नाशिक महापालिकेने स्थानिक संस्था कर (एलबीटी) वसुलीत गेल्या वर्षी विक्रमी अशी ६८० कोटी रुपयांची वसुली केली असली, तरी अद्यापही व्यापारी मोठ्या संख्येन एलबीटीपासून दूर आहेत. अशा व्यापाऱ्यांचा शोध घेण्यासह अर्धवट पत्ते असलेल्या चार हजार ८०० व्यापाऱ्यांपर्यंत पोहचण्यासाठी विक्रीकर विभागाशी संपर्क साधला आहे. या व्यापाऱ्यांकडून तब्बल दोन वर्षाची एलबीटी वसूल केली जाणार आहे.
महापालिकेन विक्रीकर विभागाकडे नोंद असलेल्या ३१ हजार व्हॅट भरणाऱ्या व्यापाऱ्यांची नोंदणी एलबीटीत करून घेतली आहे. मे २०१३ मध्ये एलबीटी लागू झाल्यानंतर १६ हजार ४०० व्यापाऱ्यांची नोंदणी झाली होती. ती संख्या आता वाढली आहे. सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात यातील तब्बल ४८०० व्यापाऱ्यांनी एलबीटीचे रिटर्न भरले नाहीत. त्यामुळे महापालिकेन या व्यापाऱ्यांचा शोध केल्यावर अर्धवट पत्ते आणि माहितीमुळे या त्यांचा शोधच लागला नाही.
त्यामुळे महापालिकेन या व्यापाऱ्यांच्या अर्धवट पत्त्यांसाठी पुन्हा विक्रीकर विभागाकडे धाव घेतली असून त्यांच्या पत्त्यासह मोबाईल नंबर किंवा नवीन बदलेला ठावठिकाणा द्यावा अशी मागणी केली आहे. सोबतच मुंबई दुकाने आणि आस्थापना अंतर्गत रजिस्टर केलेल्या शहरातील शॉप अॅक्टचीही माहिती मागविण्यात आली आहे. त्यानंतर नवीन एलबीटीधारकांची नोंदणी केली जाणार आहे. नवीन एलबीटीधारकांची नोंदणी झाल्यास एलबीटी वसूलीत वाढ होवून आपोआप तिजोरीचा भार हलका होणार आहे. गेल्या आर्थिक वर्षात महापालिकेने आपल्या उद्दिष्टापेक्षा अधिक अशी तब्बल ६८० कोटींची वसूली केली आहे. त्यामुळे चालू वर्षात ती आठशे कोटीपर्यंत नेण्याचा विभागाचा मानस आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट