कुठल्याही प्रभावी संवाद यंत्रणेशिवाय करोडोंचा जनसमुदाय कसा एकत्रित होऊ शकतो ? त्यासाठी किती खर्च येऊ शकतो? अशा आशयाचा सवाल एका इंग्रज अधिकाऱ्याने पं. मदनमोहन मालवीयांना विचारला होता. पंचांग नावाच्या पुस्तकातील केवळ एका मुहूर्ताच्या नोंदीवरून कुंभमेळ्यात ही जनशक्ती एकवटली जात असल्याचा संदर्भ त्यांना दिला त्यावेळी अधिकारी अवाक् झाले होते.. असा एक किस्सा आहे ! या कुंभचक्राचे चार पर्व आहेत. चार कुंभाच्या आयोजनानंतर एक चक्र पूर्ण होत असल्याची भाविकांमध्ये श्रध्दा आहे. याच विषयावर एक नजर :
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या जीवनध्येयांचा विचार भारतीय तत्वज्ञानाने मानवी जीवनाला दिला. याच उद्दिष्टांपैकी धर्माच्या माध्यमातून जाणारा आणि मोक्ष तथा पूर्णत्वाच्या प्रक्रियेकडे नेणारा महासोहळा म्हणून कुंभमेळ्याच्या स्थान भारतात प्राचीन काळापासून आजवर अबाधित आहे. या कुंभाची पताका पिढ्यान् पिढ्या, युगानुयुगे खांद्यावर फडकविणाऱ्या साधू समुदायाच्या रचनेला आखाड्यांनी आश्रय दिला. या आखाड्यांचा कुंभमेळ्यातील सहभाग हा अविभाज्य घटक आहे. किंबहुना आखाड्यांच्या सहभागाशिवाय या महासोहळ्याला अर्थ नाही. दहा शैव पंथीय तर तीन वैष्णव पंथीय आखाड्यांच्या माध्यमातून लाखो साधूंचा समुदाय या सोहळ्यात यंदाही सहभागी होणार आहे. यातील शैव आखाड्यांना पूज्य शंकराचार्यांपासून सुमारे २२०० वर्षांची परंपरा असल्याचे मानले जाते. तर वैष्णव पंथीय आखाड्यांची सुमारे ६०० वर्षांची परंपरा मानली जाते.
कुंभपर्वाला हरिव्दारपासून सुरुवात होत असल्याचा उल्लेख नारद पुराण, शिवपुराण अन् ब्रह्मपुराणासारख्या संदर्भांमध्ये आहे. तर हरिव्दार पाठोपाठ प्रयाग, नाशिक-त्र्यंबकेश्वर, उज्जैन या प्रमाणे हे चक्र पूर्ण होत असल्याचे मानले जाते. या प्रत्येक क्षेत्री दर बारा वर्षांच्या कालखंडाने कुंभमेळा आयोजित केला जातो. हरिव्दार व प्रयाग येथे दर सहा वर्षांनी 'अर्ध कुंभ' साजरा होतो.
दक्षिणकाशी नाशिक
बारा ज्योतिर्लिंगापैकी त्र्यंबकेश्वर हे एक स्थान. सह्याद्री पर्वतरांगांमधील ब्रह्मगिरी टेकड्यांच्या पायथ्याशी नाशिक शहरापासून हाकेच्या अंतरावर वसलेले हे क्षेत्र. ब्रह्मगिरीच्या टेकड्यांवर गोदावरीचा उगम आहे. यामुळे शैव पंथियांच्या दृष्टीने कुंभासाठी त्र्यंबकेश्वरला तर प्रभू रामचंद्र तथा भगवान विष्णूंच्या अवतरांच्या निवासामुळे पावन झालेल्या नाशिक नगरीला वैष्णव पंथियांच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. गुरूचा सिंह राशीतील प्रवेश अन् सूर्य व चंद्राचा कर्क राशीतील प्रवेशाच्या तिथीस नाशिक व त्र्यंबकेश्वरी होणाऱ्या महाकुंभास महत्त्व आहे.
अवंतिका तथा उज्जैन
मध्य प्रदेशातील क्षिप्रा नदीच्या तीरावर वसलेल्या अवंतिकापुरी तथा आजच्या उज्जैनलाही कुंभाच्या दृष्टीने महत्व आहे. महाकालेश्वर ज्योतिर्लिंगामुळे हे स्थानही अत्यंत पवित्र मानले जाते. गुरू सूर्य राशीमध्ये व चंद्र आणि सूर्य मेष राशीत असतांना उज्जैन येथे कुंभमेळा आयोजित केला जातो.
प्रयागचा कुंभमेळा
गुरू ग्रह ज्यावेळी वृषभ राशीत व सूर्य आणि चंद्राचा मकर राशीत प्रवेश होतो त्यावेळी प्रयाग क्षेत्री कुंभाचे आयोजन केले जाते. या क्षेत्री गंगा, यमुना व अदृश्य सरस्वतीच्या संगमावर कुंभमेळा पार पडतो. साधू अन् भाविकांची संख्या लक्षात घेता प्रयागमध्ये सर्वात मोठा कुंभमेळा आयोजित केला जातो.
हरिव्दार
हिंदू धर्मियांच्या दृष्टीने पवित्र असणारे हरिव्दार हे आणखी एक स्थान. या ही क्षेत्री कुंभाचे बारा वर्षांनी आयोजन होते. आता सन् २०२२ मध्ये होणारा कुंभ हा हरिव्दारला होणार आहे. हिमालयाच्या रांगांमध्ये शिवालीक टेकड्यांच्या पायथ्याशी उत्तराखंड राज्यात हे क्षेत्र आहे. 'मोक्षव्दार' म्हणूनही हे क्षेत्र भाविकांमध्ये सुपरिचित आहे. गुरूचा कुंभराशीतील प्रवेश, सूर्य व चंद्राचा अनुक्रमे मेष व धनू राशितील प्रवेश झाल्यानंतर हरिव्दार येथे कुंभमेळा आयोजित होतो.दीर्घकालाने हाती येणारी पर्वणी साधण्यासाठी कुंभाच्या कालावधीत करोडो पावलांचे ध्येयही केवळ एकच असते. ते म्हणजे पर्वणीचे स्नान.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट