म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयाद्यांच्या शुद्धीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. आज, शनिवारी (दि. २०) आणि रविवारी (दि. २१) रोजी मतदान केंद्रांवर ही मोहीम राबविण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्ण राज्यात मतदारयाद्यांच्या शुद्धीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मतदारयाद्या दोषविरहित करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेचाच भाग म्हणून मोहिमेंतर्गत शनिवारी आणि रविवारी जिल्हाभरातील सर्व मतदान केंद्रांसह मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदान नोंदणी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन करावे, असे आदेश उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी दिले आहेत. या मोहिमेदरम्यान मतदान केंद्रांवर नवमतदारांची नोंदणी, मृत मतदारांची नावे वगळणे, मतदारयादी व मतदार ओळखपत्रातील चुकांची दुरुस्ती करणे यांसारखी कामे केली जाणार आहेत. याकरिता आवश्यक फॉर्म क्रमांक सहा, सात, आठ आणि आठ-अ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. -- विभागीय आयुक्त करणार तपासणी मतदानाचा टक्का वाढावा आणि मतदानाच्या हक्कापासून कुणीही वंचित राहू नये याकरिता ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश आनंदकर यांनी सर्व 'बीएलओं'ना दिले आहेत. विशेष म्हणजे ही मोहीम व्यवस्थित आणि गांभीर्याने राबविली जातेय का, याची तपासणी विभागीय आयुक्त आणि मतदारयादी निरीक्षक राजाराम माने करणार आहेत. त्यामुळे या मोहिमेच्या अंमलबजावणीमध्ये कुठल्याही प्रकारची त्रुटी राहणार नाहीत, याची प्रत्येकाने खबरदारी घ्यावी, अशा सूचना आनंदकर यांनी केल्या आहेत. या मोहिमेंतर्गत मृत, दुबार मतदारांची नावे वगळणे, तसेच १ जानेवारी २०१९ या दिनांकावर आधारित सर्व पात्र मतदारांची नोंद मतदारयादीमध्ये करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट