म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक मराठवाड्याची भिस्त असलेल्या जायकवाडी धरणात आतापर्यंत जिल्ह्यातून ६५ टीएमसी पाणी गेले आहे. रविवारच्या महापुरावेळी दोन लाख ९१ हजार क्युसेकने सोडण्यात आलेले पाणी मंगळवारी जायकवाडी धरणात पोहोचण्यास सुरुवात झाली. त्यामुळे ४२ टक्क्यांवर असलेला जायकवाडीचा पाणीसाठा आज, बुधवारी (दि. ७) ५५ टक्क्यांपर्यंत जाईल, अशी माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली. दुष्काळात होरपळून निघालेल्या मराठवाडावासीयांचे लक्ष नाशिक जिल्ह्यातील पावसाकडे लागलेले असते. मराठवाड्यात पाऊस पडेल तेव्हा पडेल, परंतु नाशिक जिल्ह्यात पाऊस व्हायला हवा, अशी सदिच्छा ते व्यक्त करीत असतात. यंदा नाशिक जिल्ह्यावर पाऊस तुटून पडला आहे. त्यामुळे तो मराठवाडावासीयांसाठीच अधिक फायदेशीर ठरू लागला आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाण्यासह जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली असून, त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने जिल्हा प्रशासनाने हे पाणी जायकवाडीकडे सोडण्याचा निर्णय घेतला. १ जून ते १ ऑगस्ट या कालावधीत २१ टीएमसी पाणी जायकवाडीत पोहोचले होते. परंतु, त्यानंतर पावसाचा जोर अधिक वाढल्याने जिल्ह्यातील अनेक धरणांमधून एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे सोमवारी दुपारपर्यंत ४८ टीएमसी पाणी जायकवाडीत पोहोचल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली होती. रविवारी नाशिकमध्ये महापूर आला त्यावेळी तब्बल दोन लाख ९१ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. हे पाणी मंगळवारी दुपारनंतर जायकवाडी धरणात पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ६५ टीएमसी पाणी जायकवाडीकडे गेले असून, मंगळवारी ४२ टक्क्यांवर असलेला जायकवाडीचा उपयुक्त पाणीसाठा बुधवारी ५५ टक्क्यांवर जाईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली. --- २०१६ पेक्षा यंदा अधिक वेगाने विसर्ग नाशिकमध्ये २०१६ मध्ये महापूर आला होता. २ ऑगस्ट रोजी आलेल्या त्या महापुराच्या वेळी दोन लाख ८४ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. यंदा मात्र पूरस्थिती अधिक गंभीर असल्याने दोन लाख ९१ हजार ५२५ क्युसेक वेगाने विसर्ग करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट