Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मंगळवारीही करता येणार सोने खरेदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील सर्व दुकाने वर्षभर म्हणजेच ३६५ दिवसही खुली राहतील, अशी अधिसूचना उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाने जारी केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत ग्राहकांना मंगळवारसह ३६५ दिवसही सोने खरेदी करता येणार आहे. नाशिकमधील सराफी पेढ्या मंगळवारी बंद ठेवल्या जात होता. नाशिकच्या सराफ बाजारातील व्यापाऱ्यांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

नाशिकमधील सर्व सराफ मंगळवारी आपले व्यवहार बंद ठेवत आहेत. नेमके याच दिवशी ग्राहकांना सोने खरेदी करायची झाल्यास त्यांना मॉल हा एकमेव पर्याय उपलब्ध होता. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांचे नुकसान होत होते. सरकारच्या या निर्णयामुळे छोट्या व्यावसायिकांचा फायदा होणार असून, पारंपरिक ग्राहक मॉलकडे वळणार नाही.

या निर्णयामुळे साप्ताहिक सुट्टीबाबत प्रत्येकजण आपल्या मर्जीनुसार निर्णय घेऊ शकणार आहे. एखाद्या दुकानातच पाच सेल्समन असल्यास त्यांना आळीपाळीने सुट्टी देऊन व्यवहार सुरू ठेवता येणार आहे.

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम १९४८ अंतर्गत सर्व दुकाने यापूर्वी आठवड्यातून एकदा बंद ठेवण्यात येत असे. दुकाने खुली ठेवण्यासाठी परवानगी घ्यावी लागत असे. त्याबाबतचे आक्षेप नोंदविण्यात आल्यानंतर आणि तक्रारींची दखल घेऊन उद्योग आणि कामगार मंत्रालयाने सर्व दुकाने वर्षाच्या ३६५ दिवशीही खुली राहतील, अशी परवानगी दिली आहे. परंतु, त्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. प्रत्येक कामगाराला त्याच्या वेतनातून कोणत्याही प्रकारची कपात न करता एक दिवस भरपगारी सुट्टी द्यावी आणि सुट्टीसंबंधीचे प्रत्येक महिन्याचे वेळापत्रक सूचना फलकावर आगाऊ लावण्यात यावे, प्रत्येक कामगाराला सलग पाच तास काम केल्यावर एक तासाची विश्रांती द्यावी, दररोज नऊ तास किंवा आठवड्यामध्ये ४८ तासापेक्षा जास्त काम करणे आवश्यक असणार नाही, या अटींचा अधिसूचनेत समावेश करण्यात आला आहे. याशिवाय कोणतेही दुकान रात्री दहानंतर उघडे राहणार नाही. कामगारांना ओळखपत्र द्यावीत. महिला कामगारांना रात्री साडेनऊनंतर कामावर ठेवण्यात येऊ नये, इत्यादी अटीही लागू राहणार आहेत.

मोठे मॉल्स या अगोदरही ३६५ दिवस खुले असतात. त्यामुळे लहान व्यावसायिकांचे हाल सुरू होते. या निर्णयामुळे व्यवसाय वाढीस चालना मिळणार असून, ग्राहकांची होणारी गैरसोय टळणार आहे.

- गिरीष टकले

सरकारच्या निर्णयाचे सराफ व्यावसायिकांनी स्वागत केले आहे. ज्या सराफ व्यावसायिकांकडे जास्त नोकरवर्ग आहे, त्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. आळीपाळीने सुट्यांचे व्यवस्थापन करून ३६५ दिवस दुकाने उघडी ठेवता येणार आहे.

- कन्हैय्या आडगावकर

सर्वांनाच ३६५ दिवस दुकान उघडे ठेवणे शक्य होणार नाही. मात्र, या निर्णयामुळे ग्राहकांचा निश्चित फायदा होणार आहे. मॉलकडे वळणारे ग्राहक आपल्या पारंपरिक सोनारांकडेच खरेदी करतील यात शंका नाही.

- अमित नागरे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वेब अॅपसाठी ‘हम साथ साथ’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुंभमेळ्यातील संभाव्य समस्या सोडविण्यासाठी उपयुक्त ठरणारे वेब अॅप कुंभथॉनच्या टीमसोबत बनविण्याचा निर्णय कुंभमेळा प्रशासनाने घेतला आहे. कुंभमेळ्यातील संभाव्य समस्या आणि त्यावर तंत्रज्ञानाचा उतारा या अनुषंगाने सहा महिन्यांपासून कार्यरत असणाऱ्या कुंभथॉन टीमशी प्रशासनाने मिलाफ साधला.

महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी 'कुंभथॉन' टीमसोबत शेकहॅण्ड करीत कुंभमेळ्यात विविध समस्यांवर उपयोगी पडणारे मोबाइल तसेच वेब अॅप बनविण्याचा निर्णय महापालिका आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला.यावेळी मनापा आयुक्त प्रवीण गेडाम, मनपा संगणक विभागप्रमुख मगर, शहर अभियंता यू. बी. पवार, मनपा अधिकारी तसेच 'कुंभथॉन' चे सुनील खांडबहाले, संदीप शिंदे, गिरीश पगारे, गुणवंत बत्तासे, सुभाष पाटील, 'कुंभथॉन' चे विविध गट व मार्गदर्शक भीष्मराज बाम, उद्योजक मनोहर देशपांडे आदी उपस्थित होते.

कुंभमेळा ही एक व्यावसायिक संधी कशी आहे हा प्रत्यक्ष कृतीतून संदेश देण्यात 'कुंभथॉन' यशस्वी होते आहे. दर बारा वर्षांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्यात शहराची अनेक पटींनी वाढणारी लोकसंख्या मुलभूत सुविधांचा तुटवडा, स्थानिक प्रशासनावर येणारा ताण, रोगराईचे आव्हान, रहदारीचे कोलमडणारे गणित, स्वच्छता, गर्दी, आपत्ती, सुरक्षाविषयक यासारखे आदी प्रश्न हाताळताना प्रशासनासमोर आव्हान निर्माण होते. याच पार्श्वभूमीवर तंत्रज्ञानाची मदत घेत या संभाव्य प्रश्नांना उत्तरे शोधण्याचा प्रयत्न कुंभथॉनच्या टीमकडून केला जात आहे. विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी वेळोवेळी तरुणांना मार्गदर्शन केल्याने प्रशासनाच्या गरजा समजून घेणे अधिक सोपे झाले. त्यातच एमआयटीसारख्या अव्वल विद्यापीठाचे मार्गदर्शनही 'कुंभथॉन' गटांना सातत्याने मिळत आहे. उद्योग जगतातील नामांकित कंपन्याही या निमित्ताने शहराकडे आकृष्ट झाल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टँकरसाठी मोजावे लागतात पैसे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

उन्हाळाच्या प्रारंभीच जुने नाशिक परिसरात कमी दाबाने व अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने कृत्रिम पाणीटंचाईची झळ नागरिकांना बसू लागली आहे. अनियमित पाणी पुरवठामुळे काही भागात नळांना पाणीच येत नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी पैसे मोजण्याची वेळ नागरिकांवर येऊन ठेपली आहे.

उंचावर घर असलेले पिण्याचे पाणी न मिळणे कायमची डोकेदुखी झाली आहे. पुरेसा पाणीसाठा मिळविण्यासाठी नागरिकांना नगरसेवक व पाणी पुरवठा विभागाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. दरम्यान, काही भागात उच्च दाबाने व २४ तास पाणी वाहत असल्याचे चित्र आहे. तर काही ठिकाणी मोटर लावूनही नळाला पाणी येत नसल्याचे दिसून येत आहे. प्रभाग २९ मधील प्रज्ञानगर, सय्यद जुन्नरी हॉल व नानावली या भागात तर नागरिकांना प्रति टँकर चारशे रुपये पैसे मोजून पाणी विकत घ्यावे लागत आहेत. अशीच परीस्थिती अन्य प्रभागातही आहे. नानावलीच्या वीस हजार लिटर पाण्याची क्षमता असलेल्या या नवीन जलकुंभास महापालिका प्रशासनाकडून मंजुरी मिळत नसल्याने येथील पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. महापालिकेच्या तिजोरीतील खडखडाटमुळे जुने नाशिक जलव‌ाहिनी टाकण्यासह नवीन जलकुंभ उभारण्याचे काम रखडले आहेत.

जुने नाशिकमधील प्रभाग ३९ च्या काही भागात नवीन जलवाहिनीचे काम रखडले आहे. त्यामुळे संजरीनगर, इगतपुरीवाला चाळ, आझादनगर, रेणुकानगर आदी भागात कमी दाबाने व अपुरा पाणी पुरवठा होत असल्याचे नागरिकांची तक्रार आहे. प्रभाग २६ मध्ये पिंजार घाट, जोगवाडा, काझीपुरातील काही भागात उंचावर असलेले पाणीचे नळांना एकतर अगदी कमी दाबाने व अल्पवेळ पाणी पुरवठा होतो. तर काही ठिकाणी तर नळांना पाणीच येत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. पाणी येत नसलेल्या ठिकाणी टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा करण्याचे नगरसेवकांचे प्रयत्न असले तरी त्यास मर्यादा येत आहे. परिणामी नागरिकांवर पैसे देऊन पाणी विकत घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

जुने नाशिक परिससरात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. काझीगढी, नानावली, कुंभारवाडा आदी उंचावरील भागात अगदी कमी दाबाने व अपुरा पाणी पुरवठा होत आहे. आठवड्यातून तीन वेळा टँकरव्दारे नागरिकांना मोफत पाणी ‌दिले जात आहे. शिवाय प्रज्ञानगर, सय्यद जुन्नरी हॉल व नानावली आदी परिसरातील नागरिक प्रती टँकर चारशे रुपये देऊन पाणी विकत घेत आहेत. नानावली येथील नवीन जलकुंभ बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

- रंजना पवार, नगरसेविका, प्रभाग २९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवल्यात विद्यार्थ्यांना विषबाधा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या येवला तालुक्यातील बाभूळगाव येथील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांच्या निवासी शाळेतील ८३ विद्यार्थ्यांना मंगळवारी सकाळी अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला. सकाळचा नाश्ता केल्यानंतर अकराच्या सुमारास शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना मळमळ, चक्कर अन् उलट्या होऊ लागल्याने सर्वांचीच धावपळ उडाली. दुपारी या विद्यार्थ्यांना उपचारासाठी येवला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून, काही ‌विद्यार्थ्यांना उपचारानंतर डिस्‍चार्ज देण्यात आला.

बाभूळगाव येथे राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मागसवर्गीय मुलांची निवासी शाळा आहे. दिमाखदार इमारत असलेल्या या वसतिगृह अन् शाळेत सहावी ते दहावीपर्यंत शाळा आहे. या निवासी शाळेत इयत्ता सहावीचे ३४, सातवीचे ३७, आठवीचे ४६ तर नववीचे २७ अशी पटसंख्या आहे. दहावीची परीक्षा नुकतीच संपल्याने विद्यार्थी आपापल्या घरी गेले आहेत. या निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना सकाळी साडेआठला नाश्ता तर दुपारी १ वाजता जेवण दिले जाते. ठेका देऊन खासगी मेसद्वारे विद्यार्थ्यांना नाश्ता अन् जेवण दिले जाते. सध्या पोपट जगन्नाथ खरे या खासगी ठेकेदरामार्फत हे जेवण अन् नाश्ता पुरविण्यात येतो. मंगळवारी सकाळी साडेआठला मुलांना पोहे व दूध दिले गेले. त्यानंतर विद्यार्थी नेहमीप्रमाणे सकाळी निवासी शाळेत गेले खरे मात्र, त्यांना अकरा ते साडेअकराच्या दरम्यान अचानक मळमळ, चक्कर येऊ लागतांना काहींना पोटात दुखायला सुरुवात झाली. उलट्या सुरू झाल्या. या प्रकाराने सर्वच हादरून गेले. मुख्याध्यापक रामनाथ होंडे व शिक्षकांनी प्राथमिक उपचार म्हणून विद्यार्थ्यांना डायझीनच्या गोळया दिल्या. मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही. दरम्यानच्या काळात काही विद्यार्थ्यांनी दुपारचे जेवण घेतले. दुपारी दीडच्या सुमारास विद्यार्थ्यांना अधिकच त्रास होऊ लागल्याने मुख्याध्यापक होंडे, गृहपाल प्रदीप पाटील, लिपिक सुधीर कराळे आदी शिक्षकांनी रिक्षा बोलावून मुलांना येवला शहरातील ग्रामीण रुग्णालयात आणले.

येवला ग्रामीण रुग्णालयात या विद्यार्थ्यांना आणल्यानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. डी. सदावर्ते यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज पाटील, डॉ. प्रशांत जुन्नरे, डॉ. जितेंद्र पवार, डॉ. स्मिता सोनवणे तसेच खासगी बालरोग तज्ञ डॉ. श्रीकांत भडांगे आदींनी उपचार केले. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती नियंत्रणाखाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तहसीलदार शरद मंडलिक, गटविकास अधिकारी सुनील अहिरे, पंचायत समिती माजी सभापती संभाजी पवार, सभापती प्रकाश वाघ, रवि काळे, पंचायत समिती सदस्य दिलीप मेंगळ यांनी तत्काळ येवला ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेत विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. तसेच, ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांशी चर्चा करीत अधिक उपचाराबाबत सूचना केल्या.

येवला ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना चक्कर, उलट्या, मळमळ होताना काहींना जुलाब होत होते. अनेक विद्यार्थ्यांना ताप देखील आला होता. येवला ग्रामीण रुग्णालयात आणलेल्या ८३ विद्यार्थ्यांशिवाय निवासी शाळेतील इतर विद्यार्थ्यांवर देखरेख ठेवण्यासाठी पाटोदा, सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, नर्स अन् आरोग्यसेवक यांचे पथकही हजर झाले होते. प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश कांबळे, तसेच पाटोदा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद पारिक आदी येथे लक्ष ठेवून होते.

सकाळी ११ वाजताच मुलांना त्रास होत होता, तर दुपारचे दोन वाजेपर्यंत काय केले. यातून हा प्रकार दडपण्याचे प्रयत्न केले जात होते काय अशी शंका निर्माण होते. याबाबत सखोल चौकशी करून घटनेची जबाबदारी कोणाची हे ठरवून दोषींना शिक्षा व्हावी. तसेच, दूध व पोहे यांच्या तपासणीबरोबर विद्यार्थांचे रक्त व लघवीचे नमुने तपासावे. या आहाराबाबत जो कोणी ठेकेदार असेल त्याच्यावर कारवाई व्हावी.

- संभाजी पवार, माजी सभापती, पंचायत समिती येवला

दाखल सर्व विद्यार्थी रुग्णांवर तत्काळ योग्य ते उपचार करण्यात आले असून, त्यांच्या प्रकृतीला कोणताही धोका नाही. सर्व डॉक्टर लक्ष ठेवून असून, ग्रामीण रुग्णालयात आवश्यक तो औषधसाठा उपलब्ध आहे. विषबाधा कशातून झाली हे आताच सांगता येणार नाही. मुलांचे रक्त अन् झालेल्या उलट्या यांचे नमुने घेण्यात आले असून, ते नाशिक येथील प्रयोगशाळेत तपसणीसाठी पाठविण्यात येतील. तपासणी रिपोर्टनंतरच विषबाधेचे कारण स्पष्ट होईल.

- डॉ. एस. डी. सदावर्ते, वैद्यकीय अधीक्षक, येवला ग्रामीण रुग्णालय

सर्वांची उडाली धांदल

येवला शहरातील ग्रामीण रुग्णालयात अचानक तब्बल ६० च्या वर दाखल करण्यात आलेले विद्यार्थी रुग्ण बघता सर्वांचीच धांदल उडाली. ग्रामीण रुग्णालयाची सध्याची ३० खाटांची संख्या बघता कक्ष भरले गेल्याने रिकाम्या कक्षात खाली सतरंजी टाकत अन् इकडून तिकडे दोरी बांधत त्या दोरीला सलाईन लटकवत उपचार करावे लागले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टर व परिचारिकांनी न डगमगता मोठी धावपळ करीत तत्काळ उपचार केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमित ठाकरेंनी गिरवले राजकीय धडे!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी नाशिकमधून राजकीय धडे घेण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी त्यांनी मनविसेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या निवड प्रक्रियेत सहभाग घेवून राजकीय अभ्यास केला. अमित यांच्या आकर्षणामुळे मनसे कार्यालयाला मंगळवारी झळाळी प्राप्त झाली होती. राजकीय प्रक्रिया समजून घेण्यासाठी ठाकरे उपस्थित असल्याचे मनविसेचे प्रदेशाध्यक्ष राजन शिरोडकर यांनी सांगितले.

मनसेच्या राजगड कार्यालयात अमित यांची नऊ क्रमांक असलेल्या ऑडी कारने इंट्री झाली. ज्युनिअर ठाकरेंना पाहण्यासाठी आणि भेटण्यासाठी जिल्हाभरातील मनसेच्या युवा कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. प्रदेशाध्यक्ष शिरोडकर यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्हाभरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती शिरोडकर यांनी घेतल्या. ही संपूर्ण प्रक्रिया अमित यांनी जाणून घेतली. सोबतच काही पदाधिकाऱ्यांशी चर्चाही केली.

नाशिकमध्ये मनसेची सत्ता असूनही पक्ष फारशी समाधानकारक कामगिरी करू शकलेला नाही. त्यामुळे ठाकरेंकडून आता ज्युनिअर ठाकरेंना मैदानात उतरवून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आतापर्यंत अमित हे राज ठाकरेंसोबत नाशिकच्या दौऱ्यात हजेरी लावून राजकारणाचा अभ्यास करीत होते. आता या निमित्ताने मनविसेची कमान हातात घेण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता घरीच करा इसीजी टेस्ट

$
0
0

केबीटीच्या विद्यार्थ्यांचे संशोधन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इको कार्डिओग्राफ अर्थात इसीजी करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आता जाण्याची गरज राहणार नाही. कारण, इसीजी घरीच करता येणे शक्य आहे. त्यासाठी कर्मवीर अॅड. बाबुराव ठाकरे इंजिनीअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी संशोधनातून नावीन्यपूर्ण असे उपकरण तयार केले आहे.

केबीटीच्या इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन विभागातर्फे इलिसिट ही राज्यस्तरीय स्पर्धा मंगळवारी घेण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन सकाळी साडेदहा वाजता झाले. याप्रसंगी टॅक्ट प्रा. लि.चे संचालक नीलेश साळसकर, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअर्सचे विजय कोठारी व प्राचार्य डॉ. जयंत पट्टीवार उपस्थित होते. इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन शाखेच्या विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण संकल्पनांना वाव मिळावा, त्यांच्यातील सुप्त कलागुण बाहेर पडावेत आणि त्यांना योग्य अशी संधी मिळावी, यासाठी इलिसिट ही स्पर्धा घेतली जात असल्याचे प्राचार्य डॉ. पट्टीवार यांनी सांगितले.

घरच्या घरी इसीजी चाचणी करण्यासाठीचे उपकरण अरुण माळी, पारसबरेलीकर, गौरव नेमाडे यांनी विकसित केले आहे. त्यांना विभागप्रमुख प्रा. विजय बिरारी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. अवघ्या १५०० रुपयांमध्ये हे उपकरण सर्वांना उपलब्ध होऊ शकते, असा विश्वास बिरारी यांनी व्यक्त केला आहे. तसेच, या उपकरणाचे पेटंट मिळविण्यसाठीही अर्ज करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील विविध इंजिनीअरिंग कॉलेजेसमधील विद्यार्थ्यांनी इलिसिटमध्ये सहभाग घेतला. स्पर्धेदरम्यान प्रोजेक्ट कॉम्पिटीशन, डेझर्ट स्टॉर्म-रोबो वॉर, लेटस एबीसी क्वीज, प्लेसमेंट बोनान्झा, मॅग्नेटो मॅनिक, बॉक्स क्रिकेट, कोडिंग जीक सी प्रोग्रामिंग, इलेक्ट्रो डोस सर्किंट डिझायनिंग अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक, तर विजेत्या विद्यार्थ्यांना विविध पारितोषिकांनी गौरविण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रा. बी. एन. शिंदे, प्रा. एच. व्ही. पाटील, प्रा. एस. एम. जगताप, विद्यार्थी प्रतिनिधी अवधेश कुमार, अमृता खानकरी, प्रशांत वडनेरे, गौरव पाटील आदी परीश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मविप्र’ची वाटचाल ऊर्जा स्वयंपूर्णतेकडे!

$
0
0

केबीटी इंजिनीअरींग कॉलेजमध्ये सौरऊर्जा निर्मितीसाठी पायलट प्रोजेक्ट

भावेश ब्राह्मणकर, नाशिक

मराठा विद्याप्रसारक संस्थेने शतक महोत्सवानंतर आता ऊर्जा स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरू केली आहे. त्यासाठी गंगापूररोडवरील केबीटी इंजिनीअरींग कॉलेजमध्ये सौरऊर्जा निर्मितीवर आधारित पायल प्रोजेक्ट राबविला जाणार आहे. हा प्रोजेक्ट यशस्वी झाल्यानंतर संस्थेच्या तब्बल ४२० शाखांमध्ये सौर वीज निर्माण केली जाणार आहे.

मविप्र संस्थेने गेल्याच वर्षी स्थापनेचे शतक पूर्ण केले आहे. एखाद्या विद्यापीठाप्रमाणेच संस्थेचा कारभार आहे. संस्थेचे वार्षिक बजेट हे तब्बल ५०० कोटी रुपयांचे आहे. आगामी काळात संस्थेची वाटचाल ऊर्जा स्वयंपूर्णतेकडे व्हावी, या उद्देशाने संस्थेने हालचाली सुरू केल्या आहेत. सद्यस्थितीत संस्थेच्या तब्बल ४२० विविध शाखा आहेत. ज्यात मोठ्या प्रमाणात विजेचा वापर होतो. तसेच, दिवसेंदिवस विजेची मागणी लक्षणीयरित्या वाढत आहे. संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले जाते. त्यात पर्यावरणाचेही धडे दिले जातात. मात्र, वाढत्या पर्यावरणीय समस्या लक्षात घेता अपारंपरिक उर्जेचा मार्ग स्वीकारणे अत्यावश्यक बनले आहे. या साऱ्या परिस्थितीचा विचार मविप्र संस्थेने केला आहे. त्यासाठीच सौर ऊर्जेसारख्या अपारंपरिक स्त्रोताचा वापर करण्याचे संस्थेने निश्चित केले आहे. त्यासाठीच संस्थेच्या कर्मवीर बाबुराव ठाकरे इंजिनीअरींग कॉलेजमध्ये पायलट प्रोजेक्ट राबविण्याचे निश्चित झाले आहे. या कॉलेजला लागणारी वीज सौर ऊर्जेवर निर्माण करण्यासाठी कॉलेजच्या छतावर सौर पॅनल्स बसविले जाणार आहेत. याद्वारे निर्माण झालेली वीज कॉलेजमध्ये वापरली जाणार असून, या प्रोजेक्टचे प्रात्यक्षिकही कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांना करता येणार आहे. या प्रोजेक्टला यश मिळाल्यानंतर संस्थेच्या सर्वच शाखांमध्ये सौर ऊर्जेची निर्मिती करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे अपारंपरिक ऊर्जेचा स्वीकार करणारी मविप्र ही बहुधा पहिलीच संस्था ठरण्याची शक्यता आहे.

शाळांमध्येही होणार लखलखाट

पूर्व प्राथमिक शाळा ७५, प्राथमिक शाळा ६७, आश्रमशाळा ३, मराठी माध्यमाच्या माध्यमिक शाळा १४८, इंग्रजी माध्यमाच्या माध्यमिक शाळा ४, उच्च माध्यमिक विद्यालये ५४, अध्यापक विद्यालये ५, शिक्षणशास्त्र कॉलेज २, कला, विज्ञान व वाणिज्य कॉलेज २२, फार्मसी कॉलेज २, नर्सिंग कॉलेज २, आर्किटेक्चर कॉलेज १, मॅनेजमेंट कॉलेज १, आयटीआय ८, मेडिकल कॉलेज १, कृषी पॉलिटेक्निक १, कृषी कॉलेज १, ललितकला कॉलेज १, पॉलिटेक्निक कॉलेज १, भौतिकोपचार कॉलेज १, विधी कॉलेज १, समाजकार्य कॉलेज १, वसतीगृहे १६ या ठिकाणीही सौरऊर्जा निर्मितीचा संस्थेचा मानस आहे.

अपारंपरिक ऊर्जा आणि पर्यावरणपूरकतेचे धडे आम्ही विद्यार्थ्यांना देतो. मात्र, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही ऊर्जा स्वयंपूर्णतेचा ध्यास घेतला आहे.

- नीलिमा पवार, सरचिटणीस, मविप्र

पायलट प्रोजेक्ट यशस्वी व्हावा यासाठी आम्ही बहुराष्ट्रीय आणि नामांकित कंपन्यांना आमंत्रित केले आहे. हा प्रोजेक्ट इंजिनीअरींगच्या विद्यार्थ्यांनाही प्रेरणा देणारा ठरणार आहे. तो नक्कीच यशस्वी होईल, अशी खात्री आहे.

- डॉ. जयंत पट्टीवार, प्राचार्य, केबीटी इंजिनीअरींग कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खेळ मांडला!

$
0
0

>> मंदार देशमुख

स्व. भाई नेरूरकर खो-खो स्पर्धेच्या निमित्ताने...

संपूर्ण देशभरात ज्यांनी खो-खोचा संघटनात्मक पाया रचला त्या स्व. भाई नेरूरकर यांचे वयाच्या ४७ व्या वर्षी अकाली निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महाराष्ट्र खो-खो असोसिएशन पुरूष व महिला गटाच्या राष्ट्रीय स्तरावरील आमंत्रितांची खो-खो स्पर्धा सुरू केली. जानेवारी १९६४ मध्ये पहिल्या खो-खो स्पर्धेचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले होते. पहिले तपभर या स्पर्धांचे आयोजन सातत्याने केले जात होते. कालांतराने त्यात खंड पडत गेला व नंतर ती विस्मृतीत गेली. देशातील सगळ्यात मानाच्या सुवर्णचषक खो-खो स्पर्धेचे आयोजन हे राज्य संघटनेमार्फत केले जात होते. संपूर्ण भारतात ज्यांचा दबदबा आहे, अशा संघांना ह्या स्पर्धेसाठी आमंत्रित केले जात होते. मुंबई, पुणे, बडोदा, इंदौर, जबलपूर, नागपूर आदी ठिकाणच्या संघाचा या स्पर्धेत दबदबा होता. कालांतराने या स्पर्धा आयोजनाचा खर्च वाढल्याने व राज्य संघटनेचा पसारा वाढल्याने ह्या स्पर्धा आयोजनात फार कुणी स्वारस्य दाखविले नाही. देशातील सर्वांत प्रतिष्ठेची खो-खो स्पर्धा ह्या निमित्ताने बंद होणे हे क्लेशदायक होते पण...

चार वर्षांपूर्वी राज्य खो-खो संघटनेचे अध्यक्ष व माजी उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांच्या पुढाकाराने शासनाच्या माध्यमातून उगवत्या खेळाडूंसाठी राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा आयोजनाचा स्तुत्य निर्णय घेण्यात आला. तेव्हा १९ वर्षांखालील मुले-मुली यांच्या वयोगटासाठी ही स्पर्धा घेण्याचे व `एकलव्य चषक` या नावाखाली त्याचे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले. यानंतर राज्य खो-खो संघटनेने पुढाकार घेवून यात काही बदल सुचविले व ह्या स्पर्धेचे नव्याने बारसे करण्यात आले. कै. भाई नेरूरकर स्मृतीचषक खो-खो स्पर्धा व वरिष्ठ गटासाठी म्हणजे पुरुष व महिला गटासाठी ह्या स्पर्धेचे आयोजन राज्यस्तरावर करण्याचे निश्चित करण्यात आले. खो-खो खेळाची संघटनात्मक पातळीवर ज्यांनी भारत वर्षामध्ये पाळेमुळे रूजविली, त्या निमित्ताने आयोजित करण्यात येणा-या स्पर्धेचे आयोजन हे अ. भारतीय स्तरावरून राज्यस्तरावर यावे व ज्याचा संपूर्ण खर्च हा सुमारे ५० लाख रुपयांचा शासनाने करावा व राज्य संघटनेने त्याला फक्त तांत्रिक बाबींची जोड द्यावी ह्याला काव्यागत न्याय म्हणायचा की अन्य काही? असा प्रश्न खो-खोसाठी काम करणाऱ्या नव्या-जुन्या कार्यकर्त्यासमोर उभा ठाकला आहे.

२०११-१२ साली पुन्हा नव्याने ह्या स्पर्धांचा खेळ मांडला जातो. प्रथम सांगली नंतर नंदुरबार, रत्नागिरी व आजपासून आता नाशिक येथे २६ ते २९ मार्च २०१५ दरम्यान छत्रपती संभाजी स्टेडीयम, सिडको येथे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक आमदार सौ. सीमा हिरे यांनी या स्पर्धा आयोजनासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याने नाशिककरांना महाराष्ट्रातील नामवंत अशा पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा खेळ पहावयास मिळणार आहे. ह्या स्पर्धेत पुरूष व महिला गटात महाराष्ट्रातील अव्वल प्रत्येकी बारा संघ सहभागी होणार आहेत. पूर्वी ह्या स्पर्धेसाठी २० लाख रूपयांची तरतुद होती. नंतर तिच्यात वाढ होवून ती अर्ध्या कोटींपर्यंत जावून पोहोचली. त्यामुळे या स्पर्धेला जोड दिली ती किशोर-किशोरी गटाची. या गटात सुद्धा महाराष्ट्रातले प्रत्येकी ८ संघ आपले नशीब आजमावणार आहेत. अशा रीतीने संपूर्ण स्पर्धेत राज्यातील ४८० खेळाडू व ८० व्यवस्थापक, मार्गदर्शक म्हणून एकूण ६० स्पर्धक सहभागी होणार आहे. ह्या स्पर्धेच्या आयोजनापैकी साधारण ३५% टक्के वाटा ह्या खेळाडूंना मिळणा-या रोख रकमेवर खर्च होतो. याचा अर्थ सुमारे १८.५० लाख रुपये या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना रोख बक्षिसाच्या रूपाने मिळणार आहे हेच या स्पर्धेचे वेगळेपण.

सदर स्पर्धेत या आधी नाशिकचे संघ उप-उपांत्य फेरीपर्यंत धडक देत होते. या वेळी त्यांची मजल ह्या पुढे जाते का, हीच उत्सुकता क्रीडारसिकांपुढे आहे. आम्ही बदलत आहोत ही थीम नाशिक जिल्हा खो-खो संघटना आपल्या आयोजनातून महाराष्ट्राला दाखवत असते. गतवर्षी सप्टेंबर २०१४ नाशिक येथे झालेल्या स्पर्धेच्या निमित्ताने काही नवीन गोष्टीचा प्रारंभ नाशिक येथे झाला होता. या स्पर्धेच्या निमित्ताने अजून काही बदल होतात का? हा औत्सुक्याचा प्रश्न ह्या क्षेत्रातील जाणकारांपुढे आहे. तूर्तास सर्वांना शुभेच्छा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यार्थी सुखरुप परतले घरी

$
0
0

विषबाधाप्रकरणी गुन्हा दाखल; दूधविक्रेत्याची जामिनावर सुटका

म. टा. वृत्तसेवा, येवला

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या येवला तालुक्यातील बाभूळगाव येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना मंगळवारी झालेल्या विषबाधेप्रकरणी येवला शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी निवासी शाळेतील मेसच्या ठेकेदारास दुग्धपुरवठा करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी येवला न्यायालयात हजर केले असता त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.

बाभूळगाव येथील निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना मंगळवारी सकाळी पोहे अन् दूध हा नाश्ता घेतल्याने विषबाधा झाली होती. अन्न विषबाधा झाल्याने मळमळ, उलट्या, जुलाब, चक्कर आदी त्रास यामुळे तब्बल ८३ विद्यार्थ्यांना येवला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच येवला शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रणजीत डेरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास निंबाळकर, पोलिस उपनिरीक्षक सुभाष बैरागी, एम. जे. सय्यद व पोलिस कर्मचाऱ्यांनी निवासी शाळा आणि ग्रामीण रुग्णालयात भेट दिली. पोलिसांनी मुलांनी नाश्ता केलेल्या जागी भेट देत दुधाचे नमुने घेतले. मात्र, पोहे संपल्याने त्याचे नमुने हाती लागले नव्हते. मनमाड विभागाचे पोलिस उपअधीक्षक नरेश मेघराजानी यांनी भेट देत पोलिसांना तपासाबाबत सूचना केल्या.

येवला शहर पोलिसांनी मंगळवारी रात्रीच या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. निवासी शाळेतील विद्यार्थी संदीप विलास झाल्टे (वय १५) याची फिर्याद घेत शहर पोलिसांनी येवला तालुक्यातील भाटगाव येथील सुकदेव दामू कोल्हे यास मंगळवारी रात्रीच अटक केली.

निवासी शाळेतील मुलांना निकृष्ट दुधाचा पुरवठा करून ते मुलांना प्यायला दिल्याने अन् त्या निकृष्ट दुधातून मुलांची प्रकृती खराब होण्यास कारणीभूत ठरणे, त्यांची व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात आणून विषबाधेमुळे मुलांच्या जीवितास धोका निर्माण करणे याप्रमाणे शहर पोलिसांना गुन्हा दाखल केला आहे.

विषबाधा पोह्यातून की दुधामुळे?

निवासी शाळेतील विद्यार्थ्यांनी मंगळवारी सकाळी पोहे अन् नाश्ता खाताना त्यांना मळमळ, उलट्या, चक्कर व जुलाब होण्याचा त्रास झाला. ८३ मुलांवर येवला ग्रामीण रुग्णालयातील उपचारानंतर डिस्चार्ज दिला गेला. मात्र नाश्त्यातील नेमक्या कशामुळे विषबाधा झाली याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका मुलाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दूधवाल्याला आरोपी करीत गुन्हा दाखल केला असला तरी पोहे की दूध याबाबत सर्वांनाच मोठी उत्सुकता लागली आहे.

घटनास्थळी भेट दिली तसेच, विद्यार्थ्यांची भेट घेत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. निवासी शाळेचे गृहपाल व मुख्याध्यापक यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अहवाल येताच वरिष्ठांना कार्यवाही करण्याबाबत अंतिम अहवाल सादर केला जाईल. भेटीदरम्यान दुधामुळे त्रास होत असल्याचे प्रथमदर्शनी तरी निदर्शनास येत आहे.

- वंदना कोचुरे, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग, नाशिक

पोलिसांना सखोल तपास करण्याच्या सूचना केल्या आहेत. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाची मदत घेत आहोत. दुधाचे नमुने पोलिसांनी घेतले आहेत. मुलांच्या उलट्याचे घेतलेले सिलबंद बाटलीतील नमुनेही घेतले असून, ते नाशिक येथे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.

- नरेश मेघराजानी, पोलिस उपअधीक्षक, मनमाड विभाग

सर्व विद्यार्थी सुखरूप घरी

नाश्त्यामधून मंगळवारी विषबाधा झाल्यामुळे येवला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सर्व ८३ विद्यार्थ्यांना मंगळवारी रात्री उशिरापर्यंत टप्प्याटप्प्याने डिस्चार्ज देण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने सर्वांना सोडून देण्यात आल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. डी. सदावर्ते यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासकामांसाठी २१ कोटी रुपये मंजूर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण विधानसभा मतदारसंघातील सुमारे २१ कोटी रुपयांच्या विकासकामांना सन २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली आहे. ही माहिती बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी दिली. तसेच, उर्वरित विकासकामांचा जून-जुलै महिन्यातील पुरवणी अर्थसंकल्पात समावेश होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अहवा-ताहाराबाद नामपूर रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ४० लाख रुपये, अजमेर सौंदाणे-रावळगाव रस्त्याच्या रूंदीकरणासाठी २५ लाख रुपये, सटाणा वळण रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी व लॅन्ड प्लॅन तयार करण्यासाठी १० लाख रुपये, नामपूर-सटाणा वळण व कळवण रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ४० लाख रुपये, नंदुरबार-साक्री-मालेगाव रस्त्याच्या रूंदीकरणासाठी ५० लाख रुपये, काठरे दिगर - डांगसौदाणे - मालेगांव रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी ७ लाख ५० हजार रुपये, पिंपळदर- तिळवण-कंधाणे रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी ३४ लाख रुपये, आसखेडा - आंनदपूर - करंजाड रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी ३३ लाख रुपये, अहवा - ताहाराबाद - नामपूर रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी ४० लाख रुपये, अलियाबाद जाड गोळवाड रस्ता सुधारणा करण्यासाठी ६० लाख रुपये, सटाणा - दोधेश्वर - कोळीपाडा रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी ७५ लाख रुपये, आदिवासी विभागातील रस्त्यांमधील मानूर ते मोराळे रस्त्यांच्या रूंदीकरणासाठी ५० लाख रुपये, गडीपाडाते साल्हेर रस्ता सुधारणा करण्यासाठी ५० लाख रुपये, साल्हेर ते वाघंबा रस्त्यासाठी ७५ लाख रुपये, केरसाने ते मुंगसे-मुल्हेर रस्त्यासाठी ६० लाख रुपये, कातरवेल ते भिलाटीपाडा रस्त्यांचे बांधकाम करण्यासाठी ६० लाख रुपये, बोऱ्हाटे माळीवाडा मुल्हेर रस्ता दुरुस्तीसाठी ६० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महाराष्ट्राचे पाणी पळविल्यास जनता रस्त्यावर उतरणार’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

पार - तापी लिंक प्रोजेक्ट आणि दमानगंगा गोदावरी लिंक प्रोजेक्टचे पाणी गुजरातला पळविण्याचा केंद्र व गुजरात राज्य सरकरचा डाव आहे. सरकारने उत्तर महाराष्ट्रातील जनतेचे हक्काचे पाणी पळवण्याचा हा उद्योग त्वरित न थांबविल्यास जनतेला रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा परखड इशारा काँग्रेसचे नेते प्रसाद हिरे यांनी दिला आहे.

तापी प्रोजेक्ट अंतर्गत गिरणा-पांझण खोऱ्यातील जनतेचे हक्काचे ८२६ मिलियन क्युबिन लीटर पाणी काढून घेण्याचा त्या बदल्यात नार पार दमनगंगा या नद्या आडवा आणि मुंबईला पाणी द्या, असे सांगणे म्हणजे आवळा देवून कोहळा काढण्याचा प्रकार असल्याचे प्रसाद हिरे यांनी निवेदनात म्हटले आहे. केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी ७ जानेवारीला मुंबईत संबंधित मंत्री व लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता घेतलेल्या बैठकीमुळे केंद्र सरकारचा डाव उघड झाला आहे. त्यानंतर जनतेमधून मोठ्या प्रमाणात असंतोष व्यक्त केला जात आहे. या प्रश्नी राज्याच्या मंत्रिमंडळात नेतृत्व करणाऱ्या खान्देशाच्या सर्वच लोकप्रतिनिधींनी लक्ष घालणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमरनाथ यात्रेसाठी मिळेनात वैद्यकीय दाखले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, लासगलाव

लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात बाबा अमरनाथ यात्रेकरूंना लागणारे वैद्यकीय दाखले देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. आठवड्यातून केवळ एकच दिवस दाखले दिले जातील, असा अजब सल्ला दिला जात असल्याने यात्रेकरूंसमोर यात्रेआधीच अडचणी वाढल्या आहेत.

अमरनाथ यात्रेकरूंना वैद्यकीय तपासणी करूनच ही यात्रा करता येत असल्याने लासलगाव ग्रामीण रुग्णालयात तपासणीकरीता जावे लागत आहे. मात्र, अधिकारी येथे उपस्थित राहत नसल्याने अनेकांना माघारी फिरावे लागत आहे. दरवर्षी लासलगाव येथून हजारो भाविक मोठ्या श्रध्देने बाबा अमरनाथ यात्रेसाठी जातात. या अवघड यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंना लासलगाव येथील बाबा सोशल ग्रुपचे सहकार्य मिळत असते. या मंडळाचे पदाधिकारी यात्रेकरूंना रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन गेल्यानंतर त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन माघारी पाठविल्याच्या घटना येथे घडत आहेत. वैद्यकीय दाखला सरकारी दवाखान्यातून घ्यावा लागत असल्याने येथील ग्रामीण रुग्णालयात दररोज शेकडो यात्रेकरू तपासणीसाठी येतात. मात्र, डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्यांना चकरा माराव्या लागत आहेत. अनेक वेळा चकरा मारूनही कामे होत नसल्याने यात्रेकरूंना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. लासलगाव ग्रामीण रुग्णालयात एक्स रे मशीन उपलब्ध तर आहे मात्र ते चालविण्यासाठी ऑपरेटर नाही, अशी परिस्थिती येथील रुग्णालयाची आहे. आठवड्यातून केवळ एक दिवस निफाडहून एखादी व्यक्ती बोलावून एक्स रे काढण्याचे दिव्य पार पडले जाते. त्यामुळे हे मशिन सध्यातरी शोभेचे बाहुले ठरत आहे.

सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक असताना येथील डॉक्टर हे येथे वास्त्याव्यास नसून ते आठवड्यातून एकदाच उपलब्ध असतात, अशा तक्रारी रुग्णांनी केल्या आहेत. रात्री बेरात्री रुग्ण येथे गेल्यास तज्ञ डॉक्टर येथे नसल्याने रुग्णांना रात्रीच नाशिक गाठावे लागते. येथील रुग्णालयात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याचे येथील डॉक्टर सांगत आहेत. कर्मचारी नसल्याने एक्स रे मशिन फक्त गुरुवारी चालविले जाते. ही जागा भरलेली नसल्याने इतर दिवशी एक्स रे साठी निफाडला रुग्ण पाठविले जातात असेही येथील डॉक्टरांनी सांगितले.

मोठ्या संख्येने अमरनाथ यात्रेकरू येथे येत आहेत. टप्प्याटप्प्याने त्यांची तपासणी केली जात आहे. आपण या यात्रेकरूंसाठी मेळावे घेऊन त्यांची तपासणी करून दाखले देऊ.

- डॉ. राजेश कोशिरे, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, लासलगाव

अमरनाथ यात्रेसाठी लासलगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर कोशिरे हे तपासणी दाखला देतच नाहीत. दररोज येणाऱ्या रुग्णांना दाखले देणे आवश्यक आहे. लासलगावातील यात्रेकरूंची संख्या पाहता दररोज वैद्यकीय दाखले मिळणे गरजेचे आहे.

- शोभराज बागमार

मी येथे आईचा एक्स रे काढण्यासाठी चार दिवस चकरा मारत होतो. येथे एक्स रे मशिन असतानाही ऑपरेटर नसल्याने आज या उद्या या असे सांगण्यात आले. एक्स रे मशिन तातडीने सुरू केले पाहिजे.

- नितीन शर्मा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाणा पालिकेची थकली लाखो रुपयांची करवसुली

$
0
0

नरमाईची भूमिका घेतल्याने थकबाकीत वाढ

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा नगरपालिकेच्या मालमत्ताधारकांकडे करापोटी लाखो रुपयांची करवसुली थकली आहे. त्यासाठी पाठपुरावा होणे गरजेचे असून थकीत रक्कम वसूल झाल्यास पालिकेच्या तिजोरीत मोठी वाढ होणार आहे. सटाणा नगरपरिषदेचे प्रशासन दरवर्षी मार्चअखेर मोठ्या प्रमााणत करवसुली करीत असल्याचे दिसत असले तरीही वर्षानुवर्षे वसूल न होणाऱ्या मालमत्ताकराच्या वसुलीसाठी प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नसल्याचे दिसून येत आहे.

शहरातील सर्वसामान्य ग्राहकांबरोबरच शासकीय कार्यालयाकडे देखील मोठ्या प्रमाणात थकीत रक्कम असल्याची माहिती उघडकीस आली आहे. यामुळे खासगी ग्राहकांवर दंडात्मक कार्यवाहीचा बडगा उगारणाऱ्या प्रशासनाने शासकीय कार्यालयांना मुभा दिली आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. महाराष्ट्र अधिनियम लेखा संहिता २०१३ च्या तरतुदीनुसार दोन वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी थकीत असलेल्या मालमत्ताव इतर कराच्या रक्कमेत टप्प्याटप्प्याने १०० टक्क्यांपर्यंत वाढ होणार असल्याने वसुलीसाठी जोरदार प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे सांगितले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. शीतलकुमार हिरण यांना ‘फेलो ऑफ अमेरिकन’ पदवी

$
0
0

नाशिक : ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ. शीतलकुमार हिरण यांना अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिऑलॉजी या संस्थेने फेलो ऑफ अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिऑलॉजी या पदवीने नुकतेच गौरविले आहे.

जगभरातील ह्रदयरोग तज्ज्ञांची जागतिक परिषद सॅनदियगो येथे पार पडली. या परिषदेत 'बायफर्केशन स्टेटिंग इन अक्युट मायोकार्डियल इन्फाक्शन' ही दुर्मीळ शस्त्रक्रिया करणारे नाशिकचे डॉ. शीतलकुमार हिरण ही पदवी मिळणाऱ्या जगभरातील १२० तर भारतातील पंधरा जणांपैकी एक आहेत. अशा प्रकारची शस्त्रक्रिया भारतातील पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचे भारतीय ह्रदयरोग तज्ज्ञांची इंडिया लाइन या संस्थेने नुकतेच जाहीर केले होते. या संस्थेतर्फे डॉ. हिराण यांचा या शस्त्रक्रियेवरील रिसर्च पेपर परिषदेत मांडण्यात आला. याबाबत डॉ. हिरण म्हणाले, 'अशा शस्त्रक्रियेच्या रिसर्च पेपरमुळे तज्ज्ञांना संशोधनास मदत होते. ही शस्त्रक्रिया नाशिकमध्ये सहा महिन्यांपूर्वी केली होती. या पदवीमुळे संशोधनावर भर देण्याची प्रेरणा मिळाली आहे.' आधुनिक उपचार पद्धती सर्वसामान्यांपर्यंत जावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आधार’ सर्वस्पर्शी व्हावे

$
0
0

अरुण वि. कुकडे, नाशिक

आधारकार्ड ही भारतीय असल्याची नवीन ओळख म्हणून पुढे येत आहे. मात्र यातील काही अडथळे व आधारकार्ड देणे आणि रद्द करण्याच्या प्रक्रियेत सहजता येणे गरजेचे आहे. ही सहजता आणता आली तर अगदी बँकेच्या व्यवहारांपासून ते विविध शासकीय योजनांपर्यंत 'आधार' सर्वस्पर्शी होईल...

आधारकार्ड ही भारतीय नागरिकांची द्वादशअंकी अभिनव विशेष ओळख आहे. या ओळखीत मुख्यत्वे, व्यक्तिओळख (फोटो आयडी) आणि पत्तानिश्चिती समाविष्ट आहे. रेशनकार्ड, सेशनकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसंन्स, पासपोर्ट, बँक खाते क्रमांक अशा विविध ओळखीच्या कार्डाची जागा आधारकार्ड घेईल व भारतीयत्वही त्यातून सिध्द होईल, अशी प्रारंभी कल्पना होती. त्यातील भारतीयत्वाची अस्सल ओळख ही अपेक्षा राजकीय विरोध होताच युपीए सरकारने सोडून दिली. नंतर तर कुठेलेही ओळखकार्डे रद्द वा रुपांतरीत न करता आधारकार्ड हे नवीन आवश्यक ओळखपत्र करण्यात आले. निदान आधारकार्डाचा संदर्भ संबंधित व्यक्तीच्या अन्य ओळखीशी जोडण्याची गरज व प्रयत्न सुरू झाले. आता देशात ७२ कोटी जणांना आधारकार्ड देण्यात आल्याचे सांगण्यात येते. आधारकार्डाचे कर्ते करविते संशोधक संगणक इंटरनेट तज्ज्ञ नंदन निलकेनी यांनी मोठे काम केले आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व कौतुक केले पाहिजे. आधारकार्ड योजना यूपीए सरकारने सुरू केली व रेटली. एनडीए सरकारने ती उचलून धरली म्हणून तिचा वेग कायम आहे.

विशेषत: एनडीए सरकारने जनधन योजनेला आधारकार्डचा आधार दिलाने कार्यवाहीला वेग आला आहे, असे म्हणता येईल. मात्र, आधारकार्डच्या बाबतीत सरकारचे धोरण हे प्रथमपासून धरसोडीचे राह‌लिे आहे. १९ मार्च २०१५ रोजी केंद्र‌यि नियोजन मंत्री राव इंद्रजीत सिंग यांनी लोकसभेत उत्तर देताना स्पष्ट केले की, 'आधारकार्ड हे अनिवार्य नाही. या उत्तराने प्रश्न संपलेले नाही. तर अजून प्रश्न निर्माण होत आहेत. पहिला प्रश्न एवढा खर्च करून ही चांगली योजना राबविण्याचे प्रयत्न शासकीय यंत्रणेने केले. ते सर्व असे सोडून का द्यायचे ? अनिवार्य केल्याने काम होईल ? राहिलेले काम सहा महिन्यात पूर्ण करून एक चांगली योजना कार्यान्वीत करणे लाभाचे नाही का ? सध्या सरकारी यंत्रणा गॅस सबसडी देताना बँक खाते व आधारकार्डची कार्यवाही करून मागत आहेत. मग तेथेही अनिवार्यता संपणार का ? जनधन योजनेला तर आधार देणे गरजेचे व अपेक्षित आहे. तेथेही आधरकार्ड नसले तर चालेल, अशी सवलत देणार का ? सरकारी योजनांमधील अनुदाने गरिबीरेषे खालील लाभार्थिंना व इतरांनाही बँक खात्यामार्फत दिली जाणार असून, त्यातून सरकार नेमकेपणा आणत, भ्रष्टाचार रोखण्याचा प्रयत्न करीत एक लाख कोटी अनुदान खर्च सरकार वाचविणार आहे,' या साऱ्या प्रक्रियेमध्ये आधारकार्डचा संबंध व संदर्भ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.

आधारकार्ड अनिवार्य केले नाही तर या अनुदान वितरणात सरकार 'डायरेक्ट क्रेडीट' पध्दत विना जोखीम, विना विलंब व अचूक कशी राबविणार, हा प्रश्न निर्माण होईल. या साऱ्या प्रश्नांना आधारकार्ड अनिवार्य करणे हा उपाय आवश्यक आहे. उर्वरीत भारतीयांना आधारकार्ड देणे अवघड राहिलेले नाही. नागरिकांना याचे महत्त्व समजत आहे अन् ते सहकार्यही करत आहेत. शिवाय बँकांनी केवासी, नो युवर कस्टमर, खातेदाराची व्यक्ती ओळख, पत्ता निश्चितीतेचे काम, रिझर्व बँक ऑफ इंडियाने लावून धरल्याने पुरे केले आहे. त्यामुळे ज्यांचे बँक खाते आहे. त्यांना आधारकार्ड आपोआप मिळावे. याच पद्धतीने अन्य ओळखपत्रात व्यक्त‌िओळख व पत्ता निश्चिती केला असेल तर आपोआप त्वरीत आधारकार्ड दिले जावे. तर इतरांना शासकीय योजनांच्या माध्यमातून पडताळून आधारकार्ड द्यावीत. त्यापुढे मुल शाळेत प्रवेश करताना आधारकार्ड द्यावे. शाळा सोडण्याचा दाखला देताना ते अद्यावत करून घ्यावे व व्यक्ती संपल्यानंतर मृत्यू दाखला देताना व्यक्तीचे आधारकार्ड रद्द करण्यात यावे. अशी व्यवस्थित पद्धत बसवली तर ती जनगणना विकास योजना व शिफारसींसाठी उपयुक्त होईल.

अर्थसंकल्पात सहकारी बँकांना पुढीलवर्षी टीसीएस कर कपात न करण्यासाठी खातेदारांकडून १५ एच फॉर्मसोबत पॅनकार्ड नंबर घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. विशेष म्हणजे याबाबतीत काही ठिकाणी याच वर्षी १५ एच व पॅन नंबर घेणे सक्तीचे केले जात आहे. अनेक लहानमोठ्या बँक खातेदारांचे उत्पन्न कर पात्र नसते म्हणून ते पॅन घेत नाहीत. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. अनेकदा करपात्र उत्पन्न नाही म्हणून पॅन कार्ड का काढायचे ? त्यासाठी खर्च व वेळ का खर्चायचा ? हे सारे प्रश्न पॅनकार्ड ऐवजी पंधरा एच बरोबर आधारकार्ड नंबर देऊन सोडविता येऊ शकतो. या व अशाच प्रकारे आधारकार्डाचा आधार सर्वांना होईल. अजून एक विशेष उपयोग म्हणजे आपल्याकडे अनेक बँका आहेत व अनेकजण अनेक बँकाकडून शाखांमध्ये खाते उघडतात. प्रत्येक खात्याला आधार जोडला असेल तर व्यवहारांवर लक्ष ठेवणे शक्य होईल. यामुळे सायबर गुन्हे व अनेक गैरव्यवहारांवर नियंत्रण ठेवले जाऊ शकते. यापुढे आर्थिक व्यवहारात आधारकार्डाचा आधार केवळ सबसिडी पुरता न ठेवता सर्वस्पर्शी करणे फायद्याचे ठरेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संशोधन अहवाल आता ऑनलाईन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विद्यापीठ अनुदान आयोगाने संशोधन अहवाल ऑनलाईन उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिल्यानंतर आता त्याची अंमलबजावणी करण्याचे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने निश्चित केले आहे. त्यासाठीच विद्यापीठाने इन्फ्लीबनेटशी सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे संशोधन अहवालातील मजकुराची चोरी रोखण्यासह नाविन्यपूर्ण संशोधन जगभरात पोहचविण्यात मदत होणार आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या २००९ च्या निर्देशानुसार विद्यापीठात संशोधन कार्य करणाऱ्या संशोधकांसाठी आपले संशोधन इन्फ्लीबनेट केंद्राच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने सर्वांसाठी उपलब्ध करण्यात येते. संशोधन कार्य सुरू झाल्यापासून प्रबंध सादर करेपर्यंत इन्फ्लीबनेट केंद्राच्या माध्यमातून विविध टप्यांतून उपयोग होतो. यातून संदर्भही प्राप्त होतात. शिवाय संशोधनातील एकसारखेपणा टाळता येतो. वाड:मयीन चौर्य संदर्भातील माहिती सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तपासणी होते आणि संशोधनातील वाड:मयीन चौर्यास आळा बसतो. यासाठी ई-प्रबंध 'शोधगंगा' हा उपक्रम अतिशय उपयुक्त ठरू पाहत आहे. यासाठीच मुक्त विद्यापीठानेही आपल्या विद्यार्थ्यांचे संशोधन अहवाल ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आहे. त्यासाठीच विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे आणि इन्फ्लीबनेट केंद्राचे संचालक डॉ. जगदीश आरोरा यांनी 'शोधगंगा' या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. अशा प्रकारचा सामंजस्य करार करणारे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे देशातील २०१ वे विद्यापीठ ठरले आहे. या कराराप्रसंगी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव पंडित गवळी, ग्रंथालय प्रमुख डॉ. मधुकर शेवाळे, सहायक ग्रंथपाल प्रकाश बर्वे यांच्यासह विद्यापीठातील विविध विद्याशाखांचे संचालक, शिक्षक, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परीक्षेची वेळ वाटतेय अडचणीची

$
0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्षाच्या परीक्षेला गेल्या दोन दिवसांपासून सुरूवात झाली असून, या परीक्षेची वेळ अडचणी ठरत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. संध्याकाळची वेळ विविध कारणांनी विद्यार्थ्यांना गैरसोयीची ठरत असल्याने वेळ बदलावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वार्षिक परीक्षांना सुरुवात झाली आहे. 'बी.कॉम' शाखेच्या परीक्षा सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत तर 'बीए, बीएससी, बीसीएस शाखेच्या परीक्षांची वेळ दुपारी ३ ते संध्याकाळी ६ या वेळेत होत आहेत. 'बीए, बीएस्सी, बीसीएस' या शाखेच्या प्रथम वर्षास असणाऱ्या मुलांना या वेळेचा त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील कॉलेजच्या परिसरातील विद्यार्थांना या वेळेचा त्रास होत नसला, तरी बाहेरून परीक्षेसाठी येणाऱ्या गंगापूर गाव, देवळाली गाव, त्र्यंबक येथील विद्यार्थ्यांची मात्र मोठी गैरसोय होत आहे. सायंकाळी ६ नंतर घरी जाण्यासाठी प्रवासी वाहनांची सोय नसते. गंगापूर भागातील मुलांना खूप ताटळत बसावे लागते. नाशिकरोड, देवळाली भागातील विद्यार्थ्यांना बससाठी पायपीट करावी लागते. तर, अनेक बसेसही बदलाव्या लागत आहेत. त्याचसोबत त्र्यंबक भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना संध्याकाळ नंतर बसेसची संख्या कमी असल्याने अडचण होत आहे, अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे.

संध्याकाळी नाशिकरोड भागात जाण्यास कॉलेजपासून बस कमी आहेत. अनेकदा दोन बसेस बदलाव्या लागतात. आमचा प्रवासात येऊन जाऊन ३ तास जातात. विद्यापीठाने परीक्षा सकाळी ठेवावी.

भूषण पाटील, बीसीएस, आर. वाय. के. कॉलेज

मी त्र्यंबकमधून येतो. संध्याकाळी बसेस व पर्यायी प्रवासाची साधने कमी असतात. परीक्षा हॉलमधून बस स्टॅन्डवर पोहोचायलाच एक तास जातो. मग त्यानंतर बससाठी थांबाव लागतं. यातच माझे दोन-तीन तास जातात. परिणामी, अभ्यासावर परिणाम होतो.

सिध्देश इंगळे, बीसीएस, सी.एम.सी.एस कॉलेज

संध्याकाळी ६ नंतर देवळाली गावात जाण्यास खूप वेळ होतो. कॉलेजपासून शालिमार, तिथून थेट बस नसेल तर पुन्हा नाशिकरोड मग देवळाली, अशी फजिती होते.

शुभम पाळदे, बीएससी, आर. वाय. के कॉलेज

मोबाईल बंदी केल्याने मोबाईल नेत नाही. आम्हाला वेळ होणार असेल किंवा काही अडचण आली तर संपर्कासाठी साधन नसते. त्यामुळे आई-वडील चिंतेत असतात.

दर्शन ठाकूर, बीसीएस, आर. वाय. के कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरणचे नाशिक प्रशिक्षण केंद्र राज्यात अव्वल!

$
0
0

>> फणिंद्र मंडलिक

नाशिक येथील महावितरणच्या प्रशिक्षण केंद्राला राज्यात प्रथम येण्याचा मान मिळाला आहे. या केंद्राला आयएसओ ९००१ -२००८ या प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आले आहे. आयएसओ प्रमाणपत्र मिळविणारे महावितरणचे राज्यातील पहिले प्रशिक्षण केंद्र ठरले आहे.

मुंबई येथील निम्बस सर्टीफिकेशन प्रा.लि. ने या प्रशिक्षण केंद्राला प्रमाणित केले आहे. त्यानुसार जानेवारी २०१५ पासून पुढील तीन वर्षांसाठी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. नाशिकच्या एकलहरा येथील प्रशिक्षण केंद्रात तांत्रिक, वित्त, लेखा, मानवसंसाधन, सुरक्षा इत्यादीचे प्रशिक्षण दिले जाते. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात एक या प्रमाणे एकूण २५ केंद्रे आहेत. अमरावती, औरंगाबाद, नाशिक, सांगली येथे विभागीय पातळीवरील चार केंद्र आहेत या केंद्रांच्या माध्यमातून नवीन भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात येते. कर्मचाऱ्यांना व्यवस्थित प्रशिक्षण मिळावे यासाठी चार केंद्रांतर्गत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणीही प्रशिक्षण केंद्रे तयार केली आहेत. या प्रशिक्षण केंद्रात महावितरण, महाजनको, महानिर्मिती या तीनही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात येते. त्याचप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षेचेही धडे देण्यात येतात. या प्रशिक्षण केंद्रात ज्युनियर इंजिनीअर ते लाईन स्टाफपर्यंत तर नॉन टेक्निकल स्टाफमध्ये ज्युनिअर क्लार्क पासून अधिकाऱ्यांपर्यंत समावेश असतो. नवीन भरती झालेल्या कर्मचाऱ्याला कामाबद्दल अनभिज्ञता असते, आपल्याला नक्की कोणत्या स्वरुपाचे काम करायचे आहे हे त्याला माहित नसते. त्यासाठी येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात येते. कर्मचारी प्रशिक्षित झाल्यानंतर एक वर्षानंतर पुन्हा त्याचा रिफ्रेशर कोर्स घेण्यात येतो. वर्षभर काम करतांना कामात आलेल्या अडचणी, शंका यांचे निराकरण करता येते. तसेच कंपनीने एखादे सॉफ्टवेअर विकसीत केले अथवा नवीन प्रणाली विकसीत केली तर त्य़ाचेही येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात येते.

केंद्राकडूनही जबाबदारी

केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ पॉवरच्या अखत्यारित असलेल्या पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन व रुलर इलेक्ट्रीसीटी कॉर्पोरेशन या दोन कंपन्यांच्या अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाची जबाबदारीही केद्र सरकारने नाशिकच्या प्रशिक्षण केंद्रावर टाकली आहे. आजपर्यंत २५ लोकांची एक बॅच याप्रमाणे १०० बॅचेस पूर्ण झाल्या असून २ हजार ५०० अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्याचप्रमाणे सुरक्षा विषयावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कर्मचारी प्रशिक्षित केले जात असून, प्रत्येक लाईनवर काम करताना कोणती काळजी घ्यायची याबाबतही माहिती देण्यात येते. प्रशिक्षणार्थींची बॅच नसेल तेव्हा शहरातील शाळांमध्ये विद्युत उपकरणे कशी हाताळावी याचे प्रशिक्षण देण्यात येते. तसेच एखाद्या संस्थेने आमंत्रित केल्यास तेथे जाऊनही लोकांना केंद्रातर्फे सुरक्षेचे धडे देण्यात येतात.

सर्व कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे आमचे केंद्र राज्यात प्रथम येऊ शकले आहे. हा टीमवर्कचा विजय आहे. - के. व्ही. अजनाळकर, संचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता निराधार मातापित्यांना कुटुंब निवृत्तीवेतन!

$
0
0

अविवाहित अपत्य गमावणाऱ्यांना दिलासा

म. टा. वृत्तसेवा, जळगाव

शासकीय सेवेत असताना अथवा निवृत्तीनंतर एकट्या असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या आई-वडिलांना आता त्याचे कुटुंब निवृत्तिवेतन मिळू शकेल. राज्य सरकारने हा निर्णय घेतला असून, याबाबतचे परिपत्रक २२ जानेवारी रोजी काढण्यात आले आहे.

यापूर्वी निवृत्तीवेतन नियमातील कुटुंब या संज्ञेत शासकीय कर्मचाऱ्याचे पालक समाविष्ट केलेले नव्हते. सामाजिक सुरक्षेचा उपाय म्हणून निवृत्तीवेतन नियमात सरकारकडून सुधारणा करण्यात आलेली असून, कुटुंब या संज्ञेचा विस्तार करून त्यात केवळ एकट्या शासकीय कर्मचाऱ्याच्या पालकांचा समावेश करण्यात आलेला आहे.

...तर पालकांनाही लाभ

कर्मचाऱ्याचे कुटुंब अस्तित्वात नसेल तरच मृत पावलेल्या एकट्या शासकीय कर्मचाऱ्यावर अवलंबून असलेले पालक कुटुंब निवृत्तीवेतनास पात्र ठरतील. मात्र, मरण पावलेल्या एकट्या शासकीय कर्मचाऱ्याने विहित केलेल्या वेळेत व पद्धतीने आपल्या पालकांची नावे घोषित केलेली असतील अशाच कर्मचाऱ्याचे पालक निवृत्तिवेतनास पात्र ठरतील, असे या आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे. प्रशासन, तसेच कर्मचारी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

कोणाला मिळू शकेल लाभ?

एकटा शासकीय कर्मचारी म्हणजे पालकांचे हयात असलेले एकमेव अविवाहित अपत्य अथवा विवाहित असल्यास ज्याची पत्नी/पती, मुले हयात नाहीत, असा शासकीय कर्मचारी. तसेच या एकट्या कर्मचाऱ्यावर पूर्णत: अवलंबून असलेले पालक. म्हणजे आपल्या आर्थिक निर्वाहासाठी ज्यांच्याकडे कोणतेही साधन/स्त्रोत नाही व आपल्या सर्व गरजांसाठी जे त्याच्यावर/तिच्यावर पूर्णत: अवलंबून आहेत अशा पालकांनाच कुटुंब निवृत्तीवेतनाचा लाभ मिळू शकेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण अधिकारीही बोलताहेत अरेरावीची भाषा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिक्षण उपसंचालक भगवान सूर्यवंशी यांचा मनमानी कारभार सध्या चर्चेत असतानाच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांची अरेरावी समोर आली आहे. जुने सीबीएस समोरील वाय. डी. बिटको हायस्कूलमध्ये पुणे विद्यापीठाची परीक्षा सुरू असताना अधिकाऱ्यांनी अपमानास्पद शब्द वापरतानाच परीक्षेत काहीसा व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्याची माहिती प्रकाश वैशंपायन यांनी दिली आहे.

नाशिकमध्ये सध्या उपसंचालक सूर्यवंशी यांच्या कारभाराबाबत शिक्षण संस्था चालकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्याचसंदर्भात येत्या शनिवारी सर्व शिक्षण संस्था चालकांची बैठकही होणार आहे. मात्र, शिक्षण मंडळाच्या अधिकारीही अरेरावी करीत असल्याची बाब समोर आली आहे. मंगळवारी (२४ मार्च) दुपारच्या सुमारास जुने सीबीएस समोरील वाय. डी. बिटको हायस्कूलमध्ये पुणे विद्यापीठाची परीक्षा सुरू होती. त्याचवेळी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास मंडळाचे काही अधिकारी तेथे आले. दहावीच्या परीक्षेसाठी वाय. डी. बिटको हायस्कूल हे परीक्षा केंद्र असताना हे अधिकारी मात्र हायस्कूलमध्ये आले. येथे कसली परीक्षा आहे, कुणाच्या परवानगीने होते आहे, अशा प्रश्नांची सरबत्ती करतानाच उपस्थित कर्मचाऱ्यांशी अपमानास्पद भाषेत मंडळाचे अधिकारी बोलल्याचे दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष प्रकाश वैशंपायन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. पुणे विद्यापीठाच्या परीक्षांबाबत मंडळाला पत्र दिल्याचे आणि त्यास मान्यता मिळाल्याचे सांगितल्यानंतरही अधिकाऱ्यांनी अशा प्रकारचे वर्तन करणे गैर असल्याचे वैशंपायन यांनी सांगितले आहे.

`पाच मिनिटांत या`

'काही दिवसांपूर्वी रविवारी सकाळी सूर्यवंशी यांचा मला फोन आला. 'पाच मिनिटांत शाळेमध्ये ये', असे आदेश सूर्यवंशी यांनी दिले. मी तातडीच्या कामासाठी मी पुण्याला जात होतो पण काही तरी महत्त्वाचे असेल म्हणून मी तत्काळ शाळेत हजर झालो. या इथे शाळेत हा कोपऱ्यात कचरा कसा काय आहे, स्वच्छता का नाही, असा जाब सूर्यवंशी यांनी विचारला. विशेष म्हणजे शाळेत मुख्याध्यापिका उपस्थित असताना अशा प्रकारे त्यांनी उद्धटपणे बोलून मला पाचारण करणे त्यांच्या पदाला अनुसरुन नाही', असे वैशंपायन यांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images