म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड
बोगस सहकारी संस्था रद्द करण्यासाठी सरकारने मोहीम हाती घेतली आहे. सहकार क्षेत्रातील अपप्रवृत्तींना आळा बसावा आणि ठेवीदारांचे पैसे सुरक्षित राहावेत म्हणून राज्य सरकार प्राधिकरण स्थापणार असल्याची माहिती सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी रविवारी येथे दिली.
नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेतर्फे एटीएम कार्डव्दारे विविध सेवा सुरू झाल्या आहेत. त्यांचा प्रारंभ केल्यानंतर ते बोलत होते. बँकेचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय पेखळे यांनी प्रास्तविक तर उपाध्यक्ष शाम चाफळकर यांनी स्वागत केले. शिवसेचे उपनेते बबनराव घोलप, आमदार बाळासाहेब सानप, योगेश घोलप, जयंत जाधव, सीमा हिरे, बँकेचे संचालक निवृत्ती अरिंगळे, दत्ता गायकवाड, मनोहर कोरडे, रंजना बोराडे, रामदास सदाफुले, अजित बने, एकनाथ कदम, अर्बन बँक्स फेडरेशनचे संचालक भास्कराव कोठावदे, अजय ब्रम्हेचा आदी व्यासपीठावर होते.
पारदर्शी कारभाराच्या बळावर नाशिकरोड बँकेची प्रगती झाली आहे. असेच कार्य सहकार क्षेत्रात अपेक्षित असल्याचे सांगून भुसे म्हणाले की, मूठभर लोकांमुळे सहकार मोडकळीस आले आहे. राज्यात सव्वादोन लाख सहकारी संस्था आहेत. त्यांचे कामकाज तपासण्याची मोहीम सुरू झाली आहे. 15 डिसेंबरपर्यंत 50 हजार बोगस संस्था रद्द केल्या जातील. रायसोनीसारख्या मोठ्या संस्थेत ठेवीदारांचे सहाशे कोटी रुपये अडकले आहेत. सहकारी पतसंस्थांमधील ठेवीदारांचे पैसे सुरक्षित राहण्यासाठी सरकार प्राधिकरण स्थापन करणार आहे. घोलप म्हणाले की, सहकाराचा स्वाहाकार झाला असताना नाशिकरोड बँकेने नियमांचे पालन करत तसेच संचालक मंडळ आणि कर्मचा-यांच्या बळावर नावलौकिक मिळवला आहे. अशा संस्थांमुळेच सहकार टिकला आहे. यावेळी मान्यवरांची भाषणे झाली. संचालक सुधाकर जाधव यांनी सूत्रसंचलन केले. संचालक मनोहर कोरडे यांनी आभार मानले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट