टीम मटा
एकीकडे अवकाळी पाऊस व गारपिटीची आपत्ती, तर दुसऱ्या बाजूला मदतीबाबत शासनाची उदासिनता यामुळे घायकुतीला आलेला बळीराजा आक्रमक होऊ लागला आहे. अर्थसंकल्पातही आपत्तीग्रस्तांसाठी तरतूद नसल्याने शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक होत असून, त्यातूनच अर्थसंकल्पाची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. तर कुठे रास्ता रोको, मोर्चा, आंदोलनेही होऊ लागली आहेत.
अर्थसंकल्पाची प्रतिकात्मक होळी निफाड तालुक्यातील वनसगाव येथे संतप्त शेतकऱ्यांनी केली. सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप करतानाच आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने अर्थसंकल्पात कोणताही मदतनिधी व पॅकेजचा समावेश न केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. तर, आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांचे पीककर्ज व वीज बिल माफ करा या मागणीसह शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निफाड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयासमोर आंदोलकांनी काही काळ ठिय्या आंदोलन केले. कांदा, डाळींब, कापूस या पिकांना उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळावा, मध्यम मुदतीचे कर्ज माफ करावे अशा मागण्यांचे निवेदन निफाडचे तहसीलदार डॉ. संदीप आहेर यांना देण्यात आले. सरकाच्या शेतीविषयक धोरणावर टीका करण्यात आली.
सटाणा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. आंदोलनानंतर शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात मोर्चा नेऊन तहसीलदारांना निवेदन दिले.
जेटलींकडून मदतीची ग्वाही
नवी दिल्ली : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे देशभरातील रब्बी पिके आणि फळबागायतींच्या झालेल्या नुकसानीचा कृषी खात्याची स्वतंत्र पथके प्रत्येक राज्यात जाऊन अंदाज घेतील आणि संकटग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी केंद्राकडून प्रशासकीय तसेच अन्य उपाययोजना केल्या जातील, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी राज्यसभेत केली. आपत्तीग्रस्त राज्यांचा कृषीमंत्री राधामोहन सिंह आणि त्यांचे दोन सहकारी दौरा करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
पवारांच्याही सूचना
नवी दिल्ली : अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रात द्राक्षे, संत्री आणि आंब्याचे अतोनात नुकसान झाले असून अनेक वर्षांमध्ये कृषी क्षेत्रावर कधी एवढे गंभीर संकट ओढवले नव्हते, असे माजी कृषीमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. कर्जवसुलीला स्थगिती, कृषी कर्जांवर व्याजमाफी, कृषी विम्याची तातडीने भरपाई यासारख्या उपायांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा, अशी सूचनाही त्यांनी केली. अवकाळी पावसामुळे चाऱ्याची टंचाईही उद्भवणार असून ती दूर करण्यासाठी सरकारने पावले उचलावी, असेही ते म्हणाले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट