म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड
टंचाईमुक्त महाराष्ट्राच्या उद्देशाने डिसेंबर २०१६ मध्ये राज्य सरकारने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियान या योजनेच्या २०१८-१९ वर्षातील अंमलबजावणीत नाशिक विभागातील प्रशासकीय यंत्रणा सपशेल अपयशी ठरल्या आहेत. या वर्षासाठी निवडलेल्या ११२३ गावांपैकी अवघी १५० गावे जलपरिपूर्ण करण्यात यश मिळाले असून, त्यात जिल्ह्यातील ४८, नंदुरबार जिल्ह्यातील १०१ आणि जळगावमधील अवघ्या एका गावाचा समावेश आहे. उत्तर महाराष्ट्रातील नगर आणि धुळे या दोन्ही जिल्ह्यांतील जलपरिपूर्ती झालेल्या गावांच्या संख्येचा प्रशासनाला वर्षभरात भोपळाही फोडता आलेला नसल्याची वस्तुस्थिती आहे.
२०१८-१९ या वर्षासाठी विभागातील नाशिक जिल्ह्यातील ३०१, धुळे जिल्ह्यातील १५७, नंदुरबारमधील १८०, जळगावमधील २३६ आणि नगर जिल्ह्यातील २४९ गावे निवडण्यात आलेली आहेत. नाशिकमध्ये ५,५२०, धुळ्यात १,७६५, नंदुरबारमध्ये २,६२१, जळगावमध्ये ४,४२६ आणि नगर जिल्ह्यात ६,९१३ अशा एकूण २१ हजार २४५ कामांचा प्रस्तावित आराखड्यात समावेश होता. यापैकी २० हजार ५५३ कामांना प्रशासकीय मंजुरीही देण्यात आली होती. त्यापैकी ९५ टक्के म्हणजेच १९ हजार ४८९ कामांची वर्कऑर्डरही काढण्यात आली होती. गेल्या वर्षभरात विभागातील केवळ १५० गावांतील प्रस्तावित आराखड्यानुसार निश्चित करण्यात आलेली कामे शंभर टक्के पूर्ण झाली आहेत, तर ३६० गावांतील कामे ८० टक्के झाली आहेत. २८८ गावांतील कामे ५० टक्के, ७५ गावांमधील कामे ३० टक्क्यांपर्यंत कामे झालेली आहेत. वास्तविक पाहता, दुष्काळाचा दरवर्षी वाढत जाणारा कालावधी आणि तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाने मुदतीत जलयुक्त शिवार अभियान योजनेत निवडलेल्या गावांतील प्रस्तावित कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा होता. मात्र, कामे वेळेत न झाल्याने प्रशासकीय यंत्रणांतील या योजनेच्या अमंलबजावणीबाबत असलेली उदासीनता आणि टंचाईग्रस्त गावांतील नागरिकांप्रती असलेली असंवेदनशीलता उघड झाली आहे.
मुदतवाढीची खिरापत
जलयुक्त शिवार योजनेच्या अमलबजावणीच्या पहिल्या वर्षापासून ठेकेदारांना कामासाठी मुदतवाढीची खिरापत मिळावी, यासाठी सरकारदरबारी प्रशासनाकडूनच तसे वातावरण निर्माण केले गेले आहे. २०१८-१९ या वर्षासाठीची कामे पूर्ण करण्यासाठीही डिसेंबर २०१९ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत या योजनेच्या कामांवर विभागात १८७ कोटी रुपयांचा निधी खर्चही झाला आहे. विभागातील सर्वच जिल्ह्यांतील शेकडो गावे दुष्काळामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या समस्येने होरपळून निघत असताना जलयुक्त शिवार योजनेची कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने प्रथम प्राधान्य दिले असते तर टंचाईमुक्तीचे उद्दिष्ट काही प्रमाणात सहज साध्य होण्यासाठी हातभार लागला असता. मात्र, नाशिक आणि नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यांचा काहीअंशी अपवाद वगळता उर्वरित जिल्ह्यांतील प्रशासनाकडून जलयुक्त शिवार योजनेच्या अमलबजावणीला दुय्यम स्थान दिल्याची वस्तुस्थिती आहे.
जलयुक्त शिवार प्रगती (२०१८-१९)
जिल्हा-निवडलेली गावे-कामे पूर्ण झालेली गावे-प्रस्तावित कामे-पूर्ण झालेली कामे-खर्च (कोटी रु.)
नाशिक-३०१-४८-५५२०-४४००-७९९७.८७
धुळे-१५७-०-१७६५-१०२९-११८०.९५
नंदुरबार-१८०-१०१-२६२१-११८३-२७६०.२०
जळगाव-२३६-१-४४२६-२३६५-१८९१.०८
नगर-२४९-०-६९१३-४४०७-४८७२.७१
एकूण-११२३-१५०-२१२४५-१३३८४-१८७०२.५१