अमोघ पोंक्षे, कॉलेज क्लब रिपोर्टर
जगातील वेगाने वाढणाऱ्या काही मोजक्या शहरांमध्ये नाशिकचा क्रमांक लागतो. प्राचीन संस्कृती आणि आधुनिकतेचा अनोखा संगम या शहरात अनुभवायला मिळतो. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हे शहर कात टाकतयं. आज १८ एप्रिल म्हणजेच जगभरात हा दिवस 'वर्ल्ड हेरिटेज डे' म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर नाशिकमधील काही ऐतिहासिक वास्तूंबद्दल महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागातील अधिकारी श्रीकांत घारपुरे यांच्याशी खास बातचीत केली. पुरातत्व विभागाने कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील विविध मंदिरांचे व ऐतिहासिक वास्तूंचे डागडूजीचे काम हाती घेतले असून या मे अखेरीपर्यंत पूर्ण होईल, अशी आशा आहे. अशाच काही स्थळांचा कालरेषेनुसार घेतलेला हा आढावा...
नाशिक जिल्ह्याचा विचार करता ऐतिहासिक वारसा तर या शहराला लाभलेला आहेच पण, सोबतच अगदी रामायणातील पौराणिक काळाशी ही नाशिकचा फार घनिष्ठ संबंध आहे. अंजनेरी येथील मंदिर, त्र्यंबकेश्वर येथील शंकराचे प्राचीन मंदिर, गोदाघाट, काळाराम, गोराराम यासारखी मंदिरं किंवा अगदी आत्ताच्या रविवार कारंजा भागातील पेशवेकालीन सुंदर नारायण मंदिर अशा जागांची नावं ऐकली की नाशिक म्हणजे मंदिरांचं शहर असा आपला समज झालाच तर त्यात आपल्याला अतिशयोक्ती वाटू नये. कारण, एकीकडे मोठे मॉल्स, रस्ते, उड्डाणपूल बांधून आपण विकास साधायचा ठरवला तरी अगदी पौराणिक काळापासून चालत आलेल्या या वारशाचं जतन करणं ही आजच्या काळाची गरज आहे.
पौराणिक कालखंड
सध्याच्या रामकुंड परिसरात अमृत मंथनातून बाहेर पडलेल्या अमृताचे थेंब ही पडल्याचे बोलले जाते. त्यामुळे तीर्थक्षेत्र म्हणून नाशिकचं नाव कायमच मानाने घेतलं जातं. एवढचं नाही तर लक्ष्मणाने शूर्पणखा या राक्षसीचं नाक ही याच भूमीत कापून रावणाला पहिला झटका दिला होता. याचाच आधार घेत नाक म्हणजे नासिक असा संदर्भ ही दिला या शहराच्या नावामागे असल्याचे सांगितले जाते हे विशेष...!
इ.स.पू दुसरे शतक ते इ.स २ दुसरे शतक
या कालखंडात आज पांडवलेणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लेण्या खोदल्या गेल्या होत्या. याच दरम्यान सातकर्णी राजाने मोठा दान धर्म करीत येथील लोकांचं जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न केला. औरंगाबाद येथील अजिंठा वेरुळ पाठोपाठ पांडवलेणीचं नाव ऐतिहासिक वास्तूंमध्ये घेतलं गेलंच पाहिजे.
८ वे ते ९ वे शतक
नाशिक शहरातील पंचवटी भागाला जसे पौराणिक महत्त्व आहे, त्याचप्रमाणे रामाचा निस्सिम भक्त व सेवक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हनुमानाचा जन्म अंजनेरी इथलाच असे ही जाणकार सांगतात. पण, अंजनेरीचा इतिहास या पौराणिक गोष्टींपर्यंतच मर्यादीत राहिलेला नाही.
८ व्या ते ९व्या शतकादरम्यान राष्टकुट अमोघ राजा ने अंजनेरीला ताम्रपटाच्या माध्यमातून विकसित केले. कारण, आज मुंबईला एक ट्रेडिंग सेंटर म्हणून जितके महत्त्व आहे त्याहूनही जास्त एक व्यापारी केंद्र म्हणून त्या काळी अंजनेरीला महत्त्व होते. ही माहिती आज येथे राहत असलेल्या फार कमी जणांना माहित आहे.
