म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
आदिवासी आश्रमशाळांमध्ये बारा-पंधरा वर्षांपासून तासिका तत्वावर काम करणारे शिक्षक आणि रोजदांरीवर कार्यरत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे.आदिवासी आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावरील विषय नसल्याचे सांगून आपले अंग झटकले आहे, तर मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषणा मागे घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
अनेक वर्षापासून तासिका तत्त्वावर काम केल्यानंतर आता सेवेत सामावून घेण्याची १४७७ शिक्षक व १८१५ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची मागणी आहे. आदिवासी मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत वांरवार चर्चा व बैठका करूनही विभागाकडून मागण्या मंजूर होत नसल्याने शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी ठिय्या मांडत आमरण उपोषण सुरू केले आहे. मंत्र्यांच्या आश्वासनंतर दोन महिन्यात कोणतीच कारवाई झाली नसल्याने बुधवारी पुन्हा या शिक्षक व शिक्षकेत्तर रोजदांरी कर्मचाऱ्यांनी पुन्हा विभागा समोरच ठिय्या मांडून आंदोलन सुरू केले. दुसऱ्या दिवशी आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी आपला अखत्यारीतील विषय नसल्याचे सांगून आता हात झटकले आहे. तर आंदोलक मागण्यांवर कायम आहेत. त्यामुळे तिढा वाढला आहे.
आश्रमशाळा शिक्षकांचे आंदोलन
कारागृह कृषी उत्पादनात अव्वल
नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहाने राज्यात शेती उत्पादनात प्रथम क्रमांक मिळविला आहे. भौगोलिक क्षेत्र कमी असूनही उत्पादनात प्रथम क्रमांक मिळवणारे राज्यातले हे एकमेव कारागृह आहे या कारागृहात तयार होणारा भाजीपाला राज्यातील इतर कारागृहात पाठविण्यात येत असून त्यामुळे सरकारची रोजची १ ते दीड लाखाची बचत होत आहे. नाशिकरोड कारागृहाने या वर्षी अन्नधान्य उत्पादनाच्या माध्यमातून खर्च वजा जाता ३५ लाख रुपये कमविले आहे. कारागृहाला महाराष्ट्र सरकारकडून नुकतेच गौरविण्यात आले.
नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारगृहात विविध वस्तूंचे उत्पादन होत असते त्यात प्रामुख्याने शेती व्यवसायाचे उत्पादन अधिक आहे. कारागृहाच्या परीसरात एकशे दहा एकर शेती असून त्यात विविध प्रकारच्या फळभाज्या, पालेभाज्यांचे उत्पादन होत असते. या ठिकाणी पालेभाज्यांमध्ये पालक, राजगिरा, तांदुळका, मेथी, शेपू, कांदेपात, कोथंबीर, कडीपत्ता, करडई या भाज्यांचा समावेश आहे तर कांदा, बटाटा, मुळा, बिट, सलगम, नवलकोल, कोबी, टमाटे, दुधी भोपळा, गवार, गिलके, भेंडी, मिरची या भाज्याचे प्रमुख उत्पादन होत असते. नाशिकरोड कारागृह हे स्वत:ची गरज भागवून दुसऱ्या कारागृहाची गरज भागवत आहे. मुंबई मध्यवर्ती कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह, कल्याण जिल्हा कारागृह, येरवडा मध्यवर्ती कारागृह या कारागृहांची भाजीपाल्याची गरज भागवून स्वत: स्वयंपूर्ण आहे. कारागृह परीसरात गव्हाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली असून पिकविण्यात येणारे गहू राज्यातील कारागृहांमध्ये वितरीत करण्यात येत आहे. तसेच या ठिकाणी पिकविण्यात येणारा कांदा, बटाटेही कारागृहांची गरज भागवितात.
मनपाला लुबाडणाऱ्यांवर खटला
विनोद पाटील, नाशिक
यंत्रणेतील लिकेजचा गैरफायदा घेवून महापालिकेला लुबाडणाऱ्या खाजगी ठेकेदारांसह कंपन्या विरोधात महापालिका आक्रमक झाली आहे. स्पीक सिस्टीम्स लिमिटेड या कंपनीच्या अपूर्ण कामामुळे आठ वर्षापासून मिळकत करापासून वंचित असलेल्या महापालिकेने आता या कंपनीला थेट न्यायालयात खेचण्याची तयारी सुरू केली आहे.
महापालिकेच्या वतीने शुक्रवारी ७० कोटीच्या नुकसान भरपाईचा दावा नाशिक न्यायालयात दाखल केला आहे. महापालिकेला लुवबाडणाऱ्या ठेकेदार आणि कंपन्याचा शोध प्रशासनाने सुरू केला आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असून कर्मचाऱ्यांना वेतनाव्यतिरिक्त विकासकामे ठप्प आहेत. सिंहस्थाचे दायित्व आल्याने महापालिकेची आर्थिक अवस्था डामाडोल आहे. गत काळात प्रशासनासह सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आलेल्या चुकीच्या कामांचा आणि कराराचा फटका महापालिकेला बसला आहे. खत प्रकल्प, एलईडी, फाळके स्मारक, पेलिकन पार्क संदर्भात चुकीचे करार करण्यात आल्याने महापालिकेला ठेकेदांराना जास्तीचे पैसे द्यावे लागलेत आहेत. त्यामुळे महापालिकेला मोठा आर्थिक फटकाही बसला आहे.
नव्या आयुक्तांनी मात्र असे चुकीचे करार शोधून त्यांच्या विरोधात आता थेट न्यायालयीन लढाईच सुरू केली आहे. त्याचा पहिला दणका महापालिका हद्दीतल्या मिळकतींचा सर्व्हेक्षणासाठी नियुक्त केलेल्या हैद्राबाद स्थित स्पीक सिस्टीम्स लिमटिेड या कंपनीला बसला आहे. या कंपनीला २००७ मध्ये शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण करण्याचे काम दिले होते. यासाठी कंपनीला चार कोटी रुपये अदाही करण्यात आले होते. मात्र संबंधित कंपनीने त्रुटीचा फायदा घेत अर्धवट काम सोडून पोबारा केला. वारंवार स्मरणपत्रे देऊनही कंपनीने सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण केले नाही. त्यामुळे स्थायी समितीने या कंपनीला सन २०१३ मध्ये ब्लॅकलिस्ट केले होते. त्यासंदर्भातील नोटीसही पालिकेने बजावली होती.
इतर ठेकेदारांना बसणार चाप
आतापर्यंत महापालिका ठेकेदारांसह खाजगी कंपन्याना पोसण्याचे काम करीत होती. पेलिकन पार्कसह कमानीच्या कंत्राटामध्ये महापालिकेविरोधात ठेकेदार न्यायालयात गेल्याने कोट्यवधी रुपये ठेकेदारांनाच भरपाई द्यावी लागणार आहे. मात्र, महपालिकेच्या इतिहासात प्रथमच महापालिका एखाद्या ठेकेदाराला नुकसान भरपाईसाठी न्यायालयात खेचत आहे. महापालिकेतर्फे अशा चुकीच्या करारांचा शोध घेऊन त्यांच्याविरोधातही न्यायालयात जाण्याची चाचपणी सुरू केली आहे.
मेक इन हेल्थहब नाशिक!
देशातील दिग्गज साखळी हॉस्पिटल्स, मल्टी आणि सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल्स व तज्ज्ञांच्या मांदियाळीमुळे नाशिकने आरोग्य सुविधांबाबत देशातील उदयोन्मुख शहरांमध्ये प्रवेश करण्याचा बहुमान मिळविला आहे. प्राचीन काळापासून दुर्मिळ वनऔषधीसाठी प्रसिद्ध असलेले नाशिक आता दुर्मिळ शस्त्रक्रियांमुळे जगभरात दबदबा निर्माण करीत आहे. शहरातील स्पेशालिस्ट डॉक्टरांमुळे देश-परदेशातील पेशंटचा नाशिककडे ओढा वाढला आहे. त्यामुळे नाशिकला हेल्थहब हा नावलौकिक मिळवून देण्याच्या दिशेने शहराची वाटचाल सुरू झाली आहे.
नाशिकचा आरोग्य क्षेत्रात झपाट्याने विकास होत असून, दुर्मिळ शस्त्रक्रियांमुळे वैद्यकीय क्षेत्राकडून शहरातील स्पेशालिस्ट डॉक्टारांची दखल घेतली जात आहे. गेल्या काही वर्षात शहरात असाध्य अन् संशोधनाला चालना देणाऱ्या शस्त्रक्रिया शहरात यशस्वीरित्या पार पडल्या. यामुळे उपचारच नव्हे तर एज्युकेशन व रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणूनही नाशिकमधील हॉस्पिटल्स नावलौकिक मिळवित आहेत. क्युरी मानवता कॅन्सर सेंटरचे संचालक डॉ. राज नगरकर यांनी एका पेशंटवर नुकतीच केलेली रॅडीकल हेमॅटेक्टोमी ही जगातील पहिली शस्त्रक्रिया असल्याचा दावा केला जातो. या शस्त्रक्रियेमुळे काविळ असतानाही एखादी शस्त्रक्रिया होऊ शकते हे त्यांनी सिद्ध केल्याने त्यांच्या या शस्त्रक्रियेची दखल जगभरातून घेतली जात आहे.
डॉ. इंदोरवाला हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्रातील पहिली बाहा इम्पलांट शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने उत्तर महाराष्ट्रातील बाहा इम्पलांटची गरज असणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पीआरपी (प्लेटलेट रीच प्लाझमा) उपचारासाठी खेळाडूंना पुणे-मुंबईकडे जावे लागत होते. डॉ. मिलिंद पिंपरीकरांनी ही सुविधा नाशिकमध्ये उपलब्ध केल्याने खेळाडूंनाही त्यासाठी इतरत्र धाव घ्यावी लागणार नाही. अपोलो हॉस्पिटलचे कार्डीयाक सर्जन डॉ. अभयसिंग वालिया व कार्डीओलॉजिस्ट डॉ. सुधीर शेतकर यांनी हृदयाची गुंतागुंतीची दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी केल्याने आता अशा शस्त्रक्रियांसाठी परदेशात जाण्याची गरज नसल्याचे त्यांनी सिद्ध केले आहे. तर गुडघा बदलीच्या सर्जरीसाठी अपोलोने मिनीमली इन्वेसिव नेव्हिगेशन टेक्नॉलॉजीचा वापर सुरू केल्याने शस्त्रक्रियेत तंत्रशुद्धता आणली आहे. डॉ. देवदत्त चाफेकरांनी नेफ्रोप्लसचे पहिले सेंटर शहरात सुरू करून डायलेसिस घेणाऱ्यांना दिलासा दिला आहे.
वोक्हार्ट हॉस्पिटलचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. राहुल कैचे हे कोरोनरी आर्ट बायपास ग्राफिंग प्रकारची शस्त्रक्रिया करणारे भारतातील दुसरे तज्ज्ञ ठरले आहेत. तर याच हॉस्पिटलने टीबीचा संसर्ग असलेल्या महिलेवर गुडघा प्रत्यारोपन करून दुर्मिळ शस्त्रक्रियेचा मान मिळविला आहे. डॉ. जी. बी. सिंग यांनी फुप्फुसाच्या आजारावरील गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे. सोपान हॉस्पिटलचे डॉ. संजय वराडे यांनी पक्षाघातावर प्रभावी उपचार पद्धती शहरात उपलब्ध केली आहे. तर लोटस हॉस्पिटलचे डॉ. प्रीतेश जुनागडे यांनी बोनमॅरो ट्रान्सप्लान्ट सुविधा देशविदेशातील पेशंटला शहरात उपलब्ध करून दिली आहे. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नलिनी बागुल यांनीही अॅनिमिओ पॅच शस्त्रक्रिया यशस्वी केली होती. नाशिकमधील सिव्हिल व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलनेही दुर्बिणीच्या साहाय्याने परक्युटँनिअस नेफ्रलिथोटॉमी (पीसीएनएल) ही अवघड व दुर्मिळ शस्त्रक्रिया नाशिकचा वैद्यकीय क्षेत्रातील दबदबा वाढविल्याने नाशिक आता हेल्थहबच्या दिशेने झेपावत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.
.अन् त्यांनी जिंकले परिस्थितीला
दोघांच्या घरात अठरा विश्वे दारिद्रय... एकवेळच्या जेवणाची भ्रांत... दहा बाय दहाची चंद्रमोळी झोपडी... दोघांचे आई-वडील हातमजूर... घरात कोणतेही शैक्षणिक वातावरण नाही. अशातही अशिक्षित आई-वडिलांनी मुलांच्या शिक्षणासाठी असंख्य अडचणी सहन केल्या. मुलंही त्यांच्या विश्वासाला पात्र ठरली. मुकेश व सागर दोन्ही अभियांत्रिकी पदवीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहेत. दोघांना कॅम्पस मुलाखतीत अनुक्रमे वार्षिक ७.५० व ४.५० लाख पॅकेजच्या नोकऱ्या प्राप्त झाल्या. मुकेश व सागरचे हे दैदिप्यमान यश पाहून आई-वडील, गुरुजन मित्र, आप्त व सहकारी यांना अभिमान वाटत आहे.
नाशिकमधील के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक अभियांत्रिकी पदवीच्या तिसऱ्या वर्षाला शिक्षणारा मुकेश भारसाकळे मुळचा अकोल्याचा. दहा बाय दहाच्या घरात त्याचे आई-वडील राहतात. दोन्हीही हातमजुरी करतात. मुकेशला एक भाऊ व बहीण असून ते दोघेही उच्च शिक्षण घेत आहेत. मुकेशचे दहावीपर्यंत शिक्षण अकोला येथेच झाले. दहावीला ७८ टक्के गुण प्राप्त केल्यावर त्याने अकोला येथे कम्प्युटर डिप्लोमा केला. शिक्षणासाठी आई-वडिलांना सावकारी कर्ज काढावे लागले. पुढे त्याला के. के. वाघ संस्थेत अभियांत्रिकीसाठी (कॉम्प्युटर) प्रवेश मिळाला. मात्र, राहण्याचा प्रश्न होताच. आडगाव येथील सामाजिक न्याय विभागाच्या मुलां-मुलींच्या शासकीय वसतिगृहात गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश मिळाला. यामुळे निवास व भोजनाचा प्रश्न मार्गी लागला. मुकेशने नव्या जोमाने अभ्यास करत चांगले गुण प्राप्त केले. शेवटच्या वर्षी कॅम्पस मुलाखतीत त्याला पुण्याच्या निवडिया (NIVDIA) या कंपनीत वार्षिक ७.५० लाखांचे पॅकेज प्राप्त झाले. महाविद्यालयात त्याच्या एकट्याचीच निवड झाली हे विशेष.
सागर तानाजी चुंगे हा के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रिकलच्या तिसऱ्या वर्षाला शिक्षण घेत आहे. तुळजापूरमधील वडगाव (काटी) हे त्याचे मूळ गाव. त्याचेही आई-वडील दोघेही शेतमजूर आहेत. सागरचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदच्या शाळेत झाले. दहावीत ८९ टक्के गुण मिळवून तो केंद्रात प्रथम आला. त्याला शासकीय तंत्रनिकेतन, सोलापूर येथे तीन वर्षाच्या पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला. पदविकेमध्ये ८५ टक्के गुण प्राप्त केल्यानंतर के. के. वाघ महाविद्यालयात प्रवेश मिळाला. अभियांत्रिकीच्या पदवीसाठीची फी भरण्यास त्याच्याकडे पैसे नव्हते. तेव्हा सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांनी मदत केली. सागरची कॅम्पस मुलाखतीत जिंदाल स्टील वर्कस् लिमिटेड, रायगड या कंपनीत वार्षिक ४.५० लाख रुपयांच्या पॅकेजसाठी निवड झाली आहे.
रुद्राक्षांचे कलम यशस्वी!
द्राक्ष नगरी असलेल्या नाशिक आता दुर्मिळ अशा रुद्राक्षाच्या झाडांचे कलम यशस्वी झाले आहे. नाशकात पाच तर त्र्यंबकेश्वरमध्ये केवळ एक रुद्राक्षांचे झाड असून रुद्राक्षांचे कलम करण्यासाठी इंजिनीअर अविनाश शिरोडे यांनी अथक प्रयत्न केले. आता या यशामुळे रुद्राक्ष झाडांची संख्या नाशिक शहर परिसरात वाढण्याची चिन्हे आहेत.
कैलास मानससरोवर यात्रेदरम्यान शिरोडे यांना नेपाळ येथील सूत गिरणीच्या कारखानदारांनी १९९६ मध्ये रुद्राक्षाची ११ रोपे भेट दिली होती. त्यातील पाच रोपे यांनी नाशिक येथील औरंगाबाद नाका परिसरातील घराच्या आवारात लावली. तर उर्वरित सहा रोपे त्यांनी नातेवाईक व मित्रांना दिली. मात्र, ही सहा रोपे जगू शकली नाहीत. तर शिरोडे यांच्याकडील पाचही रोपे अतिशय डेरेदार आहेत. या झाडांना कुठलेही औषध किंवा खत देण्यात आले नाही. केवळ पुरेसे पाणी देण्यात आले. रुद्राक्षांची आणखी झाडे असावीत या उद्देशाने शिरोडे यांनी वारंवार विविध प्रयोग करून पाहिले.
रुद्राक्ष जमिनीत टाकणे, फांदी पुरणे, पाने, फुले यांच्यासह विविध प्रयत्न त्यांनी केले. त्यात यश आले नाही. अखेर त्यांनी इंटरनेटवर कठीण कवचाच्या फळांबाबत माहिती वाचली. त्यानुसार त्यांनी एअर लेइंग टेक्निक (गुटी कलम) करण्यात निश्चित केले. त्यासाठी त्यांनी स्थानिक कृषी तज्ज्ञांचाही सल्ला घेतला. त्यानुसारच त्यांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये तीन झाडांच्या फांद्यावर ३५ गुटी कलम केले. त्यानंतर ते दररोज या कलमाचे निरीक्षण करू लागले. कलमात बांधलेल्या शेवाळातून प्लास्टिकच्या आवरणातून पांढऱ्या-पिवळ्या रंगाची दाठ व नंतर मुळे दिसू लागली. मात्र, दोन महिने झाली तरी त्यात कुठलाही विकास होत नव्हता. शेवाळे सुकले असेल म्हणून काही कलमांना इंजेक्शनद्वारे पाणी देवून पाहिले. अखेर ६०-६२ दिवसानंतर काही ठिकाणी पिवळी गाठ दिसायला लागली आणि शिरोडे यांची आशा जागृत झाली. ३५ पैकी १२ कलमे सुकली पण उर्वरित कलमांच्या ठिकाणी मुळे विकसित होत असल्याचे पहायला मिळाले. अखेर ८१ दिवसांनी २३ कलमे झाडापासून कापली आणि त्यांचे पिशवीत रोपण केले. सुरक्षित वातावरणात ती वाढावी यासाठी ती पॉलिहाऊसमध्ये ठेवण्यात आली. योग्य ती काळजी घेतल्यानंतरही ५ रोपे सुकल्याचे डिसेंबरमध्ये आढळून आले. उर्वरित १८ रोपांपैकी ३ रोपेही काही दिवसांनी सुकली. त्यामुळे आणखीनच तणाव निर्माण झाला. आता १५ रोपांनी चांगले बळसे धरले असून त्यांना आता पानेही फुटली आहेत. त्यामुळे येत्या काळात रुद्राक्षांची झाडे नाशकात वाढण्याचा विश्वास निर्माण झाला आहे.
नाशिकचीही झोळी रितीच
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी कोणत्याही नव्या गाड्यांची घोषणा न करता मूलभूत सेवा सुधारण्यावर भर दिला असून सर्वेक्षण करूनच नव्या गाड्या सुरू केल्या जातील, असे सांगितले आहे. कोणत्याही प्रदेशाला झुकते माप न देता व्यवस्थेत बदल घडवून आणण्यासाठी उचललेले योग्य पाऊल असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
रेल्वे अर्थसंकल्पामुळे महाराष्ट्राच्या वाटेला काही मिळाले नाही. यंदा सिंहस्थामुळे नाशिकच्या पदरात काही तरी मिळेल अशी अपेक्षा होती; परंतु तीही फोल ठरली. यंदाच्या रेल्वे बजेट मध्ये ९ गाड्यांचा वेग ताशी ११० ते १३० किलोमीटरवरून ताशी १६० ते २०० किलोमीटर एवढा करणार असून त्यामुळे प्रवासाचा वेग वाढणार आहे. तसेच प्रवास करतांना काही अडचण आल्यास रेल्वेची १३८ क्रमांकाची हेल्पलाईन ग्राहकाभिमुख कशी होईल व तिची वापर कसा चांगल्या पध्दतीने करता येईल यावर भर दिला जाणार आहे. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी रक्षक नसलेल्या मानवविरहीत रेल्वे क्रॉसिंगवर ऑडियो-व्हिज्युअल अलार्म बसवण्याची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केली आहे. आरक्षणातील भ्रष्टाचार कमी व्हावा यासाठी प्रवाशांना १२० दिवस आधी आरक्षण करण्याची सुविधा मिळणार आहे. तसेच पेपरलेस तिकीटसेवा, गाडी आगमन-प्रस्थानाबाबत SMS अलर्ट, या सुविधांवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.
दर्जा सुधारावर भर
लोकप्रिय आणि महत्त्वाच्या गाड्यांचा वेग वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. अर्थसंकल्पात नव्या गाड्यांची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रदेशाला झुकते माप दिले असे कुणालाही म्हणता येणार नाही. अनेक रेल्वे स्टेशनवर अस्वच्छता असते, त्या करता स्टेशनांवरील स्वच्छतागृहांचा दर्जा सुधारणार असून ठिकठिकाणी बायो टॉयलेटची व्यवस्था करण्याची योजना तयार करण्यात येणार आहे. रेल्वे स्वच्छतेवर आणि रेल्वे खानपान सेवेचा दर्जा सुधारण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी काही खासगी कंपन्यांची मदत घेतली जाणार असल्याचे सुतोवाच प्रभू यांनी केले आहे.
योजना खर्चात
दुपटीने वाढ
रेल्वे स्टेशनवर वाय-फाय सेवेचा विस्तार करणार असल्याने त्यासाठी तातडीने उपाययोजना राबविण्यात येणार आहे. कोकण रेल्वेमध्ये ५० हजार नोकऱ्या उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच रेल्वेचा योजना खर्च दुपटीने वाढवणार असून यंदा ५२ हजार कोटींवरून १ लाख ११ हजार कोटींवर जाणार आहे.
महाराष्ट्राच्या वाट्याला निराशा
केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप सरकारच्या रेल्वे अर्थसंकल्प महाराष्ट्राची घोर निराश झाली आहे. रेल्वेला सर्वाधिक महसूल महाराष्ट्रातून मिळतो. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता होती. केंद्रातील रेल्वेमंत्री महाराष्ट्रातील असल्यामुळे मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वेसाठी व महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पासाठी झुकते माप मिळेल अशी अपेक्षा होती; मात्र ती साफ फोल ठरली आहे.
- छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री
बुलेट ट्रेनला हिरवा कंदिल
महाराष्ट्रातील वर्धा-नागपूर तिसऱ्या मार्गासाठी लवकरच नवी योजना अमलात येणार आहे. आर्थिक राजधानी मुंबईपासून ताशी २०० किलोमीटर वेगाने ट्रेन धावणार असून २०१५ च्या मध्यापर्यंत मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसंदर्भात अहवाल सादर करण्यात येणार आहे. अपंगांसाठी व्हिलचेअरचं बुकिंग ऑनलाइन करता येणार ६ हजार ६०० किलोमीटर ट्रॅकचं तातडीनं विद्युतीकरण करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.
कामगारांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न
म. टा. प्रतिनिधी, सातपूर
केंद्रातील भाजप सरकारने कामगार कायद्यांमध्ये अनेकविध बदल करण्याचे ठरविले आहेत. यामध्ये अनेक बदल कामगारांना देशोधडीला लावणारे असल्याचा आरोप सर्वच कामगार संघटांनी केला आहे. कामगार कायद्यातील संभाव्य बदलाच्या विरोधात कामगार उपायुक्त कार्यालयावर कामगार संघटनांनी गुरुवारी जोरदार निर्दशने केली. कायद्यातील संभाव्य बदल मागे न घेतल्यास यापेक्षाही मोठे आंदोलन छेडण्याचा इशाराही कामगार संघटनांनी दिला.
भाजप सरकारने कामगार कायद्यात संभाव्य बदल करण्याचे ठरविले आहे. यात कुठल्याच कामगार संघटनांना विश्वासात न घेता सरकार बदल करीत आहेत. यासाठी सिटू कामगार संघटनेच्या वतीने कामगार उपायुक्त कार्यालयावर कामगार कायद्यातील संभाव्य बदलाच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी कामगार उपायुक्तांना निवदेन देण्यात आले. औद्योगिक विकासात कामगार महत्त्वाचा घटक आहे. परंतु, अगोदरच कंपनी मालकांकडून आहे त्या कामगार कायद्यांचे पालक केले जात नाही, असे असतांना पुन्हा कामगार कायद्यात बदल का असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. यासाठी कामगार विभागाने कामगारांची एकजूट मोडीत काढण्यासाठी कायद्यात बदल होत असेल तर त्याला याही पेक्षा मोठे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
कामगार कायद्यातील काही बदलांमुळे उद्योग व कंत्राटदारांच्या हातात सर्व सूत्रे जाणार आहेत. कामगारांना काम करतांना गुलाम म्हणूनच रहावे लागेल. यासाठी सरकारने कामगारहिताचा विचार करुन कायद्यातील बदल मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. कामगार उपायुक्त कार्यालयासमोर झालेल्या निर्दशनाच्या वेळी कामगार नेते डॉ. डी. एल. कराड. सिताराम ठोंबरे, कामगार विकास मंचचे कैलास मोरे, आयटकचे राजू देसले, भिवाजी भावले, तुकाराम सोनजे, सतीश खैरनार यांसह मोठ्या संख्येने कामगार सहभागी झाले.
कामगारांसंदर्भात सध्या असलेले कायदेच केंद्र आणि राज्य सरकारांकडून पाळले जात नाहीत. त्यातच आता पुन्हा कामगारांच्या हक्कांवर गदा आणत बदल करण्याचे कारणच काय? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार देखील काँग्रेस आघाडी सरकारप्रमाणे धनधाडग्यांच्याच गळाला लागले की काय असा प्रश्न पडतो.
- सिताराम ठोंबरे,
सरचिटणीस, सिटू
मनपाजवळ बॉम्ब ठेवणा-याला अटक
नाशिक मनपा जवळ सुयोजित हाईटसमधील एका बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयाबाहेर बॉम्ब ठेवणा-याला अटक करण्यात आली आहे. बॉम्ब ठेवणारा आरोपी १२वीचा विद्यार्थी आहे. नाशिक पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फूटेज तपासून बॉम्ब ठेवणा-याला अटक केली आहे. बॉम्ब ठेवणा-या तरुणाची चौकशी सुरू असून लवकरच संपूर्ण घटनेवर प्रकाश पडेल, अशी माहिती नाशिक पोलिसांनी दिली.
अटक करण्यात आलेला तरुण बॉम्ब ठेवण्यासाठी येताना चेह-यावर रुमाल बांधून स्कूटरवरुन आला होता. स्कूटर मनपाजवळ बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयाबाहेर उभी करुन तरुण एक खोका घेऊन कार्यालयात गेला. चेह-यावरील रुमाल न काढता त्याने कुरिअर घेऊन आल्याचे सांगितले. बांधकाम व्यावसायिकाकडे काम करणा-या शिपायाने तरुणाला खोका कार्यालयाच्या दरवाज्याजवळील टेबलावर ठेवून जाण्यास सांगितले. बाहेर पडल्यावर तरुणाने थोड्यावेळाने बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात फोन करुन बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. फोन आल्यानंतर लगेच बांधकाम व्यावसायिकाच्या कर्मचा-यांनी तरुणाने आणलेला खोका कार्यालयाच्या इमारतीबाहेर नेऊन ठेवला आणि पोलिसांना बोलावले. पोलिसांनी बॉम्ब शोक पथकाच्या सहकार्याने खोक्यातील बॉम्ब निकामी केला होता.
अंबड लिंकरोडवर कसरत
म. टा. प्रतिनिधी, सातपूर
शहरात होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमिवर महापालिकेकडून सर्वच प्रमुख रस्त्यांची कामे सुरू आहेत. यामध्ये अंबड लिंकरोडवरील रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या वाहनांचा अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे रुंदीकरणात रस्त्यावरील उभ्या वाहनांमुळे चालकांना कसरत करत वाहने न्यावी लागत आहेत. त्यामुळे महापालिका व पोलिस प्रशासनाने रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या या वाहनांवर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
महापालिकेत अनेक वर्षांपासून अंबडलिंकरोडवरील अनधिकृत भंगार मार्केटचा विषय गाजत आहे. यात महापालिकेने अंबडलिंकरोडचे रुंदिकणारचे काम जोमाने हाती घेतले आहे. परंतु, सद्या अंबड लिंकरोडवरून प्रवास करतांना वाहनचालकांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. याचे कारण म्हणजे महापालिकेने हाती घेतलेल्या रस्त्याच्या रुंदीकरणात अनेक ठिकाणी वाहने रस्त्यावरच उभी केली जातात. त्यातच अनधिकृत भंगार मार्केटच्या व्यावसायिकांनी वाहने उभ्या राहणाऱ्या जागेवर भंगाराचे साहित्य ठेवले आहे. यामुळे रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या इतर वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करत वाहने चालवावी लागतात. यासाठी महापालिका व पोलिस प्रशासनाने रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी कामगार व उद्योजकांनी दिली आहे.
महापालिका अनधिकृत भंगार मार्केट हटविण्यात अपयशी ठरले आहे. महापालिकेने आता अंबडलिंकरोड रस्ता रुंदिकरणाचे काम हाती घेतले आहे. निम्यांहून अधिक रस्त्याचे रुंदिकरण झाले आहे. परंतू आता रुंदीकरणात रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे अडथळा निर्माण होत आहे. याकडे महापालिका व पोलिस प्रशासनाने कारवाई करण्याची गरज आहे.
- व्हिनस वाणी, संचालक, निमा
सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतींना जोडणारा महत्त्वाचा अंबड लिंकरोड आहे. या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. परंतु, भंगार मार्केटच्या व्यावसायिकांची वाहने रस्त्यावरच उभी केली जातात. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. प्रशासनाने यावर कारवाई केली पाहिजे.
- दिनेश बच्छाव, वाहनचालक
रिंगरोडची अवस्था विद्रुप
सातपूर आणि अंबड या दोन्ही औद्योगिक वसाहतींना जोडणाऱ्या अंबडलिंकरोड या रिंगरोडची विद्रुप अवस्था झालेली आहे. यात अनधिकृत भंगार मार्केटमधील व्यावसायिकांनी भंगाचे साहित्य रस्त्यांच्या कडेला ठेवलेले असते. यामुळे अनेकदा देश, विदेशातून येणाऱ्या उद्योजकांना अंबडलिंकरोडवरून जातांना वेगळ्याच नाशिकचे दर्शन होते. अनधिकृत भंगार मार्केट महापालिका प्रशासन हटवणार कधी असा सवाल उद्योजक उपस्थित करतात. अनधिकृत भंगार मार्केट हटल्यास येथील जागेवर सुंदर रहिवाशी वसाहत निर्माण केली जाऊ शकते. यासाठी महापालिकेने अनधिकृत भंगार मार्केट काढण्याची मागणी उद्योजकांकडून केली जात आहे.
वक्फच्या सीईओंना हटवणार नाही
म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक
राज्य वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सय्यद एजाज हुसेन यांनी घेतलेल्या वक्फ बोर्ड हिताच्या निर्णयांमुळे भूखंड माफियांच्या हस्तक्षेपास पायबंध बसला. यामुळे संतापलेल्या माफियांनी सय्यद यांना हटविण्यासाठी लॉबिंग सुरू केले आहे. मात्र, सय्यद यांना वक्फ बोर्डवरून सय्यद यांना दूर केले जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
वक्फ बोर्ड सीईओ पदावरून सय्यद यांना हटविण्यासाठी भूखंड माफियांकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यांच्यासह बोर्डातील काही समस्यांकडून होत असलेल्या जाचाला कंटाळून सय्यद यांनी बदलीसाठी अर्ज केला होता. भूखंड माफियांची वक्फ बोर्डाच्या मिळकती आणि मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जमिनींवर डोळा आहे. त्यांच्या वारंवार होणाऱ्या हस्तक्षेपाला सय्यद यांनी चाप बसविला होता. त्यामुळे भूखंड माफियांसह बोर्डाच्या काही सदस्यांची कोंडी झाली. यामुळे अशा उपद्रवी मंडळींकडून सय्यद यांना दाबण्याचा प्रयत्न केला जात होता. यासंदर्भात 'मटा'ने वृत्त देत सद्यस्थिती उघडकीस आणून दिली.
राज्यातील वक्फ मिळकतधारक, वक्फ विश्वस्त व मुस्लिम धर्मगुरुंनी वक्फ हिताचे निर्णय घेणाऱ्या सय्यद यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याला हटवू नये, अशी मागणी करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची मुंबईत जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली. वक्फ बोर्डाचे सीईओ सय्यद यांना पदावरून हटविले जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी औकाफ बचाव समितीच्या शिष्टमंडळाला दिले. प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांच्या पाठीशी माझे सरकार असल्याचा दावाही त्यांनी केला. सीईओ सय्यद यांच्या बदलीच्या विनंती अर्जावर निर्णय घेत राज्य सरकारने त्यांची उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात न्यायाधिश म्हणून बदलीचे आदेश काढले होते; मात्र नंतर मुस्लिम वक्फ विशवस्तांच्या भावना बघता सय्यद यांना सीईओ म्हणून पदमुक्त करण्यात आले नाही.
'मटा'ने एका प्रामाणिक अधिकाऱ्यावर होत असलेल्या अन्याय संदर्भातील वृत्त प्रसिध्द करून भूखंड माफियांच्या षडयंत्राचा पर्दाफाश केला. मुख्यमंत्र्यांनीही याची दखल घेत सीईओ सय्यद यांना हटविणार नसल्याचे स्पष्ट केले.
- शेख शाकीर अब्दुल शकुर,
कनव्हीनर औकाफ बचाव अक्शन कमिटी, मालेगाव
कंपनीने चोरले शेतकऱ्याचे पाणी
म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी
लखमापूर शिवारातील एका कंपनीने धरणातून शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनला छिद्र पाडून पाणी चोरल्याची तक्रार संबंधित शेतकऱ्याने वणी पोलिसांत केली आहे.
लखमापूर येथील प्रकाश दत्तात्रय देशमुख यांनी वणी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार देशमुख यांची १९९८ पासून ओझरखेड धरणातून शेतीला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन आहे. या पाइपलाइनमधून येणाऱ्या पाण्याचा दाब सन २०१० पासून खूप कमी झाला. या प्रकरणी पाण्याचा पंप बदलून सुद्धा पाण्याचा दाब वाढला नाही. नंतर ठिकठिकाणी खड्डे खोदून पाइपलाइनचा दाब तपासून बघीतला. परंतु, हेग्जागाॅन प्रा. लि. या कंपनीच्या आवारात खड्डा करून बघीतले असता त्या ठिकाणी पाइपलाइनच्या खालच्या बाजुने छिद्र पाडून नळीने पाणी चोरी झाल्याचे निदर्शनास आलेे. या संदर्भात कंपनी प्रशासनाने उडवाउडवीची उत्तरे दिली. या प्रकरणी कंपनीने पाणी चोरी केली म्हणून शेतीचे उत्पन्न घटले, अशा आशयाचा तक्रार अर्ज कंपनी प्रशासनाविरुद्ध वणी पोलिसांत प्रकाश देशमुख यांनी दाखल केला आहे. या तक्रार अर्जावरून चौकशी करून पुढील कार्यवाही करणार असल्याचे वणीचे पोलिस निरीक्षक मिलिंद खोडवे यांनी सांगितले.
साईबाबांची आरती पैठणीवर
म. टा. वृत्तसेवा, येवला
काठाकाठात अन् प्रत्येक इंच इंचात विविधतेने नटलेल्या येवल्यातील भरजरी जरतारी पैठणीची कलाच न्यारी. देशासह अगदी सातासमुद्रापार स्त्रीमनाला मोठी भुरळ घालत जगविख्यात ठरलेल्या या येवल्यातील नक्षीदार पैठणीचं अन् अनेक दिवस डोळयात तेल घालून ती हातमागावर खुलविणाऱ्या येथील हातमाग विणकर व कारागिरांच कौतुक करावे तितके थोडेच. अशाच या येवल्यातील किरण देहाडे या पैठणी उत्पादक कारागिराने साईबाबांच्या अपार श्रद्धेपोटी चक्क साईची आरती असलेली पैठणी विणली आहे.
आरती साईबाबा । सौख्यदातार जीवा ।
चरणरजातली । द्यावा दाता विसांवा ।
अशी संपूर्णच साईंची आरती असलेली ही पैठणी किरण देहाडे यांनी नुकतीच येवला शहरातील साईनाथ मंदिरात साईला प्रदान केली. यावेळी किरण देहाडे यांचा साईनाथ मंदिराचे अध्यक्ष महेश काबरा, श्रीनिवास सोनी, सुनील लक्कडकोट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शिखरेवाडीसाठी खास तरतूद
नाशिकरोड येथील शिखरेवाडी क्रीडांगणाच्या विकासासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्याचे आश्वासन शालेय शिक्षण व क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे. महापालिका प्रशासनही येत्या दोन आठवड्यात विविध सुविधा विकसित करणार आहेत.
जॉगिंग ट्रॅक, स्केटिंग आदी सुविधा असलेल्या शिखरेवाडी मैदानाच्या समस्यांबाबत महाराष्ट्र टाइम्समध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. समस्या सुटणार असल्याने खेळाडू व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. नगरसेवक संभाजी मोरुस्कर यांनी आमदार बाळासाहेब सानप यांच्यासमवेत शिक्षणमंत्री तावडे यांची मुंबईत नुकतीच भेट घेतली. मंत्री तावडे यांनी विशेष बाब म्हणून अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्याचे मान्य केले आहे.
या मैदानावरील प्रलंबित कामे त्वरित पूर्ण व्हावीत यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. शहर अभियंता सुनील खुने, कार्यकारी अभियंता सतीश हिरे, उपअभियंता निलेश साळी यांनी क्रीडांगणाला भेट देऊन पाहणी केली. सर्व समस्या जाणून त्या सोडविण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू केली. बॅडमिंटन हॉलमध्ये महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र वाशरुम, क्रीडांगणावरील महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृह, व्हॉलीबालचे मैदान नव्याने करणे, ग्रीन जीमची दुरुस्ती, सिंगल बार लावणे आदी कामे दोन आठवड्यात पूर्ण करण्याचे आश्वासन खुने यांनी दिले. यावेळी विजया कंकरेज, प्रभा पारगावकर, कांता वराडे, सुहास अडसूळ, नाना पाटील आदी नागरिक उपस्थित होते.
मवीकासेचे रविवारी अधिवेशन
मनसे वीज कामगार सेनेचे पहिले राज्यस्तरीय द्विवार्षिक अधिवेशन रविवारी (ता.१) सकाळी दहाला जेलरोड येथील शिवाजीनगरच्या समाजमंदिरात सकाळी दहाला होणार आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन होईल. मनसे वीज सेनेचे अध्यक्ष शिरीष सावंत अध्यक्षस्थानी असतील, अशी माहिती उपाध्यक्ष प्रशांत शेंडे यांनी दिली.
महापौर अशोक मुतर्डक, स्थायीचे सभापती राहुल ढिकले, मनसेचे जिल्हाप्रमुख सुदाम कोंबडे, जिल्हा संघटक डॉ. प्रदीप पवार, सभागृह नेते शशिकांत जाधव आदींची प्रमुख उपस्थिती असेल. वीज कर्मचारी अधिकारी यांच्या पाल्यांना भरतीत आरक्षण ठेवावे, रिक्त पदे त्वरित भरावीत, भरतीत मराठी भूपुत्रांना ८० टक्के राखीव जागा ठेवाव्यात, वीज कंपन्यांचे खासगीकरण थांबवावे, कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करावे, पात्र यंत्रचालक व तंत्रज्ज्ञांना अभियंता पदावर बढती द्यावी आदी मागण्यांसाठी अधिवेशन आहे.
उर्जेच्या तुटवड्यावर उतारा
जितेंद्र तरटे, नाशिक
शेतमालाच्या उपयोगापासून गॅसीफायर चालविण्याची अन् उर्जेची निकड भागविण्याची संकल्पना नवी नसली तरीही या प्रक्रीयेत येणाऱ्या असंख्य अडचणींवर शहरातील एका तरुण उद्योजक अभियंत्याने मात केली आहे. आयआयटी पवईमधून इंजिनीअर झालेल्या अश्विनकुमार शेजवलकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी यांनी संशोधनातून तयार केलेला युनिक गॅसीफायरने कमी दरात अन् इकोफ्रेण्डली उर्जेचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
शेतीमध्ये कचऱ्याच्या स्वरूपात वाया जाणारे घटकच या गॅसीफायरचे इंधन बनले आहेत. आजवर बाजारात उपलब्ध असणाऱ्या गॅसीफायरमध्ये उर्जानिर्मितीसाठी शेतीतून निघणाऱ्या कचऱ्यातील केवळ एकच घटक उपयोगात आणला जात होता. मात्र, शेजवलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निर्मिलेल्या एकाच गॅसीफायरमध्ये तब्बल १६ प्रकारचे कृषी प्रक्रियेत वाया जाणाऱ्या घटकांचा उपयोग केला जाणार आहे. हेच या गॅसीफायरचे प्रमुख वैशिष्ट्य ठरल्याची माहिती अश्विनकुमार शेजवलकर यांनी दिली. या गॅसीफायरचा मॅन्युफॅक्चरिंग प्लान्ट नुकताच नाशिकमध्ये सुरू झाला आहे.
अश्विनकुमार यांसह प्रदीपकुमार पोदाल आणि देवेंद्र पारीख यांनी २०१० मध्ये नाशिकचे सुमारे १० लाख रुपये खर्च करून या प्रकल्पाची पायाभरणी केली. अगोदर उपलब्ध असणाऱ्या गॅसीफायर्समध्ये सुरक्षा, इंधनासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या मालाच्या वापरावर येणाऱ्या मर्यादा आणि मनुष्यबळाची कमतरता अशी आव्हाने होती. या सर्व आव्हानांवर मात करीत त्यांनी बनविलेला गॅसीफायर कमी दरात इंधन पुरवठा उपलब्ध करून देऊ शकतो, असा त्यांचा दावा आहे. हजार रुपयांपर्यंत उपलब्ध होणारा एलपीजी गॅस या गॅसीफायरच्या माध्यमातून अवघ्या दोनशे रुपयातच उपलब्ध होत असल्याचा अश्विनकुमार यांचा दावा आहे. सामान्यत: मोठ्या प्रमाणावरील स्वयंपाक, औद्योगिक हेतू, पेंट दुकाने आणि बॉयलर आदी ठिकाणी हे गॅसीफायर उपयुक्त ठरू शकणार आहे.
कचऱ्यातून गॅसीपायरचा पुनर्वापर
राज्याच्या काही ग्रामीण भागात अद्यापही मोठ्या प्रमाणावर होणारा विजेचा तुडवडा अन् त्यामुळे उद्भविणाऱ्या समस्यांवर या संकल्पनेच्या आधारे पॉवर जनरेशन युनिट उभारणेही शक्य आहे. शेतीतून वाया जाणाऱ्या १६ प्रकारच्या कचऱ्याचा या गॅसीफायरमध्ये पुनर्वापर होणार असून अत्यल्प दरात सुरक्षित इंधनाचा पर्याय होणार आहे. या धर्तीवर तामिळनाडूमध्ये काही प्रयोग सुरू आहेत. उर्जेच्या पुर्नवापरासंदर्भातील जर्मनीतील अभ्यास दौऱ्यात भारतातून सहा सदस्यीय समिती सरकारच्या माध्यमातून पाठविण्यात आली होती. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या (सीआयआय) माध्यमातून आयोजित हा समितीत नाशिकचे उद्योजक व युनिक गॅसीफायरचे फाऊंडर अश्विनकुमार यांचाही समावेश होता.
'भूसंपादन'विरोधात रस्त्यावर उतरा
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
केंद्राचा प्रस्तावित भूसंपादन कायदा हा शेतकरी विरोधी असून, शिवसेनेचा या कायद्याला तीव्र विरोध आहे. हा कायदा शेतकऱ्यांवर दडपशाही करणारा आहे. शिवसैनिकांनी या कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरावे, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले आहे. शिवसेना सत्तेत असली या कायद्याविरोधात भांडणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनचे शिवसंपर्क अभियान सुरू आहे. शुक्रवारी देसाई यांच्या उपस्थितीत दिंडोरी, निफाड, सिन्नर, इगतपुरी, देवळाली, नाशिक मध्य, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. यावेळी शिवसेना उपनेते अनंत तरे यांनी २०१४ विधासभा निवडणुकीच्या जय पराजयाची कारणे जाणून घेतली. त्याचप्रमाणे संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा तसेच, शिवसेना संघटनेच्या संघटनात्मक रचनेसंदर्भात आढावा घेतला. आगामी काळातील शिवसेनेच्या माध्यमातून जनतेसाठी विविध सामाजिक व विधायक कामे करण्यासाठी मार्गदर्शन केले. सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. या वेळी शिवसेना उपनेते बबनराव घोलप, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, आमदार योगेश घोलप, शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, सत्यभामा गाडेकर, शामला दीक्षित, नगरसेवक सूर्यकांत लवटे, विनायक पांडे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मंदिरांना मिळेना निधी
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
कुंभमेळा अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेला असताना सिहस्थांतर्गत अनेक प्रस्तावित कामे रखडलेली आहेत. सिंहस्थासाठी जिल्ह्यातील प्राचीन मंदिरांच्या डागडूजी संबंधी पुरातत्त्व विभागाने सुचविलेली कामेही निधीअभावी रखडली असल्याने यातून राज्य तथा केंद्र शासनाची उदासीनता प्रकर्षाने दिसून येत आहे.
पुरातत्व विभागाकडून या कामांकरिता राज्य सरकारकडे दोन कोटींची मागणी केली होती. मात्र, हा निधी विभागाला अद्यापही न मिळाल्याने जिल्ह्यातील मंदिरांच्या जिर्णोद्धाराशी संबंधित कामे रखडून पडली आहेत. पुरातत्व विभागाला सिंहस्थाच्या अंतिम टप्प्यात निधी मिळाल्यास हे काम पूर्ण होईल की नाही याबद्दल शंका उपस्थित होत आहे. देशातील विविध आखाडे, साधू-संत, पर्यटक, जगभरातील नागरिक यांची सिंहस्थ पर्वणीनिमित्त गोदावरीच्या काठावरील विविध प्राचीन मंदिरात दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी होणार आहे. त्यामुळे याअनुषंगाने पुरातत्त्व विभागाने गोदाकाठ तसेच शहरातील विविध प्राचीन मंदिरांची डागडूजी करण्याबाबत राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. यामध्ये या विविध मंदिरांचे रासायनिक पद्धतीने जतन प्रक्रिया करण्याच्या प्रक्रियेचा यामध्ये समावेश आहे. पालकमंत्री तसेच सिंहस्थासाठीच्या विविध समित्यांनीही त्यास मान्यता दिली आहे. तरीही या निधी उपलब्धतेसाठी राज्य शासनाने पुरातत्व विभागाला ठेंगा दाखवल्यामुळे ही कामे रखडली आहे. या कामांसाठी लागणाऱ्या निविदा केंद्र सरकारकडून तयार करण्यात आल्या. त्यामध्ये दोन कोटींवरून या निधीची रक्कम एक कोटी ३२ लाखांवर आली आहे. सिंहस्थापूर्वीच जिल्ह्यातील पडझड झालेल्या विविध मंदिरांचा जिर्णोद्धाराचा विषय राज्य प्रशासन तसेच जिल्हा प्रशासनासाठी प्राथमिक पातळीवर मार्गी लागणे अपेक्षित होते.
मंदिरांची प्रत्यक्षातील दुरवस्था पाहणे, त्याबाबत निट सर्वेक्षण करणे, तेथील आसपासच्या लोकांशी चर्चा करणे आदी प्राथमिक स्वरुपाची कामे या अधिकाऱ्यांकडून होत नाही. शासनाकडे केवळ निधीचा तगादा लावायचा. पण तो निधी आपण का आणि कशासाठी मागत आहे याचं ठोस उत्तर या अधिका-यांना केंद्र तथा राज्य प्रशासनाकडे मांडता येत नाही. त्यामुळे हा निधी मिळवण्यात या मंडळीना नेहमी अडचणी येतात.
- सतीश शुक्ल,
अध्यक्ष, नाशिक पुरोहित संघ
स्वत:पासूनच स्वच्छतेची सुरुवात!
म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प
स्वच्छतेची सुरुवात स्वत:पासून करावी जेणेकरून समाजातील उर्वरित घटक आपोआप स्वच्छतेच्या मार्गावर चालतील व आपला भारत देश स्वच्छ व सुंदर होईल, असे प्रतिपादन डॉ. शेखर राजदरेकर यांनी केले. देवळाली कॅम्प येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया कॉलेजमध्ये झालेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) मूल्यशिक्षण कार्यशाळा झाली. यावेळी ते बोलत होते.
मूल्यशिक्षण कार्यशाळेच्या उदघाटन डॉ. राजदरेकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्रचे संचालक मुरलीधर पाटील होते. कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात डॉ. प्रतिभा औंधकर यांनी आहाराबाबत मार्गदर्शन करतांना सांगितले, की पालेभाज्या व विटामिनयुक्त पूरक आहार सेवन केल्यास आरोग्याची काळजी घेण्याची गरज भासत नाही. या वेळी कॉलेजच्या प्राचार्या डॉ. जे. डी. सोनखासकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रा. वरखेडे प्रभाकर यांनी कार्यशाळेचे उद्दिष्ट्ये समजून सांगितली.
पूजा चौधरी हिने सूत्रसंचालन केले. यावेळी रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा. विक्रम काकुळते, प्रा. सुनीता आडके, प्रा. सुनील सौंदणकर, प्रा. मंगला निकुंभ, प्रा. दौलत शिंदे, प्रा. प्रकाश आव्हाड, प्रा. प्रेमराज गुळवे आदी उपस्थित होते.
उद्योगांना बळ अन् सामान्यांचा अपेक्षाभंग!
अर्थव्यवस्थेसाठी बुस्टर डोस!
आयकरामधून सूट मिळेल ही सामान्य जनतेची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात सूट मिळाली नाही. याउलट सेवाकराचा दर वाढविल्याने सेवा आणि वस्तूंच्या किमती नक्कीच वाढतील. या बाबी वगळता अर्थसंकल्प अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने उत्तम आहे. सरकारच सगळे करेल या मानसिकतेला या अर्थसंकल्पाने धक्का दिला आहे. सुरक्षा, आरोग्य आणि निवृत्ती वेतन या बाबींचा विचार अर्थसंकल्पात करण्यात आला. मात्र, नागरिकांचाही सहभाग सरकारने काही तरतूदींच्या माध्यमातून करवून घेतला आहे. लघु, मध्यम आणि मोठे उद्योग या सर्वांसाठी त्या त्या क्षेत्राची गरज ओळखून ती भागविण्याचा प्रयत्न मुद्रा बँक (व्यापारी येणी) बँक करप्सी (दिवाळखोरी संदर्भातील नियम) या आहेत. पायाभूत सुविधांची कमतरता लक्षात घेऊन मोठी तरतूद करण्यात आली. शिवाय, करमुक्त इन्फ्रा बॉन्डची योजना देऊन सामान्यांना गुंतवणुकीचे साधन मिळाले आहे. काळ्या पैशाच्या बाबतीत सरकार वचनबध्द दिसते आहे. देश आणि विदेशातील काळ्या पैशांबाबत सकारात्मक तरतुदी करण्यात आल्या आहेत. काळा पैसा दडविणाऱ्यांसाठी दहा वर्षे कारावासाची करण्यात आलेली तरतूद हे सरकारचे धाडसी पाऊलच म्हणावे लागेल. मालमत्तेचा तपशील आयकर विवरणात करावा लागणार ही सुध्दा महत्वाची तरतूद आहे.
डॉ. विनायक गोविलकर, अर्थतज्ज्ञ
अष्टपैलू अर्थसंकल्प
नवीन रोजगाराच्या निर्मितीसोबतच उद्योगांना चालना देण्याचे नियोजन यंदाच्या अर्थसंकल्पनातून दिसते. एप्रिल २०१६ पासून जीएसटीची घोषणा, मुद्रा बँकेची स्थापना व कॉर्पोरेट टॅक्स ३० हून २५ टक्के या उद्योगासाठी आनंदाच्या योजना तर गोल्ड बॉन्ड, व्हीसा ऑन अरायव्हल आणि २० हजार गावांमध्ये सोलर प्रकल्प यासारख्या तरतुदींमुळे उद्योजकांना चालना मिळेल.
प्रदीप पेशकार,
महाराष्ट्र प्रदेश चिटणीस, भाजप उद्योग आघाडी
सर्वसमावेशक बजेट
यंदाच्या अर्थ संकल्पात मोदी सरकारने शेती आणि कॉर्पोरेट क्षेत्राला प्राधान्य दिले आहे. परिणामी सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांच्या विकासाला चालना मिळेल. सबसीडी कमी करण्यऐवजी त्यातील गळती थांबविण्यासाठीची योजनाही चांगली आहे. आयकराच्या स्लॅबमध्ये कुठलाही बदल नाही. मात्र करकपातीसाठी असलेल्या मर्यादा वाढविण्यात आल्या आहेत. यामुळे नोकरदार वर्गाला दिलासा मिळेल. कररचनेच्या सुधारणेच्या नावाखाली संपत्ती कर काढून टाकला आहे तर अन्य सवलतीही काढून घेतल्या आहेत. सर्व सेवाही महागणार असल्याने अत्यंत चातुर्य आणि कल्पकतेने सामान्यांच्या खिशातूनही पैसे काढत सर्वसमावेशक अर्थसंकल्प मांडला आहे.
संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अॅण्ड अग्रीकल्चर
संमिश्र तरतुदी
आगामी पाच वर्षांचा विचार करून मोदी सरकारकडून अर्थसंकल्प मांडला जाण्याची अपेक्षा होती. मात्र मोदी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पाने उद्योजकांच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या नाहीत. उत्पादन शुल्क या संकल्पात कमी करणे अपेक्षित होते. तसे घडले नाही. सेवाकरही वाढविण्यात आला आहे. इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्राच्या दृष्टीने काही तरतुदी चांगल्या आहेत. उर्जा क्षेत्रालाही नव्या धोरणांचा काही प्रमाणात फायदा होईल. मात्र, ऑटोमोबाईलसारख्या क्षेत्रांचा फारसा सकारात्मक विचार करण्यात आलेला नाही. 'मेक इन इंडिया' ही उत्तम संकल्पना सरकारने मांडली असली तरीही तिच्या अंमलबजावणीसाठी पाठबळ देणाऱ्या आणखी काही बाबींच्या तरतूदीची आवश्यकता होती.
मनिष कोठारी, अध्यक्ष, निमा
गृह स्वप्नांवर घाला
सर्व्हिस टॅक्स यापूर्वी ३.०९ टक्के एवढा होता. आता तो ३.५० टक्के करण्यात आला आहे. म्हणजेच ३० लाख रुपयांचे घर घेण्यासाठी ९२ हजार ७०० रुपये सर्व्हिस टॅक्स ग्राहकाला भरावा लागत होता. तोच आता १ लाख ५ हजार रुपये भरावा लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांवर मोठा बोजा पडणार आहे. सरकार केवळ परवडणाऱ्या घरांची भाषा करते. पण, ती उपलब्ध कशी होणार? एकंदरीत, अर्थसंकल्प हा गृहस्वप्न बाळगणाऱ्यांसाठी बुरे दिन आणणाराच आहे.
जयेश ठक्कर, अध्यक्ष, क्रेडाई
उद्योगांना मिळेल चालना
यंदाच्या अर्थसंकल्पात कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्यात आला आहे. परिणामी उद्योगांमध्ये देशांतर्गत आणि परकीय गुंतवणुकीस चालना मिळेल. उद्योग क्षेत्राच्या विस्ताराच्या दृष्टिकोनातून ही बाब सकारात्मक आहे. सुरक्षेच्या क्षेत्रातही यंदा मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात आली आहे. तर 'मेक इन इंडिया' या संकल्पनेवरही करण्यात आलेल्या मोठ्या तरतुदींमुळे उद्योग क्षेत्राच्या वाढीला चालना मिळणे शक्य होणार आहे.
विवेक पाटील, अध्यक्ष, आयमा
नोकरदारांची निराशा
यंदाच्या अर्थसंकल्पनाने गरीब व नोकरदार वर्गास महागाईचा चटका दिला आहे. इन्कम टॅक्सच्या दरात कुठलीही सवलत न दिल्याने कर्मचारी व नोकरदार वर्गाची घोर निराशा झाली आहे. सेवाकरात वाढ केल्याने सर्वच क्षेत्रांमध्ये प्रतिकूल परिणाम जाणवेल. संरक्षण क्षेत्रात परकीय गुंतवणुकीस वाव देण्यात आला आहे. विमा आणि कोळसा उद्योगात खासगीकरणाला प्रोत्साहन देण्यात आले आहे. सन् २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याची केवळ घोषणाच राहील, असे चित्र हा अर्थसंकल्प निर्माण करतो.
मोहन देशपांडे, सरचिटणीस, विमा कर्मचारी संघटना
शिस्तबध्द अर्थसंकल्प
भविष्यातील वाटचाल सकारात्मक करण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारला काही कठोर निर्णय घ्यावे लागले असले तरीही शिस्तबध्द अर्थसंकल्प असे म्हणता येईल. पुढील वर्षापासून जीएसटी लागू होणार असल्याने अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. कॉर्पोरेट टॅक्स घटविल्याने टॅक्स चुकवेगिरी कमी होईल. तंत्रज्ञान विकासासाठी रॉयल्टी फी कमी केल्याने उत्पादन दर्जा वाढण्यास मदत होईल. अत्यल्प दरात कामगार क्षेत्रासाठी अपघाती विमा मिळणार आहे.
आशिष नहार, अध्यक्ष, उद्योग आघाडी, भाजप
उद्योग वाढीस चालना
उद्योग आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून या अर्थसंकल्पात करण्यात आलेली तरतूद आशावादी आहे. लघु उद्योगांनाही नव्या धोरणांमुळे चालना मिळणे शक्य होणार आहे. काळ्या पैशावर बंधने आणण्यासाठी करण्यात आलेल्या तरतुदीही सकारात्मक आहेत. तर 'मेक इन इंडिया' सारखी संकल्पना देशातील उद्योग क्षेत्राला नवे बळ पुरवून जाईल. अर्थसंकल्पाचे स्वागतच सर्वांनी करायला हवे.
आशिष कुमार,
मुख्य वित्त अधिकारी, इएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशन्स
आरोग्याचे उत्तरदायित्व
प्रत्येक खेड्याला मेडिकल युनिट देण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. हे आशादायी असले तरी त्याची अंमलबजावणी कशी होणार? कारण सध्याची प्राथमिक आरोग्य केंद्रे चांगल्या स्थितीत नाहीत. करसवलतींमुळे मेडिकल इंडस्ट्री व मेडिक्लेम उद्योग क्षेत्राला बूस्ट मिळेल. पण नॅशनल हेल्थ पॉलिसी अंतर्गत येणाऱ्या आरोग्य योजनांबाबत केंद्राने धोरण स्पष्ट केलेले नाही. हे थोडे चिंतेचे आहे. कारण याचा अर्थ, तुमची काळजी तुम्हीच घ्या!
डॉ. शाम अष्टेकर,
वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासक
आशादायी बजेट
आरोग्य क्षेत्र दिवसेंदिवस महागडे होत आहे. हा महागडेपणा परदेशातून येणारी औषधे व वैद्यकीय साहित्य-साधनांमुळे निर्माण झालेला असतो. ही औषधे व साहित्यसाधने निर्माण करणाऱ्या इंडस्ट्रीला केंद्राने बूस्ट दिला तर आरोग्य-सुविधा सर्वसामान्यांच्या खिशाला परवडू शकतील. यादृष्टीने विचार केल्यास यंदाचा अर्थसंकल्प आशादायी आहे. कारण आरोग्य क्षेत्राच्या वाढीसाठी करसवलती मिळणे गरजेचे होते. त्यादृष्टीने तरतुदी या अर्थसंकल्पात आहेत.
डॉ. राज नगरकर, कॅन्सरतज्ज्ञ
सामान्य जनतेची निराशा
घरगुती बचतीला प्रोत्साहन व रोजगाराच्या संधींमध्ये वाढ करणे हेही गरजेचे होते. मात्र जनतेच्या माफक अपेक्षाही सरकारला पूर्ण करता आलेल्या नाहीत. वाढत्या महागाईचा विचार करून आयकर मुक्त उत्पन्नाची मर्यादा मोठ्या प्रमाणावर वाढविणे, प्रमाणित वजावटी (स्टॅन्डर्ड डिडक्शन) पुन्हा सुरू करणे, स्लॅबमध्ये वाढ करणे अशा माफक अपेक्षाही सरकारने पूर्ण केलेल्या नाहीत.
अॅड. कांतीलाल तातेड,
अर्थविषयक अभ्यासक
मेक इन इंडियाकडे वाटचाल
स्कील इंडियाच्या संकल्पनेवर मेक इन इंडियाकडे वाटचाल करणारा सरकारचा अर्थसंकल्प आशादायी म्हणावा लागेल. शालेय शिक्षणासाठी या अर्थसंकल्पात करण्यात आलेली तरतूद ही शैक्षणिक दर्जावाढीसाठी सकारात्मक आहे. वीज निर्मितीसाठी यंदाच्या अर्थसंकल्पातील भरीव तरतूद विकासाच्या दिशेने घेऊन जाणारी आहे. कॅशलेस व्यवहाराला देण्यात आलेल्या चालनेमुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल. या अर्थसंकल्पात छोट्या छोट्या समूहांचाही विचार करण्यात आला आहे. सेवा कर वाढविण्यऐवजी कॉर्पोरेट कर जसाच्या तसा ठेवण्यास हरकत नव्हती.
रतन लथ, अध्यक्ष, फ्रवशी इंटरनॅशनल स्कूल
शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने
शेतीप्रधान देशामध्ये सरकारने शेतकरी, मजुरांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. सिंहस्थ कुंभमेळा, टोलमाफीबद्दल चकार शब्दही उच्चारलेला नाही. सेवाकर वाढवित अप्रत्यक्षरित्या सामान्यांच्या खिशात हात घातला आहे. गृहकर्जावरील व्याजदराबाबत सवलत मिळाली असती तर लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकले असते.
रवींद्र पगार, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
सामान्यांनाच फटका
अर्थमंत्र्यांनी सादर केलेले हे बजेट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा कोटींच्या कोटसाठी गरीबांच्या अंगावरचे कपडे काढण्याचाच प्रकार आहे. त्यांनी अप्रत्यक्ष करामध्ये वाढ करून सर्व सेवा महागड्या केल्या आहेत. ज्याचे परिणाम सामान्य नागरिकांना सहन करावे लागणार आहेत. जनतेने मोठ्या विश्वासाने मोदी सरकारला निवडून दिले होते. प्रत्यक्षात जनतेचा विश्वासघात झाला आहे.
सुदाम कोंबडे, शहराध्यक्ष, मनसे