म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड
राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाचे आगमन झालेले असले, तरी अजूनही टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत घट झालेली नाही. जून महिना सरत आलेला असतानाही नाशिक विभागातील ५४ पैकी तब्बल ४२ तालुक्यांतील १२२२ गावे आणि ४४०४ वाड्यांवर ७१ शासकीय आणि १४९७ खासगी अशा एकूण १५६८ टँकरद्वारे २७ लाख ६६ हजार ५७५ नागरिकांना प्रशासनातर्फे पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. पावसाने अद्याप सर्वदूर हजेरी न लावल्याने विभागातील पाणीबाणी कायम आहे.
नाशिक विभागात एकीकडे काही टापूंत धो-धो पाऊस कोसळला असला तरी दुसरीकडे बहुतांश दुष्काळग्रस्त तालुक्यांवर मात्र मान्सूनने अद्याप कृपा केलेली नसल्याचे चित्र आहे. परिणामी, नाशिक विभागात यंदा प्रथमच जून महिन्याच्या शेवटीदेखील टंचाईची स्थिती कायम असल्याने प्रशासनापुढील चिंता वाढली आहे. नाशिक विभागातील नाशिक, नगर आणि जळगाव या तीन जिल्ह्यांत टंचाईग्रस्त गावांची संख्या अजूनही कायम आहे. नाशिक जिल्ह्यातील ५ लाख ६१ हजार ७७२, नगर जिल्ह्यातील १४ लाख ५३ हजार ७९९, जळगाव जिल्ह्यातील ४ लाख ८६ हजार ४५५, धुळे जिल्ह्यातील २ लाख ६४ हजार ३४ तर नंदुरबार जिल्ह्यातील ५१२ नागरिकांना अजूनही पिण्याचे पाणी टँकरद्वारे पुरविले जात आहे. विभागात गावांसाठी ५५३, तर टँकरसाठी १८७ विहिरी यापूर्वीच प्रशासनाकडून अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहेत. नगर जिल्ह्यातील कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी आणि पारनेर या पाच नगरपालिका क्षेत्रातील पाणी टंचाईची समस्यादेखील अद्याप कायम आहे.
टंचाईग्रस्त तालुके
नाशिक : बागलाण, चांदवड, येवला, देवळा, मालेगाव, नांदगाव, सुरगाणा आणि सिन्नर
जळगाव : जामनेर, पाचोरा, चाळीसगाव, अमळनेर, पारोळा
नगर : संगमनेर, अकोले, नेवासा, नगर, पारनेर, पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा
धुळे : धुळे, साक्री, शिंदखेडा
विभागातील टंचाई स्थिती
जिल्हा---गावे---वाड्या---टँकर्स---लोकसंख्या
नाशिक---२८८---९८८---३९३---५६१७७२
धुळे---८८---३६---८५---२६४०३४
नंदुरबार---२---०---१---५१५
जळगाव---२४९---०---२२०---४८६४५५
नगर---५९५---३३८०---८६९---१४५३७९९
एकूण---१२२२---४४०४---१५६८---२७६६५७५