११ वे शतक
या काळात धर्म व समाज पद्धती यांचं महत्व समाजात दृढ होतं गेलं. याच दरम्यान शिलाहार राजाने सध्या उत्तर महाराष्ट्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक, नंदुरबार, धुळे अशा भागांवर आपली सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. हा राजा मुळात ठाणक म्हणजे आजचं ठाणे येथील होता. मात्र, त्यासंदर्भातील माहिती आज हवी तेवढी आपल्याकडे उपलब्ध नाही
१२ वे शतक
बाराव्या शतकात देवगिरीचे यादव यांनी नाशिकजवळील सिन्नर येथे गोंदेशवर मंदिराची स्थापना केली. अनेकांना याची कल्पना नसली तरी अनेक प्राचीन मंदिरांपैकी एक म्हणून हे मंदिर आजही ओळखले जाते. नाशिकपासून अवघ्या ३० ते ३५ किमी अंतरावर हे मंदिर वसलेले असून या मुख्य मंदिराच्या आजूबाजूला चार आणखी देवतांची मंदिरे आहेत. पण, मुख्य मंदिर मात्र शंकराचे असून, या मंदिर समुहाला पंचायतन असे म्हणतात. हे मंदिर १३ व्या शतकात बांधले गेले असल्याचे कळते.
१३ वे शतक
तेराव्या शतकात मालेगाव येथील झोडगे गावात तसेच तिथूनच जवळ असलेल्या देवळाणा गावात ही शंकराचे प्राचीन मंदिर आहे. ही दोन्ही मंदिरे देवगिरीच्या यादवांनी बांधलेली असून, त्या काळी असलेल्या अनेक राजांनी समाजासाठी अशा अनेक मंदिरांची स्थापना केल्याचे आपल्या लक्षात येईल.
सूरत व्हाया नाशिक
श्रीरामांबरोबरच शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने ही नाशिक भूमी पावन झाल्याचे इतिहासात दाखले सापडतात. सूरतेची लूट करण्यासाठी निघालेले महाराज आणि त्यांचे सहकारी त्र्यंबकेश्वर मार्गे गेल्याचे कळते तसेच पेशव्यांनी जीर्णोध्दार करण्यापूर्वी महाराजांनी त्या काळी त्र्यंबकेश्वरचे दर्शन घेऊन मग सूरतवर स्वारी केल्याचे कळते.
पेशवाईचा काळ
पेशव्यांच्या काळात खऱ्या अर्थाने नाशिकमध्ये मंदिरांची स्थापना झाली. सुंदर नारायण मंदिर, त्र्यंबकेश्वर मंदिर, काळाराम मंदिर, बल्लाळेश्वर मंदिर, त्रिभूनेश्वर मंदिर, गंगाधरेश्वर मंदिर, कुशावर्त तीर्थकुंड, केदारेश्वर मंदिर व इंद्राळेश्वर मंदिर ही सर्व मंदिरं पेशवेकालीन असून, फार मोठा स्थापत्य केलेला नमुना म्हणून आज या मंदिरांकडे पाहिलं जातं. सुंदर नारायण मंदिराला तर खूप मोठा इतिहास आहे. हे मंदिर १८ व्या शतकात बांधण्यात आलेले असून पेशव्यांचे सरदार चंद्रचूड यांनी ते बांधल्याचे समजते. रामजन्म उत्सवात जी रथयात्रा निघते तो रथ ही माधवराव पेशव्यांच्या मातोश्री गोपिका बाईंनी मंदिराला दिल्याचे कळते.
सरकारवाडा
पेशवाई १८१८ साली खालसा झाली आणि हळूहळू इंग्रजांनी भारतभर आपला साम्राज्य विस्तार करण्यास सुरुवात केली आणि याचा एक साक्षीदार म्हणजे आजही नाशिकमध्ये डौलाने उभा असलेला सरकार वाडा. या वाड्याची भिंत अतिशय गुळगुळीत दगडातून बनवलेली असल्याने यालाच चोपडावाडा असेही म्हणतात. याच वाड्याला पुलावरचा वाडा असेही काही लोक संबोधतात.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट