'मामाचा गाव मोठा
सोन्या चांदीच्या पेठा
शोभा पाहून घेऊया
मामाच्या गावाला जाऊया...'
सध्या मामाचा गाव शोभा पाहण्यासाठी नव्हे तर शोभेइतकाच उरला आहे. मुलांच्या भावविश्वातला सर्वात सुखद असणारा हा ठेवा काळाच्या ओघात त्यांच्यापासून दूर गेला आहे. त्यामुळे नाती आणि नात्यातील प्रेम यापासून आजची पिढी दुरावत चालली आहे. मुलांच्या मानसिक बळासाठी मात्र ही नाती अत्यावश्यक आहेत.
पूर्वी दीर्घकालीन उन्हाळ्याची सुटी ही जणू काही नात्यांचे बंध अधिक रुढ करण्यासाठीच योजलेली असायची. उन्हाळ्यात मामा-मावशी-काका-आत्या या सर्व हक्कांच्या नातेवाईकांकडे जाऊन मुले ही सुटी मनसोक्त उपभोगायचे. एकाच ठिकाणी सर्वजण (आते-मामे-मावस-चुलंत भावंड) एकत्र जमून सुटीचा आनंद लुटायचे. सुटी दीर्घकालीन असल्याने प्रत्येकाकडे थोडे-थोडे दिवस जाऊन राहण्याची इच्छा पूर्ण व्हायची. त्यातच सुट्यांमध्ये आवर्जून कौटुंबिक सोहळे (लग्न-मुंज-वास्तू-पूजा) यांचे आयोजन केले जायचे. त्यामुळे ज्याच्याकडे कार्य असायचे त्याच्याकडे आधी अन् नंतरही पाहुण्या रावळ्यांचा राबता असायचा.
सुट्यांमध्ये मुलांच्या निमित्ताने सर्व नातेवाईक एकत्र जमून धमाल करायचे. नात्यांची ओळख मुलांना आपसूकच व्हायची. प्रत्येक सुटीत मुलांच्या-नातेवाईकांच्या गाठी भेटी होत असल्याने नात्यांमध्ये प्रचंड आपुलकी असायची. एकमेकांप्रती ओढ आणि जिव्हाळा प्रत्येकाच्या मनात असायचा. नातेवाईक राहत असलेल्या प्रत्येक गावी जाणे-येणे होत असल्याने त्या गावाची संस्कृती-चालीरीती-रूढी-परंपरा, एखादे वैशिष्ट्य हे मुलांना आवर्जून माहित असायचे. शिवाय ते गाव मामा-मावशीचे-आत्याचे असल्याने एक वेगळीच ओढ त्याबद्दल मनात असायची. त्या काळी कुठल्याही नातेवाईकाकडे गेले तरी औपचारिकतेला थारा नसायचा. खूप दिवसांनी एकत्र येत असल्याने प्रत्येकाकडे सांगण्यासारखे खूप असायचे. किस्से-अनुभव-गमती-फजिती असा खजिना प्रत्येकाच्या पेटाऱ्यातून बाहेर पडायचा.
आजच्या व्हर्च्युअल जगात मात्र 'मी'पणाची व्याप्ती वाढल्याने नात्यांचा संकोच झाला आहे. 'मी', 'माझे', 'मला' एवढ्याच पुरते जग सीमित झाल्याने इतरांना त्यात सामावून घेण्याची वृत्ती लोप पावली आहे. त्यामुळे आप्तस्वकीय-नातेवाईक यांच्याशी असलेला जिव्हाळा कमी होऊ लागला आहे. कधीही नातेवाईकांकडे हक्काने जाऊन धडकणारे पाहुणे आता वेळेची सोयीची चौकशी करून क्वचित प्रसंगी जाऊ लागले. यामुळेच सर्व-सामान्य माणूस सुटीत पर्यटनासाठी बाहेर पडून वरवरच्या सुखाला भाळून चकचकीत हॉटेलमध्ये एन्जॉय करू लागला. मुलांना नकळत्या वयात या भौतिक सुखाच्या सवयी लावून त्या भौतिक सुखाच्या कक्षा रुंदावण्यात हातभार लावू लागला. नात्या-नात्यातली नाळ स्वतःच्या हाताने ठेचून बाजूला करण्याचा अट्टहास मुलांच्या मनावर विपरित परिणाम करू शकतो हे भान तो विसरला. त्यामुळे हॉटेलच्या तथाकथित सुखासोयीलाच जीवनशैली मानण्याची चुकीची मानसिकता मुलांच्या मनात रुढ झाली. नात्यांचा आदर आणि जिव्हाळा या बाबी मुलांपासून कोसो दूर गेल्या आहेत.
सुखी दिसत असले तरी मानसिक संतुलन बिघडवणारी पोकळी प्रत्येकाच्या मनात आहे. मानसिक आधाराची तीव्र गरज भागवण्यासाठी माणसाला माणसाची गरज निर्माण झाली आहे. मन मोकळे करण्याची एक हक्काची जागा नात्यांमध्येच मिळू शकते. म्हणून नात्यांना पुन्हा एकदा उजाळा देण्याची गरज भासू लागली आहे. आपल्या पाल्यांना नात्यांमुळे मिळणाऱ्या मानसिक बळाचे सुरक्षित कोंदण मिळवून देणे गरजेचे आहे. यासाठी मुलांची सुटी कारणी लावून नात्यांचे घट्ट बंध परत एकदा तयार करायला हवेत. त्यायोगे मुलांना मानसिक बळ मिळू शकेल.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट