विकास सामान्य नागरिकांसाठी असतो. मात्र, यामुळे सामान्यांचे जगणे सुसह्य होत असेल तर त्या विकासाला अर्थ असतो. अन्यथा विकास करण्याला महत्त्व रहात नाही. दिंडोरी रोडवरील तारवालानगरजवळ शंभर फुट रुंदीचा भव्य रस्ता झाला. मात्र, तो ओलांडणे नागरिकांना कठीण झाले आहे. जीव मुठीत धरुन या रस्त्यावरून पायी चालावे लागते.
तारवाला नगर ते अमृतधाम या १०० फुटी रस्त्याचे काम काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाले आहे. या भव्य रस्त्यामुळे दिंडोरी व पेठकडून येणाऱ्या तसेच धुळे व पुण्यासह औरंगाबादकडे आणि नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर जाणाऱ्या वाहनांसाठी मुख्यत: सोय झाली. शिवाय अमृतधामवरून दिंडोरी आणि पेठसह गुजरातकडे जाणाऱ्यांनाही हा रस्ता सोयीचा झाला आहे. याच रस्त्यावरून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र, नियमाकडे दुर्लक्ष करून सर्रासपणे अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. त्यामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शालेय विद्यार्थी यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. याच रस्त्यालगत सेतू कार्यालय आहे. तेथे विद्यार्थी व पालकांनी नेहमी वर्दळ असते. तसेच तारवालानगरजवळच सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेली सीडीओ-मेरी शाळा, प्राथमिक व बालवाडी आणि इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. सकाळी व सायंकाळी विद्यार्थ्यांची गर्दी असते. पालकांचीही वर्दळ असते. सर्वांनाच रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरून ओलांडावा लागत आहे. वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी या रस्त्यावर गतिरोधक टाकण्यात यावेत, अशी नागरिकांची मागणी आहे.
रस्ता छान मोठा झाला आहे. मात्र, सकाळी-सायंकाळी रस्ता ओलांडणे कठीण झाले आहे. या रस्त्यावर दुभाजक टाकण्याची गरज आहे. यामुळे वेगाने धावणाऱ्या वाहनांचा वेग कमी होऊ शकेल. - माधवराव भणगे, ज्येष्ठ नागरिक
शाळेत दररोज गाडीवरून जातांना भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांचा सामना करावा लागतो. रस्ता ओलांडणे कठीर जाते. - सुनिता वाईकर, शिक्षिका
वाहनांच्या गर्दीमुळे भीती वाटते. शाळेत येतांना पालकांना सोबत आणावे लागते. या रस्त्यावर वाहतूक पोलिस असणे गरजेचे वाटते. - आसावरी पगारे, विद्यार्थिनी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट