सिंहस्थ कुंभमेळा काळात लग्न सराईचा मुहूर्त निघत नसल्याने नाशिक शहर व जिल्ह्यात लग्नांचा धामधूम सुरू आहे. याचा परिणाम सिंहस्थ कामांवर झाला असून, मजूर मिळणे दुरापास्त झाले आहे. यामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये मजुरांची टंचाई जाणवू लागली आहे. तसेच वेळेवर रोजंदारीचे पैसे न दिल्यामुळेही मजुरांनी सिंहस्थ कामांकडे पाठ फिरविल्याचे मजुरांकडून सांगण्यात येत आहे.
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कामांची लगीनघाई सुरू आहे. रस्ता, निवारा शेड, टॉयलेट, आखाड्यांची कामे, पाइपलाइनची कामे, घाट बांधकाम आदी कामे वेगाने सुरू आहेत. या सर्व कामांना उशीर झाल्यामुळे एकाच वेळी सर्व कामे उरकण्याची प्रशासनाकडून घाई सुरू आहे. काही कामांना पंधरा मे पर्यंत तर काही कामांना या महिन्याच्या अखेरीस पूर्ण करण्याचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. यामुळे सर्वच कामांना मजुरांची मोठी गरज भासत आहे. पावसाला सुरुवात झाल्यास सर्व कामांवर पाणी फिरू शकते याची प्रशासन व अधिकारी व ठेकेदारांना कल्पना आहे. यामुळे सर्वच जण कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. लग्न सराईमुळे मजुरांवी वानवा जाणवत आहे.
कामानुसार मजुरीचे दर दिले जात आहेत. सर्वसाधारणपणे मजुरांना ३५० रुपये मजुरी दिली जात आहे. कारागीरला ७०० रुपये, आरसीसी काम करणाऱ्यास ६०० रुपये, महिला कामगारांना २०० ते २५० रुपये मजुरी दिली जात आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सर्वांना मजुरीचे वाटप केले जाते.
पाणीटंचाईमुळे टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. एका टँकरसाठी ४०० रुपये तर एक ब्रास वाळूसाठी चार ते पाच हजार रुपये मोजावे लागत आहेत. काही ठेकेदारांनी छोट्या ठेकेदरांना ठेका देऊन कामे उरकण्यावर भर दिला आहे. यामुळे मजुरांना मजुरी मिळण्यास दिरंगाई होत असल्याने अनेक मजुरांनी या कामांकडे पाठ फिरवल्याचे दिसून येते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट