म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
स्थायी सभापतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने मागील तीन वर्षांपासून एकमेकांना लपून छपून मदत करणारी मनसे-राष्ट्रवादी-काँग्रेस अशी महाआघाडी प्रथमच एकत्रित पालिकेत सत्तेत आल्याने सत्तेचे त्रांगडे पूर्ण झाले आहे. शिवाय, मनसेच्या टेकूने दहा वर्षानंतर प्रथमच राष्ट्रवादीला शहरात संजीवनी मिळाली आहे. तर आपणही इतर पक्षांपेक्षा वेगळे नसल्याचे मनसेने यानिमित्ताने दाखवून दिले आहे.
तीन वर्षांपूर्वी झालेल्या नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. मनसे मोठा पक्ष असल्याने राज ठाकरे यांनी सत्ता मिळविण्यासाठी राष्ट्रवादीशी असलेले संबंध वापरत भाजपच्या मदतीने सत्ता मिळवली. दुसऱ्या टर्ममध्ये भाजपला धोबीपछाड करून राष्ट्रवादी आणि काँग्रेसची थेट मदत घेवून सत्ता मिळवली. मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि अपक्षांची महाआघाडी स्थापन झाली असली तरी सत्तेत मात्र मनसे आणि अपक्ष वगळता राष्ट्रवादी आणि काँग्रेसला वाटा मिळाला नव्हता. मात्र, मंगळवारी राष्ट्रवादीने मनसेच्या मदतीने थेट स्थायीचे सभापतीपद मिळवून सत्तेत वाटा मिळवला आहे. सत्ताधारी मनसेने उमेदवार न दिल्याने राष्ट्रवादीचा विजय सोपा झाला होता. चुंभळे यांच्या निवडीने महापौर मनसेचा, उपमहापौर शहर विकास आघाडीचा तर स्थायी समितीचे सभापतीपद राष्ट्रवादीकडे गेल्याने काँग्रेस वगळता महाआघाडीतल्या सर्वांना सत्तेत वाटा मिळाला आहे. त्यामुळे कधीकाळी एकमेकांचे शत्रू असलेले पक्ष सत्तेसाठी एकत्र आले आहेत.
महापालिका निवडणुकीत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची नक्कल करून दाखवली होती. आता त्याच ठाकरेंच्या पक्षांने नाशिकमध्ये राष्ट्रवादीला संजीवनी दिली आहे. मनपा निवडणुकीत केवळ २० जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादीने मनसेशी तडजोड करून स्थायी सभापतीचे महत्त्वपूर्ण पद मिळवले आहे. सोबतच मनसेला राष्ट्रवादीशिवाय पर्याय नसल्याचे सांगत, मनसेच्या बळावर महापालिकेत हा पक्ष सत्तेत सहभागी झाला आहे. एकमेकांविरूद्ध आरोपांची राळ उठवण्यासह समोरासमोर भिडणारे मनसे आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते महापौरांच्या रामायण बंगल्यावर मंगळवारी एकमेकांच्या गळ्यात गळे घालून गुलालाची उधळून करीत होते. विजयाच्या नशेत कधीकाळी एकमेकांचे दुश्मन असल्याचे भानही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नव्हते. तडजोडीच्या या राजकारणाचा राष्ट्रवादीला फायदा होणार असून, मनसेला मात्र हा सौदा घाट्यात नेवून ठेवणारा आहे.
काँग्रेसची पुन्हा फरफट
राष्ट्रवादीचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसची पुन्हा फरफट झाली आहे. निवडणुकीच्या शेवटपर्यंत काँग्रेसच्या दोन सदस्यांसह पदाधिकाऱ्यांमध्ये फूट होती. अखेरच्या क्षणी राहुल दिवे यांनी परिस्थितीचे भान ठेवून राष्ट्रवादीला पाठिंबा दिला असला तरी सत्तेत सन्मानाची वागणूक मिळाली नसल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.
तिजोरीची चावी भुजबळांकडे
महापालिकेतील सत्तेचा रिमोट कंट्रोल आता कृष्णकुंजपाठोपाठ भुजबळ फार्महाऊसवर गेला आहे. महापौर मनसेचा असला तरी मनपाची तिजोरी ही राष्ट्रवादीच्या हातात आहे. त्यामुळे मनसेला योजना राबविण्यासाठी राष्ट्रवादीकडेच हात पसरावे लागणार आहेत. त्यासाठी भुजबळ फार्महाऊसच्या मंजुरीची गरज भासणार आहे.
झेडपी अन् महापालिकेच्याही चाव्या!
शिवाजी चुंभळे यांनी पश्चिम मतदारसंघातून राष्ट्रवादीतर्फे आमदारकी लढवली होती. मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला होता. आमदारकी मिळाली नसली तरी महापालिकेतील महत्त्वपूर्ण स्थायी समितीच्या सभापतीपदाच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या राजकीय पदाला गवसणी घातली आहे. चुंभळे यांच्या स्नुषा विजयश्री चुंभळे यांनी पालिकेतच चुंभळे यांचे औक्षण केले. विजयश्री जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत. ग्रामीण भागाच्या विकासाचा गाडा हाकण्याची जबाबदारीही या रुपाने चुंभळे कुटुंबीयांकडेच आहे. आता महापालिका तिजोरीच्या चाव्याही त्यांच्या हाती गेल्या आहेत. त्यामुळे एकाच वेळी ग्रामीण भागासह शहरी भागाचे नेतृत्व करण्याची संधी चुंभळे कुटुंबीयांना मिळाली आहे. दरम्यान, मराठा समाजाचे विरोधक हा कथित शिक्का पुसण्यासाठीच भुजबळांनी मराठा समाजाकडे महत्त्वाची पदे देण्याचा सिलसिला सुरू केल्याचे मानले जात आहे.
महापालिकेतील सर्व नगरसेवकांना सोबत घेवून शहर विकासाला प्राधान्य देणार आहे. सिंहस्थाच्या नियोजनासह साधूसंताना चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सर्वच जण एका विचाराचे असून, नाशिकच्या विकासाची जबाबदारी आमच्यावर आहे. सर्वांनाबरोबर घेवून पुढील काळात काम करणार आहे.
- शिवाजी चुंभळे, नवनिर्वाचित सभापती, स्थायी समिती
राजकारणात काहीही घडू शकते. इथे कोणी-कोणाचा कायमचा मित्र वा शत्रू नसतो. मनसे, राष्ट्रवादी आणि अपक्ष शहराच्या विकासाठी एकत्र आले आहेत. यावर आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही.
- अशोक मुर्तडक, महापौर, नाशिक
मनसेला कधीकाळी जातीयवादी पक्ष म्हणणारे काँग्रेस, राष्ट्रवादी आता सत्तेत सहभागी झाल्याने त्यांचे खरे रुप उघड झाले आहे. दलितांच्या जीवावर राजकारण करणाऱ्या या दोन्ही पक्षांनी आरपीआयला मदत करायला हवी होती. सत्तेसाठी या पक्षांनी आपल्या विचारांना तिलांजली दिली आहे. नाशिकची जनता त्यांना माफ करणार नाही.
- अजय बोरस्ते,
महानगरप्रमुख शिवसेना, नाशिक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट