नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांच्या मानसिकतेचा फायदा घेऊन त्यांना गंडविण्याचा प्रयत्न शहरात पुन्हा घडतो आहे. शहरातील अनेक उमेदवारांना रेल्वे खात्याच्या भरतीसाठी निवड झाल्याचे कॉल लेटर्स मिळाले आहेत. पुढील प्रक्रियेवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी उमेदवारांकडून हजारो रूपये बँकेच्या अकाऊंट नंबरवर भरण्याच गळ घातली जाते आहे. परिणामी, असे कॉल लेटर्स हाती पडलेले उमेदवार संभ्रमात आहेत.
सुमारे सात ते आठ महिन्यांपूर्वी नाशिकमधील काही उमेदवारांनी केंद्र सरकारच्या रेल्वे खात्याकडे नोकरीसाठी अर्ज केले होते. या प्रक्रियेत सहभागी होत या उमेदवारांनी परीक्षाही दिली होती. मात्र या प्रक्रियेशी काडीचाही संबंध नसणाऱ्या व्यक्तींनी आता या परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना तुमचीच निवड झाल्याचे सांगून पैशांचीही मागणी केली आहे. या निवड प्रक्रियेत उमेदवाराच्या परीक्षेच्या तपशीलाचा अथवा कुठल्याही मुलाखतीचा काहीही संबंध नाही. उमेदवारांच्या मोबाइल नंबरवर येणाऱ्या एका मेसेजच्या माध्यमातून थेट नोकरीसाठी निवड झाल्याचे कळविण्यात येते. या पाठोपाठ दुसऱ्याच मोबाइल नंबरहून येणाऱ्या कॉलच्या माध्यमातून या उमेदवारांना अभिनंदनाचा फोन येतो. पुढील प्रक्रियेसाठी सिक्युरिटी बाँड म्हणून १३ हजार ५०० रूपयांची मागणी करण्यात येते आहे.
दोन दिवसांपूर्वी रेल्वेचे कॉल लेटर हाती पडल्यानंतर दोन दिवसांच्या कालावधीत उमेदवारांना वेगवेगळ्या नंबरहून सुमारे आठ ते दहा कॉल पैशांच्या मागणीसाठी आले आहेत. उमेदवाराची कुठलीही मुलाखत न घेता थेट त्याच्या हाती कॉल लेटर पोहचवून पैसे उकळण्याची ही प्रक्रिया संशयास्पद आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या लेटरहेडची कॉपी यामध्ये करण्यात आली आहे. या लेटरमधील भाषा, नियमांचे आणि भरती कायद्याचे दिलेले संदर्भ तपशीलवार दिसत असले तरीही ग्रेड पे ची मांडणीसह विविध मुद्द्यांबाबत प्रथमदर्शनीच संशय निर्माण होतो आहे. यातील बहुतांश उमेदवारांनी नोकरीच्या संधी देणाऱ्या विविध वेबसाइट्सवर माहिती नोंदली आहे. या किंवा इतर माध्यमातून चोरीला गेलेल्या माहितीच्या आधारे गरजू उमेदवारांपर्यंत या जाळ्याच्या माध्यमातून संपर्क साधला जातो आहे.
मात्र तक्रार नाही...
केंद्राच्या विविध खात्यांमध्ये विविध पदांवर निवड झाल्याचे पत्र पाठवून त्यापोटी उमेदवारांकडून लाखोंची लूट झाल्याचे प्रकार यापूर्वीही नाशिकमध्ये घडले आहेत. झालेल्या फसवणूकीमुळे बदनामी होऊ नये यासाठी फसलेले उमेदवारही तक्रारी दाखल करण्यासाठी पुढाकार घेत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यापूर्वी नाशिकमधील उमेदवारांना माहिती व प्रसार मंत्रालय, महिला व बालकल्याण विकास मंत्रालय, वनविभाग आदी विभागांकडून या प्रकारचे लेटर्स आले आहेत. यातून अनेक उमेदवार गंडविले गेल्याचीही उदाहरणे कमी नाहीत.
नाशिकमधील काही उमेदवारांना आता रेल्वे खात्याकडून कॉल लेटर्स पाठविल्याचा फार्स भामट्यांच्या माध्यमातून उभारला जातो आहे. रेल्वे खात्याकडून या बाबत मिळणारी माहिती, कॉल लेटर्समधील काही संशयास्पद चुका आणि उमेदवारांकडे मुलाखतीशिवाय पैशांची होणारी मागणी या गोष्टी उमेदवारांची दिशाभूल करणाऱ्या आहेत. - अजिंक्य गिते, भारतीय जनता युवा मोर्चा, कार्यकर्ता
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट