जिल्हाधिकाऱ्यांची त्र्यंबकला भेट; स्थानिकांच्या शंकानिरसनाचे प्रयत्न
म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर
अचानक उद्भवलेली पूरपरिस्थिती जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मंगळवारी सायंकाळी चार वाजता शहराला भेट दिली. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींसह विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी समस्यांचा पाढा वाचत प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराची पोलखोल केली. त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न केला.
महाराष्ट्र टाइम्समध्ये रविवारी (दि. १४) 'तुंबके'श्वर असा लेख प्रसिद्ध झाला होता. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्याची दखल घेत नियाजन आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांना त्र्यंबकेश्वर येथे जाऊन परिस्थितीची पाहणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी त्र्यंबकला मंगळवारी भेट दिली. यावेळी प्रांताधिकारी राहुल पाटील, तहसीलदार दीपक गिरासे, त्र्यंबक नगरपालिकेचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर आणि नगरसेवकांसह त्यांनी आहिल्या-गोदावरी संगमघाट, त्र्यंबकेश्वर मंदिर तसेच दक्षिण बाजूस असलेले गायत्री मंदिर, कुशावर्त तीर्थ, तेलीगल्ली, मेनरोड गंगास्लॅब आदी सर्व भागांची पाहणी केली. त्यानंतर तहसील कार्यालयात बैठक घेतली. त्यास नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
ज्येष्ठ नागरिक व माजी नगरसेवक गोविंदराव मुळे, आरपीआय तालुका अध्यक्ष शांताराम बागूल, सामाजिक कार्यकर्ते उमेश सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील शेलार, नगरसेवक अॅड. श्रीकांत गायधनी, संजय कदम, नगरसेवक विष्णू दोबाडे, अमर सोनवणे, गटनेते समीर पाटणकर, दिनेश पाटील आदींसह काही नागरिकांनी आपले म्हणणे मांडत सूचना केल्या. राजेश पंडित आणि ललिता शिंदे यांनी पाण्याचा नैसर्गिक प्रवाह वळविण्यास विरोध दर्शविला तसेच आपत्ती निर्माण होणाऱ्या कामांना परवानगी कशी दिली जाते, असा प्रश्न उपस्थित केला.
दावा ठरला फोल
गंगाद्वार पायथ्याच्या अटल आखाड्याचे महंत उदयगिरी महाराज यांच्या नगरसेवकांनी तक्रारी केल्या. त्यांनी नाल्याचा प्रवाह अडविल्याने पाणी रस्त्यावर येते. ते काम करू देत नाही, असा दावाही नगरसेवकांनी केला. याबाबत शहानिशा करण्यासाठी जिल्हाधिकारी ताफा घेऊन संत निवृत्तिनाथ मंदिराच्या पाठीमागी पोहचले. तेथे मात्र वस्तुस्थिती वेगळीच दिसली. तेथे नाल्याचा प्रवाह मोकळा केलेला दिसला; परंतु या प्रवाहास पुढे अडथळा होईल, असे बांधकाम शेजाराच्या जमिनीतील कब्जेदारांनी केलेले आढळले. तसेच शहरात येणारा प्रवाह शेजारच्या गटातून वाहत असल्याचे स्पष्ट झाले.
मुख्याधिकाऱ्यांच्या तक्रारी
आजारपणाच्या कारणाने रजेवर असलेल्या मुख्याधिकारी डॉ. चेतना केरूरे यांच्याबाबत सर्वाधिक तक्रारी करण्यात आल्या. त्या १५ दिवसातून एकदा येतात. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक असल्याचे कारण सांगतात, असा मुद्दा आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अशी कोणतीही बैठक नसते असे सांगितल्याने उपस्थितीत आवाक झाले. मुख्याधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास काय करायचे, असा प्रश्न उपस्थित करून त्यांच्या बदलीची मागणी झाली. तक्रारीबाबत आपण मुख्याधिकाऱ्यांकडून खुलासा मागणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
तर पूर्ण बाथरूमच तोडणार का?
जिल्हाधिकारी मांढरे यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेत ताबडतोब काय करता येईल त्याचे मार्गदर्शन केले. मेनरोड स्लॅबच्या बाजूस पाणी जाण्यासाठीचे इनलेट होल कचरा व मातीने बुजले आहेत, ते मोकळे करणे आवश्यक आहे. तसेच अंतर्गत व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. उगाच मोठे प्लॅन करण्याची गरज नाही. उपाययोजना म्हणून केलेले काम नंतर चुकीचे ठरायला नको. रस्त्यांचे सिमेंट काम काढणे शक्य आहे. सर्वांचा हातभार यासाठी लागला पाहिजे. पण मोरी तुंबली म्हणून संपूर्ण बाथरूमचे नुतनीकरण करायचे नसते, तर तुंबलेले पाणी निचरा होईल, अशी उपाययोजना करावी लागेल असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी कितीही पाऊस झाला तरी शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली नाही. सिंहस्थ कामांच्या दरम्यान पूर्वीचे रस्ते न खोदता नव्याने सिमेंट थर टाकण्यात आले. यात रस्त्यांची उंची वाढली. पाणी वाहून जाण्यासाठी गटारीवर ढापे ठेवले नाहीत. पेव्हर ब्लॉक टाकल्याने कुशावर्त आणि मंदिरात पाणी शिरते.
- गोविंदराव मुळे,
ज्येष्ठ नागरिक व माजी नगरसेवक
ओहळांच्या पाण्यासाठी स्वतंत्र बॉक्स चॅनेल करून तो शहराबाहेर नेण्यात येणार आहे. त्र्यंबकेश्वर येथे पूर येत नाही तर केवळ रस्त्यावर पाणी येते.
- स्वप्नील शेलार,
माजी उपनगराध्यक्ष
आजूबाजूच्या डोंगरांवर जंगल राहिले नाही त्यामुळे माती वाहून येते. पाण्याच्या प्रवाहाला अडथळा करणाऱ्या समस्या निर्माण होत असल्याने नागरिकांनी इतस्त कचरा टाकू नये.
- पुरुषोत्तम लोहगावकर,
नगराध्यक्ष