साधुग्रामच्या जागेचे हस्तांतरण होऊन सात दिवस उलटून गेले असले तरी जागा वाटपाचा तिढा कायम राहिला आहे. साधुग्राममधील प्लॉट अप्रमाणीत असून, त्यावर नंबर टाकण्यात आलेले नाही. प्रशासनाचे आणि आखाड्याचे प्लॉट नेमके कोणते, याबाबत अजूनही संभ्रम असून, या गोंधळामुळे शनिवारी संध्याकाळीपर्यंत एकाही प्लॉटचे वाटप करणे शक्य झालेले नाही.
तपोवनात २००३ साली साधुग्रामसाठी २०० एकर जागा आरक्षित करण्यात आली होती. यंदाच्या कुंभमेळ्यासाठी त्यात १५० एकरची वाढ करण्यात आली. एकूण ३५० एकर जमिनीवर साधुग्राम उभारण्यात आला असून, त्यात तीन लाख २० हजार साधुमहंताच्या निवासाची सोय करण्यात आली आहे. प्रशासनाने साडेतीनशे एकरमध्ये ३०० चौरस मीटरचे १ हजार ५३७ प्लॉट तयार केले आहेत. या प्लॉटमध्ये टॉयलेटससह बाथरूमची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, जमीन हस्तांतरीत करण्यापूर्वीच अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज यांनी टॉयलेटस व बाथरूमच्या जागेसह सर्व्हिसरोडबाबत हरकत घेतली. महंताच्या आक्षेपानुसार शक्य ते बदल केले जातील, असे प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतर गत सोमवारी प्रशासनाने साधुग्रामची जागा आखाडा परिषदेकडे सोपवली. मात्र, यानंतर जागा वाटापावरून दिंगबर आखाड्याचे महंत रामकिशोरदास महाराज आणि ग्यानदास महाराज यांच्यात खटके उडाले. हा वाद महंतांनी आपआपसात गुरूवारी मिटवला. त्यामुळे शुक्रवारपासून जागा वाटपाचे काम सुरू होईल, अशी अपेक्षा सर्वांना होती. मात्र, प्रशासनाच्या धोरणांमुळे यास फाटा बसला.
याबाबत माहिती देताना रामकिशोरदास महाराज यांनी सांगितले की, साधुग्राममधील ४०० प्लॉट प्रशासन खासगी संस्थाना देणार आहेत. ते प्लॉट नेमकी कोणते आहेत, याची आम्हाला माहिती नाही. उपस्थित अधिकारीही त्याबाबत अनभिज्ञ आहेत. आम्ही आज जागा वाटप केली आणि प्रशासनने ती पुन्हा परत मागितली तर अडचण निर्माण होऊ शकते. तसेच काही प्लॉटमध्ये फक्त टॉयलेटस तर काही प्लॉटमध्ये फक्त बाथरूम येतात. सर्वत्र सावळा गोंधळ असून, त्यावर प्रशासनाने पर्याय सुचवणे अपेक्षीत आहे. साधुग्राममध्ये २८ हजार २४७ मीटर लांबीची सिव्हेज पाईप लाईन टाकण्यात आली असून, त्यात बदल होणार नाही. मग, आलेल्या साधुमहंताच्या निवसाची सोय करायची तरी कशी असा प्रश्न आहे. गत कुंभमेळ्यात प्लॉटला नंबर देण्यात आले होते. यावेळेस अशी तजवीज नसल्याने सीमा निश्चित करताना अडचणी निर्माण होत आहेत. शनिवारी संध्याकाळपर्यंत एकाही प्लॉटचे वाटप करणे शक्य झाले नसल्याचे महंत रामकिशोरदास महाराज यांनी स्पष्ट केले.
प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे सर्वत्र गोंधळ निर्माण झाला आहे. लवकरात लवकर प्लॉट ताब्यात मिळाले तरच त्यावर तंबू उभारण्याचे काम सुरू होईल. वॉटरप्रुप काम करताना वेळ लागू शकतो. मात्र, प्रशासन अजूनतरी याबाबत गंभीर नसल्याचे दिसते.
महंत रामकिशोरदास महाराज, दिगंबर आखाडा
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट