सिंहस्थ कुंभमेळ्यातील साधू-महंत आणि आखाड्यांमध्ये विविध कारणांवरून सुरू असलेला वादविवाद हा त्यांचा अतर्गंत प्रश्न असल्याचे सागूंन पालकमंत्री गिरीश महाजन यांना या वादापासून दूर राहणेच पसंत केले. तसेच आखाडा परिषदेचा अध्यक्ष ठरवणे ही सरकारची जबाबदारी नसून तो, आखाड्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याचे स्पष्ट करून या वादावर मौन पाळणेच पसंत केले. साधू-महंतांच्या भेटीमागे भुजबळांचे कोणतेही राजकारण नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
माजी मंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी अचानक नाशिक व त्र्यंबकेश्वरमधील नाराज साधू महंतांची भेट घेतली. त्यामुळे पालकमंत्र्यांनी सोमवारी नाशिक गाठत साधू-महंतांची चाचपणी करत, त्यांचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पत्रकारांशी बोलतांना महाजन यांनी कुंभमेळ्यासाठी आवश्यक तयारी सरकारने पूर्ण केली आहे. साधू-महंताच्या अपेक्षा पूर्ण केल्या असल्याचा दावा त्यांनी केला. तर साधू-महंत आणि आखाड्यांमध्ये रंगलेल्या वादावर अधिक भाष्य करण्यात त्यांनी नकार दिला. साधू-महंतांचा वादविवाद हा त्यांचा अतंर्गत प्रश्न आहे. त्याचा सरकारशी काहीच संबंध नाही. सोबतच आखाडा परिषदेचा अध्यक्ष कोण असावा हे सरकार ठरवित नसून ती सरकारची जबाबदारी नाही. कोणते पद कोणाला द्यावे हा आखाड्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे आमच्यासाठी सर्वच जण प्रतिष्ठेचे असल्याचे सांगत अधिक बोलायचे टाळले. महापालिकेत मनसेची सत्ता असल्याने आखाड्यांचे ध्वजारोहण सोहळा पार पडण्याची जबाबदारीही त्यांचीच असल्याचे सांगून यात राजकारण नसल्याचे त्यांनी सांगितले. सिंहस्थासाठीची तयारी आम्ही पूर्ण केली असून काही त्रुटी असल्यास त्याही दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. जागेची कमतरता असल्याने खासगी ठिकाणी राहणाऱ्या साधू-महंतानाही आम्ही सुविधा देण्याचा प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले. सोबतच नाराज साधू महंतांचे गैरसमज दूर करण्यासाठी त्यांच्या भेटी घेणार असल्याचे महाजन यांनी यावेळी सांगितले.
भुजबळांच्या दौऱ्यानंतर धावपळ
सोयी सुविधांवरून नाशिकसह त्र्यंबकेश्वरमधील साधू-महंत भाजप सरकारवर नाराज आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांना रविवारी नाशिकसह त्र्यंबकेश्वरमधल्या साधू-महंतांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय आखाडा रंगण्याची शक्यता असतांनाच, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी तातडीने नाशिकमध्ये धाव घेतली. महंत ग्यानदास महाजारांसह सर्व साधू-महंतांची भेट घेवून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सोबतच त्र्यंबकेश्वरमध्ये जावून हरिगिरीजी महाराजांसह सर्वच साधूंची भेट घेत, वादावर पडदा टाकण्यासाठी त्यांची दमछाक झाली.
तक्रारी अन् समाधानही
साधुग्राममधील विविध आखाड्यातील साधू-महंताशी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी संवाद साधला. यावेळी उपस्थित साधू-महंतांनी त्यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचला. याउलट, सदैव प्रशासनावर तुटून पडणारे आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांनी प्रशासनाच्या कामावर समाधान व्यक्त केले. आखाडे आणि ग्यानदास यांनी परस्परविरोधी भूमिका घेतल्याने सर्वच आलबेल सुरू नसल्याचे स्पष्ट होते.
आखाड्यांचे १९ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण होणार आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाच्या वतीने साधुग्राममधील विविध कामांना गती देण्याचे काम सुरू आहे. याबाबत पालकमंत्री महाजन यांनी आखाड्यांना भेट देऊन माहिती घेतली. या दौऱ्यात तीन्ही प्रमुख आखाड्यांच्या महंतांनी पालकमंत्र्यांसमोर तक्रारींचा पाढा वाचला. सुमारे ५० ते ६० खालशांच्या जागा कमी पडत असल्याची खंत महंतांनी व्यक्त केली. काही आखाड्यांनी खासगी जागेत आपले काम सुरू केले आहे. याठिकाणी प्रशासनाकडून सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. साधुग्राममधील काही शौचालय व स्नानगृहातील नळ तोट्यांची अवस्था दयनीय झाली असून, त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली. कुंभमेळ्यात आखाड्यांच्या वतीने भाविकांसाठी भंडाऱ्यांचे आयोजन केले जाते. रेशनमध्ये गव्हाचे पीठ उपलब्ध करून द्यावे. साखरेचे भाव जास्त असल्याने साखर कमी दरात उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली.
तसेच पोलिस प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने ठिकठिकाणी बॅरेकेड्स लावले आहे. त्यामुळे साधू-महंतांना वाहनांवरून प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने त्वरित आखाड्याच्या महंतांसाठी वाहन पास उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी तीनही आखाडा प्रमुखांनी केली. यावेळी ना. महाजन यांच्या समवेत आमदार बाळासाहेब सानप, आ.देवयानी फरांदे, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, मनपा आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट