म. टा. प्रतिनिधी, नाशिक
साधुग्राममधील प्रमुख तीन अनी आखाड्यांपैकी एक असलेल्या दिगंबर अनी आखाड्याला प्रशासनाकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचा गंभीर आरोप दिगंबर आखाड्याचे श्री महंत रामकिशोरदास महाराज यांनी केला आहे. यावेळी उपस्थित महापालिका अधिकारी आणि ठेकेदारावर महाराजांनी तोंडसुख घेतले.
दिगंबर आखाड्यावर जागा वाटपापासून अन्याय करण्यात आला. दिगंबर आखाड्यातंर्गत सात आखाडे येतात. मात्र, त्यांच्यासाठी सुविधा निर्माण करणे अशक्य झाले आहे. झाडांची छाटणी करण्यात आली नाही. ज्या झाडांची छाटणी झाली, त्यांच्या काटेरी फांद्या आखाड्याच्या आवारात पडून आहेत. जागा लेव्हल करून देणार, असे आश्वासन प्रशासनाने दिले होते. मात्र, त्याचाही विसर पडल्याने प्रशासन नेमके कोणाच्या दिमतीला गुंतले? असा प्रश्न रामकिशोरदास महाराजांनी उपस्थित केला आहे. आखाड्याला सतावणाऱ्या समस्यांचे गऱ्हाणे कोणाकडे मांडावे याबाबत सर्वच महंत आणि साधू अनभिज्ञ आहेत. अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला असता फिल्डवर असल्याचे सांगितले जाते. फिल्डवर शोधले असता ऑफीसमध्ये गेल्याचे उत्तर मिळते. सर्व व्यवस्था कोलमडून पडली असून, दलालीमुळे साधुग्रामला अवकाळा प्राप्त झाल्याचा आरोप महंत परमात्मा दास यांनी केला. या सर्व प्रकरणाची योग्य चौकशी होणे क्रमप्राप्त असून, गुरूपौर्णिमेपर्यंत हा सावळा गोंधळ संपण्याची आवश्यकता असल्याचे मत उपस्थित साधू महंतांनी व्यक्त केले.
ठेकेदार-अधिकारी घेतले फैलावर
जुन्या पत्र्यांना सिल्वर कलर देऊन नवे असल्याचे भासवले जात आहे. प्लॉटला नंबर देण्याचे काम रखडले असून, त्याचा फटका साधुमहंतांना बसत असल्याचे यावेळी रामकिशोरदास महाराजांनी स्पष्ट केले. दरम्यान, यावेळी साधुग्रामचे काम पाहणारा ठेकेदार आणि महापालिकेचे डेप्युटी इंजिनीअर सचिन जाधव हजर झाले. त्यांना रामकिशोरदास महाराजांनी फैलावर घेत प्रश्नांची सरबत्ती केली. जुनाट पत्रे, प्लॉट नंबरिंग, झाडांची छाटणी, जमीन लेव्हल करणे असे अनेक मुद्दे यावेळी मांडण्यात आले. लवकरच यावर मार्ग काढण्याचे आश्वासन जाधव यांनी दिले.
व्हीआयपींचा पाठिंबा नाही
साधुग्राममध्ये प्रमुख तीन आखाडे आहेत. यातील निर्वाणी आखाड्याकडे आखाडा परिषदचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांचे पाठबळ आहे. निर्मोही आखाड्यात व्हीआयपींची लगभग सुरू राहिल. मात्र, दिगंबर आखाड्यात हे चित्र दिसून येणार नाही. प्रशासन यामुळेच दिगंबर आखाड्याकडे दुर्लक्ष करीत असावे, असा खोचक टोला रामकिशोरदास महाराजांनी लगावला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट