Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

ग्यानदासांच्या हट्टापुढे बेजार

0
0

पुरोहितविरुद्ध साधुमहंताच्या वादात भरडताहेत अधिकारी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज यांनी गुरूवारी पालकमंत्र्यांसमोर वस्रांतरगृहाचा वाद उकरून काढत, ते पाडण्याची मागणी केली. त्यामुळे वस्रांतरगृहाचा वाद पुन्हा उफाळून आला असून, पुरोहित संघ आणि साधुमंहताच्या वादात प्रशासनातील अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधी भरडले जात आहेत.

सिंहस्थ कुंभमेळा सुरू होण्यापूर्वीच साधुमंहताच्या हट्टाहासाने प्रशासकीय यंत्रणा हैराण झाली आहे. त्यातच साधुमहंत विरूद्ध पुरोहित संघ असा वाद उफाळल्याने यंत्रणाच अधिक बेजार झाली आहे. तीन महिन्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महंत ग्यानदास यांनी रामकुंडावरील वस्रांतरगृह पाडण्याची मागणी केली होती. पालकमंत्र्यांनीही घाईघाईत ते पाडण्याची घोषणा केली. या वस्रांतरगृहात पुरोहित संघाचे कार्यालय असून, त्याचे नियंत्रण सतीश शुक्ल करतात. वस्रांतरगृहाचा भाविकांकडून कपडे बदलण्यासाठी केला जात असून, त्याला पाडण्यास पुरोहित संघाने विरोध केला आहे. सोबतच या मागणीमागे शुक्ल आणि धनंजय बेळे यांच्यातील वाद कारणीभूत असल्याची चर्चा पुढे आली. पुरोहीत संघाने राजकीय ताकद वापरून थेट नागपूरहून दबाव आणत, या विषयावर पडदा पाडला होता. मात्र पुन्हा हा वाद उकरून काढल्याने अडचणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

'वस्रांतरगृह पाडले नाही तर, कुंभात स्नान करणार नाही,' असा इशारा ग्यानदास महाराजांनी दिला आहे. पालकमंत्री महाजन यांच्या भेटीतही ग्यानदास महाराजांनी पूर्ण किंवा अर्धे वस्रांतरगृह पाडा असा हट्ट धरला. त्यामुळे पालकमंत्र्याच्या अडचणी वाढल्या असून, याबाबत पालकमंत्र्यांनी ग्यानदास यांची भेट घेत त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र ते हट्टावर

कायम असल्याने पेच निर्माण झाला आहे.

मुख्यमंत्री हवेतच...

ध्वजारोहण सोहळ्याच्या पंतप्रधानांना दिलेल्या निमंत्रण प्रक्रियेत पुरोहित संघाने डावल्याने ग्यानदास महाराज नाराज आहेत. त्यामुळे २९ ऑगस्टला होणाऱ्या पहिल्या शाही स्नानाला मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांना हजर करण्याचा दम ग्यानदास महाराजांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांना भरला आहे. यामुळेही नवीन पेच निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


२५ टक्के ड्रायव्हिंग लायसन्स ‘बोगस’

0
0

रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरींचा दावा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ड्रायव्हिंग लायसन्स देण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांचा फोन येणे तर कधी भष्ट्राचारमुळे अयोग्य व्यक्तिच्या हाती लायसन्स पडणे चुकीचे आहे. आपल्याकडे लायसन्स देण्यासाठी कम्प्युटराईज्ड सुविधांचा अभाव असून, किमान २५ टक्के वाहनचालकांकडे बोगस ड्रायव्हिंग लायसन्स असल्याचा दावा रस्ते परिवहन, महामार्ग तथा जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केल्याने प्रादेशीक परिवहन खात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तर सरकारी नोकऱ्या टिकवण्यासाठी काही चालक अक्षरशः आंधळे असताना वाहने हाकत असून, विदेशमंत्री सुषमा स्वराज यांच्यासह दिग्वीजय सिंग यांच्या चालकांना दृष्टीदोष असल्याचेही त्यांनी सांगितले.

एव्हीइएस या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्‌घाटन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी आयोज‌ित कार्यक्रमात ते बोलत होते. वाहन चालवण्याची समज नसताना वाहने हाकणाऱ्या चालकांमुळे अपघातांची संख्या वाढली आहे. देशात दरवर्षी ५ लाख अपघातांची नोंद होत असून, अपंगत्व आलेल्या आणि मयत झालेल्यांची संख्या काही लाखांत पोहचली आहे. अपघात कमी करण्यासाठी परिवहन विभागाची ई-गर्व्हनसच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.





इंधन आयातीपेक्षा इथेनॉल बरा

देशाचा खूप मोठा पैसा इंधन आयात करण्यावर खर्च होतो आहे. याचा परिणाम थेट विकासावर होत असून, यापुढे अपांरपरीक ऊर्जा साधनांचा वापर वाढव‌िण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट असल्याचे गडकरींनी स्पष्ट केले. बायो डिझेल, इथेनॉल, इलेक्ट्रीक व बॅटरी यांचा वापर अनिवार्य ठरत आहे. नागपूरमध्ये सध्या इथेनॉलवर एक बस धावते. नाशिकसह पश्च‌िम महाराष्ट्रात साखर कारखाने इथेनॉलची निर्मिती करतात. त्याचा वापर केला गेल्यास शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले. अनेक दृष्टीने महत्वाच्या ठरणाऱ्या 'दि रोड सेफ्टी ट्रान्सपोर्ट अँड सेफ्टी बिल २०१४ कायद्यात चांगल्या तरतुदींचा समावेश आहे. नियम भंग करणाऱ्या वाहनचालकांवर यामुळे कडक कारवाई होऊ शकते. वाढत्या अपघाताच्या संख्येला ब्रेक लावण्यासाठी हे गरजेचे आहे. मात्र, ई गर्व्हनसमुळे भ्रष्टाचार करणाऱ्यांचा पोटशुळ उठला. ते सध्या विरोध करीत असल्याचा टोला गडकरी यांना लगावला.

गडकरी उवाच...

रस्ते वाहतुकीला जलमार्गांचा पर्याय

विजनिर्मितीसाठी सांडपाण्याचा वापर वाढवणार

काही सरकारी वाहनचालक दृष्यता तपासणीचे सत्य लपवतात

सक्षम बॅटरी निर्मितीसाठी इस्त्रोची मदत घेणार

आरटीओचे काम कम्पुटराईज्ड करणार

ड्राईव्हिंग लायसन्स कम्प्युटरच्या मदतीने देणार.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिंदे येथील टोलबाबत नितीन गडकरींना साकडे

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिक-सिन्नर मार्गावर टोल नाका सुरू करुन नाशिकचे कोल्हापूर होऊ देऊ नका, अशी मागणी शिवसेनेने केंद्रीय रस्ते व वाहुतक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. शिंदे येथील टोलप्लाझा रद्द करा किंवा सिन्नरपर्यंतच्या रस्त्याचे पैसे सरकारने भरावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

नाशिक दौ-यावर आलेल्या गडकरींना खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. नाशिक-सिन्नर या २५ किलोमीटर मार्गाचे चौपदरीकरणाचे काम चेतक एंटरप्राइझेसला मिळाले आहे. या मार्गावरील टोल प्लाझाची मुदत १८ वर्ष असेल. त्यातील दोन वर्षे बांधकामासाठी आहेत. हा कालावधी ३० एप्रिल २०१५ पासून सुरू झाला आहे. नाशिक-पुणे दोनशे कि.मी. मार्गावर पाच टोल असून, त्यात शिंदेचा समावेश आहे. हा प्रकल्प नाशिक-सिन्नरला जोडणार आहे. सिन्नरला दोन एमआयडीसी व इंडिया बुल्सचा सेझ प्रकल्प आहे. येथील बहुतांश कामगार नाशिकला वास्तव्यास आहेत. येथील शेतकऱ्यांचा भाजीपाला वाहनांव्दारे नाशिकला आणला जातो. शिंदे गावच्या परिघात नाशिक महापालिका, सिन्नर पालिका व तीस चाळीस खेडे येतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दूषित पाण्यावरून कानउघडणी

0
0



दसक व टाकळी घाटाबाबत हायकोर्टाकडून विचारणा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिव्हेज ट्रिटमेंट प्लांटमधून (एसटीपी) बाहेर पडणारे पाणी प्रदूषित असताना त्यात भाविकांना स्नान करण्याची परवानगी देणार काय? असा सवाल हायकोर्टाने उपस्थित करीत याबाबत पुढील गुरूवारपर्यंत प्रतिज्ञपत्र सादर करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. ऐन कुंभमेळ्याच्या तोंडावर कोर्टाने कडक भूमिका घेतल्याने प्रशासनाची धांदल उडाली आहे.

गोदावरी नदी प्रदूषणाबाबत मुंबई हायकोर्टात मागील वर्षी याचिका दाखल करण्यात आली. सुनावणीदरम्यान या​चिकाकर्त्यांनी मनुष्यांना नदी पात्रात जाण्यास व पाण्याचा वापर करण्यास बंदी घालण्यात यावी, अशी मागणी प्रतिज्ञापत्राद्वारे कोर्टाकडे केली. या प्रतिज्ञापत्राबाबत आज, गुरूवारी सुनावणी झाली. तपोवन परिसरातील एसटीपीमधून बाहेर पडणाऱ्या पाण्यातील बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड (बीओडी) ३० पेक्षा जास्त असून, त्याअनुषंगाने याचिककर्त्यांनी अर्ज सादर केला आहे. हायकोर्टाने याबाबत नेरीच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली. त्यात त्यांनी हे पाणी वापरायोग्य नसल्याचा खुलासा दिला. यावर राज्य सरकारने आठ दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. गुरूवारी होणाऱ्या सुनावणी दरम्यान उच्च समितीच्या सदस्यासह नेरीच्या अधिकाऱ्यांना हजर राहण्याबाबत कोर्टाने आदेश दिले आहेत.

घाटांचा वापर होणार?

कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांचे विकेंद्रीकरण होण्यासाठी प्रशासनाने टाकळीसह दसक येथे नवीन घाट उभारले आहेत. औरंगाबाद, नाशिकरोड मार्गे येणाऱ्या भाविकांना याठिकाणी घेऊन जाण्यात येणार आहे. मात्र, कोर्टाने प्रदुषीत पाण्याबाबत सरकारला तंबीच दिली असून जर याठिकाणी नदीपात्रात उतारण्यास भाविकांना बंदी घालण्यात आली तर काय? याबाबत अधिकाऱ्यांमध्ये खलबते सुरू आहे.

तात्पुरते पर्याय नकोच!

गंगापूर धरणातील पाणी पर्वणीदरम्यान सोडून पाण्याचे प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होणार आहे. याचिकाकर्ते राजेश पंडीत यांच्यासह इतरांनी हा पर्याय योग्य नसल्याचे म्हटले. कुंभमेळ्यादरम्यान स्नानासाठी ५० पेक्षा अधिक मुहूर्त आहेत. प्रत्येक मुहुर्ताला प्रशासन पाणी सोडणार काय? असा युक्तिवाद याचिककर्त्यांतर्फे करण्यात आला. गोदा प्रदूषणासाठी कायमस्वरूपी उपायांची आवश्यकता असल्याचे याचिककर्त्यांनी स्पष्ट केल्यानंतर कोर्टाने त्यांनाही प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रॉम्प्टन ग्रीव्हज तिढा जैसे थे

0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

अंबड औद्योगिक वसाहतीतील क्रॉम्प्टन ग्रीव्हिज कंपनीत कामगारांचे आंदोलन महिनाभरापासून सुरू आहे. नाशिकच्या औद्योगिक न्यायालयात गुरुवारी झालेल्या तारखेला प्रश्न न सुटल्याने १५ जून तारीख देण्यात आली आहे. महिनाभरापासून सुरू असलेल्या आंदोलनाने कामगार कुटुंबीय हवालदिल झाले आहेत. कामगार उपायुक्तांनी मध्यस्थी करूत संप मिटविण्याची मागणी कामगार वर्गातून होत आहे.

अंबड औद्योगिक वसाहतीतील नावाजलेल्या क्रॉम्प्टन ग्रीव्हिज लिमिटेड कंपनीतील कामगारांनी पगारवाढीच्या मुद्यावरून आंदोलनाची भूमिका घेतली आहे. यात कामगारांसह त्यांचे कुंटूंब सुद्धा सहभागी झाले आहेत. असे असतांना मात्र कामगार युनियन व कंपनी व्यवस्थापन यांच्यात समझोता होत नसल्याने कामगारांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे. दरम्यान, गुरूवारी औद्योगिक न्यायालयाने पुन्हा कंपनीला १५ जूनची तारीख दिली आहे.

याबाबत सीटू युनियनचे कामगार नेते डॉ. डी. एल. कराड यांना विचारले असता, त्यांनी कंपनी व्यवस्थापनाने कामगांना विश्वासात घेत पगारवाढीचा करार करण्याचे सांगितले. दोन विचार धारेच्या युनियनमधील हा वाद नसून, कंपनी व्यवस्थापन कामगारांना यात भरडत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अद्ययावत उपचारांची ओळख गरजेची

0
0

नाशिकमध्ये १३ व १४ जूनला राज्यस्तरीय बालरोगतज्ज्ञांची 'नाशिकॉन २०१५' ही परिषद होणार आहे. राज्यभरातील जवळपास ५०० बालरोगतज्ज्ञ यामध्ये सहभागी होणार आहेत. मुंबई-आग्रा हायवेवरील 'हॉटेल एक्स्प्रेस इन' येथे ही परिषद होणार आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भराडिया यांच्याशी संवाद साधला असता, बालरोगतज्ज्ञांनी अद्ययावत उपचार पध्दती समजून घेण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

'नाशिकॉन २०१५' परिषदेचा मुख्य उद्देश काय?

