दृष्टिक्षेपात...
- दहा रुपयांत जेवणासाठी वेळेआधीच झुंबड
- अर्ध्या तासात संपल्या थाळी
- लाभार्थीचे नाव, छायाचित्राची मोबाइल अॅपवर नोंद
- जेवणाची वेळ १२ ते २
...
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
वडापावसाठीही हल्ली १२ ते १५ रुपये मोजावे लागत असताना, अवघ्या दहा रुपयांत शिवथाळी जेवण मिळू लागल्याने नागरिकांच्या त्यावर अक्षरश: उड्या पडत आहेत. स्वस्तात मस्त जेवणाचा आस्वाद घेता यावा, याकरिता जिल्ह्यातील शिवथाळी केंद्रांवर सोमवारी नागरिकांच्या लांबलचक रांगा लागल्या. त्यामुळे अवघ्या तासाभरातच ६०० थाळ्यांचा कोटा फुल्ल झाल्याने जेवणाशिवायच परतावे लागल्याने जिल्ह्यात सुमारे ४०० नागरिकांची निराशा झाली. येत्या काही दिवसांत योजनेचा जसजसा प्रसार होईल, तशी जेवणासाठी येणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने थाळ्यांची संख्या वाढवावी लागणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवथाळी या महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनी करण्यात आला. पहिल्या दिवसापासूनच या योजनेला जिल्ह्यात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मंगळवारी दुसऱ्या दिवशीही १० रुपयांत जेवण मिळावे याकरिता जिल्ह्यातील चारही केंद्रांवर नागरिकांच्या रांगा लागल्या. दुपारी १२ ते २ या कालावधीतच हे जेवण मिळणार असले तरी त्याकरिता प्रत्येक केंद्राला १५० थाळींची मर्यादा निश्चित करून देण्यात आली आहे. शिवशाही केंद्रांना ठरवून दिलेली मर्यादा आणि लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांची प्रचंड संख्या यामध्ये मोठी तफावत असल्याने येथे गर्दी वाढू लागली आहे. सकाळी साडेअकरापासूनच नागरिकांनी केंद्रांवर रांगा लावल्या. शिवथाळीचा आस्वाद घेऊ इच्छिणाऱ्यांचे छायाचित्र आणि नाव विशिष्ट अॅपवर नोंदविल्यानंतरच त्यांना जेवणासाठी प्रवेश देण्यात येत होता. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ महसूल कर्मचारी संघटनेची कॅन्टीन असून, तेथेही जेवणासाठी नागरिकांची झुंबड उडाली. त्यामुळे दुपारी साडेबारापर्यंत १५० नागरिकांचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाले. तेवढ्याच नागरिकांना जेवण देण्यात आले. त्यानंतरही दुपारी दोनपर्यंत नागरिक येथे येतच होते. परंतु, थाळी संपल्याचे त्यांना सांगितले जात होते. त्यामुळे या एकाच केंद्रावरून सुमारे १०० नागरिकांना जेवण न करताच परत जावे लागले.
...
कर्मचारी संघटनेकडून अन्नदान
आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते महसूल कर्मचारी संघटनेच्या कॅन्टीनमध्ये शिवथाळी उपक्रमाचा श्रीगणेशा झाला. पहिल्याच दिवशी दुपारी दीड-दोनपर्यंत १५० नागरिकांना जेवण देण्यात आले. त्यानंतरही नागरिकांचा ओघ सुरूच होता. महसूल कर्मचारी संघटना ही कॅन्टीन चालवित असून, त्यांनी त्यांच्या खर्चाने अतिरिक्त ३५ नागरिकांना जेवण दिले. त्र्यंबकेश्वरहून परतणाऱ्या काही दिंडीकऱ्यांना संघटनेने स्वखर्चातून जेऊ घातल्याची माहिती अध्यक्ष दिनेश वाघ यांनी दिली.
.
मालेगावात उरल्या थाळी
मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात १० रुपयांत जेवणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु, रविवारी प्रजासत्ताक दिनी म्हणजेच पहिल्या दिवशी येथे १११ थाळ्यांचा लाभ देण्यात आला. ३९ थाळी उरल्या. दुसऱ्या दिवशी मात्र येथील १५० थाळी संपल्या. पंचवटीतील कृषी उत्पन्न बाजार समिती आणि नाशिकरोड परिसरातील दीपक हॉटेल येथेही तासाभरातच दीडशे थाळींसाठी रजिस्ट्रेशन झाले.
...
दहा रुपयांत थाळी, द्या टाळी!
केवळ दहा रुपयांत थाळीच्या उत्सुकतेपोटी काही जण या योजनेचा लाभ घेण्यासाठी येत आहेत. ही उत्सुकता आणि तृप्तीचा ढेकरे या मंडळींच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होते. काही जणांनी तर दहा रुपयांत थाळी, मग द्या टाळी, अशी प्रतिक्रियाच व्यक्त केली. परंतु, ज्यांना थाळीचा लाभ घेता आला नाही, त्यांची नाराजीही स्पष्टपण जाणवत होती. अधिकाधिक गरजूंच्या पोटात हे अन्न जावे अशी अपेक्षा प्रशासकीय यंत्रणा करीत आहे.
...
राज्यभरात शिवथाळीचा लाभ घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली. नाशिक जिल्ह्यातही दुसऱ्या दिवशी ६०० नागरिकांनी या थाळीचा आस्वाद घेतला. थाळींच्या कोट्यापेक्षा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना थाळीचा लाभ देता आला नाही. थाळींची संख्या वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारच्या पातळीवरच होऊ शकेल.
- अरविंद नरसीकर, जिल्हा पुरवठा अधिकारी