म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक ग्रामीण पोलिस दलातील तब्बल चारशे पोलिस कर्मचारी विविध प्रकारच्या दोन हजार व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये दाखल झाले आहेत. हा आकडा हळूहळू वाढत जाणार असून, याद्वारे सोशल मीडियावर प्रसारित होणारे संदेश पोलिसांच्या नजरेखालून जात आहेत. सोशल मीडियाद्वारे पसरविण्यात येणाऱ्या अफवा आणि त्यातून होणाऱ्या सामूहिक हल्ल्यासारख्या घटनांना रोखता येणे शक्य होणार आहे. देशभरात सध्या झुंडशाहीसारख्या घटना घडत असून, या घटनांचे मूळ बऱ्याचदा सोशल मीडियात सापडते. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक आरती सिंह यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाबाबत बोलताना पोलिस सूत्रांनी सांगितले, की काही महिन्यांपूर्वी आम्ही यासाठी पावले उचलली. नाशिक जिल्हा मोठा असून, तब्बल ४० पोलिस ठाण्यांचा यात समावेश होतो. त्यात छोट्या-मोठ्या खेड्यांची संख्या लक्षणीय असून, तिथे किमान दोन हजार व्हॉट्सअॅप ग्रुप कार्यरत आहेत. हे व्हॉट्सअॅप ग्रुप त्या खेड्यापाड्यांतील मोठ्या लोकसंख्येशी जोडले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर त्या भागातील एका पोलिस कर्मचाऱ्याला अशा किमान तीन ते चार ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्यात आले. यामुळे त्या ग्रुपमध्ये येणारे मेसेज, त्यातून उमटणारी प्रतिक्रिया यावर बारकाईने लक्ष ठेवणे सोपे होते. विशेष म्हणजे ग्रुपमध्ये पोलिसाचा सहभाग असल्याचीही जाणीव करून देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील अर्थकारण मान्सूनवर अवलंबून असते. पाऊस कमी झाला, की ग्रामीण भागात रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो. काही वर्षांपासून दुष्काळ किंवा दुष्काळसदृश परिस्थितीला जिल्हा सामोरा जात असून, अशा वेळी अफवांचे पीक पसरण्याचा मोठा धोका निर्माण होतो. अगदी छोट्या कारणांवरून अथवा न घडलेल्या घटनांचे अवास्तव चित्र निर्माण करून अफवांचे पीक पसरवले जाते. अशा वेळी व्हॉट्सअॅप ग्रुमध्ये पोलिसांचा सहभाग महत्त्वाचा ठरू शकतो. अफवेबाबत योग्य ती माहिती देणे, घटनेतील तथ्य वेळीच समजावून सांगण्याचे काम या निमित्ताने होणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. नाशिक जिल्ह्याचा विस्तार मोठा असून, मालेगावसह अन्य काही तालुके संवेदनशील मानले जातात. व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून याकडे लक्ष पुरविण्याचे काम होत आहे. काही दिवसांपूर्वी एका महिलेची बॅग रिक्षात विसरली होती. त्यात तिचा मोबाइलसुद्धा होता. रिक्षाचालकालाही त्याची खबर नव्हती. ही बाब महिलेने अन्य सदस्यांमार्फत व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर केली. त्याच व्हॉट्सअॅप ग्रुपवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने घटनेची दखल घेऊन त्या रिक्षाचा शोध घेतला. काही वेळातच त्या महिलेला बॅग परत मिळाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. या उपक्रमाच्या माध्यमातून एकाच वेळी मोठ्या लोकसंख्येपर्यंत पोहोचणे शक्य होत आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यास चांगला हातभार मिळतो आहे. अफवांना रोखणे हे मोठे काम यामुळे शक्य होत असून, लवकरच अशा व्हॉट्सअॅप ग्रुपची संख्या वाढवण्यात येईल. - डॉ. आरती सिंह, पोलिस अधीक्षक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट