राज्य सरकारच्या अल्पसंख्यांक विभागाने २९ जून रोजी राज्य वक्फ मंडळाच्या अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर केली आहे. यापूर्वी वक्फ बोर्डाला अध्यक्षपद मिळावे, यासाठी सुरू असलेली न्यायालयीन लढाई तारीख पे तारीखमुळे रेंगाळली होती. या संदर्भातील वृत्तही महाराष्ट्र टाइम्सने प्रसिध्द केले होते.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात राज्य वक्फ बोर्ड सदस्यांनी याचिका दाखल केली होती. अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा करून देण्यासाठी शासन नियुक्त सदस्यांची नियुक्ती राज्य सरकारने त्वरित करण्याची मागणी केली होती. मात्र, सुनावणी तारीख पे तारीख फेऱ्यात अडकल्याने वक्फ बोर्डाला अध्यक्ष मिळण्याची आशाही धुसर होत होती. राज्य सरकाराने राज्य वक्फ बोर्डाला शासन नियुक्त सदस्यांची नियुक्त्यांच्या फेऱ्यात न पडता सध्या आहे त्या सदस्यांमधून अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरू करून दिली आहे. येत्या २९ जून रोजी मुंबईच्या मंत्रालयातील विस्तारीत कक्षात सकाळी अकरा वाजता सदस्यांची विशेष सभा बोलावण्यात आली आहे. याच सभेत राज्य वक्फ बोर्डाचे सात वर्षांपासून रिक्त असलेले अध्यक्षपद निवडणुकीच्या माध्यामातून निवडले जाईल.
राज्य वक्फ बोर्डात गेल्या सात वर्षांपासून अध्यक्षपद रिक्त होते. राज्य सराकारने अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर केली असून, तसे आदेश प्राप्त झाले आहेत. २९ जून रोजी मुंबईत राज्य वक्फ बोर्डचा नवीन अध्यक्ष निवडणुकीच्या माध्यामातून निवडला जाईल.
- सय्यद एजाज हुसेन, मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) राज्य वक्फ बोर्ड औरंगाबाद
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट