सद्यस्थितीत रक्तदानाविषयी जागरूकता आहे का ?
माहितीचा प्रसार आणि प्रत्यक्ष कार्यातील सहभाग यात अंतर दिसून येते. रक्तदानाविषयी आजवर तुलनेने बरीचशी माहिती प्रसारीत झाली आहे. याचा अर्थ सहभाग वाढला असा होत नाही. ही दरी भरण्यासाठी प्रत्यक्षात रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यायची गरज आहे.
कोणत्या काळात रक्तदात्यांची गरज पडते ?
सुट्यांचा कालावधी खूपसा आव्हानात्मक ठरतो. यात एप्रिल, मे यासारखे महिने आणि दिवाळीसारखा कालावधी आहे. या काळात जाणवणारी रक्ताची तूट ही रूग्णांसाठी अत्यंत त्रासदायक ठरते. याच कालावधीत रक्तदात्ये आणि सामाजिक संस्थांनी रक्तसंकलनासाठी अधिकाधिक नियोजन करायला हवे.
रक्तदान करणाऱ्यांनी साखळीची गरज आहे का?
हो, जीवन मरणाच्या रेषेवर संघर्ष करणाऱ्या चार रूग्णांना एकाच दात्याने केलेले रक्तदान एकावेळी जीवदान देऊ शकते. रक्तदात्यांचा हेल्पींग ब्रिज तयार होण्यासाठी या साखळीत एकेक दाता यासाठीच जोडला जायला हवाच.
दूषीत रक्तातून होणाऱ्या संक्रमणाचा धोका आहे का?
तंत्रज्ञानामुळे असा धोका कमी झाला असला तरीही तो संपला असे म्हणता येणार नाही. अनेकदा दूषीत रक्तामुळे कावीळ, एचआयव्ही यासारख्या आजारांनाही रूग्णांना बळी पडू शकतात.
या समस्येला सामोरे जाताना उपाय काय ?
रक्तदात्यांनी दिलेले रक्त विविध चाचण्यांमधून पुढे जाते. या सर्व कसोट्यांमधून पुढे जाणारे रक्त हे बहुतांश सुरक्षित असले तरीही सुरक्षेची शक्यता अधिकांशाने वाढविण्यासाठी रूग्णाच्या नातेवाईकांनी नॅट टेस्टेड रक्ताला प्राधान्य द्यावे.
थॅलेसेमिया रुग्णांना आयुष्यभर रक्ताची गरज भासते ?
होय. रक्ताशी संबंधित असणारा हा आजार आहे. रूग्ण रक्तासाठी आयुष्यभर दुसऱ्यावर अवलंबून रहावे लागते. त्यामुळे समाजातील निरोगी दात्यांनी केलेले रक्तदान हे कधीही वाया जात नाही. मागणीच्या तुलतेन अद्यापही रक्तदाते कमीच आहेत. सर्वत्र हे चित्र आहे.
थॅलेसेमिया आजार कशामुळे होतो ?
या आजारांचा दोष गुणसुत्रांकडे निर्देश करतो. जनुकीय दोषातून उद्भवणारा हा आजार थॅलेसेमिया मायनर आणि मेजर अशा दोन वर्गात मोडतो. हा आजार रोखणे केवळ दोन मायनर रूग्णांचा विवाह रोखण्यातूनच शक्य आहे. जेणेकरून त्या दांपत्याच्या पुढच्या पिढीला याची लागण होणार नाही. यासाठी लग्नाच्या अगोदर रक्त चाचणीही करून घ्यायला प्राधान्य द्यायला हवे.
आपल्या संस्थेच्या माध्यमातूनही थॅलेसेमियाच्या रूग्णांसाठी कार्य सुरू आहे
अर्पण रक्तपेढीच्या माध्यमातून थॅलेसेमियाच्या आजाराची नोंद असलेल्या १८१ रूग्णांना सातत्याने नॅट टेस्टेड डब्ल्युबीसी विरहीत रक्त पुरविण्यात येते. या आजारीतील रक्तदाते त्यांचे जीवन जगण्यासाठी पूर्णत: समाजावर अवलंबून आहेत.
कुठले रक्तदाते सुरक्षित समजावेत ?
नियमित रक्तदाते हे सर्वाधिक सुरक्षित. प्रति तीन महिन्यांच्या कालावधीनंतर रक्तदात्यास रक्तदान करता येते. यानुसार एक दाता वर्षभरात ४ वेळा रक्तदान करू शकतो. वर्षातून चारदा रक्तदान करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करणारा दाता हा सर्वात सुरक्षित असतो. कारण सातत्याने रक्त देण्यासाठी तो स्वत: निरोगी रहाण्याचा प्रयत्न करतो.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट