कुंभमेळ्यादरम्यान गंगापूर धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या नियोजनासंदर्भात मंगळवारी सेंट्रल वॉटर अॅण्ड पॉवर रिसर्च यंत्रणेने ताकदीने सादरीकरण करण्याचे प्रयत्न केला. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर या यंत्रणेची तारांबळ उडाली. संभाव्य अडचणी लक्षात घेऊन अपडेटेड सिम्युलेशन येत्या १५ दिवसांत सादर करावे, अशा सूचनाही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडून यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.
धरणातून पाणी सोडल्यानंतर कुंभमेळ्यासाठी बांधण्यात आलेल्या घाटांच्या स्थितीचे संभाव्य चित्रण सेंट्रल वॉटर अॅण्ड पॉवर रिसर्च यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मांडले. धरणातून पाणी सोडल्यानंतर घाटांवर निर्माण होणारी परिस्थिती आणि त्यातून उद्भवणारी संभाव्य आव्हाने लक्षात घेता करण्यात येणाऱ्या नियोजनाचे चित्रही यावेळी मांडण्यात आले. मात्र, यापुढे जात या कालावधीत पावसाळा असल्याचे यंत्रणा कशी विसरली? असा सवाल जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.
धरणातून सोडल्या जाणाऱ्या पाण्याच्या स्थितीबाबत विचार केला असला तरीही गंगापूर धरण क्षेत्रात किंवा नाशिक शहर परिसरात पाऊस पडल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीबाबत संबंधित यंत्रणेने काय विचार केला आहे, या प्रश्नावर मात्र यंत्रणेची भंबेरी उडाली. यानुसार आता पावसाळ्याचा विचार करून संभाव्य आव्हानांच्या संदर्भाने १५ दिवसांच्या आत नव्याने सादरीकरण करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी सेंट्रल वॉटर अॅण्ड पॉवर रिसर्च यंत्रणेस दिल्या आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट