जिल्ह्यातील पाऊण लाख विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशांचे नियोजन करण्यासाठी आज होणारी साडेतीनशे प्राचार्यांची बैठक चांदवडमध्ये पार पडणार आहे. एरव्ही या बैठकीचे आयोजन जिल्ह्याच्या मुख्यालयी करण्यात येते. यंदा मात्र चांदवडच्या नेमिनाथ जैन शिक्षणसंस्थेत होणाऱ्या या बैठकीवरही विद्यार्थी संघटनांच्या एल्गाराची टांगती तलवार आहे. ही बैठक सहीसलामत पार पाडण्यासाठी आज शिक्षण विभागाला संघटनांचा कल सांभाळत तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
गतवर्षी दहावीचा निकालानंतर अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक ठरविण्यासाठी शहरातील रावसाहेब थोरात सभागृहात या बैठक झाली होती. मात्र, विद्यार्थीहित डावलणाऱ्या कॉलेजेसवर ठोस कारवाई करण्यासाठी विभागीय स्तरावर धोरणात्मक निर्णय व्हावेत, यासाठी या बैठकीतील पॉलिसी मेकर्सना विद्यार्थी संघटनांनी घेराव घालत बैठक मध्यावरच संपविली होती. विद्यार्थीहित डावलणाऱ्या शहरातील सर्वच कॉलेजेसकडून प्रॉस्पेक्ट विक्रीसाठी आकारले जाणारे अव्वाच्या सव्वा दर, बारावीपर्यंत मुलींच्या मोफत शिक्षणाचा डावलला जाणारा आग्रह, प्रवेशाच्या पावत्यांमध्ये दिसून येणारा विरोधाभास, विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी देणग्यांच्या नावाखाली केली जाणारी अडवणूक या प्राधान्याच्या मुद्यांबाबत या बैठकीत कडक नियमावली करण्यात यावी अन् त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशा मागण्या यात करण्यात आल्या होत्या. गेल्यावर्षी छात्रभारती संघटनेने या मागण्या लावून धारत बैठकीतील अधिकाऱ्यांना घेराव घातला होता. शहरात जागरूक असणाऱ्या विद्यार्थी संघटनांच्या एल्गार पुकारण्यामुळेच ही बैठक यंदा शहरातून हद्दपार झाल्याची चर्चाही प्राचार्यांच्या वर्तुळात आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट