणी आखाड्याच्या ध्वजाची तर महंत राजेंद्रदास महाराज यांच्या हस्ते निर्मोही आखाड्याच्या ध्वजाची पूजा पार पडली. त्यानंतर ध्वजारोहणासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, पालकमंत्री गिरिश महाजन, महंत ग्यानदास महाराज, महापौर अशोक मुर्तडक, खासदार हेमंत गोडसे, माजी पालकमंत्री छगन भुजबळ, स्थाय‌ी समिती अध्यक्ष शिवाजी चुंभळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

त्र्यंबकमध्ये गोळीबार

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर ये‌थे आवाहन आखाड्यात ध्वजारोहण झाल्यानंतर सुरक्षारक्षकाने बंदुकीतून हवेत जवळपास पाच ते सहा वेळा गोळीबार केला. यासाठी परवानगी घेतली होती का?, याची माहिती घेण्यासाठी पोलिसांची धावपळ उडाली. दरम्यान, या सुरक्षारक्षकाने आपणास येथील साधूने सांगितले म्हणून गोळीबार केला, असे स्पष्टीकरण ‌दिले आहे. दरम्यान, ध्वजाला फायरिंगने सलामी दिली, अशी चर्चा होती. मात्र, या घटनमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी निलपर्वत येथे जाऊन महामंत्री हरिगिरी महाराज यांच्याशी चर्चा केली. याच भेटीत त्यांनी येथे स्थापन होत असलेल्या निलकंठ महादेवाचा १०८ फूट उंच त्रिशुलाचे पूजन केले. या प्रसंगी पालकमंत्री गिरीश महाजन आणि आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्रगिरी महाराज उपस्थित होते. शहा यांनी सर्व आखाड्यांचे साधू-महंत आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

पोलिसही गर्दीला कंटाळले

अत्यंत उत्साहाच्या वातावरणात नाशिककरांनी या ध्वजारोहण सोहळ्यासाठी हजेरी लावली होती. मोबाइलमध्ये सर्वच दृश्य टिपण्याचा त्यांची उत्सुकता वाखाणण्यासारखी होती. भाविकांच्या झुंडीच्या झुंडी साधुग्रामच्या दिशेने येत होत्या. त्यांना थोपवून सुरक्षितपणे नेण्यासाठी पोलिसांनी जागोजागी बॅरिकेडस ठेवलेले होते. नागरिकांच्या सुरक्षेची पूर्णपणे काळजी घेण्यात आली होती. तिन्ही आखाड्याच्या प्रवेशद्वाराजवळ मेटल डिटेक्टर लावण्यात आलेले होते. जाताना प्रत्येकाची अत्यंत कडक तपासणी केलेले पोलिस मात्र नंतर गर्दीला कंटाळून त्यांना न तपासताच आत सोडत होते. त्यामुळे मेटल डिटेक्टर केवळ शोभेपुरतेच राहिले होते. पोलिसांनी नागरिकांची गर्दी थोपविण्यासाठी मोठ्या दोरखंडाचा वापर केला. परंतु ध्वजारोहण झाल्यानंतर मुख्य कार्यक्रमाला जाण्यासाठी गर्दीचा महापूर उसळला त्यात पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेचा फज्जा उडाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज रंगणार श्रावणक्वीन

0
0

>> नाशिक टाइम्स टीम

गेल्या काही दिवसांपासून तरुणींच्या चर्चेचा विषय बनलेला 'वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत' 'मटा श्रावणक्वीन २०१५' एलिमिनेशन राऊंड आज (२१ ऑगस्ट) मुंबई-आग्रारोडवरील 'हॉटेल म्यूस ज्युपीटर' येथे रंगणार आहे. 'ऱ्हिदम म्युझिक' याचे म्युझिक पार्टनर आहेत. टॅलेंटला वाव देणाऱ्या श्रावणक्वीनसाठी नाशिकमधून तरुणींचा भरघोस प्रतिसाद लाभला. यामध्ये वाचकांची मते आणि तज्ज्ञांच्या सहाय्याने एलिमिनेशन राऊंडसाठी तरुणींची निवड करण्यात आली आहे.

गेल्या चार वर्षात श्रावणक्वीनने नाशिकमधील तरुणींच्या टॅलेंटला उत्तम व्यासपीठ मिळवून दिले आहे. श्रावणक्वीनच्या माध्यमातून आज या तरुणी मॉडेलिंग, अभिनय, फॅशन या क्षेत्रात झळकताना दिसतात. मुंबईमध्ये होणाऱ्या ग्रुमिंग सेशन आणि फायनल राऊंडसाठी आज अशाच चार तरुणींची निवड नाशिकमधून करण्यात येणार आहे. यामध्ये परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. नावनोंदणी केलेल्यांनाचा यावेळी प्रवेश दिला जाणार असून यासाठीची नोंदणी प्रक्रिया संपली आहे. कार्यक्रमस्थळी नावनोंदणी केली जाणार नाही.

सहभागींसाठी सूचना

सकाळी अकरा वाजता कार्यक्रमाची सुरुवात होणार असून सहभागींनी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटे कार्यक्रमस्थळी पोहोचणे अनिवार्य आहे. यावेळी सहभागींना रॅम्पवॉक करायचा असून त्याचबरोबर सादरीकरणही करायचे आहे. यासाठी प्रत्येकीला तीन मिनिटांचा अवधी दिला जाईल.

यासाठीची सर्व तयारी घरूनच करून यायची असून कार्यक्रमस्थळी तयारीची सोय उपलब्ध करून दिली जाणार नाही. तसेच तुम्ही सादर करीत असलेल्या गाण्याची सीडी सोबत आणणे आवश्यक आहे. चला तर मग 'मटा'ने उपलब्ध करुन दिलेल्या या व्यासपीठावर तुमच्यामध्ये असलेलं टॅलेंट दाखवा आणि बना श्रावणक्वीन.

कार्यक्रमाचे ठिकाण

मॉन्टेरीअल हॉल, हॉटेल म्यूस ज्युपीटर, पाथर्डी फाटा,
मुंबई-आग्रा हायवे, नाशिक,
वेळ : सकाळी ११ वाजता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुंभदर्पण फोटो स्पर्धेचे आयोजन

0
0

नाशिक टाइम्स टीम

इंडियन इन्स्टिट्युट्स ऑफ आर्किटेक्ट्सच्या नाशिक सेंटरमार्फत फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. व्यावसायिक आणि हौशी अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा होणार असून १९ ते ३० ऑगस्ट असा या स्पर्धेचा कालावधी असणार आहे.

ही केवळ फोटो स्पर्धा नसून या माध्यमातून कुंभमेळ्याचा एक मोठा दस्तऐवज निर्माण होणार असल्याची माहिती अध्यक्ष प्रदीप काळे यांनी दिली. शहर व राज्यातील नामवंत फोटोग्राफर्स यासाठी परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. तसेच या स्पर्धेत प्राथमिक फेरीत निवड झालेल्या फोटोंचे तीन दिवसिय प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. तसेच या फोटोंची सीडीदेखील प्रकाशित केली जाणार आहे. एका मोठ्या समारंभामध्ये स्पर्धेचे पारितोषिक वितरण होणार असून वेगवेगळ्या विभागात अकरा हजार रुपयांपर्यंतची बक्षिसे ठेवण्यात आल्याची माहिती उपाध्यक्ष रसिक बोथरा यांनी दिली. स्पर्धेच्या प्रवेशिकांचे वितरण १ ते १५ ऑक्टोबरदरम्यान होणार असून प्रवेशिका जमा करण्याची मुदत ३० ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. स्पर्धेची नियमावली तसेच प्रवेशिका इंडियन इन्स्टिट्युट्स ऑफ आर्किटेक्ट्सच्या नाशिक सेंटरमध्ये उपलब्ध असणार आहे. जास्तीत जास्त हौशी व व्यावसायिक फोटोग्राफर्सनी यामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रपतींना कॉलेजियन्सचे साकडे

0
0

नाशिक टाइम्स टीम

अंधश्रद्धेविरुद्ध काम करताना आपले आयुष्य खर्ची घालणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांची हत्त्या काही समाजकंटकांकडून करण्यात आली. या दोन्ही घटनांमधील गुन्हेगारांना अद्यापही सरकार पकडू शकलेले नाही. त्यामुळे सरकारला जाब विचारण्यासाठी एचपीटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांमार्फत पत्रलेखन मोहीम राबविण्यात आली. ही पत्रे थेट राष्ट्रपतींना पाठविली जाणार आहेत.

दोन वर्षे उलटूनदेखील डॉ. दभोलकरांच्या मारेकऱ्यांना गजाआड करण्यात सरकारला यश आलेले नाही. त्यामुळेच कॉलेजमधील जवळपास ३५० विद्यार्थ्यांनी या मोहिमेत सहभाग घेत पत्रलेखन केले. 'भारतातील समाजसुधारकांची हत्या करणाऱ्या या नराधमांना पकडून फाशी दिली जावी. मा. राष्ट्रपती महोदय याची दखल घेत पाठपुरावा करतील अशी इच्छा व्यक्त करुन न्याय मिळेल अशी आशा आम्ही बाळगतो', असा उल्लेख या पत्रांमध्ये करण्यात आला आहे. हे पत्र पोस्टाने राष्ट्रपती भवनात पाठवले जाणार असून याचा पाठपुरवठा करण्याची जबाबदारी कॉलेजच्या जीएसची आहे.

एचपीटी कॉलेजमधील विवेक वाहिनी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी ही मोहिम गुरुवारी राबवली. सर्व कॉलेजियन्सनी स्वेच्छेने राष्ट्रपती महोदयांना पत्र लिहिले. विवेक वाहिनी ही संस्था अंनिस अंतर्गत कॉलेजमध्ये कार्यरत असून प्रा. हरिष खैरनार, प्रा. डॉ. गिरी हे तसेच दिपक चौधरी, विशाल गोराने, निखिल गुरव हे या संस्थेचे कॉलेज स्तरावरील प्रमुख कार्यकर्ते आहेत. या मोहिमेस कॉलेजचे विद्यार्थी प्रतिनिधी सुरेश नखाते, पुष्कर तिवारी, ऐश्वर्या गुजराथी, भक्ती आठवले, नेहा तावडे यांचे सहकार्य मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवला बाजार समितीवर उषा शिंदे

0
0

उपसभापतीपदी गणपत कांदळकर यांना संधी

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी उषा माणिकराव शिंदे तर उपसभापतीपदी गणपत ठकाजी कांदळकर यांची बिनविरोध निवड झाली. राज्याचे माजी मंत्री तथा आमदार छगन भुजबळ यांनी शिंदे व कांदळकर यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवतांना या दोघांचेच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीवर बाजार समिती संचालकांच्या गुरुवारी सकाळी झालेल्या विशेष सभेत शिक्कामोर्तब झाले.

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील महिन्यात झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत राज्याचे माजी मंत्री तथा येवल्याचे आमदार छगन भुजबळ प्रणित 'प्रगती' पॅनल'ने बाजार समितीच्या १८ पैकी १२ जागा जिंकत बहुमत प्राप्त केले होते. बहुमत प्राप्त केलेल्या याच गटाचे संचालक सभापती व उपसभापतीपदी विराजमान होणार हे स्पष्ट होते तरीही आमदार भुजबळ सभापती व उपसभापती पदासाठी कुणाच्या नावाला 'ग्रिन सिग्नल' देतात याबद्दल तालुक्यातील राजकीय धुरीणांसह संचालकांनाही मोठी उत्सुकता होती. येवला शहरातील भुजबळ संपर्क कार्यालयातील सभागृह कक्षात गुरुवारी सकाळी बाजार समितील बहुमतातील १२ संचालक एकत्र जमल्यावर मुंबईत असलेल्या आमदार भुजबळ यांनी भ्रमणध्वनीवरून या संचालकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सभापतीपदासाठी उषा शिंदे तर उपसभापतीपदासाठी गणपत कांदळकर यांच्या नावाला संमती दिली. त्यानंतर सभापतीपदासाठी शिंदे याचा संजय बनकर हे सूचक तर मोहन शेलार हे अनुमोदक असलेला अर्ज दाखल झाला. उपसभापतीपदासाठी कांदळकर यांचा अर्ज दाखल होतांना त्यांना कृष्णराव गुंड हे सूचक तर नवनाथ काळे हे अनुमोदक होते. सकाळी ११ वाजता बाजार समितीच्या सभागृहात निवडणुक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समिती संचालकांची विशेष सभा झाली.

सभापती व उपसभापती पदाची निवड बिनविरोध होताच बाजार समिती आवारात जमलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शिंदे समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली. नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींचा भुजबळ यांचे स्विय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, अंबादास बनकर, माजी सभापती सुभाष निकम, मावळते सभापती शिवाजी वडाळकर, दामोदर पवार, माजी नगराध्यक्ष निलेश पटेल,नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे आदींनी सत्कार केला.



उषा शिंदेंना दुसऱ्यांदा सभापतीपद

येवला तालुक्याच्या राजकीय पटलावरील एक मात्तबर नेते तथा जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष माणिकराव शिंदे यांच्या पत्नी असलेल्या उषा शिंदे यांनी या अगोदर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकपद, येवल्याचे नगराध्यक्षपद भूषविलेले होते. महाराष्ट्र कापूस पणन महामंडळ (नागपुर) च्या विद्यमान संचालिका तसेच येवला पालिकेच्या विद्यमान नगरसेविका असलेल्या सौ. शिंदे यांनी सन २००३ ते २००८ या कालावधीत येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपद भूषवितांना बाजार समितीच्या विकासाला गती दिली होती. बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सोसायटी महिला राखीव जागेवर विजय संपादन करत त्यांनी बाजार समितीत संचालक म्हणुन सलग चौथ्यांदा पोहचण्याची किमया केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images