लोककलावंत डॉ. प्रकाश खांडगे यांचे प्रतिपादन
....
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
'महाराष्ट्र टाइम्स'ने नेहमीच लोकसाहित्याच्या लेखनाला प्रोत्साहन दिले आहे. गावगाड्यातील लोकसंस्कृतीचे उपासक 'मटा'च्या कलासंगम महोत्सवात सहभागी होत आहेत. त्यांना व्यासपीठ दिल्याने एकप्रकारे लोकसाहित्याची उपासनाच करण्यात आली असून, मूल्यांचा नंदादीप चेतवण्याचे काम कलासंगम करतेय, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध लोकसाहित्य अभ्यासक आणि मुंबई विद्यापीठातील लोककवी वामनदादा कर्डक अध्यासनाचे प्रमुख डॉ. प्रकाश खांडगे यांनी केले.
महाराष्ट्र टाइम्स व कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय कलासंगम महोत्सवाचे उद्घाटन डॉ. गणेश चंदनशिवे आणि डॉ. प्रकाश खांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, की अभिजात हा शब्द 'मटा'साठीच जन्माला आला आहे. अभिजात ज्या कला असतील, त्यांच्यासाठी नेहमीच पुढाकार घेऊन प्रसिद्धी देण्याचे काम करतानाचा सामाजिकतेचे भानही 'मटा'ने जपले आहे.
यावेळी व्यासपीठावर 'महाराष्ट्र टाइम्स'चे संपादक अशोक पानवलकर, लोककलावंत व मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे विभागप्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे, नामवंत चित्रकार-मूर्तीकार चंद्रमोहन कुलकर्णी, ख्यातनाम लोककलावंत नंदेश उमप, चित्रकर्ती शर्वरी लथ, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह मकरंद हिंगणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. गणेश चंदनशिवे यांनी लोकगीतांतील एक गणपतीचा गण सादर करीत कलासंगम महोत्सवाचे उद्घाटन केले. यावेळी प्रास्ताविक करताना 'महाराष्ट्र टाइम्स'चे संपादक अशोक पानवलकर म्हणाले, की हा काळ तंत्रज्ञानाचा आहे. परंतु केवळ भविष्याकडेच बघायचे का, आपले मूळ लक्षात राहिले पाहिजे आणि मूळ लोककला आहे. त्यामुळेच कलासंगमसाठी लोककला हा विषय घेतला आहे. लोककलेची नाळ मराठी माणसाशी कायम जुळलेली राहिली पाहिजे यासाठी लोककला विषय पुढे आला असल्याचेही ते म्हणाले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते नटराजाचे पूजन करण्यात आले. नृत्यांगना शिल्पा देशमुख व त्यांच्या शिष्यांनी गणेशवंदना सादर केली. अपर्णा क्षेमकल्याणी यांनी सूत्रसंचालन केले.
कुसुमाग्रज स्मारकात संपूर्ण दोन दिवस हा महोत्सव होत असून, आज (दि.८) दिवसभरात स्थानिक कलावंतांचे सादरीकरण, गिटार वादन, व्हॉयोलिन वादन, तबल्याची जुगलबंदी, भरतनाट्यम, कथक मूर्ती, पॉटरी डेमोस्ट्रेशन, जागरण गोंधळ, वारली, गोंदण, कशिदा, फोटोग्राफी, पेन्टिंग प्रदर्शन या कला बहरणार आहेत.
...
औचित्यपूर्ण कलासंगम महोत्सव
आपल्या मनोगतात डॉ. प्रकाश खांडगे म्हणाले. की 'मटा'चा हा कलासंगम महोत्सव लोककलेला वाहिलेला आहे, हे अत्यंत औचित्यपूर्ण आहे. कारण आपले सर्व आयुष्य लोककलेच्या अभ्यासासाठी वाहून घेतलेल्या डॉ. सरोजिनी बाबर यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. याच वर्षात होणारा हा महोत्सव म्हणजे डॉ. बाबर यांना वाहिलेली सुमनांजली आहे, असेही डॉ. खांडगे म्हणाले.