डॉ. भामरेंचा आश्वासन; पूनदचे काम सुरू होणार
म. टा. वृत्तसेवा सटाणा
सटाणा शहरासाठी मंजूर झालेल्या पुनद पाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइनच्या कामास लवकरच प्रारंभ करण्यात येईल. कळवण-देवळावासियांवरही अन्याय होणार नाही, याची प्रशासनपातळीवर दखल घेतली जात असून, त्यांच्या शेतीसिंचन योजना मार्गी लावण्यासाठी आपल्यासह खासदार भारती पवार प्रयत्नशील असतील, असा आशावाद धुळे लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी व्यक्त केला.
सटाणा येथील पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित खरीप पूर्व टंचाई आढावा बैठकीचे आयोजन खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. त्याप्रसंगी डॉ. सुभाष भामरे बोलत होते.
व्यासपीठावर पंचायत समिती सभापती विमल महाले, नगराध्यक्ष सुनील मोरे, उपनगराध्यक्ष महेश देवरे, जि. प. सदस्य लता बच्छाव, प्रातांधिकारी प्रविण महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष संजय भामरे, शहराध्यक्ष मुन्ना सोनवणे, साहेबराव सोनवणे, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. विलास बच्छाव, बिंदूशेठ शर्मा उपस्थित होते.
आढावा बैठकीत बोलताना खासदार डॉ. सुभाष भामरे म्हणाले,'बागलाणमधील पाणी टंचाईची तीव्रता अधिक आहे. धरणातील मृतसाठा शिल्लक आहे. पावसाळा देखील लांबण्याची भिती आहे. याची जाणीव ठेवून प्रशासनाने व लोकप्रतिनिधीनींनी एकत्रित येवून टंचाईवर मात करण्यासाठी समन्वयाची भूमिका घ्यावी. गरज असेल तेथे तातडीने पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्यावेत, सक्तीचे कर्जवसुली थांबवावी, वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा सुरळीत ठेवून शेतकरीवर्गाला नाहकच त्रास देवू नये, यासारख्या महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
बागलाण तालुक्यातील हरणबारी व केळझर या दोघाही धरणातील जलसाठा संपुष्ठात आला आहे. दोघाही धरणात मृतसाठा शिल्लक आहे. परिणामी तालुक्यात पाणी टंचाईची तीव्रता अधिक जाणवू लागली आहे. सद्यस्थितीत तालुक्यात ४५ गावे व ४६ वाड्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून,३८ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असल्याची माहिती तहसीलदार जितेंद्र इंगळे यांनी दिली.
तालुक्यातील बहुतांश ठिकाणी पाण्याचे टँकरचे वितरण १ किंवा २ वेळाच करण्यात येत असल्याचे संबंधित सरपंच व उपसरपंच यांनी लक्षात आणून दिले असता पाण्याच्या टँकरचे फेऱ्या वाढविण्याच्या सूचना खासदार डॉ. भामरे यांनी केली. या प्रसंगी आढावा बैठकीस विविध विभागाचे अधिकारी, भाजपाचे पदधिकारी व विविध गावातील सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.