रेल्वे पोलिस करताहेत स्वखर्चाने तपास; सात महिन्यांपासून विनाफंड काम
...
डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड
गैरसोयी, तुटपुंजी साधने, बारा तास ड्युटी अशा परिस्थितीत काम करणाऱ्या नाशिकरोड रेल्वे पोलिसांची नवीन सत्त्वपरीक्षा सुरू आहे. सात महिन्यांपासून तपास फंडच मिळालेला नसल्याने या पोलिसांना स्वतःच्या खर्चाने तपास करावा लागत आहे. कमी पगारात संसार चालवायचा की गुन्ह्यांचा तपास करायचा हा यक्ष प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे.
रेल्वे पोलिसांना तपासासाठी राज्यात-परराज्यात जावे लागते. तपासादरम्यान प्रत्येक पोलिसाला दर दिवसाला भोजन, निवास, वाहतूक आदींसाठी एक हजार रुपये तरी खर्च येतो. यासाठी पोलिसांना निधी मंजूर होतो. त्याला तपास फंड म्हणतात. नाशिक शहरातील पोलिसांना हा वेळेत मिळतो. मात्र, या पोलिस यंत्रणेचाच भाग असलेल्या रेल्वे पोलिसांना सात महिन्यांपासून तपास फंड मिळालेला नाही.
..
...यासाठी हवा फंड
नाशिकरोड हे क्लास वन दर्जाचे रेल्वेस्थानक आहे. प्रवासी हरवणे, ऐवज चोरी, गाडीतून पडून प्रवासी जखमी किंवा मृत्यू होणे, परगावची मुले, प्रेमीयुगल पळून येणे, गाडीत किंवा स्थानकात नैसर्गिक मृत्यू आदी घटना घडतात. त्यांच्या तपासासाठी रेल्वे पोलिसांना देशभरात जावे लागते. रेल्वेगाड्यांमध्ये गस्त घालावी लागते. या सर्व गोष्टींसाठी तपास फंड लागतो.
..
प्रशासनाचे दुर्लक्ष
रेल्वे पोलिसांचे मुख्यालय अनेक वर्षे नागपूरला होते. १५ ऑगस्ट २०१८ नागपूरचे विभाजन होऊन औरंगाबाद विभाग स्थापन झाला. औरंगाबाद, नांदेड, नाशिक, इगतपुरी, शेगाव, नंदुरबार, जळगाव, भुसावळ आदी प्रदेश तिकडे जोडले गेले. हा विभाग झाल्यापासून तपासफंड विलंबाने मिळत आहे. पोलिसांना औरंगाबाद अधीक्षक कार्यालयाला बिले पाठवावी लागतात. सहा-सात महिने ती मंजूरच होत नाहीत. तोपर्यंत खर्च पोलिसांना करावा लागतो.
..
सर्वच प्रतिकूल
नाशिकरोड रेल्वे स्थानकात पूर्वी इगतपुरी पोलिस चौकी होती. सन १९८८ साली तिचे रुपांतर पोलिस ठाण्यात झाले. तेव्हापासून हे पोलिस या खुराड्यातच काम करतात. हे पोलिस शेजारील कोर्टाच्या खोलीत बसतात. महिला पोलिसांना चेंजिंग रूम, स्वच्छतागृहही नाही. गुन्हेगारांसाठी मोठी कोठडी नाही. रेल्वे पोलिसांसाठी रेल्वेने क्वार्टस बांधून दिल्या आहेत. मात्र, त्यांची अवस्था वाईट झाल्याने केवळ तीनच रेल्वे पोलिस कर्मचारी तेथे राहतात. पाच खोल्या पडून आहेत.
..
जिद्दीला सलाम
नाशिकरोड स्थानकात गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. तपासी अंमलदार संख्या कमी आहे. एका ठाणे अंमलदाराकडे वर्षाला वीस गुन्हेही खूप होतात. मात्र, नाशिकरोड रेल्वे पोलिसाकडे किमान ३० तपास असतात. बारा तास काम, ढासळते आरोग्य, वाढते गुन्हे, अपुरे मनुष्यबळ, अपुरी जागा, स्वच्छतागृहाची वानवा, मोडकळीस आलेली निवासस्थाने अशा समस्यांना तोंड देत हे पोलिस कर्तव्य बजावत आहेत.
..
गुन्हे संख्या वाढ
नाशिकरोड रेल्वे पोलिसांच्या हद्दीत आकस्मात मृत्यूची संख्या वर्षाला ७० ते ७५ असते. वर्षाला सुमारे चारशे गुन्हे नोंदवले जातात. या पोलिसांना रेल्वेगाडीखाली कटलेले मृतदेह रुग्णालयात न्यावे लागतात. या पोलिसांची हद्द इगतपुरीपासून ओढ्यापर्यंत २०० किलोमीटर होती. आता कसबे व खेरवाडी समाविष्ट झाल्याने हद्द २४१ किलोमीटर झाली आहे. एकूण बारा रेल्वे स्थानकांची जबाबदारी आली आहे. या स्थानकात २०१७ सालात चोरीचे ३७५ गुन्हे दाखल झाले, तर २०१८ सालात हा आकडा ४३२ वर गेला आहे. मनुष्यबळ तेवढेच आहे.