म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणांवरून १६ वर्षांच्या तीन अल्पवयीन मुली गायब झाल्या आहेत. यामध्ये दोन मैत्रिणी तर एका बाल निरीक्षण गृहातील मुलीचा सामावेश आहे. या प्रकरणी अंबड तसेच मुंबई नाका पोलिस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मोरवाडी परिसरातील १६ वर्षांच्या दोघी मैत्रिणी बुधवारी (दि. ३१) पहाटे ३ वाजेच्या सुमारास गायब झाल्या आहेत. या प्रकरणी अपहृत मुलीच्या आईने अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीनुसार, अज्ञात व्यक्तीने फूस लावून दोघींचे अपहरण केल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक बेडवाल अधिक तपास करत आहेत. दुसरी घटना गुरुवारी (दि.१) सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास घडली. अपहृत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, सदर १६ वर्षांची युवती मुलींच्या निरिक्षणगृहात राहत होती. बाल निरीक्षण गृहातून ती गडकरी चौकातील रमाबाई कन्या विद्यालयात शिक्षणासाठी जात होती. रोजच्या प्रमाणे ती शाळेसाठी म्हणून गेली. मात्र, ती शाळेत पोहचलीच नाही. युवतीच्या आईच्या तक्रारीनुसार मुंबई नाका पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरूद्ध अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरिक्षक पी. पू. शिंदे करत आहेत. ... म्हणून गुन्ह्यांचा आलेख वाढलेला या घटनांच्या तपासाबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले, की १८ वर्षांपर्यंतच्या मुलीच्या बेपत्ता होण्याची तक्रार आल्यास अपहरणाचा गुन्हा दाखल केला जातो. सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे शहरातून दिवसाला किमान एक ते दोन मुल किंवा मुली बेपत्ता होतात. बऱ्याचदा घरच्याशी वाद, अभ्यासाचे कारण, प्रेमप्रकरण यामुळे मुली घर सोडतात. पोलिसांचा वेगवेगळ्या पातळ्यांवर शोध सुरू असतो. मुलांचा शोध लागेपर्यंत संबंधित तपासाधिकारी प्रकरणाचा तपास करतात. दरम्यान, अनेक प्रकरणात अशी मुले स्वत:च घरी परततात. तर काहींमध्ये मुलांचे कुटुंबीय त्यांना शोधून काढतात. मात्र, मुले सापडल्याची माहिती पोलिसांना दिली जात नाही. त्यामुळे अपहरणाच्या गुन्ह्यांचा आलेख सतत वाढलेला दिसतो, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट