म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज यांनी गुरूवारी पालकमंत्र्यांसमोर वस्रांतरगृहाचा वाद उकरून काढत, ते पाडण्याची मागणी केली. त्यामुळे वस्रांतरगृहाचा वाद पुन्हा उफाळून आला असून, पुरोहित संघ आणि साधुमंहताच्या वादात प्रशासनातील अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधी भरडले जात आहेत.
सिंहस्थ कुंभमेळा सुरू होण्यापूर्वीच साधुमंहताच्या हट्टाहासाने प्रशासकीय यंत्रणा हैराण झाली आहे. त्यातच साधुमहंत विरूद्ध पुरोहित संघ असा वाद उफाळल्याने यंत्रणाच अधिक बेजार झाली आहे. तीन महिन्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महंत ग्यानदास यांनी रामकुंडावरील वस्रांतरगृह पाडण्याची मागणी केली होती. पालकमंत्र्यांनीही घाईघाईत ते पाडण्याची घोषणा केली. या वस्रांतरगृहात पुरोहित संघाचे कार्यालय असून, त्याचे नियंत्रण सतीश शुक्ल करतात. वस्रांतरगृहाचा भाविकांकडून कपडे बदलण्यासाठी केला जात असून, त्याला पाडण्यास पुरोहित संघाने विरोध केला आहे. सोबतच या मागणीमागे शुक्ल आणि धनंजय बेळे यांच्यातील वाद कारणीभूत असल्याची चर्चा पुढे आली. पुरोहीत संघाने राजकीय ताकद वापरून थेट नागपूरहून दबाव आणत, या विषयावर पडदा पाडला होता. मात्र पुन्हा हा वाद उकरून काढल्याने अडचणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.
'वस्रांतरगृह पाडले नाही तर, कुंभात स्नान करणार नाही,' असा इशारा ग्यानदास महाराजांनी दिला आहे. पालकमंत्री महाजन यांच्या भेटीतही ग्यानदास महाराजांनी पूर्ण किंवा अर्धे वस्रांतरगृह पाडा असा हट्ट धरला. त्यामुळे पालकमंत्र्याच्या अडचणी वाढल्या असून, याबाबत पालकमंत्र्यांनी ग्यानदास यांची भेट घेत त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र ते हट्टावर
कायम असल्याने पेच निर्माण झाला आहे.
मुख्यमंत्री हवेतच...
ध्वजारोहण सोहळ्याच्या पंतप्रधानांना दिलेल्या निमंत्रण प्रक्रियेत पुरोहित संघाने डावल्याने ग्यानदास महाराज नाराज आहेत. त्यामुळे २९ ऑगस्टला होणाऱ्या पहिल्या शाही स्नानाला मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांना हजर करण्याचा दम ग्यानदास महाराजांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांना भरला आहे. यामुळेही नवीन पेच निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट