राज्यातील सर्व दुकाने वर्षभर म्हणजेच ३६५ दिवसही खुली राहतील, अशी अधिसूचना उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाने जारी केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत ग्राहकांना मंगळवारसह ३६५ दिवसही सोने खरेदी करता येणार आहे. नाशिकमधील सराफी पेढ्या मंगळवारी बंद ठेवल्या जात होता. नाशिकच्या सराफ बाजारातील व्यापाऱ्यांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
नाशिकमधील सर्व सराफ मंगळवारी आपले व्यवहार बंद ठेवत आहेत. नेमके याच दिवशी ग्राहकांना सोने खरेदी करायची झाल्यास त्यांना मॉल हा एकमेव पर्याय उपलब्ध होता. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांचे नुकसान होत होते. सरकारच्या या निर्णयामुळे छोट्या व्यावसायिकांचा फायदा होणार असून, पारंपरिक ग्राहक मॉलकडे वळणार नाही.
या निर्णयामुळे साप्ताहिक सुट्टीबाबत प्रत्येकजण आपल्या मर्जीनुसार निर्णय घेऊ शकणार आहे. एखाद्या दुकानातच पाच सेल्समन असल्यास त्यांना आळीपाळीने सुट्टी देऊन व्यवहार सुरू ठेवता येणार आहे.
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम १९४८ अंतर्गत सर्व दुकाने यापूर्वी आठवड्यातून एकदा बंद ठेवण्यात येत असे. दुकाने खुली ठेवण्यासाठी परवानगी घ्यावी लागत असे. त्याबाबतचे आक्षेप नोंदविण्यात आल्यानंतर आणि तक्रारींची दखल घेऊन उद्योग आणि कामगार मंत्रालयाने सर्व दुकाने वर्षाच्या ३६५ दिवशीही खुली राहतील, अशी परवानगी दिली आहे. परंतु, त्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. प्रत्येक कामगाराला त्याच्या वेतनातून कोणत्याही प्रकारची कपात न करता एक दिवस भरपगारी सुट्टी द्यावी आणि सुट्टीसंबंधीचे प्रत्येक महिन्याचे वेळापत्रक सूचना फलकावर आगाऊ लावण्यात यावे, प्रत्येक कामगाराला सलग पाच तास काम केल्यावर एक तासाची विश्रांती द्यावी, दररोज नऊ तास किंवा आठवड्यामध्ये ४८ तासापेक्षा जास्त काम करणे आवश्यक असणार नाही, या अटींचा अधिसूचनेत समावेश करण्यात आला आहे. याशिवाय कोणतेही दुकान रात्री दहानंतर उघडे राहणार नाही. कामगारांना ओळखपत्र द्यावीत. महिला कामगारांना रात्री साडेनऊनंतर कामावर ठेवण्यात येऊ नये, इत्यादी अटीही लागू राहणार आहेत.
मोठे मॉल्स या अगोदरही ३६५ दिवस खुले असतात. त्यामुळे लहान व्यावसायिकांचे हाल सुरू होते. या निर्णयामुळे व्यवसाय वाढीस चालना मिळणार असून, ग्राहकांची होणारी गैरसोय टळणार आहे.
- गिरीष टकले
सरकारच्या निर्णयाचे सराफ व्यावसायिकांनी स्वागत केले आहे. ज्या सराफ व्यावसायिकांकडे जास्त नोकरवर्ग आहे, त्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. आळीपाळीने सुट्यांचे व्यवस्थापन करून ३६५ दिवस दुकाने उघडी ठेवता येणार आहे.
- कन्हैय्या आडगावकर
सर्वांनाच ३६५ दिवस दुकान उघडे ठेवणे शक्य होणार नाही. मात्र, या निर्णयामुळे ग्राहकांचा निश्चित फायदा होणार आहे. मॉलकडे वळणारे ग्राहक आपल्या पारंपरिक सोनारांकडेच खरेदी करतील यात शंका नाही.
- अमित नागरे
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट