म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड
\Bएखाद्यावर संकटे चुहूबाजूंनी येतात. पण आयुष्याच्या सायंकाळी सारं काही आलबेल बघण्याच्या दिवसात अशी स्थिती कुणावरही ओढावणे म्हणजे निव्वळ दुर्दैवाचे फासे. एका ७५ वर्षांच्या वृद्धेवर असाच करुण प्रसंग ओढावला आहे. तरुण मुलगा कर्करोगाच्या दुर्धर व्याधीने गमाविल्यानंतर ज्या सुनेवर उरलेल्या आयुष्याची भिस्त ठेवावी, तिनेच राहत्या घराला टाळे ठोकले अन् मयत पतीच्या जर्जर आईला अन्न-वस्त्र अन् निवाऱ्यासाठी घरघर फिरायला लावले. सुनेकडून हे घडलं तर एकवेळ घराघरातील कहाणी म्हणून आपण थोड दुर्लक्षही करू पण, दुसरा डॉक्टर मुलाकडूनही उपेक्षा झाल्याची ही करुण कहाणी आहे हिराबाई श्याम वाघ (वय ७५) यांची. कुटुंब नसल्याने बेघर होणारे अनेक असतात. पण मुलापश्चात त्याच्या कुटुंबाकडून आलेला हा वाईट अनुभव डोळ्यांच्या कडा ओलावतो आहे. \B
बेघर झालेल्या हिराबाई शाम वाघ (वय ७५, रा. मुरली अपार्टमेंट, गोसावीवाडी) या वृद्ध विधवा महिलेवर रेल्वे स्टेशन परिसरात भीक मागून उदरनिर्वाह करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. कधीतरी सून येईल आणि घराचे टाळे उघडेल आणि डोक्यावर पुन्हा एकदा छप्पर मिळेल, या आशेने ती वर्षभरापासून प्रतीक्षा करीत आहे. मुरली अपार्टमेंटमध्येच वास्तव्यास असलेले संतोष श्रीवंत, वृत्तपत्र विक्रेते गौतम सोनवणे यांना ही वृद्ध आजी स्टेशन परिसरात भीक मागताना भेटली. त्यांनी तिला ओळखले आणि विचारपूस केल्यावर धक्कादायक प्रकार समजला. मुलुंड येथील बीएसएनएलमध्ये नोकरीस असलेला त्यांचा मुलगा वाल्मिक वाघ याचा वर्षभरापूर्वी मृत्यू झाल्यावर दशक्रिया विधीच्या दिवसापासून मुरली अपार्टमेंटमधील त्यांच्या राहत्या घराला टाळे लावण्यात आले आहे. तेव्हापासून त्यांची स्नुषा सारिका आणि नातू संजय यांच्याशी हिराबाई यांची भेट झालेली नाही. घराला कुलूप असल्याने हिराबाई वर्षभरापासून स्टेशन परिसरात भीक मागून उदरनिर्वाह करीत आहेत. हिराबाईंच्या मुलाचा दुसरा फ्लॅट जेलरोडला होता. तिथे सुनबाई राहत असल्याचे त्या सांगतात. परंतु, हा फ्लॅट नेमका कोठे आहे याची त्यांना माहिती नाही. त्यांचा दुसरा अविवाहित असलेला मुलगा भरत वाघ डॉक्टर असून, तो दिल्लीला राहतो. त्यानेही आईच्या दशावताराकडे दुर्लक्ष केलं आहे. परकं तर परकं पण, आपलं रक्ताकडून दुर्लक्ष झाल्याने हिराबाई मुलांच्या आठवणींना उजाळा देत अश्रू ढाळत दिवस काढत आहेत.
पैशांचीही चोरी
हिराबाईंना मुलाच्या मृत्यूनंतर अडीच लाख रुपये मिळाले होते. हे पैसे त्यांनी मुलाच्या बॅगमध्ये ठेवलेले होते. ही बॅग त्यांच्यासोबतच होती. दिवाळीच्या वेळी स्टेशनवरून ही बॅग चोरट्यांनी लांबवल्याने त्या निर्धन झाल्या. या बॅगेत मुलाचे घड्याळ आणि सोन्याची एक पोतही होती, असे त्या सांगतात.
सुनेच्या भेटीसाठी तळमळ
सुनेच्या भेटीसाठी वृद्ध हिराबाई तळमळत आहेत. हिराबाईंनी आपली कैफियत नाशिकरोड पोलिसांकडेही मांडली. पोलिसांनी मुरली अपार्टमेंन्टमध्ये त्यांना नेल्यावर घराला कुलुप आढळून आले. पोलिसांनी कुलूप तोडण्यास नकार दिल्याने हिराबाईंची होती नव्हती ती आशा धुळीला मिळाली. रेल्वे स्टेशनवरील पोलिस त्यांना दररोज हाकलून देतात. सुनेला शोधण्यासाठी हिराबाईंनी जेलरोडला जावून तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यात त्यांना यश मिळाले नाही. पोलिसांनीही केवळ फोनवर संपर्क साधण्यापलीकडे मदत केली नाही.
मोठ्या मुलाचा मृत्यू झाल्यापासुन सूनबाई नातवंडांना घेऊन घराला कुलूप लावून निघून गेली. भरत नावाचा लहान मुलगाही दिल्लीला राहतो. पैशांत लोळत होते आता वर्षभरापासून भीक मागून खाते. सून आणि नातवंडांची वाट बघते आहे."
-हिराबाई वाघ
पीडित महिला