-लॉन्स, मंगल कार्यालयांना पोलिसांचे निर्देश -वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पाऊल म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक शहर परिसरातील लॉन्स आणि मंगल कार्यालयांमुळे निर्माण होणारा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न, तसेच वाहतुकीची कोंडी याची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. त्यामुळेच विवाहाची तारीख पोलिस स्टेशनला आगाऊ कळवावी, असे सक्तीचे निर्देश पोलिसांनी दिले आहेत. त्यामुळे विवाहाच्या दिवशी त्याठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवतानाच वाहतुकीचेही योग्य नियोजन केले जाईल, असा पोलिसांचा कयास आहे. तसेच, विविध निर्देशांचे पालन न झाल्यास व्यवस्थापक व संचालकांवर कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. शहरातील मुख्य रस्त्यांलगत तसेच महत्त्वाच्या चौकांमध्ये मंगल कार्यालये आणि लॉन्स आहेत. त्यातच सध्या लग्नसमारंभ धूमधडाक्यात सुरू आहेत. मात्र, याठिकाणी सोहळे सुरू असताना अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. खासकरुन मौल्यवान ऐवजाची चोरी, महिलांचा विनयभंग यांसारखे गुन्हे घडत आहेत. शिवाय, वाहतुकीची कोंडी वाढतच आहे. पार्किंगची सुविधा नसल्याने रस्त्यावर उभी केली जाणारी वाहने आणि त्यामुळे वाहतुकीवर पडणारा ताण, मिरवणुकीवेळी वाहनांना उपलब्ध न होणारा रस्ता ही बाब शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी ठरत आहे. या सर्वांची गंभीर दखल शहर पोलिसांनी घेतली आहे. त्यामुळेच लॉन्स, मंगल कार्यालये, हॉलच्या संचालक तसेच व्यवस्थापकांना त्या-त्या पोलिस स्टेशनच्या ठिकाणी बैठकीसाठी बोलावून विविध निर्देश देण्यात आले आहेत. या सर्व निर्देशांचे पालन झाले नाही तर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. हे आहेत निर्देश! - लॉन्स, कार्यालय किंवा हॉलमध्ये सीसीटीव्ही सक्तीने लावावेत - डीजेला पूर्णपणे बंदी - लाऊडस्पीकर लावायचा असेल तर त्याची रितसर परवानगी घ्यावी लागेल - वाहतुकीच्या नियोजनासाठी ट्रॅफिक वॉर्डन नेमावेत - वाहनांचे पार्किंग कार्यालय किंवा लॉन्सच्या जागेतच असावे - औरंगाबाद रोडवरील मिरवणुकींना बंदी -अन्य ठिकाणी मिरवणुकीसाठी १/३ जागा वापरता येणार लॉन्स व मंगल कार्यालयांनी पोलिसांच्या सूचनांचे सक्तीने पालन करावे. वाहतूक कोंडी आणि नागरिकांची सुरक्षा यासाठी ते महत्त्वाचे आहे. - सूरज बिजली, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, आडगाव
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट