महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या बसेस मेळा स्टॅण्डवरून सोडल्या जात असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. याबाबत ठक्कर बाजार येथे कोणतीही सूचना दिली जात नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.
पुणे येथे जाण्यासाठी महामंडळातर्फे दर अर्ध्यातासाला ठक्कर बाजार येथून विनावाहक बस सोडण्यात येतात. प्रवाशांची संख्या वाढल्याने व आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर पुणे येथे जाणाऱ्या फक्त निमआराम बसेस मेळा स्टॅण्डवरून सोडण्यास सुरुवात केली. मात्र, ही सेवा सुरू करण्यापूर्वी याबाबतची माहिती प्रवाशांना काही दिवस आधी देणे गरजेचे असताना महामंडळाकडून तसे करण्यात आले नाही. त्यामुळे पुण्याला जाणारे प्रवासी ठक्कर बाजार येथे आल्यानंतर पुण्याच्या गाड्या मेळा स्टॅण्डवरून सुटत असल्याचे समजते. त्यानंतर पायपीट करीत त्यांना मेळा स्टॅण्डवर जावे लागत आहे.
उन्हाळ्याचे दिवस असल्याने अनेकांना लहान मुलांसह तेथे जाणे अवघड होऊन जाते. ठक्कर बाजार ते मेळा स्टॅण्ड हा परिसर अत्यंत अस्वच्छ असतो. मधल्या मार्गाने प्रवाशांना पायी चालताना नाक दाबूनच जावे लागते. या मार्गावर खडबडीत रस्ता असल्याने वृध्दांना चालणेही कठीण होऊन जाते.
अनेकदा पुण्याहून गाडी नाशिकला पोहचल्यानंतर तिच गाडी नाशिकहून पुण्याला जाते. पुण्याहून येणारी गाडी उशिरा आल्यास येथून जाणारी गाडी रद्द करण्यात येते. अशा वेळेस प्रवासी साध्या एसटीतून पुण्याला जाणे पसंत करतात. साधी बस ठक्कर बाजार येथून जात असल्याने नागरिकांना पुन्हा ठक्कर बाजाराला जावे लागते. त्यामुळे नागरिकांना नाहक हेलपाटे मारावे लागतात. पुण्याकडे जाणाऱ्या साध्या बसेस व निमआराम बसेस एकाच ठिकाणाहून सुटल्यास प्रवाशांना दोन्ही पर्याय उपलब्ध होतील.
सुविधांच्या नावाने बोंब
मेळा स्टॅण्डवर प्रवाशांना आवश्यक असलेल्या पुरेशा सुविधा देखील नाहीत. या ठिकाणी असलेल्या
स्वच्छतागृहाची अवस्था अत्यंत बिकट बनली आहे. त्याचप्रमाणे पिण्याच्य़ा पाण्याची व्यवस्थाही चांगली नाही. पुण्यासाठी मेळा स्टॅण्डवरून गाड्या सोडण्यास नागरिकांचा विरोध नाही. मात्र, तर त्यामार्गावरच्या सर्व बसेस एकाच ठिकाणाहून सोडाव्यात, अशी प्रवाशांची मागणी आहे.
अधिकाऱ्यांची मनमानी
येणारा प्रत्येक अधिकारी हा प्रवाशांवर प्रयोग करीत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. पुण्याला जाणाऱ्या गाड्यांच्या अनेकवेळा जागा बदलण्यात आल्या. मात्र, आजपर्यंत एकही कायमस्वरूपी जागा ठेवण्यात आलेली नाही. नवीन आलेला अधिकारी आपल्या मनाप्रमाणे कार्यवाही करतो. तीन वर्षानंतर पहिल्या अधिकाऱ्याने घेतलेला निर्णय दुसऱ्या अधिकाऱ्याला चुकीचा वाटत असल्याने तोही आपल्या मर्जीप्रमाणे जागा बदलतो.
पुण्याला जाणाऱ्या गाड्यांबाबत आजपर्यंत अनेकवेळा जागा बदलण्यात आल्या आहेत. पुणे मार्गावर जाणाऱ्या सर्व गाड्या एकाच ठिकाणाहून सोडाव्यात अर्ध्या गाड्या या स्थानकावरून, तर अर्ध्यागाड्या दुसऱ्या स्थानकावरुन सोडून महामंडळाचा काय फायदा होतो, असा सवालही केला जात आहे.
प्रवाशी संघटनांची अळिमिळी...
सध्या असलेल्या प्रवासी संघटना या राजकीय पक्षांच्या दावणीला बांघल्या गेल्याने प्रवाशांच्या हिताचे निर्णय घेणे तर दूरच; परंतु त्याबद्दल चकार शब्दही काढले जात नाही. त्यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
स्टॅण्ड बदलतांना प्रवाशांच्या सोयीकडे लक्ष द्यायला हवे. निमआराम गाडी नसल्यास प्रवाशी साध्या बसने निघून जात होता. आता मात्र तसे करता येत नाही.
- सर्वेश सोनार,
प्रवासी
महामंडाळाचा मनमानी कारभार सुरू आहे. कधी ठक्कर बाजार, तर कधी मेळा स्टॅण्ड या ठिकाणाहून बसेस सोडल्या जात आहेत. पुण्याच्या मार्गावर जाणाऱ्या गाड्या एकाच ठिकाणाहून सोडाव्यात
- सुषमा पाटील, प्रवासी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट