अरविंद जाधव, नाशिक
सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान शाहीस्नानासाठी तब्बल ७० ते ८० लाख भाविक येण्याची शक्यता असून, याचा ताण मोबाइल नेटवर्कवर पडणार आहे. यामुळे मोबाइल यंत्रणा कोसळली तर प्रशासनाच्या नियोजनाचे तीन तेरा वाजू शकतात. या पार्श्वभूमीवर भारत संचार निगम लिमिटेडतर्फे रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या मदतीने सुरू राहणारे विशेष फोन उपब्लध करून देण्यात येणार आहेत. यामुळे नाशिक व त्र्यंबकेश्वरमधील अधिकारी एकमेकांशी संवाद साधू शकतील.
सिंहस्थादरम्यान मोबाइल टॉवर कंपन्यांवर ग्राहकांचा अतिरिक्त भार पडणार आहे. बीएसएनएल वगळता इतर खासगी मोबाइल ऑपरेटर्संनी फक्त सिंहस्थ म्हणून सेवा विस्तार करण्यास अनुकूलता दर्शवलेली नाही. एका टॉवरसाठी ४० ते ४५ लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. जागेचाही प्रश्न आहे. बीएसएनएलने मात्र आहे त्यापेक्षा ५० टक्क्यांपेक्षा अधिक आपल्या क्षमतेमध्ये वाढ केली आहे. टॉवरची संख्या लक्षणीयरित्या वाढविण्यात आली असून, आपत्तकालीन परिस्थितीत अडचण नको म्हणून मुंबईच्या दिशेने कल्याण-वाडामार्गे पर्यायी केबल टाकण्यात आली आहे. यामुळे किमान पर्वणी दरम्यान त्र्यंबकेश्वरमध्ये नेटवर्कचा प्रश्न उद्भवणार नाही.
गर्दीचे नियोजन करण्यासाठी गुंतलेल्या प्रशासनातील सर्व विभागांना सातत्याने एकमेकांशी संवाद साधावा लागणार आहे. संवादात खंड पडू न देता हे काम होणे अपेक्षित आहे. साधारणतः प्रत्येक टॉवरची कॉल घेण्याची व पाठवण्याची क्षमता निर्धारीत असते. त्यात अचानक खूप वाढ झाल्यास सर्व यंत्रणाच बंद पडू शकते. या पार्श्वभूमीवर बीएसएनएलतर्फे सर्वच विभागातील अधिकाऱ्यांना विशेष मोबाइल पुरवण्यात येणार आहे. या मोबाइलची संख्या सुमारे एक हजाराच्या आसपास आहे. विशेष म्हणजे एखाद्या टॉवरची रेंज फारतर दोन किलोमीटरपर्यंत असू शकते. याउलट या फोनची रेंज किमान २५ किलोमीटरपर्यंत असते. म्हणजेच नाशिक तसेच त्र्यंबकेश्वरमधील अधिकारी बीएसएनएलच्या 'त्या' फोनच्या मदतीने संवाद साधू शकतील. यासाठी टॉवरकडून मिळणाऱ्या रेंजची आवश्यकता असणार नाही. सदर फोन उपलब्ध करून देण्याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बीएसएनएलची अनेक कामे पूर्णत्वास पोहचली आहे. सिंहस्थ काळात संवादात खंड पडणार नाही, या दृष्टीने सर्व नियोजन आखले असून, किमान एक हजार फोनचे वाटप केले जाणार आहे. नारायण पोटोळे, - जनसंपर्क अधिकारी, बीएसएनएल
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट