कसमादे कार्यक्षेत्र असलेल्या विठेवाडी (ता. देवळा) येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यावर अखेर प्रशासक मंडळाची वर्णी लागली आहे. गेल्या १८ महिन्यापासून बंद असलेल्या कारखान्याची चाके भविष्यात पुन्हा रूळावर येतील, असा विश्वास ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. या प्रशासक मंडळावर जिल्हा उपनिबंधक जी. जी. मावळे व शिखर बँकेचे व्ही. के. पकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अहमदनगर येथील प्रादेशिक सहसंचालक मिलिंद भालेराव यांनी विठेवाडी येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यावर द्विस्तरीय प्रशासक मंडळाची नियुक्ती करून गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या वसाकाच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. तत्कालीन चेअरमन डॉ. जे. डी. पवार यांच्या गुरुदत्त पॅनलची एकहाती सत्ता असताना वसाका कामगारांनी आपल्या थकीत १९ महिन्यांच्या पगारांची मागणी केली होती.
यांनतर दि. २ फेब्रुवारी २०१२ रोजी वसाकाचे चेअरमन डॉ. जे. डी. पवार यांनी आपल्या समर्थक संचालकासह राजीनामे सादर केले होते. तेव्हापासून कारखाना बंद स्थितीत आहे. यानंतर वसाका चालविण्यास देण्यासाठी विद्यमान संचालक डॉ. दौलतराव आहेर यांच्यासह माजी चेअरमन शांताराम तात्या आहेर यांनी कमालीचे प्रयत्न केले. खासगी कंपनीमार्फत वसाका चालविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
मात्र, अनेक तांत्रिक अडचणींमुळे अपयश आले. या दरम्यान संचालक शांताराम आहेर यांनी आपल्या समर्थक संचालकासह राजीनामा दिल्याने संचालक मंडळ अल्पमतात आल्याने वसाकावर प्रशासकांची नियुक्ती होण्याचा मार्ग सुकर झाला होता. वसाका कामगारांचे कारखान्याकडे सुमारे ३० कोटी रुपये घेणे असून, राज्य शिखर बँकेसह अन्य बँका व व्यापाऱ्यांचे सुमारे २३० कोटी रूपयांची घेणी आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासक म्हणून जिल्हा उपनिबंधक जी. जी. मावळे व शिखर बँकेचे व्ही. के. पकाळ यांची नियुक्ती झाल्याने ते पुढील कामकाजाची दिशा कशी ठरवितात, यावर पुढील घडामोडी निश्चित होणार आहेत. यामुळे कधी चाके फिरतात याकडे लक्ष लागले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट