Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

गरोदर महिलांसाठी मविप्रचा पुढाकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आर्थिक दुर्बल घटकांमधील गरोदर महिलांच्या वैद्यकीय तपासण्या आणि पुरेशा औषधोपचारांभावी त्यांची होणारी हेळसांड रोखण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून मविप्रच्या मेडिकल कॉलेजने पुढाकार घेतला आहे. गरजू गरोदर महिलांच्या औषधोपचार अन् चाचण्यांसह त्यांच्या दोन प्रसूती मोफत करण्यात येणार आहेत.

मविप्रच्या डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमधील स्त्रीरोग व प्रसूती विभागाच्या वतीने यासाठी सर्व यंत्रणा प्रयत्न करणार आहे. गरोदर महिलांच्या पहिल्या दोन प्रसूती, सर्व चाचण्या आणि औषधोपचारांची जबाबदारीही संस्थेने घेतली आहे. यात नॉर्मल किंवा सिझेरिअन पध्दतीने डिलिवरी करण्यात येईल. ऐनवेळी वैद्यकीय सेवेची गरज पडल्यास सामान्य अतिसामान्य कुटुंबातील गरोदर महिलांना दवाखान्यात पोहचण्यासाठी वाहनाचा प्रश्न निर्माण होतो. या महिलांचा विचार करीत मेडिकल कॉलेजने त्यांना अॅब्युलन्सही उपलब्ध करून दिली आहे. प्रसूतीवेदना सुरू झाल्यानंतर गरोदर महिला किंवा नातेवाईकांनी मविप्र रुग्णालयाशी ९८२२४०२५०१ या क्रमांकावर संपर्क साधावा. या माध्यमातून रुग्णालयापर्यंत विनामूल्य रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात येईल. प्रसूतीनंतर संबंधित महिलेस घरापर्यंत परतीची वाहन व्यवस्थाही मोफत देण्यात येणार आहे.

घरी बाळंतपणाचे प्रमाण ३० टक्के

अद्यापही आर्थिक परिस्थिती व अज्ञानाच्या परिणामी ग्रामीण भागात घरीच बाळंतपण करण्याचे प्रमाणही तब्बल ३० टक्के आहे. परिणामी माता-बालकांचा मृत्यू, बालकांमध्ये जन्मजात निर्माण होणारे व्यंग अशा उदाहरणांचेही प्रमाण बरेच आहे. सुरक्षित मातृत्व आणि नवजात सुदृढ बालकांसाठी शहरी, ग्रामीण तसेच आदिवासी- दुर्गम भागातील मातांचे बाळंतपण रुग्णालयात व्हावे, यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत शासनाकडून मोफत रुग्णवाहिकासेवा सुरू केली आहे. या सेवेमुळे माता व बालकांचे मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. याच धर्तीवर आता मविप्रच्या खाजगी मेडिकल कॉलेजनेही या विषयात पुढाकार घेतल्याने याचा लाभ गरजू गरोदर महिलांना होणार आहे.

दुहेरी लाभ मिळणार

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत शासनाकडून जिल्ह्यात ही सेवा १२ ऑक्टोबर २०११ पासून सुरू आहे. या सेवेच्या परिणामी गत काही वर्षांच्या तुलनेत जिल्ह्यातील गरोदर मातांचे व बालकांचे मृत्यूचे प्रमाण कमी होण्यासही मदत झाली आहे. या अभियानांतर्गत जिल्हा रुग्णालयात २४ तास सेवा देणाऱ्या 'संदर्भसेवा रुग्णवाहिका कॉल सेंटर'चीही स्थापना करण्यात आली आहे. यासाठी (०२५३) २२३२२२१ या क्रमांकावर रुग्णाच्या नातेवाइकांनी संपर्क साधावा. या योजनेत गरोदरपणा व प्रसूती पश्चात ४२ दिवसांपर्यंत सर्व सेवा, शस्त्रक्रिया, औषधे, उपचार व आहार मोफत दिला जातो. जिल्ह्यातील १०३ प्राथमिक आरोग्य केंद्रांत १०१ रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन शेतकऱ्यांच्या जिल्ह्यात आत्महत्या

$
0
0

सटाणा : नाशिक जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. सटाणा तालुक्यातील बोढरी येथील हिराजी खैरनार यांनी विहीरीत उडी मारून तर नाशिक तालुक्यातील गंगाम्हाळुंगीचे भाऊराव पालवे यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली.

बोढरी येथील हिराजी रामजी खैरनार (२८) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आत्महत्या केली. तहसीलदार अश्विनकुमार पोतदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, खैरनार यांच्या नावे बोढरी विकास सहकारी सोसायटीचे दीड लाख रुपयांचे कर्ज आहे. कुटुंबाची जबाबदारी पेलताना खैरनार यांनी तीन बहिणींचे लग्न करुन दिले. तसेच सहा एकर शेतीतून फारसे उत्पन्न येत नसल्याने ते निराशाग्रस्त होते. अखेर गुरुवारी त्यांनी शेतातील विहीरीत उडी मारुन आत्महत्या केली. त्यांच्या मागे आई आणि लहान भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, गंगाम्हाळुंगी येथील भाऊराव पालवे (५०) या शेतकऱ्याने खतासाठी पैसे कमी पडत असल्याच्या नैराश्येतून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मृतदेह थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गंगाम्हाळुंगी येथील भाऊराव शंकर पालवे (५०) या शेतकऱ्याने पत्नीचे मंगळसूत्र विकूनही खतासाठी पैसे कमी पडत असल्याच्या नैराश्येतून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. त्यानंतर या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणला. याप्रकरणी आवश्यक ती सरकारी मदत देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेह गावी नेत त्यावर अंत्यसंस्कार केले.

पालवे यांच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगाम्हाळुंगी येथे भाऊराव पालवे यांची शेतजमीन आहे. शेतातील पिकांसाठी त्यांना युरिया, सुफला या खतांची आवश्यकता होती. मात्र, त्यांच्याकडे केवळ पाचशे रुपये असल्याने त्यांनी आपल्या पत्नीचे मंगळसूत्र विकण्यासाठी सोनाराकडे नेले; परंतु सोन्याला भाव कमी झाल्याने खतांसाठी आवश्यक असलेल्या रकमेची पूर्तता होत नव्हती. यामुळे नैराश्य आलेल्या पालवे यांनी बुधवारी दुपारच्या सुमारास विषारी औषध प्राशन करून आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला. वडिलांनी विषारी औषध प्राशन केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या मुलांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. रात्री त्यांच्यावर उपचार करण्यात आले. पण, गुरुवारी सकाळच्या सुमारास भाऊराव पालवे यांची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर पालवे कुटुंबियांनी मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणला. सरकारच्यावतीने मदत मिळावी, असे आर्जव त्यांनी केले. प्रांत रमेश मिसाळ आणि तहसीलदार गणेश राठोड यांनी त्यांच्याशी संवाद साधला. शेतकरी आत्महत्या प्रकरणात सरकारतर्फे दिली जाणारी मदत देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.

दहा हजारांची मदत

पालवे कुटुंबियांची परिस्थिती लक्षात घेत जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापल्यापरीने आर्थिक मदत गोळा केली. त्यानुसार दहा हजार रुपयांची आर्थिक मदत पालवे कुटुंबीयांकडे तातडीने सुपूर्द केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपपेक्षा काँग्रेसवाले अच्छे!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गंगा, साबरमतीच्या स्वच्छतेकडे लक्ष देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गोदावरीकडे दुर्लक्ष का असा सवाल करत, नोकरशाहीच भाजपचे केंद्र आणि राज्यातील सरकार चालवत असल्याचा आरोप अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री श्री महंत हर‌िगिरीजी महाराज यांनी केला आहे. भाजपचे आमदार, पालकमंत्री, प्रशासन, ग्यानदास हे सगळे पैशांच्या मागे लागल्याचे सांगत भाजपावाल्यांपेक्षा काँग्रेस आघाडी सरकारचे सरकार चांगले होते, अशी टीका त्यांनी केली आहे.

पत्रकारांशी बोलताना हर‌िगिरीजी महाराज यांनी कुंभमेळा अधिकारी ते पंतप्रधान यांच्यावर कडाडून टीका केली आहे. आमदार बाळासाहेब सानप हे साधूंची दिशाभूल करत असून, पालकमंत्री केवळ फेरफटका मारण्यासाठीच त्र्यंबकेश्वरमध्ये येत असल्याचा आरोप त्यांनी केला. सिंहस्थाच्या नावावर आमदार, प्रशासन, पालकमंत्री ग्यानदास महाराज हे केवळ पैशांच्या मागे लागल्याची टीका त्यांनी केली आहे. निधीच्या नावाने ठणठणाट असून, काँग्रेस आघाडी सरकारने दिलेल्या निधीवरच कामे केली जात असल्याचा दावा त्यांनी केला. भाजप सरकार काहीच काम करत नसून, आम्ही या सरकारपासून दुःखी असल्याचे सांगून कुंभमेळ्यावर नोकरशाही प्रभावी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे भाजपचे लोक जेवढ्या जोमाने जिंकलेत, तेवढ्याच जोरात हारतील असा दावा त्यांनी सांगितले. माजी मंत्री छगन भुजबळ हे काम करणारे व्यक्ती होते, असे सर्टिफिकेटही हर‌िगिरीजी यांनी दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'भुजबल काम करनेवाले व्यक्ती'

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

गोदावरीच्या स्वच्छतेसाठी तळेगाव डॅमचे पाणी गोदावरीत उतरवून त्र्यंबकेश्वर ते नाशिक ३५ किलोमीटर गोदावरीच्या दोन्ही बाजूला घाट बांधण्याची मागणी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री श्री मंहत हरिगिरीची महाराज यांनी केली आहे.

गोदावरीच्या पाण्यात सध्या मलमूत्रच मिसळले जात असल्याने ती गटारगंगा झाली आहे. त्यामुळे हे मलमूत्र आम्ही प्यायचे का? असा सवाल करत तळेगावचे पाणी गोदावरीत आणल्यास गोदाप्रदूषणाचा प्रश्न सुटेल असा दावा हरिगिरी महाराज यांनी केला आहे. गोदावरीच्या प्रदूषणाकडे केंद्र आणि राज्य सरकारने दुर्लक्ष केल्यास त्यांचे सिंहासन हालवून सोडू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

त्र्यंबकमधील आपल्या आश्रमात पत्रकारांशी संवात साधतांना हरिगिरीजी महाराज यांनी भाजप आमदारांसह, पालकमंत्री, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांवर कठोर टीका केली. नरेंद्र मोदींनी साबरमती स्वच्छ केली. त्यावरच ते देशाचे पंतप्रधान झाले. मात्र, आता त्यांनी गोदावरीच्या प्रदूषणाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे त्यांनी आता आत्मचिंतन केले पाहिजे. गोदावरी ही गटारगंगा झाली आहे. मलमूत्राशिवाय तिच्यात काहीच नाही. असे तीर्थ आम्ही प्यायचे का? गोदा स्वच्छतेसाठी तळेगाव डॅमचे पाणी आणणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व्हेक्षण झाले पाहिजे. यासाठी आपण २३ वर्षांपासून शासन दरबारी प्रयत्न करत आहोत.

तळेगाव डॅमचे पाणी गोदावरीत टाकल्यास आणि त्र्यंबक ते नाशिक दरम्यान ३५ किलोमीटरवर दोन्ही बाजून घाट बांधल्यास नदीचे प्रदूषण कमी होईल, असा दावा त्यांनी केला आहे. यासाठी त्र्यंबक नगरपालिका आणि नाशिक महापालिकेने ठराव पारीत करून केंद्राला सादर करावा, अशी मागणी त्यांनी केली.

नाशिक आणि त्र्यंबक हे वेगवेगळे नसून एकच तीर्थ आहे. सध्याचे सरकार काहीच काम करत नसल्याची टीका हरि‌गिरी महाराज यांनी केली आहे. कुंभमेळ्याच्या कामांवर प्रशासनाचा प्रभाव असून पालकमंत्री आणि भाजपचे आमदार दिशाभूल करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी आमचा आवाज दाबू शकत नाही. त्यांच्यावर नोकरशाहीचा पगडा असून या दोघांमध्ये ताळमेळ नाही. 'यह पंढरपूर नही जो रामभरोसे छोड दिया जाय,' असे सांगत त्यांनी भाजप नेत्यांचा समाचार घेतला.

भुजबल काम करनेवाले व्यक्ती

आज जे काही आहे ते केवळ तत्कालीन मंत्री छगन भुजबळ यांच्यामुळेच आहे. काँग्रेस आघाडी सरकारने मंजूर केलेली कामे होत आहे. भाजपच्या लोकांनी आमच्यासाठी काहीच केले नाही. भुजबळ हे काम करणारे नेते होते. ते सर्व समजून घेत होते. मात्र, भाजपवाले केवळ दिशाभूल करीत आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असले तरी त्यांच्यापेक्षा काँग्रेस आघाडीचे सरकार चांगले होते. आम्ही कोणत्याही एका पक्षाचे नसून आमच्यासाठी सर्वच सारखेच असल्याचे त्यांनी सांगितले.

महाजन तो घुमने आते है

सिंहस्थांची कोट्यवधीची कामे असली तरी त्र्यंबकमध्ये काहीच नाही. मुख्यमंत्री, पालकमंत्री यांना अनेकदा कामांबाबत सांगितले. त्यांचे लक्ष नाही. भाजप आमदार दिशाभूल करतात तर पालकमंत्री केवळ फिरायला येतात. कुंभमेळा अधिकारी सांगतात त्यावरच पालकमंत्र्याचे काम चालते. या सर्वांवर नोकरशाही हावी झाल्याची टीका हरिगिरीजी महाराज यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधुग्रामने घेतला मोकळा श्वास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या वादात अडकलेल्या साधुग्राम स्वच्छता ठेक्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी कत्रांटी कर्मचाऱ्यांनी स्वच्छता कामास सुरुवात केली. स्वच्छतेचे काम उशिरा का होईना प्रशासनाने हाती घेतल्याने साधुमहंतांनी समाधान व्यक्त केले.

साधुग्राममध्ये साधुमहंतांचा डेरा पडल्यापासून याठिकाणी स्वच्छता होत नव्हती. डस्टबीनची सुविधा नसल्याने संपूर्ण साधुग्राममध्ये कचरा इतस्तः कचरा विखुरला होता. त्यातच पाऊस सुरू झाल्याने कचऱ्याच्या प्रश्नाने उग्र रूप धारण केले. कचऱ्यामुळे दुर्गंधीसह डासांचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला. ठेक्याचा वाद कोर्टात पोहचल्याने सर्वांच इलाज खुंटला. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सुमारे २०० पेक्षा अधिक स्वच्छता कर्मचाऱ्यांनी साधुग्राममध्ये साफसफाईच्या कामास सुरुवात केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांची साधुग्रामवारी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बारा वर्षांनी आलेला कुंभमेळा व त्यादृष्टीने होत असलेल्या घडामोडी पाहता सध्या नाशिककर घराबाहेर पडून साधुग्रामला भेट देण्याच्या मूडमध्ये दिसून येत आहे. साधुग्राममधील गर्दीवरून हे लक्षात येत असून, एव्हाना तेथे जत्रेचे स्वरूप आले आहे. आषाढी एकादशीच्या वारीला पंढरपूरला जाण्यासाठी जमले नाही. म्हणून नाराज न होता साधुग्राममध्ये जाऊन हीच वारी केल्याचे समाधानही या निमित्ताने नाशिककरांना मिळत आहे.

कुंभमेळ्याच्या अनेक वार्ता ऐकिवात असल्याने आता अनायसे कुंभमेळा आला आहे तर, साधूंचे दर्शन घेण्याच्या उद्देशाने व साधुग्रामबाबत प्रचंड कुतूहल असल्याने सुटीच्या दिवशी तसेच वेळात वेळ काढून नाशिककर साधुग्रामच्या वारीला जात आहे. ऐरवी बाराही वर्षे तपोवनाकडे न फिरकणारा भाविक यानिमित्ताने भारावून जात साधूंच्या जथ्याच्या दर्शनाला जात आहे. औरंगाबाद नाक्याहून जाताना वृंदावनच्या पहाडीबाबांचा आखाडा दृष्टीपथास पडतो. येथून पुढे सर्वच आखाडे सुरू होत असून तेथील बांधकाम, मोठ मोठी मंदिरे, कमानी ही भाविकांसाठी कुतूहलाचा विषय ठरत आहेत. विशेषत: साधुग्रामच्या प्रवेशद्वाराजवळ उभ्या करण्यात येणाऱ्या भव्य कमानी भाविकांचे लक्ष वेधून घेत असल्याने तेथूनच भाविकांना साधुग्रामचा मोह पडत आहे.

विविध आखाडे, बाबा-अवलियांचे आश्रम तसेच विविध पोशाख केलेले साधू आकर्षणाचा विषय असून, त्यांच्यासाठी म्हणून खास वेळ काढून साधुग्रामला जाण्यासाठी पसंती दिली जात आहे. पूर्वी तपोवनाकडे न फिरकणारेही आता वेळात वेळ काढून साधुग्रामला भेट देत असून विविध आखाड्यांचे आश्रम, बाबाबुवांची ठिकाणे माहिती करून घेण्याचा अनेकांचा आग्रह असून मुख्य ठिकाणांवरही गर्दी दिसून येत आहे.

भाविकांसाठी जेवणाची खास व्यवस्था

कुंभमेळ्यासाठी आलेल्या साधूंचे दर्शन घेण्यासाठी तसेच उत्सुकतेपोटी साधुग्राम पाहण्यासाठी आलेल्या भाविकांच्या जेवणाची व्यवस्था काही आखाड्यांकडून केली जात आहे. भाविकांच्या जेवणासाठी मसालेभात तसेच साजूक तुपाची खीर देण्यात येत असल्याने या ठिकाणी अनेकांच्या जेवणाचा प्रश्न मिटत आहे. दिगंबर आखाडा तसेच मुख्य अनेक आखाड्यांच्या बाजूला भंडारा स्वरूपात आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केलेले असते. त्यामुळे घराच्या ओढीने लगेचच शहराकडे पळणारे भाविक काही वेळापुरते का होईना साधुग्राममध्ये आपला फड जमवत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीस रेल्वेगाड्यांना नाशिकला थांबा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

मध्य रेल्वेने नाशिक व त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्यासाठी ३८ रेल्वेगाड्यांचा बोनस दिला आहे. ऑगस्टपासून वीस रेल्वेगाड्यांना नाशिकरोड येथे थांबा देण्यात येणार आहे तर, मुंबईहून सुटणाऱ्या १८ रेल्वेगाड्यांना फक्त नाशिक येथे उघडणारे डबे उपलब्ध करण्यात आले आहेत.

रेल्वेने कुंभमेळ्यासाठी विशेष २० रेल्वे गाड्या सोडल्या आहेत. त्या नाशिकरोड, ओढा आणि देवळाली कॅम्प येथे थांबतील व तेथून सुटतीलही. त्याशिवाय ३८ गाड्यांची विशेष सुविधा उपलब्ध केल्याची माहिती

रेल्वेच्या सूत्रांनी दिली. दि. १० ऑगस्टपासून खालील रेल्वेगाड्या नाशिकरोडला थांबा घेतील. (कंसात नाशिकरोडला आगमनाची वेळ). मुंबई सीएसटी आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथून सुटणाऱ्या डाऊन गाड्या-एलटीटी छपरा (१४.२३), एलटीटी हावडा (२३.४३), एलटीटी हबीबगंज (१९.३३), सीएसटी आसनोल (१४.५०), एलटीटी गोरखपूर (१४.४०), एलटीटी राक्सौल (१४.५०), सीएसटी गोरखपूर (१७.४६), एलटीटी जयानगर (१४.५०), एलटीटी कामाख्या (१५.०५), एलटीटी पुरी (०३.२८).

मुंबईला जाणाऱ्या अप गाड्या- छप्रा एलटीटी (११.१५), हावडा एलटीटी (०१.१०), हबीबगंज एलटीटी (०३.२५), आसनसोल सीएसटी (०२.०५), गोरखपूर एलटीटी (२३.१०), राक्सौल एलटीटी (०२.०५), गोरखपूर सीएसटी (०८.२८), जयानगर एलटीटी (०२.३१), कामाख्या एलटीटी (१७.२८), पुरी एलटीटी (०९.०५).

खास नाशिकसाठी बोगी

मुंबईहून सुटणाऱ्या लांबच्या रेल्वेगाड्यांना फक्त नाशिकरोडला उघडणाऱ्या बोगी जोडण्यात येणार आहेत. त्या गाड्या पुढीलप्रमाणे (कंसात गाडीचा क्रमांक)- एलटीटी वाराणसी एक्स्प्रेस (१२१६७/१२१६८) जनरल सेकंड क्लास एक बोगी. सीएसटी नागपूर नंदीग्राम (११४०१/११४०२) जनरल सेकंड क्लास एक बोगी. दादर औरंगाबाद जनशताब्दी (१२०७१/१२०७२) सेकंड चेअर कार दोन बोगी. एलटीटी हाजूर साहेब नांदेड एक्स्प्रेस (११०११/११०१२) जनरल सेकंड क्लास चार बोगी.

एलटीटी आझमगड (११०५३/११०८२) जनरल सेकंड क्लास दोन बोगी. एलटीटी गोरखपूर एक्स्प्रेस (११०८१/११०८२) जनरल सेकंड क्लास दोन डबे. एलटीटी अंजनी (११२०१/११२०२) जनरल सेकंड क्लास पाच बोगी. निझामाबाद एक्स्प्रेस (११२०५/११२०६) जनरल सेकंड क्लास पाच बोगी. एलटीटी सुलतानपूर (१२१४३/१२१४४) जनरल सेकंड क्लास तीन बोगी.

सुपरफास्ट गाड्या नाशिकला थांबणार

भुसावळ : सिंहस्थ कुंभमेळा सुरू झाला असून, अनेक गाड्यांना कुंभमेळ्यासाठी नाशिकला थांबा देण्यात आला आहे. तसेच काही गाड्यांना जादा डबे जोडण्यात येणार आहेत. तसेच मुंबई-एलटीटी वाराणसी एक्सप्रेसला एक साधारण डबा, नंदीग्राम एक्सप्रेसला एक साधारण डबा, जनशताब्दी एक्सप्रेसला दोन डबे, मुंबई एलटीटी नांदेड एक्सप्रेसला चार साधारण डबे, मुंबई एलटीटी आझमगड साप्ताहीक एक्सप्रेस दोन डबे, मुंबई एलटीटी गोरखपूर साप्ताह‌िक एक्सप्रेसला दोन डबे, मुंबई एलटीटी काझीपेठ एक्सप्रेसला तीन डबे, मुंबई एलटीटी ब‌िदर एक्सप्रेसला तीन डबे, मुंबई निजामाबाद एक्सप्रेसला पाच डबे तर मुंबई सुलतानपूर एक्सप्रेसला तीन डबे जादा जोडण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अखंड ज्योत ठरतेय लक्षवेधी

$
0
0

महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर दर्शनार्थी भाविकांची रीघ

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

काश्मीर ते कन्याकुमारी या भारताच्या दोन टोकांना साधण्याचे प्रतीक असणाऱ्या सुमारे साडेतीन हजार किलोमीटर्सच्या धाग्याची तपोवनात तेवणारी अखंड ज्योत पर्यटक अन् भाविकांचे आकर्षण ठरत आहे. दहा ऑक्टोबरपर्यंत तेवणारी ही कमलदलातील भव्य अखंड ज्योती कुंभमेळ्याचा सिम्बॉल ठरत आहे. या ज्योतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ वाढीलाच लागली आहे.

काश्मीर ते कन्याकुमारी या दरम्यान सुमारे ३६१७ किलोमीटर्सचे अंतर आहे. देशातील भिन्न समुदायातील अखंडता दर्शविण्यासाठी इतक्याच अंतराच्या सूताची वात बनविण्यात आली आहे. तब्बल ३६१ ठिकाणी या वातीची घडी घालण्यात आल्यानंतर वातीचे टोक प्रज्वलित करणे शक्य झाले. तपोवनातील हिमालय बाबांच्या आश्रम परिसरात काचेच्या दालनात ही अखंड तेवणारी ज्योती लक्ष वेधून घेते. या अखंड सूताच्या वातीचे भले मोठे वेटोळे दिव्याच्या भोवतालीच ठेवण्यात आले आहे. प्रज्वलित केल्यापासून सुमारे १०८ दिवस ही ज्योत तेवत ठेवण्यात येणार आहे.

या ज्योतीच्या संरक्षणासाठी ब्राँझ धातूपासून बनविण्यात आलेल्या दीपाचा उपयोग करण्यात आला. या दिव्याची त्रिज्या आठ मीटरची आहे. या दिव्यात शेकडो लीटर्स तेल साठवून ठेवण्याची क्षमता आहे. हॅण्ड हेल्ड मशीनच्या सहाय्याने या ज्योतीच्या तोंडावरील काजळी दूर करण्यासोबतच वात पुढे सरकविण्याची प्रक्रिया पार पडते. देशातील विविधेतीतील एक्याचे प्रतीक म्हणून मांडण्यात आलेली ही ज्योती धार्मिकदृष्ट्याही महत्त्वाची असल्याचे ज्योतीची देखभाल करणाऱ्या हिमालयबाबा यांच्या आश्रमातील सेवेकऱ्यांनी सांगितले. देशातील ५१ शक्तीपीठांची उपासना या अखंड ज्योतीच्या माध्यमातून होत असल्याने आदिशक्तीची कृपादृष्टी या महासोहळ्यावर राहील. या ज्योतीच्या पूजनाने सूर्य, चंद्रादी, नवग्रहांचेही पूजन होते.

सौभाग्य आणि समृध्दी वाढविणाऱ्या या ज्योतीच्या दर्शनाने कोटी दीपदानाचे पुण्यही भाविकांना मिळते, असे महत्त्व हिमालय बाबा आश्रमातून सांगण्यात आले. कुंभाच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या दिवशी शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्या हस्ते या ज्योतीच प्रज्वलन करण्यात आले होते. आता दिवसेंदिवस या ज्योतीची ख्याती पसरत आहे.

महाकुंभ अखंड दीपज्योती

काश्मीर ते कन्याकुमारी : ३६१७ किलोमीटर्स अंतर

अखंड ज्योतीच्या वातीची लांबी : ३६१७ किलोमीटर्स

वातीच्या घड्यांची संख्या : ३६१

ज्योत प्रज्वलित राहण्याचे दिवस : १०८

ज्योत लावलेल्या दिव्याची त्रिज्या : ८ मीटर्स

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांचे वरातीमागून घोडे

$
0
0

गोविंदनगर अंडरपाससंदर्भात मागविल्या हरकती

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोविंदनगर अंडरपास वाहतुकीसाठी बंद केल्याच्या विरोधात अनेक राजकीय पक्ष तसेच नागरिकांनी रस्त्यावर उतरून निषेध नोंदविला असताना आता कोठे वाहतूक पोलिसांनी नागरिकांकडून लिखित स्वरुपात सूचना व हरकती मागविल्या आहेत. सात दिवसांत या हरकती नोंदवाव्यात असे आवाहन पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी केले आहे.

गोविंदनगर अंडरपास येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन वाहनचालकांचा वेळ निरर्थक जात होता. मुंबईनाका, इंदिरानगर, गोविंदनगर आणि पाथर्डीफाट्याकडून येणाऱ्या वाहनांच्या सकाळ, सायंकाळी लांबच लांब रांगा लागत असल्याने अर्धा ते पाऊणतास नागरिक तेथे अडकून पडत असत. अंडरपासचे काम चुकीचे झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर अन्य नागरिकांनाही वाहतुककोंडीमुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. महाराष्ट्र टाइम्सनेही या समस्येकडे वारंवार लक्ष वेधले आहे. फोकस या कॉलमच्या माध्यमातून या समस्येचा समाचार घेण्यात आला. राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या माध्यमातून विविध उपाय सूचविण्यात आले. गोविंदनगर कोंडीवर वाहतूक विभागाने अंडरपास बंद ठेवण्याचा उतारा शोधला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘क्लायडोस्कोप’

$
0
0

>> सई बांदेकर

यंग जनरेशनच्या लाइफस्टाइलचा मागोवा घेणं म्हणजे एखाद्या क्लायडोस्कोपमधून बघताना विविधरंगी आणि चित्राकार्षक अशा सतत बदलत्या डिझाईन्सच्या जगात हरवून जाण्यासारखं आहे. जितक्या वेळा तो फिरवला तितके वेगवेगळे आकर्षक पॅटर्न्स आपल्याला बघायला मिळतात. या लाइफस्टाइलमध्ये कधी नव्हते इतके ट्रेण्डसचे रंग भरलेले आहेत. तुम्ही या रंगाचा आनंद कसा घेता यावर तुमची जनरेशन ठरते.

तंत्रज्ञानाने जगाला जवळ आणले आहे. त्यामुळे साहजिकच आजच्या लाइफस्टाइलमध्ये या परिवर्तनाचे प्रतिबिंब दिसते. आजच्या पिढीला या परिवर्तनाच्या वेगाशी सतत जुळवून घ्यावे लागते. हे त्यांच्या पुढील मोठे आव्हान आहे आणि जो या बदलाशी जुळवून घेतो तोच या पिढीतला आहे असं म्हणायला हरकत नाही. वर चढण्यासाठी आता जिन्यांच्या जागी एस्केलेटर्स जरी असले तरी पहिल्या पायरीवर पाय टाकताना नीट अंदाज घेऊन, धीर करून, अलगद पाय टाकावा लागतो. नाहीतर पडण्याची शक्यता असतेच.

आजची तरुणाई ज्या स्पर्धात्मक वातावरणात वावरते आहे ती लाइफस्टाइल सोपी नाही. पण ती काळाची गरज आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने येणारे ताण-तणाव सहन करत, त्यातून 'डी-स्ट्रेस' होण्याचे मार्ग शोधत आयुष्य आनंदाने आणि भरभरून जगण्याचा प्रयत्न ते करत असतात. गेमिंगच्या 'व्हर्चुअल वर्ल्ड'मध्ये जितके ते रमतात तितकेच 'शिवा ट्रायलॉजी'च्या जगात देखील हरवतात. मूव्हीज आणि म्युझिक तर त्यांची लाइफलाईन आहे.

या जनरेशनची खासियत ही आहे की ते आपल्याला त्यांच्यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करत असतात. 'एज इज नो बार' यावर त्यांचा ठाम विश्वास दिसतो. मात्र, त्याबाबत ते फार आग्रहीदेखील नसतात. आलात तर स्वागत आहे आणि नाही आलात तरी स्वागत आहे असा त्यांचा प्रॅक्टिकल दृष्टीकोन असतो. उगाच भाव-भावनांचे अवडंबर करणे त्यांना आवडत नाही किंवा तेवढा वेळच त्यांच्याकडे नसतो. हाच प्रॅक्टिकल अॅप्रोच रिलेशनशिप्सच्या बाबतीत देखील दिसतो. पण याचा अर्थ ते संवेदनशील नाहीत असा नाही. जितके ते त्यांच्या करिअरकडे, अभ्यासाकडे फोकसड् असतात. तितकीच सामाजिक जाणीव देखील तरुणाईमध्ये आढळते. दोन्ही गोष्टींचे संतुलन साधण्याचा ते प्रयत्न करत असतात. मध्येच कुठेतरी हरवलेली सामाजिक बांधिलकी नव्याने रुजवायचा प्रयत्न ते सोशल मीडियासारख्या माध्यमांचा आधार घेऊन करत असतात. कोणी निसर्ग संवर्धनाच्या माध्यमातून तर कोणी सामाजिक कार्य करणाऱ्या लहान-मोठ्या ग्रुप्सच्या माध्यमातून 'ऑन-फील्ड' कामं करतात.

प्रत्येक पिढी पुढील प्रश्न व आव्हाने वेगळी असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये तुलना करणे हे खरं तर योग्य नाही. पण सहसा पुढच्या पिढीला कुठेतरी तुलनात्मकरित्या कमी लेखणारी त्यांच्या आधीची पिढी हे कदाचित विसरते की त्यांच्यावर संस्कार करण्यामध्ये, त्यांना घडविण्यामध्ये आपला देखील हातभार असतो.

मुळात ही पिढी 'स्मार्ट जनरेशन' आहे. त्यामुळे आयुष्याशी निगडीत प्रत्येक घटकामध्ये हा स्मार्टनेस झिरपलेला आहे. तुम्ही जितक्या सहजपणे हे स्वीकारून अंगीकृत कराल तेवढे तुम्ही या जनरेशनचा एक भाग बनून राहू शकता. 'क्लायडोस्कोप'मधल्या रंगांचा आनंद कसा घ्यायचा हा चॉईस तुमचा आहे!

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लॉट नंबरची रजिस्टरवर नोंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

साधुग्राम उभारणीचे काम पूर्णत्वास पोहचल्यानंतर अखेर शुक्रवारी प्लॉट नंबरची नोंद करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले. मात्र, हे नंबर देण्याचे काम रजिस्टरमध्ये होत असून मूळ समस्या कायम राहणार असल्याचा दावा साधू-महंताकडून करण्यात येतो आहे.