मेडिकल सायन्स खूप वेगाने बदलत असतं. पंधरा वर्षांपूर्वीच्या शिक्षणातील अनेक गोष्टी आता आऊटडेटेड झालेल्या असतात. त्यामुळे नवीन उपचार पध्दतींबाबत वेळोवेळी जाणून घेणे आवश्यक असते. याचा फायदा पेशंटवर उपचार करताना होतो. या क्षेत्रातील ताज्या बदलांचा आढावा घेत डॉक्टरांना या बदलांबाबत जागरूक करणे आणि उपयुक्त उपचारपध्दतींची ओळख करून देणे हाच या परिषदेमागील मुख्य उद्देश आहे.

सध्या लहान मुलांमध्ये आढळणाऱ्या सर्वाधिक आरोग्य समस्या कोणत्या?

बाळांचे वजन न वाढणे, वाढ खुंटणे, जन्मत:च हृदयाला छिद्र असणे, त्वचारोग अशा अनेक समस्या आज लहान मुलांमध्ये आढळतात. यावर अनेक उपचारही आज पुढे आले आहेत. केवळ त्यांची योग्य माहिती नसल्यामुळे अनेकदा समस्या जटील होते. अशा समस्यांवर उपचार करण्यासाठी अद्ययावत उपचार पध्दती माहिती असणे आवश्यक आहे.

प्रीमॅच्युअर्ड मूल जन्माला येण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर उपाय काय?

बरोबर आहे, हे प्रमाण आज वाढत आहे. पण, या मुलांचा सर्व्हायव्हल रेटही खूप चांगला आहे. जन्मापासून योग्य वेळेत योग्य ते उपचार करणे आवश्यक आहे. तसेच, अशा मुलांची वाढ योग्य प्रकारे होते की नाही याची सतत तपासणी केल्यास अशी मुले नॉर्मल वाढू शकतात. डाएट, स्ट्रेस, मल्टीपल प्रेग्नन्सी यामध्ये प्रीमॅच्युअर्ड डिलिव्हरी होण्याची शक्यता अधिक असते. या विषयावरही एक छोटे सेशन आम्ही परिषदेत समाविष्ट केले आहे.

या परिषदेमुळे नेमके काय साध्य होईल?

परिषदेचे विषय निवडतांना बालरोगतज्ज्ञांना दररोजच्या कामादरम्यान येणाऱ्या अडचणींचा आढावा घेण्यात आला होता. त्यानुसार यावर मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञांची निवड करण्यात आली. आज लसीकरणाबाबत पेशंटसोबत अनेक डॉक्टरांमध्येही गोंधळ आहे. तसेच, दररोज पेशंटवर उपचार करताना डॉक्टरांनाही अनेक समस्या येतात. त्यामुळे अशा विषयांवर ही परिषद मार्गदर्शनपर ठरणार आहे. मुख्य म्हणजे केवळ चर्चा नव्हे तर डॉक्टरांनी कोणत्या उपचारांचा अवलंब करायला हवा याची सखोल माहिती दिली जाणार आहे. परिषदेत राज्यभरातील पाचशे बालरोगतज्ज्ञ सहभागी होत आहेत. पुण्यातील बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रमोद जोग यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार असून ते 'वॅक्सिनेशनचे फायदे-तोटे' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. लहान मुलांच्या हृदयरोगाविषयी डॉ. भरत दळवी मार्गदर्शन करतील. त्याचबरोबर नवजात अर्भकांच्या त्वचारोग, खोकला, वाढीवरील परिणाम यावरही तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे.

(शब्दांकन: गायत्री काळकर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘फिटनेस’चा फंडा

0
0

>> सई बांदेकर

फिटनेस! तंदुरुस्तीला कधीच नव्हते इतके महत्त्व या शब्दाला आजच्या लाइफस्टाइलमध्ये आले आहे. म्हणजे आधी लोक या बाबतीत सजग नव्हते असे नक्कीच नाही. किंबहुना तेव्हाची जीवनशैली अशी होती की धडधाकट राहण्यासाठी खूप काही वेगळे करण्याची गरज नव्हती. व्यायाम, चालणे, पोहणे, सायकलिंग, योगा तेव्हाही होते. जिम्स आणि एरोबिक्स जरा नंतरचे. पण आजच्या फास्ट लाइफस्टाइलचे एक 'बाय-प्रॉडकट' म्हणून 'फिटनेस' ही संकल्पना सध्या एकदम जोमात आहे.

खरं तर ही आजच्या लाइफस्टाइलची नक्कीच एक चांगली बाजू आहे. मधल्या काळात फिटनेसच्या नावाने बऱ्यापैकी आनंदच होता. आता कमीतकमी यंगस्टर्समध्ये तेवढी जागरुकता आली आहे की ते फिटनेसकडे गांभीर्याने बघतात हे स्वागतार्हच आहे. एरवी व्यायाम म्हटले की कंटाळाच येतो, पण तोच व्यायाम मनोरंजनाचे आवरण घालून सादर केला तर तो आकर्षक आणि रोचक वाटतो. हाच फिटनेसचा बेसिक फंडा आहे! धावपळीचे आयुष्य हे आजच्या जनरेशनच्या रक्तात इतके भिनले आहे की जोश असल्याशिवाय कुठलीही गोष्ट त्यांच्या पटकन पचनी पडत नाही. म्हणूनच कुठेही फिरताना जीम आणि एरोबिक्सच्या बरोबरीने आसपास झुम्बा, पॉवर योगा आणि फिटनेसचे बोर्ड हमखास दृष्टीस पडतात. झुम्बा हे नावच कसलं आकर्षक आहे! आपोआप उत्साह संचारतो! हा खास करून लॅटीन म्युझिकवर केला जातो. पॉवर योगाचही तसच आहे! आपल्या शास्त्रशुद्ध योगाचा हा मॉडर्न अवतार. पिलाटेस व स्पायरल्सचा पण ट्रेण्ड हळूहळू रुजतो आहे.

या ट्रेण्डबद्दल रोहन मेहता फिटनेस एक्सपर्ट सांगतो की, 'आजकाल यंगस्टर्सच नाही तर एकूणच तब्येतीबाबत जागरुकता दिसते. फरक इतकाच की यंगस्टर्स सहसा बॉडी मेंटेन राहण्यासाठी याकडे आकर्षित होतात तर पस्तीशीतले तरुण लोक एकूणच तब्येत तंदुरुस्त रहावी म्हणून येतात.' तो पुढे सांगतो, की हे सगळे वर्कआउट्स बऱ्यापैकी म्युझिकच्या तालावर केले जातात. याला कारण म्हणजे फिटनेस हा केवळ बाह्य स्वरूपी नसून मन, शरीर, आत्मा या तिन्ही स्तरांवर असायला हवा. संगीत हे तुमच्या शरीर आणि मनाला लयबध्द हालचालींमध्ये एकत्रितपणे कार्य करायला लावते. त्यामुळे आपोआपच शरीराला पण व्यायाम मिळतो. मनदेखील उल्हासित होते आणि कंटाळाही येत नाही. महत्त्वाचे हे की तुम्ही ज्या ट्रेनरकडे जाणार त्याचा या क्षेत्रातला प्रॅक्टिकल अनुभव किती आहे याची व्यवस्थित खात्री करून घ्या. कारण योग्य पद्धतीने हे सगळे व्यायाम केले गेले नाहीत तर शरीराला गंभीर इजादेखील होऊ शकते. तसेच या सगळ्याचाच एक भाग म्हणजे प्रोटीन शेक्स आणि इतर सप्लिमेंट्स. हे मात्र तुमच्या फिटनेस ट्रेनर आणि डाऐटिशिअनच्या सल्ल्याने घेणे आवश्यक आहे.

प्रत्येक प्रकाराची वेगळी खासियत आहे, पण त्याचा मुख्य आधार सारखाच असतो. थोडक्यात झुम्बा हा पूर्णपणे डान्स 'वर्कआऊट' असतो तर पॉवर योगा म्हणजे योगासनांच्या थोड्या वेगवान हालचाली. फिटनेस वर्कशॉप्समध्ये हे सगळे प्रकार आलटून पालटून घेतले जातात. त्यामुळे तोचतोचपणा जाऊन ते कंटाळवाणे होत नाहीत. धमाल करत तंदुरुस्त राहण्याचा हा 'फिटनेस'चा फंडा भारीच आहे! आणि हो! यामध्ये पण 'एज नो बार' आहे! कारण कोणालाही झेपेल अशा पद्धतीने हे वर्कआऊटस आखले जातात!

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दमछाक होते तरीही...

0
0

>> अरविंद जाधव

गत कुंभमेळ्याचा कटू अनुभव असलेले कर्मचारी आजही कार्यरत आहेत. कुंभमेळा जवळून अनुभवलेल्या तसेच नियोजनाच्या माध्यमातून अनुभवत असलेल्या काही पोलिस कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. कुंभमेळ्यासारख्या मेगा इव्हेंटच्या नियोजनात सहभागी असणे ही निश्चितच अभिमानास्पद बाब. मात्र, यातून किती दमछाक होते हे सांगायलाच नको, असे मत त्यांनी व्यक्त केले.

कुंभमेळ्याची तयारी ही साधी बाब नाही. सर्वसामन्यांना उमजणार नाही, अशा घटकांचा बारकाईने विचार केला जातो. यात पोलिस दलाचे काम महत्त्वाचे ठरते. काही वर्षांपासून अनेक अधिकारी व कर्मचारी यात गुंतलेले आहे. सुटीच्या दिवशीही काम सुरूच असते. यामुळे दमछाक होते; मात्र सामन्य भाविकांच्या सुरक्षेसाठी याशिवाय पर्याय नसल्याचे मत संबंधितांनी व्यक्त केले. कुंभमेळा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. शहराचा चेहरा बदलून टाकणारा हा इव्हेंट प्रशासनासह नाशिककरांची परीक्षा पाहणारा ठरतो. एकाच वेळी ७० ते ८० लाख भाविक जमा होऊन शहराबाहेर सुरक्षित पडणे तशी मोठी गोष्ट मानली जाते. लाखो भाविक, साधू-महंत येणार म्हणजे कुंभमेळ्याच्या नियोजनाला सर्वांत अधिक महत्त्व लाभते. या नियोजनात जिल्हा प्रशासन, पोलिस, महापालिका, पीडब्लूडी, इरिगेशन असे एक ना अनेक विभाग सहभागी आहेत. अगदी मंत्री, राज्याचे विविध विभागांचे सचिव बारीक-सारीक कामांवर लक्ष ठेऊन आहेत. पोलिसांनी तर २०१२ अखेरपासून नियोजनाला सुरुवात केली. वाहनतळे, सीसीटीव्हीच्या जागा, बॅरेकेडसचे आकार, त्यांची संख्या, विविध रस्त्यांची माहिती, शाही मार्गावरील अडथळे, आपत्ती व्यवस्थापन, पर्यायी मार्ग, पोलिसांचा जागांनुसार बंदोबस्त, वॉच टॉवर, पोलिस चौक्यांच्या जागा असे एक ना अनेक मुद्दे बारकाईने तपासले गेले. यात वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून, पोलिस नाईक दर्जाच्या कर्मचाऱ्यांचाही तितकाच तोलमालाचा सहभाग आहे. याबाबत एका कर्मचाऱ्याने सांगितले, की सूक्ष्म नियोजनात सहभागी असलेल्या प्रत्येक घटकाला कामाची जबाबदारी पार पाडताना वेळेचे भान ठेऊन कसे चालेल? मागील कुंभमेळ्याच्या कटू आठवणी दूर सारण्यासाठी ही चांगली संधी आहे. नाहीतर आजही नाशिकचा कुंभमेळा म्हटला की २९ भाविकांच्या मृत्युच्या घटनेशिवाय त्याचे वार्तांकन पूर्ण होत नाही. यंदाचे नियोजन व्यापक असल्याचा दावा निवृत्ती समीप असलेल्या कर्मचाऱ्याने केला. शेवटी, या कामामुळे शहराचा नावलौकीक मोठा होणार असल्याचे संबंधित कर्मचाऱ्याने सांगितले. यंदाच्या कुंभमेळ्याच्या नियोजनात सक्रिय सहभाग असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी काहींनी मत व्यक्त केले.

बैठकांपूर्वी कामांचा आढावा घेऊन तशी तयारी करणे, बैठकानंतरच्या सूचनांनुसार होणाऱ्या बदलांवर काम करणे, असे कित्येक दिवसांपासून सुरू आहे. एक-एक दिवस महत्त्वाचा असल्याने कामाला प्राधन्य दिल्याशिवाय पर्याय नसल्याचे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. गुन्हेगारी घटना रोखण्यासाठी होणारे प्रयत्न, पोलिस स्टेशनची कामे यापेक्षा नियोजनाचे काम खूपच वेगळे अनुभव देत असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. जुने संदर्भ गोळा करून नवीन माहितीची सांगड घालताना होणारा अभ्यास, भविष्यात पुन्हा केव्हा होईल हे सांगता येत नाही. आजवर केलेल्या मेहनतीचे फळ कुंभमेळा यशस्वी झाल्यानंतरच दिसून येईल. अतिरिक्त कामांचा बोजा ओढताना सर्वसामन्यांनी ते स्वीकारावे, एवढीच अपेक्षा असते. दुर्दैवाने कुंभमेळ्याचे नियोजन आ​णि गुन्हेगारी यांची सांगड घातली जात असल्याची खंत पोलिस कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. दमछाक कितीही झाली तरी यास गत्यंतर नाही. शेवटी कुंभमेळ्यासाठी येणारा प्रत्येक जीव महत्त्वाचा ठरतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कॉमर्स विद्यार्थ्यांसाठी मंगळवारी सेमिनार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स व आशा ग्रुप पारख क्लासेस यांच्या वतीने मंगळवारी (दि. १६) एकदिवसीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. अकरावी कॉमर्स शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या व कॉमर्स शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या सेमिनारमधून प्रा. सीए लोकेश पारख विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

सध्या सर्वत्र अॅडमिशनसाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू आहे. या धावपळीत विद्यार्थ्यांचा कोणत्या शाखेला प्रवेश घ्यावा, याबाबत गोंधळ उडताना दिसतो. तर काही विद्यार्थ्यांना अॅडमिशन घेतल्यानंतरही संबंधित शाखेतील संधी कळू शकत नाही. अशा विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास करिअरची वेगळी वाट सापडू शकते. त्यामुळेच 'मटा' व आशा ग्रुप 'पारख क्लास' यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. कॉमर्स करिअरची सखोल माहिती, एकूण खर्च, वेळ, निकालाची टक्केवारी, अकरावी कॉमर्समधील विषयांची निवड व अभ्यासक्रमांची प्राथमिक माहिती अशी कॉमर्स शाखेविषयी सर्व उपयुक्त माहिती समजून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना या सेमिनारमधून मिळणार आहे. तसेच बोर्ड व सीए परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचे अनुभवही यावेळी ऐकता येणार आहेत. प्रा. सीए लोकेश पारख यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना करिअरची दिशा गवसेल. या सेमिनारमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला पारख क्लासतर्फे गिफ्ट दिले जाणार आहे.

सेमिनारची वेळ व ठिकाण

पारख क्लासेस, सोना हार्डवेअर समोर, पेठे हायस्कूलजवळ, रविवार कारंजा नाशिक. मंगळवार (दि. १६) वेळ ३ ते ५ या वेळात.पारख क्लासेस, शॉप नं. २३, २४ एस. के. ओपन मॉल, बीवायके कॉलेज समोर, कॉलेजरोड नाशिक. मंगळवार (१६ जून) सायंकाळी ५.३० ते ७.३० या वेळात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दाखल्यासाठी वणवण

0
0

येवला, नांदगाव पॅटर्नप्रमाणे उपक्रम राबविण्याची पालकांची मागणी

कॉलेज क्लब रिपोर्टर, नाशिक

दहावी-बारावीचे निकाल लागले की विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी धावपळ सुरू होते. अशा प्रसंगी ‌उत्पन्न, जातीच्या दाखल्यांसाठी विद्यार्थी पालकांची वणवण होते. यावर उपाय शोधत येवला आणि नांदगाव तालुक्यातील तहसील कार्यालयामार्फत 'आजच अर्ज, आजच दाखला' हा अनोखा उपक्रम राबविला जात आहे. असाच उपक्रम नाशिकमध्ये राबविण्याची मागणी नाशिककरांनी केली आहे.

राजस्व अभियाना अंतर्गत येवला आणि नांदगाव तालुक्यामध्ये एकाच दिवसात जातीचा दाखला व नॉन क्रिमीलेयर दाखला देण्याचा उपक्रम प्रांताधिकारी कार्यालयाकडून सुरू आहे. मात्र, असा उपक्रम नाशिकमध्ये का राबविला जात नाही, असा सवाल पालकांनी विचारला आहे. नाशिकच्या तहसील कार्यालयासह सेतू केंद्रातून नेहमीच दाखले देण्यास विलंब होत असल्याचे निदर्शनास येते. तालुकास्तरावर मोहीम राबवून दाखले दिले जाऊ शकतात. तर शहर पातळीवर नाशिक शहरात हे उपक्रमांतर्गत दाखले का दिले जाऊ नये, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अर्ज केल्यानंतर किमान १० दिवस विद्यार्थी-पालकांना या दाखल्यांसाठी वाट पहावी लागत आहे. शहरात पाच सेतू कार्यालये असतानाही दाखले देण्यास विलंब होतो. जातीचा दाखला, उत्तपन्नाचा दाखला, भारतीय अधिवास, नॉन क्रिमीलेअर हे दाखले लवकर न मिळाल्याने प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडते. शिवाय विद्यार्थी व पालकांना सेतू कार्यालयात सारख्या चकरा माराव्या लागतात. पालकांची आणि विद्यार्थ्यांची दाखल्यांसाठी मोठी पायपीट होते. त्यामुळे नाशिकमध्येही 'आजच अर्ज, आजच दाखला' हा उपक्रम राबविण्याची मागणी केली जात आहे.

सेतू कार्यालयातून दिलेल्या तारखेस दाखले मिळत नाहीत. दरवर्षी हीच परिस्थिती असते. त्यात कुठलीच सुधारणा होत नाही. त्यामुळे एक दिवस अर्ज आणि लगेच दाखला हा उपक्रम राबवणे अत्यावश्यक आहे. - अनिल पाटील, पालक

केवळ दाखल्यावर स्वाक्षरी बाकी आहे, असे सांगून दाखला देणे टाळले जाते. ऑनलाईनच्या जमान्यातही रांग लावावी लागणे अतिशय वाईट आहे. त्यामुळे शैक्षणिक प्रवेशावेळी तरी एका दिवसात दाखला द्यावा. - चिन्मय मोडक, विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैद्यकीय अधिकाऱ्यास लाच घेताना अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अर्जित रजा मंजूर करून देण्यासाठी करार पध्दतीने काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून तीन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यास व कनिष्ठ सहाय्यकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली.

डॉ. वैभव बाजीराव पानसरे, असे या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव असून, दत्तू किसन शिरसाठ असे कनिष्ठ सहाय्यकाचे नाव आहे. तक्रारदार या ११ ​महिन्याच्या कररावर वैद्यकीय अधिकारी म्हणून देवळा तालुक्यातील दहीवड येथे कार्यरत आहेत. त्यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत २२ एप्रिल २०१५ ते ११ मे २०१५ या अर्जित रजा मंजूर होण्यासाठी जिल्हा परिषदेत अर्ज केला होता. या रजा १२ मे रोजी मंजूर झाल्या. दरम्यान, रजेचा प्रस्ताव डॉ. पानसरे यांच्यामार्फत न गेल्याने त्यांनी हजेरी मस्टरवर तक्रारदारांची गैरहजेरी लावली. तक्रारदाराने गैरहजेरीची नोंद दुरुस्त करण्याची विनंती केली असता पानसरे यांनी तीन हजार रुपयांची लाच मागितली. तशी तक्रार तक्रारदाराने एसीबीकडे केली असता शुक्रवारी दुपारी तीन वाजता दहीवड आरोग्य केंद्रात सापळा रचून दोघा संशयितांना एसीबीने ताब्यात घेतले. दरम्यान, इतर लोकसेवकांकडून लाचेची मागणी होत असेल तर तक्रारदारांनी थेट पोलिस अधीक्षक डॉ. डी. पी. प्रधान यांच्या मोबाइल नंबर ९९२३१८५५६६ या क्रमांकावर किंवा ०२५३-२५७५६२८, २५७८२३० किंवा १०६४ या टोल फ्री नंबरवर तक्रार करण्याचे आवाहन एसीबीने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘उत्सव सारस्वतांचा’ मधून आनंदाची पर्वणी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नेहमीच विविध चित्रपटांची मेजवानी देणाऱ्या कुसुमाग्रज फिल्म सोसायटीच्या वतीने आयोजित तीन दिवसीय उत्सव सारस्वतांच्या या फिल्म फेस्टिव्हलचे उद्घाटन शुक्रवारी करण्यात आले. कुसुमाग्रज स्मारकात होत असलेल्या या कार्यक्रमात पहिल्या दिवशी महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्यावर आधारित बोधपट दाखविण्यात आला.

उद्घाटनप्रसंगी गिरीश टकले म्हणाले की, पु. लं. च्या पुण्यतिथीनिमित्ताने फिल्म डिव्हिजन प्रस्तूत हा बोधपट दाखविण्याची कल्पना आली. कविवर्य कुसुमाग्रजांच्या सर्कस लेखात म्हटल्याप्रमाणे विदूषकाच्या डोळ्यात आसू व ओठात हसू असते. आणिबाणीनंतर यशवंतराव चव्हाण यांनी पुलंना विदूषक ही पदवी बहाल केली होती. त्यांच्या स्मरणानिमित्ताने ही फिल्म दाखविण्याचे मनात आले. ते पुढे म्हणाले की, पुल हे साहित्यिक म्हणून मोठे होतेच परंतु, ते खरोखरच दादा व्यक्तिमत्त्व होते.

फिल्म डिव्हिजन प्रस्तूत पुलंच्या बोधपटात स्वत: पुलंनी स्वत:वर केलेले विवेचन रसिकांना पहायला मिळाले. यात अगदी पुलंच्या जन्मापासून तर त्यांचे मोठे होणे, कारकूनी करणे, शिक्षकी पेशात जाणे, नंतर नाटकात काम करणे, विनोदी लेख लिहिणे येथपासून तर चित्रपटात काम करण्यापर्यंत सर्व आयुष्यावर चित्रित ही फिल्म पाहणे म्हणजे एक आनंदपर्वणी असल्याचे मत यावेळी प्रेक्षकांनी व्यक्त केले.

'उत्सव सारस्वतांचा' या देशातील पहिल्या मराठी साहित्यिकांवर आधारित चित्रपट महोत्सवात एकूण पाच लघुपट दाखवले जाणार असून, एक अभिवाचनाचा कार्यक्रम होणार आहे. आज कवी ग्रेस, ग. दि. माडगुळकर, विंदा करंदीकर, मारुती चितमपल्ली यांच्यावर आधारित लघुपट सादर केले जातील.रविवार, १४ जून रोजी सायंकाळी सहा वाजता 'एका खेळियाने' हा पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यावर आधारित अभिवाचनाचा कार्यक्रम प्रख्यात अभिनेते आनंद इंगळे, हृषिकेश जोशी व गीतकार वैभव जोशी सादर करतील. एक अभिनेता, एक लेखक, आणि एक गीतकार-संगीतकार यांच्या नजरेतून पुलंच्या साहित्याचा मागोवा घेण्याचा हा प्रयत्न असेल. याशिवाय सोसायटीच्या वतीने दर महिन्याला दोन, तर वर्षभरात तीन फेस्टिव्हल्स घेतले जाणार आहेत. मागील महिन्यात टर्टल्स कॅन फ्लाय, मंथन आणि रिअर विंडो असे वेगवेगळे सिनेमे दाखविण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्किटेक्चर कॉलेजेस सापडली कात्रीत

0
0

गायत्री काळकर, नाशिक

'महाराष्ट्र असोसिएशन ऑफ स्कूल ऑफ आर्किटेक्चर'च्या (मासा) माध्यमातून राबवली जाणारी प्रवेश प्रक्रिया रद्द करून राज्य सरकारने सर्व आर्किटेक्चर कॉलेजेसना 'डीटीई'च्या माध्यमातून केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया राबविणे बंधनकारक केले आहे. 'मासा'ची प्रवेश प्रक्रिया उंबरठ्यावर येऊन ठेपलेली असताना सरकारने अचानक काढलेल्या या अध्यादेशामुळे राज्यभरातील आर्किटेक्चर कॉलेजेस कात्रीत सापडली आहेत.

आर्किटेक्चरला प्रवेश घेण्यासाठी राज्य सरकारमार्फत किंवा 'नॅशनल अॅप्टिट्यूड टेस्ट ऑफ आर्किटेक्चर'मार्फत (नाटा) घेतली जाणारी प्रवेश परीक्षा विद्यार्थी देतात. त्या परीक्षेनंतर 'मासा' व राज्य सरकार या दोहोंच्या वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रियांमधून विद्यार्थ्यांना राज्यातील कॉलेजेसमध्ये प्रवेश दिला जातो. राज्यातील काही आर्किटेक्चर कॉलेजेस 'डीटीई'च्या माध्यमातून प्रवेश प्रक्रिया करीत असले तरी बहुतांश खासगी आर्किटेक्चर कॉलेजेस 'मासा'च्या माध्यमातून प्रवेश प्रक्रिया राबवतात. त्यानुसार यंदासुध्दा ही प्रक्रिया सुरू झाली होती. पण 'डीटीई'च्या वेबसाईटवर ११ जूनला प्रसिध्द झालेल्या या अध्यादेशाने आर्किटेक्चर कॉलेजेसपुढे प्रवेश प्रक्रिया राबवायची कशी?, ही समस्या निर्माण झाली आहे.राज्य सरकारमार्फत घेतली जाणारी प्रवेश परीक्षा यंदापासून बंद केली आहे. त्यामुळे आर्किटेक्चर कॉलेजेसनी 'नाटा' देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविणे सुरू केले. जवळपास ५५ ते ६० कॉलेजेसमधील तीन ते चार हजार जागांसाठी 'मासा'च्या माध्यमातून ही प्रक्रिया राबविणे सुरू झाले आहे. प्रवेश प्रक्रियेचे शेड्यूल 'मासा'च्या वेबसाईटवर जाहीर झाले आहे. विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून रजिस्ट्रेशनही केले आहे. परंतु, ऐन प्रवेश प्रक्रियेच्या तोंडावर हा अध्यादेश आल्यामुळे कॉलेजेसबरोबरच कालपासून पालक आणि विद्यार्थ्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न

'मासा'च्या माध्यमातून केलेले प्रवेश ग्राह्य धरण्यात आले नाहीत तर या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्यच धोक्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही प्रवेश प्रक्रिया अचानक थांबविण्याचे कोणतेही कारण सरकारने न दिल्यामुळे आर्किटेक्चर कॉलेजेसचा गोंधळ उडाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीक्षित विरोधात कोर्टाचे वॉरंट

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

येवला येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडून इंडियन इमू लाईफ प्रा. लि. या कंपनीविरुध्द दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी हरिष जयप्रकाश दीक्षित, रा. जयहरी अपार्टमेंट, हिरावाडी ओमनगर, पंचवटी यांच्याविरुद्ध सीआरपीसी कलम ८२ प्रमाणे १६ मे २०१५ रोजी जाहीरनामा काढण्यात आला आहे. आरोपी हरिष दीक्षित याने १५ जुलै २०१५ रोजी फिर्यादीचा जाब देण्यासाठी येवला न्यायालयात हजर व्हावे, असे आदेशित करण्यात आले आहे. हरिष दीक्षितबाबत माहिती असल्यास पोलिस अधीक्षक कार्यालय, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, डॉग युनिट शेजारी पोलिस मुख्यालय, जुने सीबीएसच्या मागे या पत्त्यावर किंवा नाशिक शहर (दूरध्वनी- ०२५३-२५७०३३२/३३) येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस उपधीक्षक डी. के. परदेशी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज पडून युवक ठार

0
0

येवला : येवला तालुक्यातील पन्हाळसाठे शिवारात शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वीज पडून लहानशा सूर्यभान पवार (वय २२) हा जागीच ठार झाला. शितल अशोक शिरसाठ ही महिला जखमी झाली. या महिलेला राजापूर येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नगरसूल आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घरपट्टी वसुलीतून २३ कोटी

0
0

वसुलीत नाशिकरोड अव्वल; योजनेला प्रतिसाद

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सव्वादोन महिन्यात महापालिकेकडे २३ कोटी ७५ लाख २७ हजार रुपये घरपट्टी करापोटी जमा झाले आहेत. तब्बल ८८ हजार ५२९ मिळकतधारकांनी कराची रक्कम जमा केली असून, यात नाशिकरोड विभाग अव्वल ठरला आहे.

सिंहस्थ कामांमुळे आर्थिक ओझ्याखाली दबलेल्या महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी आयुक्तांनी घरपट्टी वसुलीकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून घरपट्टी देयकांची वाट न पाहता घरपट्टी अदा करणाऱ्या मालमत्ताधारकांना एप्रिलमध्ये पाच टक्के, मेमध्ये तीन, तर जूनमध्ये दोन टक्के सवलतीची योजना सुरू केली आहे. ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी इच्छुक मालमत्ताधारकांना यामुळे चांगला पर्याय उपलब्ध झाला. एप्रिल महिन्यातच देयके अदा न करताही ३० हजार ९२४ मालमत्ताधारकांनी घरपट्टी जमा केली. त्यातून महापालिकेला तीन कोटी ३३ लाख ९७ हजार रुपये महसूल प्राप्त झाला होता. तेच गेल्या वर्षी १ ते २२ एप्रिलदरम्यान अवघा एक कोटी ५१ लाख रुपयांचा महसूल मिळाला होता. ११ जून अखेर ८८ हजार ५२९ मिळकतधारकांनी २३ कोटी ७४ लाख २७ हजार ५०० रुपयांचा महसूल जमा केला आहे. सवलतीपोटी ५८ लाख ४६ हजार ६१० रुपयांवर महापालिकेला पाणी सोडावे लागले आहे. घरपट्टी कर भरण्यात नाशिकरोड विभाग अव्वल राहिला आहे. या विभागातून एकूण महसुलापैकी सर्वाधिक म्हणजे ५ कोटी २५ लाख २१ हजार ७९१ रुपये जमा झाले आहेत. सवलतीमुळेच आगाऊ पैसे जमा होत असून, मोठ्या प्रमाणावर वसुली होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. याबरोबर, संशयास्पद मालमत्तांची तपासणी करण्यासाठी लवकरच स्कॉड तयार करण्यात येणार असून महसुलाची गळती थांबवण्याकरिता योग्य ती खबरदारी घेण्यात येणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांने स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेब्रिजचा प्रश्न सुटता सुटेना!

0
0

महापौरांनीच पकडले डेब्रिज फेकणारे वाहन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इंद्रप्रस्थ पुलानजीक गोदावरी नदीकाठाजवळ बांधकामाचे टाकाऊ पदार्थ (डेब्रिज) फेकून देणाऱ्या वाहनाला महापौर अशोक मुर्तडक यांनी पकडले. या प्रकरणी संबंधित वाहनचालकावर कारवाई करण्याचे आदेश देत डे​ब्रिज टाकण्यासाठी ठिकाणांची यादी तयार करण्याची संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना केल्या आहेत.

जुन्या इमारती पाडून नवीन बांधकाम तयार करताना निघालेले डे​ब्रिज टाकायचे कुठे असा प्रश्न इमारत मालकांना पडतो. डेब्रिज टाकण्यासाठी विशेष असे ठिकाणे निश्चित नसल्याने अनेकदा नदी ​किनारी किंवा मोकळ्या मैदानांमध्ये डेब्रिज फेकले जाते. यामुळे प्रदूषणाची समस्या निर्माण होत आहे. इतस्तः डेब्रिज फेकणाऱ्या वाहनचालकांवर महापालिका कारवाई करू शकते. शुक्रवारी सकाळी महापौर अशोक मुर्तडक यांचे वाहन रामवाडीमार्गे राजीव गांधी भवन येथे येत असताना त्यांनी इंद्रप्रस्थपुलाजवळील नदीकिनारी एक वाहन डे​ब्रिज टाकत असल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ त्या ठिकाणी पोहचून चौकशी केली. तसेच, पंचवटी विभागीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. संबंधित वाहनचालकावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश त्यांनी विभागीय अधिकाऱ्यांना दिले.

फलक नावालाच

रामवाडीकडून इंद्रप्रस्थ पुलाकडे येणाऱ्या रस्त्यालगत नेहमीच डेब्रिज फेकले जाते. रस्त्याच्या दोन्ही कडेला शेती असून दिवसभर वाहनांची वर्दळ असते. याच परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू असून, दिवसाढवळ्या नदीकिनारी मोठ्या प्रमाणावर डेब्रिज टाकले जाते. विशेष म्हणजे महापालिकेने या ठिकाणी कचरा किंवा डेब्रिज फेकू नये, असे सूचना फलक लावले आहेत. याच फलकाजवळ डेब्रिज फेकले जात असल्याने महापालिकेने कडक कारवाईची मागणी केली जात आहे.

आदेशाकडे दुर्लक्ष

शहरात कोणत्या भागात डेब्रिज टाकण्यासाठी जागा उपलब्ध असून, त्यादृष्टीने यादी तयार करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना महापौरांनी आदेश दिले होते. यादी प्रसिध्द झाल्यानंतर आदेशाकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनचालकांवर फौजदारी कारवाई होऊ शकते. यापूर्वी २०१३ मध्ये महापालिकेने २३ पेक्षा जास्त ठिकाणांची यादी तयार केली होती. मात्र, त्यावर पुढे काहीच झाले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संन्यासिनींच्या मागण्यांनी पेच

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थकाळातील मुख्य पर्वण्यांमध्ये शाहीस्नानासाठी स्वतंत्र वेळ द्या, अशी मागणी करून संन्यांसिनींच्या आखाड्याने जिल्हा प्रशासनापुढील पेच निर्माण केला आहे. याबाबतचा निर्णय आखाडा परिषदच घेईल, असे सांगत प्रशासनाने या विषयावर कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया देण्यास असमर्थता दर्शवली आहे.

यंदाच्या सिंहस्थ कुंभमेळ्यात साधू-महंतांप्रमाणे प्रथमच संन्यासिनींचा आखाडाही सहभागी होत आहे. तब्बल १० ते १५ हजार महिला त्यामध्ये सहभागी होणार आहेत. त्र्यंबकेश्वरमध्ये दहा एकर जागा द्यावी, अशी मागणी प्रयाग येथील गायत्री त्रिवेणी तीर्थपीठ जगद्गुरू शंकराचार्य परित्रिकाल भवनताजी महाराज सर्वेक्षर वैकुंठधाम मुक्तिद्वार या महिला आखाड्याने केली आहे. शाहीस्नानासाठी महिला साध्वींना स्वतंत्र वेळ राखून ठेवावी, अशी मागणीही पुढे आली आहे. मात्र कुंभमेळ्याच्या इतिहासात अशी मागणी प्रथमच पुढे आल्याने त्यावर काय भूमिका घ्यावी, असा पेच जिल्हा प्रशासनापुढे निर्माण झाला आहे. कुंभमेळ्यात १३ आखाड्यांचे प्रमुख महंत आणि सुमारे ७०० खालसा सहभागी होणार आहेत. त्यादृष्टीने प्रशासन तयारी करीत असून, महिला संन्यासिनींच्या आखाड्यानेही त्र्यंबकेश्वरमध्ये दहा एकर जागेसाठी आग्रह धरल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. संन्यासिनींना निवास, वीज, पाणी व प्रसाधनगृहांसारख्या मुलभूत सुविधा पुरवाव्यात, अशी मागणीही करण्यात आली असून अलाहाबादला अशी व्यवस्था करण्यात आली होती, असा दावा त्यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२५ एकरवर पार्किंग

0
0

भ‌ाविकांच्या खासगी गाड्यांना मोहगावजवळ थांबा

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यांसाठी शहरात येणाऱ्या भाविकांच्या वाहनांचे पार्किंग आणि बस वाहतूक व्यवस्थेचे काम नाशिक-पुणे महामार्गावरील चिंचोली शिवारात वेगात सुरू आहे. भाविकांची खासगी वाहने सिन्नर घाटाखालील मोह गावाजवळ थांबविण्यात येणार आहेत. यासाठी तब्बल २५ एकरमध्ये पार्किंगची व्यवस्था करण्यात येत आहे.

सिंहस्थासाठीच्या खासगी वाहनांचे पा‌र्किंग करण्यासाठी मैदानाचे सपाटीकरण आणि रस्ते बांधण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. गगनगिरी विश्वमानव सेवाश्रम प्रतिष्ठानच्या जागेत हे पार्किंग विकसित केले जात आहे. नाशिकरोडला येताना उजव्या बाजूला ही जागा आहे. तीन ते चार हजार वाहनांची पार्किंगची सोय येथे होईल. पार्किंगच्या विरुद्ध बाजूला खासगी बिल्डरच्या ४० एकर जागेत तात्पुरते बसस्थानक उभारले जात आहे. दोनशे बस येथून सोडल्या जातील. तेथे भाविकांसाठी रुग्णवाहिका, फिरते शौचालये, स्नानगृह, निवार शेड, मार्गदर्शन केंद्र आदी सुविधा असतील. संपर्कसाठी मोबाइल टॉवर तर पोलिसांना निगराणीसाठी वॉच टॉवर उभारला जाईल. पोलिस चौकी आणि सीसीटिव्ही देखील कार्यान्वित करण्यात येतील.

रुंदीकरण रखडले

कुंभमेळ्यानिमित्त सिन्नरफाटा ते सिन्नर दरम्यान महामार्ग रुंदीकरणाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. सिन्नरपासून पुढे ते वेगात सुरू आहे. शिंदे गावाजवळ भूसंपादनात अडथळे आल्यामुळे काम रेंगाळले आहे. कुंभमेळ्यापर्यंत रस्ता रुंदीकरण होणे अवघड आहे. चेहेडी येथील जुना दगडी पुलाला समांतर पुलाचे कामही अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे कुंभमेळ्यात वाहतूकीची कोंडी होण्याची शक्यता आहे.

पर्यायी वाहतूक मार्ग

पर्वणीच्या एक दिवस आधी खासगी वाहनांकरीता नाशिक-पुणे रस्ता बंद केला जाईल. मुंबईला जाणारी वाहतूक सिन्नरहून घोटीमार्गे तर धुळ्याला जाणारी वाहतूक सिन्नरमार्गे वळवली जाईल. चिंचोली शिवारातून बसने भाविकांना सिन्नरफाटा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर आणले जाईल. तेथून ते पायी रामकुंड अथवा दसकच्या गोदा घाटावर जातील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षाचालकांना भोवला युनिफॉर्म

0
0

दिवसभरात ९३ जणांवर दंडात्मक कारवाई

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांवर पोलिसांची करडी नजर असून, गुरुवारी दिवसभरात युनिफॉर्म न घालणाऱ्या तब्बल ९३ रिक्षाचालकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. यामुळे रिक्षा चालकांचे धाबे दणाणले आहेत.

स्टॉपसोडून रिक्षा उभी करणे, वाहनांचे कागदपत्रे जवळ नसणे, फ्रंट​सीट वाहतूक करणे, स्टॉपवर प्रवाशांना दमबाजी करणे, फॅशनच्या नावाखाली नको ते कपडे परिधान करणे असे प्रकार सर्रास सुरू असतात. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहनचालकांना किमान शिस्त लागणे आवश्यक असून पोलिसांनी त्यादृष्टीने उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. याबाबत माहिती देतान सूत्रांनी सांगितले की, गुरुवारी दिवसभरात वाहतूक विभागाने एकूण १६८ वाहनांवर कारवाई करीत १६ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला. सर्वांत जास्त कारवाई रिक्षाचालकांवर करण्यात आली. फ्रंटसीटच्या १४ केसेस करण्यात आल्या.

नाकाबंदीदरम्यान कारवाई

शहरातील ११ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील विविध भागात गुरुवारी सकाळी ९ ते रात्री ९ या दरम्यान पोलिसांनी नाकाबंदी केली होती. यात पोलिसांनी ३०३ वाहनांची तपासणी करून वाहनांची कागदपत्रे नसलेल्या ५६ वाहनांवर कारवाई केली. भद्रकाली पोलिस स्टेशन अंतर्गत सर्वाधिक कारवाई झाली या ठिकाणी ११३ वाहनांची तपासणी करून २४ वाहनचालकांकडून २ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यानंतर, नाशिकरोड पोलिसांनी ५० वाहनांपैकी १७ वाहनचालकांवर कारवाई केली. याबरोबर रात्री ९ ते ११ या दरम्यान २४ चायनीज गाड्यांवर देखील पोलिसांनी कारवाई केली.

पोलिस आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार सर्वच प्रकाराच्या बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात येते आहे. किती कारवाई झाली, त्यापेक्षा कारवाईचा परिणाम काय झाला, हे आम्ही तपासत आहोत. वाहनचालकांना शिस्त लागण्याच्या दृष्टीने नियोजन केले जात आहे.

- एम. एम. बागवान, सिनीअर पीआय, वाहतूक विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images