प्लॉट नंबर नसल्याने साधू-महंतांना रेशनकार्ड मिळणे कठीण झाले असून प्रशासनाने रजिस्टरमध्ये नोंदवण्यात येणारा नंबर लागलीच प्लॉटमधील पत्र्यांवर टाकावा, अशी मागणी दिगंबर आखाड्याचे प्रमुख महंत रामकिशोरदास महाराजांनी केली. साधुग्राममध्ये कोण कोणत्या प्लॉटमध्ये राहतो, याबाबत साधू-महंत अनभिज्ञ आहेत. सरकारी अधिकारी याबाबत इतके दिवस गंभीर नव्हते. प्लॉटला नंबर देण्याचे काम तत्काळ हाती घ्यावे, याबाबत साधू-महंतांकडून सातत्याने मागणी केली गेली. मात्र, प्रशासनाने या मागणीला वटाण्याच्या अक्षदा लावल्या. शुक्रवारी सायंकाळी महापालिकेचे डेप्युटी इंजिनीअर सचिन जाधव यांच्या समवेत दिगंबर आखाड्याचे महामंत्री वैष्णवदास महाराज, निर्मोही आखाड्याचे महामंत्री श्यामसुंदरदास महाराज आणि निर्वाणी आखाड्याचे महामंत्री यांनी विविध प्लॉटवर जाऊन प्लॉट नंबरची नोंद रजिस्टरमध्ये करण्यास सुरुवात केली. प्लॉट नंबरची माहिती नसल्याने साधू-महंत भांबवले आहेत. नंबर टाकण्यात होणारी चालढकल नेमकी कशामुळे होते आहे, याचे कोडे कायम असल्याचे मत रामकिशोरदास महाराजांनी व्यक्त केले. दरम्यान, या मुद्यावर चर्चा सुरू असताना रजिस्टरमध्ये नोंदवण्यात येणारी माहिती संकलित करून प्रत्येक आखाड्यासमोर तसेच प्लॉटसमोर बोर्ड लावणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले. प्लॉटला नंबर देण्यात आलेले नाही. त्यामुळे जागेची शोधा-शोध करताना साधू-महंतांची दमछाक होते आहे. यातच, रेशन कार्ड तसेच गॅस कनेक्शन मिळवाताना प्लॉट नंबरची मागणी प्रशासनाकडून केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियोजनात फेरबदलाची शक्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राजमुंद्री आणि जगन्नाथ पुरी येथील यात्रांमध्ये झालेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या नियोजनात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सर्वच विभागाचे अधिकारी नवीन बदलांच्या नियोजनात व्यस्त असून पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होऊ शकते.

आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथील दुर्घटनेत २२ तर ओडिशातील जगन्नाथ पुरी रथयात्रेत २ भाविकांचा मृत्यू झाला या दोन्ही चेंगराचेंगरींच्या घटनांमुळे धास्तवलेल्या प्रशासनाने निवडक अधिकाऱ्यांना जगन्नाथ पुरी येथे पाठविले. राजमुंद्री घटनेचा अभ्यास केला. दोन्ही ठिकाणी झालेल्या दुर्घटनेची कारणे शोधून जिल्हा प्रशासनाने त्यानुसार आपल्या नियोजनात मोठे फेरबदल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी दुपारी तीन वाजता सुरू झालेली बैठक रात्री साडेनऊ वाजेपर्यंत सुरू होती. मोठे फेरबदल होतील. भाविक मार्गात बदल, अंतर्गत तसेच बाह्य पार्किंगच्या ठिकाणांमध्ये बदल, सुरक्षेच्या दृष्टीने बंदोबस्तात बदल केला जाऊ शकतो. आजवर केलेल्या नियोजनात मोठा फेरफार होऊ शकताे.

पालकमंत्र्यांचा तातडीने दौरा

जिल्हा प्रशासन करीत असलेल्या बदलांना राज्य सरकारची तत्काळ मान्यता घ्यावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गिरीश महाजन शुक्रवारी रात्री उशिरा शहरात दाखल होणार होते. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गोल्फ क्लब येथील शासकीय विश्रामगृहावर त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार असून लागलीच या बदलांना मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधुग्राममध्ये डिस्पेन्सरी सुरू

$
0
0

पंचवटी : साधुग्राममध्ये देशभरातून आलेल्या आणि येत असलेल्या साधू-महंतांसह भाविकांसाठी महापालिकेने उभारलेल्या डिस्पेन्सरी (दवाखाना) कामकाजास सुरुवात झाली आहे.

या डिसपेन्सरीमध्ये रुग्णांसाठी ६० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. तपोवनातील रुग्णालयात २४ तास सेवा सुरू असणार आहे तर साधुग्राम या ठिकाणी उभाण्यात आलेल्या डिस्पेन्सरीमध्ये सकाळी आठ ते रात्री ११ वाजेपर्यंत सेवा दिली जाणार आहे. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कोकणी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य सेविका तेजाळे यांच्यासह २० नर्सेस आणि मदतनीस यांची नेमणूक करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डॉक्टरांनी सहकार्य करावे’

$
0
0

नाशिकरोड : कुंभमेळा काळात महापालिकेच्या आरोग्य सेवा केंद्रात डॉक्टरांनी स्वयंसेवक म्हणून काम करावे. देशाभरातून येणाऱ्या भाविकांना वैद्यकीय सेवेची गरज भासल्यास उपचार करून सहकार्य करावे, असे प्रतिपादन महापालिकेचे वैद्यकीय पर्यवेक्षक डॉ. बी. आर. गायकवाड यांनी येथे केले.

कारडा कन्स्ट्रक्शन आणि मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, नाशिकरोड यांच्यातर्फे डॉक्टर डेनिमित्त डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. सिंहस्थ कुंभमेळ्यात डॉक्टरांचे सहकार्य यावर मार्गदर्शन शिबिर झाले. त्यावेळी डॉ. गायकवाड बोलत होते. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. समीर लासुरे अध्यक्षस्थानी होते. कारडा कन्स्ट्रक्शन्सचे नरेश कारडा यांच्याहस्ते दीपप्रज्वलनाव्दारे शिबिराचे उदघाटन झाले. करमचंद कारडा, मनोहर कारडा, प्रेम कारडा, पूजा क्षत्रिय आदींची प्रमुख उपस्थिती होती. डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. डॉ. अंबादास कुलकर्णी यांनी सूत्रसंचलन केले. डॉ. अशोक निरगुडे, डॉ. विकास गोऱ्हे, डॉ. आर. वाय. कुलकर्णी, डॉ. विजय गवळी, डॉ. महेश भालेराव, डॉ. प्रकाश पुंड, डॉ. जयदीप भांबरे, डॉ. मयूर सरोदे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘स्थायी’ने पलटविला आयुक्तांवर डाव

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

न्यायालयाचा निकाल येण्यापूर्वीच महापालिका वकिलाच्या पत्रावर स्थायीची सभा बोलवून विषय मार्गी लावण्याच्या आयुक्तांचा प्रस्ताव स्थायी समिती फेटाळून लावला आहे. न्यायालयाचा अधिकृत निकाल येईपर्यंत हा निर्णय स्थगित ठेवण्याचे आदेश सभापती शिवाजी चुंभळे यांनी दिला आहे. त्यामुळे साधुग्राम स्वच्छतेचा प्रश्न चिघळला आहे. तर वकीलाच्या पत्रावर आपण निर्णय का घ्यावा असा सवाल करत सदस्यांनी आयुक्तांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

साधुग्रामच्या स्वच्छतेच्या ठेक्यावरून सध्या प्रशासन आणि स्थायी समितीत टोलवाटोलवी सुरू आहे. वादग्रस्त प्रकरण आपल्या अंगावर येवू नये म्हणून प्रशासन आणि स्थायी समिती सध्या एकमेकांवर हा ढकलाढकली करताहेत. वॉटर ग्रेस कंपनी ऐवजी क्रिस्टला ठेका देण्याचा निर्णयावर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. सोबतच अत्यावश्यक बाब असेल तर स्थायीने आपल्या अधिकारात अंतिम निर्णय घ्यावा, असे निर्देश सोमवारी दिले होते. मात्र हा निर्णय अधिकृतपणे येण्यापूर्वीच महापालिकेच्या वकिलांनी तातडीने पत्र पाठवून स्थायीने या वादासंदर्भात अंतिम निर्णय घ्यावा अशी विनंती आयुक्तांना केली. आयुक्तांनी गुरुवारी तातडीने डॉकेट तयार करून शुक्रवारी सभा घेण्याचा निर्णय झाला. मात्र न्यायालयाचा निकाल हाती येण्यापूर्वीच निर्णय का घ्यायचा असा सवाल शैलेश ढगे, यंशवत निकुळे, राहुल दिवे यांच्यासह सर्व सदस्यांनी केला.

प्रशासन वॉटर ग्रेसच्या बाजूने झुकल्याचा आरोप सदस्यांनी केला. आयुक्तांनी ब्लॅक लिस्टेड वॉटर ग्रेसचा ठराव ४५१ खाली विखंडीत करावा. स्थायीकडे हा विषय ढकलू नये, अशी मागणी सदस्यांनी केली. वॉटर ग्रेसने महापालिकेची बदनामी केल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी कुणाल वाघ यांनी केली. सदस्यांनी विरोध केल्याने सभापतींनी वकिलाच्या पत्राच्या आधारावर निर्णय घेता येणार नाही असे सांगत हा विषय निकाल लागेपर्यंत स्थगित ठेवला. त्यामुळे निकालापूर्वीच निर्णय घेण्याचा प्रशासनाचा प्रयत्न ऐनवेळी ओळखून सदस्यांनी प्रशासनावरच हा विषय आता पलटवला आहे.

प्रशासनाची भूमिका संशयास्पद

उच्च न्यायालयाचा निकाल साधारणता दोन दिवसात अपलोड होतो. मात्र, निकाल लागून चार दिवस लोटले तरी अद्याप अधिकृत निकाल आलेला नाही. दुसरीकडे वकिलाने पाठविलेल्या पत्रावरच या कंत्राटाचा विषय मार्गी लावण्याचा आयुक्तांचा प्रयत्नही संशयास्पद आहे. वॉटर ग्रेसला कंत्राट देण्यासाठीच प्रशासनाचा खटाटोप सुरू असल्याचा आरोप सदस्य करीत आहे. तर ठेकेदारासह महापालिकेतील प्रशासनाची भूमिकाच संशयास्पद असल्याने स्थायीने या प्रकरणापासून लांब राहणे पसंत केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतेचा वाद पेटला

$
0
0



महापालिका-मेघवाळ समाज उतरले आमने-सामने

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

साधुग्रामच्या स्वच्छता ठेक्याचा वाद न्याय प्रविष्ठ असतांनाच आयुक्तांच्या आदेशाने अन्य ठेकेदारामार्फत साधुग्रामची स्वच्छता करून घेण्यावरून शुक्रवारी वाद उफाळून आला. रामकुंड व भाविक मार्गावरील स्वच्छता कर्मचारी साधुग्राममध्ये येताच मेघवाळ संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना जोरदार विरोध करीत काम थांबवण्याचा प्रयत्न केला. तसेच आयुक्तांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप समितीच्या सुरेश मारू यांनी केला. तर अतिरिक्त कर्मचाऱ्यांनाच साधुग्राममध्ये काम दिल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.

साधूग्रामच्या स्वच्छतेसाठी साडेपाच कोटींच्या कंत्राटावरून सध्या रणकंदन पेटल आहे. वॉटर ग्रेस आणि क्रिस्टल या दोन्ही कंपन्या कंत्राटासाठी न्यायालयात गेल्या आहे. त्यामुळे सध्या हा वाद न्यायालयात असल्याने साधुग्रामची स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. साधुग्राममध्ये साधू राहण्यास आल्याने स्वच्छतेसाठी महापालिकेची धावपळ सुरू झाले आहे. हा वाद मिटेपर्यंत स्थानिक बेरोजगारांना काम देण्याची मागणी वाल्मिकी मेघवाळ मेहतर समाज संघर्ष समितीने केली आहे. त्यातच आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी रामकुंड आणि भाविक मार्गाच्या स्वच्छतेचा ठेका दिलेल्या ठेकेदाराकडून साधुग्रामची साफसफाई शुक्रवारी सुरू केली. जवळपास ६०० कर्मचारी दाखल झाल्याने मेघवाळ समाजाने त्यावर आक्षेप घेतला. कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांचे कामबंद पाडण्याचा प्रयत्न मारू आणि त्यांच्या समर्थकांनी केला. त्यामुळे तणाव निर्माण झाल्याने आयुक्त आणि महापौरांनी हस्तक्षेप केला. महापौर अशोक मुर्तडक यांनी घटनास्थळी जाऊन मेघवाळ समाजाच्या पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. महापौरांनी समजूत काढल्यानंतर स्वच्छतेच्या कामाला सुरुवात झाली.

प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत आम्ही फुटक काम करतो अशी मागणी मारू यांनी केली. न्याय प्रविष्ठ बाब असतांना आयुक्तांनी परस्पर काम देण्याच्या भूमिकेवर मेघवाळ समाजाने आक्षेप घेतला आहे. या संपूर्ण ठेक्याच्या प्रकरणात आयुक्तांची भूमिका संशयास्पद असून ठेकेदारांच्या भल्यासाठी काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर आरोग्य विभागाने रामकुंड आणि भाविक मार्गावर असलेल्या ठेकेदारांच्या कर्मचाऱ्याकडूनच काम केले जात असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणात कोणतीही गडबड नसून आहे त्याच मॅनपॉवर मध्ये काम केले जात असल्याचा दावा केला आहे.

आम्ही फुकटात काम करतो

महासभा व स्थायी समितीने स्थानिक बेरोजगारांना स्वच्छतेचे काम द्या, असा ठराव केला आहे. त्यामुळे हे काम आम्हालाच मिळायला हवा, असा आग्रह वाल्मिकी मेघवाळ मेहतर समाज संघर्ष समितीचा आहे. न्याय प्रविष्ठ बाब असेल तर निकाल लागेपर्यंत आम्ही फुकटात काम करतो, अशी भूमिका घेतली. तर प्रशासन ठेकेदाराकडूनच काम करून घेण्यास इच्छूक आहे. त्यामुळे हा वाद आणखीन पेटला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध गौणखनिजांची वाहतूक सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गौण खनिजांची अवैध वाहतूक टाळण्याची हमी देणाऱ्या वाहतूकदारांनी संप मागे घेतला असला तरी अजूनही अवैध वाहतूक पूर्णत: बंद झालेली नाही. ११ जुलै ते २३ जुलै या कालावधीत गौण खनिज विभागाने अवैध वाहतूक करणाऱ्या ८४ गाड्या पकडल्या असून, त्यांच्याकडून ११ लाखांहून अधिक दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजे गुरुवारी एकाच दिवसात पाच वाहनांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांच्या संघटनांनी जिल्हा प्रशासनाकडून अन्यायकारक कारवाई केली जात असल्याचा आरोप करीत ४ जुलैपासून वाहतूक बंदचे हत्यार उपसले होते. ऐन ‌सिंहस्थ काळात पुकारण्यात आलेला हा बंद बेकायदेशीर असल्याचा दावा करीत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर वाहतूकदारांनी बंदची तलवार म्यान केली. बंदला शंभर टक्के प्र‌तिसाद मिळत असल्याचा दावा वाहतूकदार संघटनांनी केला होता. मात्र, या काळात केवळ वाळूची वाहतूक बंद होती. मुरूम, खडी, दगड यासारख्या गौण खनिजांची वाहतूक सुरूच होती, असे गौण खनिज विभागाने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होते.

११ ते २३ जुलै या कालावधीत गौण खनिज विभागाने अवैध वाहतूक करणारी ८४ वाहने पकडली. त्यांच्याकडून ११ लाख ११ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अर्थात यामध्ये वाळूची वाहतूक करणाऱ्यांची संख्या कमी असल्याची माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी एम. पी बऱ्हाणपूरकर यांनी दिली.

गुरुवारी गौण खनिज विभागाच्या पथकाने बेकायदा वाळू वाहतूक करणारे तीन ट्रक, एक ट्रॅक्टर याखेरीज एक ट्रक्टर मुरूमाची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यापैकी दोन वाहने निफाड येथे तर एक वाहन वडाळीभोई येथे पकडण्यात आले.

बनावट पावतीद्वारे धुळफेक

राहाता येथील वाळूचा लिलाव झाला नसतानाही तेथून नाशिक जिल्ह्यात वाळू आणल्याचा प्रकार काल पथकाने केलेल्या तपासणीत पुढे आला. विशेष म्हणजे हे वाहन पकडल्यानंतर वाहनचालकाने वाहतुकीचा परवानाही दाखविला. मात्र राहाता येथील वाळूचा लिलावच न झाल्याने पावतीबाबत पथकाला संशय आला. त्यांनी तेथील संबंधित तहसीलदारांकडून माहिती घेतली असता लिलाव झाला नसल्याचे सांगितले. बनावट पावत्या वापरून त्याद्वारेही वाळूची एका जिल्ह्यातून वाहतूक होत असल्याचा प्रकार अधिकाऱ्यांच्या सजगतेमुळे पुढे आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण समिती सभापतीच्या निवडणूक तारखेकडे लक्ष

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या शिक्षण समितीच्या सभापतीपदाच्या निवडीसंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची प्रत महापालिकेच्या वतीने विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांना शुक्रवारी सादर केली. निकालाच्या आधारावर विभागीय आयुक्त महापालिकेला निवडणुकीची कोणती तारीख देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, संबंधित आदेश हा संदिग्ध असून, अंतिम निकाल ४ ऑगस्टला होणार असल्याचा दावा जय कोतवाल यांनी केला आहे.

शिक्षण समिती स्थापन करण्याचा आणि सभापती निवडीचा ठराव निलंबित करण्याचा राज्य सरकारच्या आदेशाला स्थगिती देवून निवडणूक घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. उच्च न्यायालयाने दिलेल्या या निकालाची प्रत याचिकाकर्ते संजय चव्हाण यांनी पालिका आयुक्तांना सादर केली. पालिका आयुक्तांनी ही प्रत आता विभागीय आयुक्तांकडे रवाना केली आहे. विभागीय आयुक्त आता या निकालाचा अभ्यास करून निवडणूक तारीख जाहीर करतील. त्यामुळे या निवडणुकीच्या तारखेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

दुसरीकडे उच्च न्यायालयाचा आदेश हा संदिग्ध असून, त्यावर अंतिम निर्णय हा ४ ऑगस्टला होणार असल्याचा दावा शिक्षण मंडळ माजी सदस्य जय कोतवाल यांनी केला आहे. संजय चव्हाण यांनी त्यांचा दावा फेटाळून लावला आहे. त्यामुळे समितीचा वाद कायम आहे. विभागीय आयुक्त न्यायालयाचे निकालपत्र तपासून निवडणुकीची तारीख जाहीर करतील. कारण या निकालावर मंडाळाच्या सदस्यांनी आक्षेप घेतले आहेत. त्यामुळे आयुक्तांच्या कोर्टात चेंडू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आणखी पाच मोठे प्रोजेक्टस्

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहर परिसरात रिअल इस्टेट क्षेत्राचे वाढलेले महत्त्व लक्षात घेता येत्या सहा महिन्यात आणखी पाच ते सहा नवीन प्रकल्प येण्याची शक्यता आहे. खासकरून सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या घरांचे हे प्रकल्प राहणार असून, याद्वारे या क्षेत्रात मोठी उलाढाल होण्याची चिन्हे आहेत.

सेकंड होम म्हणून परिचित असलेल्या नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्राचे महत्त्व दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. देशाची राजधानी असलेल्या मुंबई शहरापासून असलेली जवळीकता आणि आल्हाददायक हवामान यामुळे नाशिक हे वास्तव्यासाठी पसंतीचे ठरत आहे. खासकरून सेवानिवृत्त झालेल्यांचा ओढा नाशिककडे आहे. पाण्याची मुबलक उपलब्धता आणि विविध प्रकारच्या सोयी-सुविधांमुळे नाशिकचे राहणीमानही उंचावत आहे. हीच बाब लक्षात घेऊन रिअल इस्टेट क्षेत्रातही मोठ्या घडामोडी घडत आहेत. गेल्या पाच ते सहा महिन्यात शहरामध्ये दोन मोठे गृह प्रकल्प जाहीर झाले आहेत. यातील एक प्रकल्प केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे.

प्रत्यक्षातील मागणी लक्षात घेता येत्या काळात शहर परिसरात किमान पाच मोठे प्रोजेक्टस् येण्याची शक्यता या क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली आहे. खासकरून परवडणाऱ्या घरांचे हे प्रकल्प राहणार असून, त्यास नाशिककरांचा प्रतिसाद लाभण्याचा आशावाद बांधकाम क्षेत्रातून व्यक्त केला जात आहे. या नव्या प्रोजेक्टसमुळे परवडणारी घरी मिळाल्यास बांधकाम व्यवसायाला मोठा बूस्ट मिळणार असून, यामुळे सर्वसामान्यांचे स्वप्नही साकार होईल.

शहर परिसरात परवडणाऱ्या घरांचे किमान पाच प्रोजेक्टस् येणार आहेत. त्यामुळे शहरातील रिअल इस्टेटला पुन्हा बूस्ट मिळेल. नाशिककरांच्या पसंतीस उतरतील असेच हे प्रोजेक्टस् राहतील, अशी आम्हाला खात्री आहे.

- जयेश ठक्कर, अध्यक्ष, क्रेडाई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images